Monday, July 30, 2012

वाचणा-याची रोजनिशी

११ फेब्रुवारी
आज पुस्तक प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी लवकरच ते पाहायला गेलो. कुणीही आलेलं नव्हतं. त्यामुळे मला सर्व पुस्तकं निवांत पाहता आली. आधी बंगाल डिव्हायडेड-१९३८ टू १९४७हे पुस्तक घेतलं. नंतर भारतातल्या एका ब्रिटिश नोकरशहाचं-आर्किटेक्टचं चरित्र घेतलं. पण ज्यामुळे खूप आनंद व्हावा, असं एकही पुस्तक मिळालं नव्हतं. शिवाय या दोन्हीपैकी पहिलं सीकॅटेगेरीतलं म्हणजे १२० रुपयांना तर दुसरं डीकॅटेगेरीतलं म्हणजे ५० रुपयांना होतं. त्यामुळे तीच घेण्याच्या विचारात होतो, तोच द प्लेजर्स ऑफ रीडिंगहे अण्टोनिया फ्रेझर या लेखिकेने संपादित केलेलं पुस्तक मिळालं. प्रत थोडी कराब झालेली होती, पण पुस्तक चांगलं होतं. यात ४० वेगवेगळ्या लेखकांनी आपल्या वाचनाविषयी लेख लिहिले आहेत. त्यांना पूरक अशी उत्कृष्ट चित्रं ४० चित्रकारांनी काढलेली आहेत. रॉयल आकाराचं हे आर्टपेपरवर छापलेलं आणि संपूर्ण रंगीत असलेलं पुस्तक फारच सुंदर आहे. त्यातील लेखकांनी आपल्या वाचनावर झालेला घरचा - आजूबाजूच्या वातावरणाचा, सहवासातल्या लोकांचा-शिक्षकांचा - परिणाम, मनावर परिणाम करून गेलेली पुस्तकं, प्रभावित केलेली पुस्तकं याविषयी समरसून लिहिलं आहे. त्या त्या लेखाला चित्रकारानं अतिशय सुंदर चित्रं काढली आहेत. पुस्तकांचं महत्त्व, त्यांचे उपयोग आणि त्यांची फँटसी याविषयीची ही चित्रं बेहद्द अप्रतिम म्हणावी अशी आहेत. शिवाय प्रत्येक लेखकानं लेखाच्या शेवटी माझी आवडती पुस्तकं म्हणून दहा पुस्तकांची यादी दिली आहे. काहींनी तीच का आवडली, याची कारणमीमांसा केली आहे, तर काहींनी आवडती दहा पुस्तकं सांगणं कठीण आहे, तरीही फार विचार करून ही दहा नावं देत आहे, असा अभिप्राय दिला आहे. हे पुस्तक वर्गातलं असल्यानं त्याची किंमत २५० रुपये होती. अर्थात ते ६०० रुपयांना असतं तरी मी घेतलंच असतं म्हणा. मग आधीची दोन्ही पुस्तकं टाकून देऊन हे एकच पुस्तक घेतलं आणि आनंदानं ऑफिसाला परतलो.
१२ फेब्रुवारी
अलीकडच्या काळात अगदी भरमसाठी म्हणावी इतकी पुस्तकं विकत घेतली. वाचलीही तशीच अधाशासारखी. त्यामुळे इंग्रजीतल्या अनेक नव्या लेखकांच्या आणि परकीय भाषांतल्या कितीतरी मान्यवर लेखकांच्या ओळखी झाल्या. हा ग्रंथसंचय भरपूर आनंद देणारा ठरला. आपलं अजून लग्न झालेलं नाही, वयाच्या या टप्प्यावरही आपण लग्नाविषयी फार गंभीर नाही आणि लग्न न होण्याचं वैषम्यही वाटत नाही, याचं मुख्य कारण म्हणजे मैं और मेरी किताबें’!
१४ फेब्रुवारी
काही पुस्तकं पुन्हा पुन्हा भेटत राहतात. प्रदीप सॅबॅस्टीयन या पुस्तकप्रेमी लेखकाविषयी पहिल्यांदा ऐकलं ते जयप्रकाश सावंतांकडून. मग त्यांचे द हिंदूमधील लेख वाचायचा सपाटा लावला. अतिशय सुंदर लेख लिहितो हा माणूस! एके दिवशी सावंतांनी सांगितलं की, सॅबॅस्टीयन यांचं पुस्तक आलं आहे. मग ते फ्लीपकार्टवरून मागवलं. ‘द ग्रोनिंग शेल्फ अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ बुक लव्हहे त्यांचा वाचन, ग्रंथसंग्रह आणि ग्रंथांविषयीच्या ग्रंथांविषयीचा लेखसंग्रह आहेही उत्तम. त्याची निर्मितीही प्रकाशकानं चांगली केली आहे. या पुस्तकाच्या शेवटी पूरक वाचनासाठी संदर्भग्रंथांची यादी दिली आहे. त्यातली एक्स लिब्रिस’, ‘द मॅन हू लव्हड बुक्स टू मच’, ‘८४ चेरिंग क्रॉस रोड’, ‘द बुक ऑफ लॉस्ट बुक्स’, ‘हिस्ट्री ऑफ रीडिंगअशी काही पुस्तकं आपल्या संग्रही आहेत आणि ती आपण यापूर्वीच वाचली आहेत, याचं समाधान वाटलं. पण इतर काही पुस्तकं मात्र वाचलेली नाहीत आणि ती आपल्या संग्रहीपण नाहीत, याचं वाईटही वाटलं. त्यामुळे ती आता एकेक करून मागवायची, असं ठरवलं.
१५ फेब्रुवारी
पाशा पिंपळापुरे यांनी मागच्या महिन्यात अमेरिकेहून येताना माझ्यासाठी पॅशन फॉर बुक्सहे पुस्तक आणलं होतं. ते त्यांनी मला ६ फेब्रुवारीला दिलंही. पण त्यांनी ते आधीच वाचायला सुरुवात केली होती. त्यामुळे तेच त्याच्या प्रेमात पडले. पुस्तक देताना ते मला म्हणाले, ‘‘हे पुस्तक आणलंय तुझ्यासाठी, पण सध्या मीच ते वाचतोय. खूपच छान पुस्तक आहे. मलाही आवडलंय. माझं एक प्रकरण वाचून व्हायचं आहे, ते झालं की पुस्तक तुला देतो. दरम्यान या पुस्तकावर तुझं नाव लिहून ठेव.’’ मला पुस्तकावर स्वत:चं नाव लिहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी विकत घेतलेल्या कोणत्याही पुस्तकावर - मग ते नवे असो की जुने - स्वत:चं नाव लिहीत नाही. पण हे पुस्तक परत आपल्या ताब्यात येईल की नाही, या धास्तीपोटी त्यावर मी नाव लिहून ते परत पिंपळापुरेंना वाचायला दिलं.
पण या पुस्तकाचा किस्सा भारी आहे. ‘पॅशन फॉर बुक्सबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं ते नीतीन रिंढे यांच्याकडून. गेल्या वर्षी त्यांनी त्यावर एक लेखही लिहिला. नंतर त्यांनी मला ते पुस्तक वाचायला दिलं. पुस्तक फार मस्त होतं. मग मी ते शोधायचा प्रयत्न केला. पण ते आता आऊट ऑफ प्रिंट झालं होतं. त्यामुळे निराश होऊन मी त्याचा पिच्छा सोडला. काही दिवसांनी या पुस्तकाची महती उन्मेष अमृते या मित्रापर्यंत गेली. तोही त्याच्या प्रेमात पडला. पण त्यालाही ते मिळेना, तेव्हा त्याने ते अमेरिकेतल्या मित्राकडून मागवायचं ठरवलं. तेव्हा त्याने माझ्यासाठीही एक प्रत मागवली. या दोन्ही प्रती हार्ड बाऊंड होत्या. नीतीन रिंढेंकडची प्रत मात्र पेपरबॅक होती. अमृतेने मागवलेल्या प्रती महिनाभरात आल्या. माझी प्रत त्याने रिंढेंकडे दिली. पण रिंढेंनी माझी हार्ड बाऊंड प्रत स्वत:कडेच ठेवून मला स्वत:कडची पेपरबॅक प्रत दिली. रिंढे मित्रच असल्याने मला काही बोलता आलं नाही. पण मी नाही म्हटलं तरी थोडा नाराज होणार, हे त्यांनी आधीच हेरून स्वत:कडची इतर दोन-चार पुस्तकं मला भेट दिली. ती पुस्तकं चांगली होती. त्यामुळे ही तडजोड मी मान्य केली.
पॅशन फॉर बुक्सची एक प्रत असताना पुन्हा त्याचीच दुसरी प्रत पिंपळापुरेंनी भेट दिली. तेव्हा माझ्याकडे हे पुस्तक आहे, असं मी त्यांना अजिबात सांगितलं नाही. कशाला सांगा? आपल्या आवडत्या पुस्तकाच्या एकापेक्षा जास्त प्रती संग्रही असलेल्या बऱ्याच. शिवाय मित्रांनी प्रेमाने दिलेल्या भेटीचा अनमान का करायचा? उन्मेषला मी पुस्तकाचे पैसे देऊ केले, तेव्हा तो तडकून म्हणाला होता, ‘‘लेका, फार पैसे झाले का तुझ्याकडे?’’ फार पैसे झाले नाही पण एकाच पुस्तकाच्या दोन प्रती झाल्या ना!
१९ फेब्रुवारी

एक्स लिब्रिसया अॅनी फीडमनच्या पुस्तकाविषयी पहिल्यांदा अरुण टिकेकरांच्या अक्षरनिष्ठांची मांदियाळीया पुस्तकात वाचलं होतं. त्यानंतर दोनेक वर्षानी एक्स लिब्रिसप्रत्यक्षात पाहायला मिळालं ते जयप्रकाश सावंतांकडे. मग ते झपाटल्यासारखे वाचून काढलं. अॅनीनं अतिशय जिव्हाळ्यानं पुस्तकांविषयी, तिच्या संग्रहाविषयी आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणींविषयी लिहिलं आहे. यातला मॅरिइंग लायब्ररीहा पहिला लेख लेख तर केवळ अप्रतिम आहे. अॅनी आणि तिचा नवरा दोघांचाही ग्रंथसंग्रह एकाच घरात स्वतंत्र असतो. लग्न झालं, मुलं झाली, तेव्हा अॅनीला वाटलं की, आपण आता एकजीव झालेले पती-पत्नी आहोत, मग आपला ग्रंथसंग्रह तरी का स्वतंत्र ठेवायचा? तोही एकत्र करून टाकू. पण तो एकत्र करताना धम्माल उडते. दोघांच्या त - हा वेगवेगळ्या. त्यामुळे ग्रंथांचं सामिलीकरण करताना मतभेद होतात. पण प्रचंड चर्चा, वाद होऊन शेवटी ग्रंथसंग्रह एकत्र केला जातोच. अॅनी लेखाच्या शेवटी लिहिते, ‘हीज बुक्स अॅण्ड माय बुक्स आर नाऊ अवर बुक्स. वुई आर रिअली मॅरिड!’
हे पुस्तक वाचलं खरं, पण त्याच्या शीर्षकाचा काही तेव्हा उलगडा झाला नाही. अलीकडे पाशा पिंपळापुरे यांनी पॅशन फॉर बुक्सहे पुस्तक भेट दिलं. अमेरिकेत दोन-तीन महिने लेकीकडे असताना त्यांनी ते हाफ प्राइज असणाऱ्या एका पुस्तकाच्या दुकानात घेतलं होतं. हे पुस्तक सेकंडहॅण्ड आहे. मात्र तरीही त्याची प्रत फारच चांगली आहे. अगदी नवी म्हणावी अशी. आधी हे पुस्तक ज्याचं होतं, तो उत्तम वाचक असावा आणि ग्रंथप्रेमीही. त्यामुळे त्याने हे पुस्तक फार जपून वाचलं. विकताना त्यावर आपली नाममुद्रा नोंदवून ठेवली. ती अशी - ‘एक्स लिब्रिस - डॅनिअल आर. विंटरिच.’ म्हणजे हे पुस्तक विंटरिंच यांच्या मालकीचं होतं. तेव्हा मला अॅनीच्या एक्स लिब्रिसया पुस्तकाच्या शीर्षकाचा उलगडा झाला. हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ अमूकच्या मालकीचंअसा आहे. इंग्रजीमध्ये अनेक लेखक-ग्रंथालयं त्यांनी विकत घेतलेल्या नव्या-कोऱ्या पुस्तकावर एक्स लिब्रिस..’ असा स्टिकर लावतात. त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. या स्टिकरवर पुस्तकाशी संबंधित एक चित्र असतं. त्या चित्राच्या वरच्या बाजूला एक्स लिब्रिसहे दोन शब्द आणि चित्राच्या खाली ज्याचं ते आहे त्याचं नाव असतं.
२१ फेब्रुवारी
आज फ्लीपकार्टवरून मागवलेली दोन पुस्तकं आली. त्यातील पहिलं आहे अर्नोल्ड बेनेट या लेखकाचं हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’. हे पुस्तक १९०८ साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. या पुस्तकाविषयी पहिल्यांदा वाचलं होतं, ते प्लेजर ऑफ रीडिंगमध्ये. त्यात मायकेल फूट या लेखक-राजकारण्याने अनरेल्ड बेनेटच्या हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डेआणि लिटररी टेस्ट : हाऊ टु फॉर्म इटया दोन पुस्तकांचा उल्लेख केला आहे. ही दोन्ही पुस्तकं, पुस्तिका म्हणाव्यात इतकी छोटी आहेत. जेमतेम शंभरेक पानांची. पण फूटने त्यांचं खूपच कौतुक केलं आहे. फूट लिहितात, ‘आय डू थिंक दॅट लिटल बुक, लिटरली, चेंजज्ड माय लाइफ’.
दुसरं आलेलं पुस्तक आहे पलाश कृष्ण मेहरोत्राचं द बटरफ्लाय जनरेशन’. या पुस्तकाविषयी फ्लीपकार्टवर पहिल्यांदा न्यू रिलिजया विभागातली पुस्तकंपाहताना वाचलं होतं. पण आपल्या आवडीचा विषय नाही म्हणून ते दोन-चार वेळा पाहून सोडून दिलं होतं. पंधरा दिवसांपूर्वी त्यावर इंडियन एक्स्प्रेसमध्ये परीक्षण आलं. ते फार छान लिहिलं होतं. त्यामुळे त्याविषयीची उत्सुकता पुन्हा चाळवली गेली. मागच्या आठवडय़ात ते फ्लीपकार्टवर पाच-सात वेळा पाहिलं. मग एकदाचं परवा मागवून टाकलं. आज आलंही. या पुस्तकाच्या फ्लॅपवर लिहिलं आहे, ‘‘हाफ ऑफ इंडियाज पॉप्युलशन इज अण्डर द एज ऑफ ट्वेन्टी फाइव्ह. इन २०२०, द अव्हरेज पर्सन इन इंडिया विल बी ओन्ली २९ इयर्स ओल्ड, कम्पेअर्ड विथ ४८ इन जपान, ४५ इन वेस्टर्न युरोप अॅण्ड ३७ इन चायना अॅण्ड द युनायटेड स्टेटस.’’ आजच्या भारतीय तरुणांना पलाशने टेक्नीकुलर यूथअसं म्हटलं आहे.
ही दोन्ही पुस्तकं पाशांनी पाहिली तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू असली पुस्तकं कशाला घेतोस? ती फार ऑर्डिनरी आहेत.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘पलाश कृष्ण मेहरोत्राचं पुस्तक आजच्या तरुणाईविषयीचं आहे. म्हणून मी ते मागवलं आहे. तर अनरेल्ड बेनेटच्या हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डेविषयी मायकेल फूटने प्लेजर्स ऑफ रीडिंगमधल्या लेखात असं म्हटलंय की, या पुस्तकानं माझं आयुष्य बदलवलं. फूट हा काही ऑर्डिनरी माणूस नाही.’’ त्यावर पाशा म्हणाले, ‘‘फूट मार्क्सवादी होता. तो एमपी होता. लंडनचा पंतप्रधान होता होता राहिला. त्यानं असं म्हटलंय म्हणजे ते पुस्तक नीट वाचलं पाहिजे. नंतर मला वाचायला दे.’’

Monday, July 23, 2012

कर्त्या जातीचा मागोवा

आमच्या 'मराठा समाज' या पुस्तकावर महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवनित (२२ जुलै २०१२) ,
प्रतिमा जोशी यांनी लिहिलेले परीक्षण.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्राचा विचार मराठ्यांना वगळून करता येणार नाही याबाबत बव्हंश समाजशास्त्रज्ञांचे आणि राजकीय विश्लेषकांचे दुमत नाही. इथे जातीचे मराठे नव्हे , तर मराठा जातीचे लोक अभिप्रेत आहेत. ती जशी महाराष्ट्राची सत्ताधारी जात आहे , तशी समाजजीवनावर प्रभाव टाकणारीही आहे का याबाबत मात्र मतांतरे असू शकतात. राम जगताप आणि सुशील धसकटे यांनी संपादित केलेल्या " मराठा समाजः वास्तव आणि अपेक्षा " या पुस्तकात त्याचे दाखले मिळतात. 

या संपादकीय जोडीचे मनोगतच त्या दृष्टीने बोलके आहे. ते म्हणतात की , हल्ली मराठा समाज आपल्या गतेतिहासाबद्दल आणि इतिहास पुरुषांबद्दल फार संवेदनशील आणि हळवा बनला आहे. ही काही प्रगल्भतेची निशाणी नाही. उलट तो प्रगतीला अडसरच असतो. मराठा तरुणांनी आत्मपरीक्षणाला सिद्ध व्हावे हा या पुस्तकामागचा उद्देश आहे. संपादक असेही म्हणतात की , आपल्याच समुहाचा कळप करून राहण्यात कोणताच शहाणपणा नाही , त्यातून आत्मोन्नती तर साधणार नाहीच , मग समाजपरिवर्तन तर फारच दूरची गोष्ट. किमान स्वतःच्या प्रगतीसाठी तरी मराठ्यांनी अनिष्ट रूढींना मूठमाती द्यावी असेही ते म्हणतात. त्या दृष्टीने डॉ. बाबा आढाव , डॉ. आ. ह. साळुंखे , प्रा. रंगनाथ पठारे , डॉ. भा. ल. भोळे , शांताराम पंदेरे , प्रा. सदानंद मोरे , प्रा. शेषराव मोरे , प्रा. प्रकाश पवार , बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबरोबरच डॉ. कुमार सप्तर्षी आणि वरुणराज भिडे तसेच गेल्या शतकातील परखड लेखिका ताराबाई शिंदे यांचे पूर्वप्रकाशित लेख या पुस्तकात संग्रहित केलेले आहेत. हे पुस्तक म्हणजे महत्वाचा वैचारिक ठेवा असले तरी प्र्रा. सदानंद मोरे यांची प्रस्तावना वगळता सर्वच लेख किमान १० आणि कमाल १०० वर्षांपूर्वीचे आहेत.

या लेखांमधील मराठ्यांच्या सामाजिक जीवनाचे आणि समजुतींबद्दलचे वास्तव काही प्रमाणात आजही तसेच असले तरीही ग्रथित करताना भिडे आणि शिंदे वगळता त्याच लेखकांकरवी त्यांना वर्तमानाची जोड देणे अपेक्षित होते. कालपरवापर्यंत राखीव जागांना प्राणपणाने विरोध करणाऱ्या मराठा समाजाने गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा सध्या अगदी लावून धरला आहे. या आरक्षणाचा काय जो निर्णय होईल तो होईल (बहुधा होईलच) , परंतु यानिमित्ताने मराठ्यांमध्ये गरिबी आहे ही बाब कुळीचा अभिमान बाळगणाऱ्या या जातीच्या पुढाऱ्यांनी काही कारणाने स्वीकारलेली दिसते. या गरिबीची कारणमीमांसा करत बसण्यापेक्षा थेट आरक्षणच मागण्याचे काय कारण असू शकते ? शेतजमिनीवरून गरीब मराठा हलाखीत निघालेला असला तरी तो सहसा इतरांचे नेतृत्व का स्वीकारत नाही ? या प्रश्नांबरोबरच महाराष्ट्रात एकंदरच समाजपरिवर्तनाची प्रक्रिया मंदावली आहे. स्त्रीभ्रूणहत्या केवळ खात्यापित्या मराठ्यांच्यातच नव्हे तर लेवा पाटलांपासून अनेक मध्यम जाती , अगदी ऊसतोडणी कामगारांपर्यंत बळावलेल्या असणे , स्वकर्तृत्वावर उभ्या राहू शकणाऱ्या महिला सत्ताकारणातून बाद होणे , दलित आणि अल्पसंख्याकांवरील हल्ले ही त्याचीच लक्षणे आहेत.

मराठा तरुण गतेतिहासाबद्दल हळवा बनला आहे हे संपादकांचे मतही त्यांनी हळवा हा शब्द वापरल्याने तपासून घ्यायला हवे. गेल्या सत्तरएक वर्षांत बहुजनवादी राजकारणाची चर्चा खूप झाली. या संपूर्ण कालावधीत मराठा नेतृत्वाने वेळोवेळी घेतलेली भूमिका पाहिली तर या तपासाचे एक टोक हाती लागते. विशेषतः मंडलोत्तर राजकारणात ओबीसींनी स्वतःसाठी जागा करून घेतल्यानंतर मराठे जात म्हणून अधिक सजग झाल्याचे दिसते. इतिहासाचा वापर हा त्याचाच एक भाग आहे. गरीब मराठे किंवा कुणब्यांना हे समजते तरीही त्यांना ते मंजूर असते याचे विश्लेषण याच पुस्तकातील बाबा आढाव , सदानंद मोरे , भा. ल. भोळे यांच्या लेखात सापडू शकते. विठ्ठल रामजी शिंदे आणि जागृतीकार पाळेकर यांनी तेच किती तरी आधी मांडलेले दिसते. 


उदारीकरणानंतर बदललेल्या राजकारणावर वित्ताचा म्हणजे पैशांचा प्रभाव आहे. राजकारणाचा पारंपरिक साचा बदलला आहे. इतरांच्या खांद्यावर बसून गावचे पुढारपण करणाऱ्यांना हे समजत नाही असे म्हणता येत नाही. एकंदर समाजावरील राजकारणाचा प्रभाव कमी होत जाताना सामाजिक आणि आर्थिक प्रभाव निर्माण करण्यास गत्यंतर उरत नाही. संपादकांना जे परिवर्तन व्हावेसे वाटते ते आणि वर्तमान वास्तव परस्परांच्या विरोधात आहे. " राजकीय सत्तास्थाने हे अंतिम ध्येय मानून ज्या जाती किंवा जातीसमूह प्रयत्न करीत आहेत , त्यांना त्या स्थानांवर प्रत्यक्ष पकड मिळवता येईल , तेव्हा माश्याही मारीत नाही आणि लाजही झाकत नाही , असे शेळीचे शेपूट आपल्या हाती आले आहे , असे त्यांना आढळेल " ज्येष्ठ राजकीय पत्रकार वरुणराज भिडे यांनी मे १९९९मध्ये लिहिलेल्या लेखाचा हा समारोपाचा परिच्छेद या संपादित पुस्तकातीलही अखेरचा परिच्छेद आहे. तो केवळ नवी राज्यव्यवस्था किंवा बहुजन राजकारण यावरच नव्हे , तर मराठ्यांच्या चाणाक्षपणावरही प्रकाश टाकतो.

या स्थितीत संपादकांना जी परिवर्तनाची कळकळ आहे ती प्रत्यक्षात यायची तर ताराबाई शिंदेंसारख्या धीट बायामाणसांतर्फेच वैचारिक फटकारे बसले तर कदाचित येईल. कारण बदलाची गरज सर्व महिलांप्रमाणे मराठा महिलांना जास्त आहे. मग या पुस्तकात चालू शतकातील एकाही विचारी महिलेला चार पाने मिळू नयेत याचे आश्चर्य वाटून राहते. असो. तरीही महाराष्ट्रातील कर्त्या जातीने हे पुस्तक किमान एकदा तरी वाचावे याबाबत दुमत नसावे.

मराठा समाजः वास्तव आणि अपेक्षा
संपादकः राम जगताप , सुशील धसकटे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन , पुणे
पाने 
: २२६ , किंमतः २०० रूपये

Monday, July 16, 2012

नेमाडे पंचाहत्तरीत, ‘कोसला’ पन्नाशीत!

वयाच्या पंचविसाव्या वर्षी ‘कोसला’सारखी सशक्त कादंबरी लिहिणाऱ्या डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे, तर ‘कोसला’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीनेही सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे. ‘कोसला’ सलग तीन पिढय़ा वाचली जात असतानाच नेमाडय़ांची गेल्या वर्षी ‘हिंदू’ ही ‘हिंदू’ या संकल्पनेचीच पुनर्माडणी करणारी नवी कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यानिमित्ताने हा खास लेख...
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी 24 मे रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे, तर त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी लिहिलेली ‘कोसला’ ही कादंबरी लवकरच सुवर्णमहोत्सवी वर्षात पर्दापण करेल. मुख्यत: कादंबरीकार आणि कादंबरी-समीक्षक अशी नेमाडय़ांची ओळख सांगता येईल. पण नेमाड्यांविषयी साहित्यक्षेत्रात आणि साहित्याबाहेरच्या जगात ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ आहे. त्यामुळे वाद, टीका, कौतुक, हेटाळणी आणि द्वेष आजवर नेमाडे यांच्या वाटय़ाला आलेले आहे. त्यातून त्यांच्या कादंब-याही सुटलेल्या नाहीत. ‘कोसला’विषयी आजही असलेली उलटसुलट चर्चा आणि गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘हिंदू’विषयी अहमहमिकेने होत असलेले वाद, यातून ते स्पष्ट होते. 

नेमाडे यांचे शत्रूही खूप आहेत. आपल्या फटकळ बोलण्याने ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. सत्य बोलण्याची मोठी किंमत दर वेळीच मोजावी लागते. ती नेमाडे मोजत आलेत. पण त्यामुळे एकंदर मराठी साहित्याचं भलंच झालेलं आहे. साहित्यातल्या भोंदूगिरी, चापलूसगिरीला काही प्रमाणात तरी आळा बसला आहे. एकमेकांची तळी उचलणारे आणि नैतिक पातळीवर भ्रष्ट असलेले लोक समाजाचं, साहित्याचं पुढारपण करायला पुढे सरसावत असतात. त्यांना नेमाडे आपल्या एक-दोन फटका-यांनी ब-याचदा गारद करतात. ‘नेमाडपंथी दहशतवाद’ या शब्दाची निर्मिती त्यातूनच झाली आहे.

‘कोसला’नं तीन पिढय़ांवर आपला प्रभाव काही प्रमाणात का होईना कायम ठेवला आहे. आज पन्नाशी-साठीत असलेले लोक एकेकाळी ‘कोसला’नं खूप भारावून गेले होते. त्यांच्या तारुण्यात त्यांनी ही कादंबरी वाचली, तेव्हा त्यांच्यावर तिचा जो प्रभाव पडला, तो आजही काही प्रमाणात कायम आहे. ‘कोसला’, तिचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती याचा ‘कोसला’तलाच आलेख प्रमाण मानल्यामुळे या लोकांचं आकलन कसं राहिलं आणि आजही जे तरुण ‘कोसला’नं प्रभावित आहेत, त्यांचंही आकलन कसं आहे, याचा कुणीतरी सविस्तर अभ्यास करायला हवा. स्वातंत्र्यानंतर शिक्षणासाठी शहरात आलेल्या पहिल्या पिढीच्या मनोवस्थेचं चित्रण ‘कोसला’मध्ये आहे. त्यामुळे ती महाविद्यालयीन काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला आवडते.
'कोसला'ची चवथी आवृत्ती. यात 'कोसला'चा लेखनकाळ २४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर १९३८ असा दिला आहे.

अपूर्व, द्रष्टी कादंबरी
जानेवारी 2000 मध्ये मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं ‘गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी’ या विषयावर एक चर्चासत्र घेण्यात आलं. त्यात गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ मराठी कादंबरी म्हणून ‘कोसला’चा आणि कादंबरीकार म्हणून नेमाडे यांचा गौरव काही समीक्षकांनी केला होता.

‘कोसला’विषयी पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते अशोक केळकर यांच्यापर्यंत अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा ‘कोसलाबद्दल’ हा समीक्षालेखांचा संग्रहही प्रकाशित झाला आहे. आकाशवाणी मुंबईनं  भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं ‘1947 ते 1997-सर्वोत्कृष्ट 10’ पुस्तकं अशी स्पर्धा घेतली होती. त्यात महाराष्ट्रभरातल्या वाचकांनी आपली पसंती कळवली. त्यात वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ला पहिला तर ‘कोसला’ला दुसरा क्रमांक मिळाला. 

ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव या कादंबरीबद्दल म्हणतात, ‘‘कोसला ही अपूर्व कादंबरी, द्रष्टी कादंबरी म्हणता येईल काय? वास्तवाकडे ती वेगळ्या नजरेने पाहते, सखोलपणे पाहते, मनुष्य जीवनाच्या अस्तित्वाच्या मूलभूत प्रवृत्तीच्या व आकांक्षांच्या परिप्रेक्ष्यात पाहते; मार्मिकपणे, स्वतंत्रपणे व काही एक नैतिक मूल्यभानाने पाहते व या प्रकारचे तिचे पाहणे एक प्रकारचे द्रष्टेपण ठरते, असे म्हणता येईल. सुजाण वाचक व समाज या दोहोंना अवतीभवतीच्या वास्तवाचे आकलन करण्याची डोळस दृष्टी ही कादंबरी देते, हेही खरे आहे.’’ पण कोसला पूर्णत्वाने द्रष्टेपण देत नाही, असाही निर्वाळा   रा. ग. जाधव देतात.थोडक्यात ‘कोसला’ आणि नेमाडे यांचा सत्तरीतल्या कादंबरी आणि कादंबरीकारांवर मोठा प्रभाव आहे.

पण साहित्याचे प्राध्यापक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काही पत्रकार यांच्यापलीकडच्या समाजावर ‘कोसला’चा काही प्रभाव पडला आहे का? जे लोक गंभीर वाचनाचे भोक्ते आहेत, त्यांच्या ‘कोसला’विषयीच्या काय प्रतिक्रिया आहेत? ‘कोसला’ ज्या पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये घडते, तेथील सध्याच्या किती विद्यार्थ्यांनी ती वाचली आहे? याचा आता तरी कुणा जाणकारानं अभ्यास करायला हवा.

‘हिंदू’ संकल्पनेची पुनर्मांडणी
 गेली पंचवीस-तीस वर्ष येणार येणार म्हणून चर्चेत असलेल्या नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरी चतुष्टयाचा पहिला भाग गेल्या वर्षी प्रकाशित झाला. ‘हिंदू’चे अजून तीन भाग प्रकाशित व्हायचे आहेत, त्यामुळे त्याविषयी आताच काही ठोस विधान करणे बरोबर नाही. पण ‘हिंदू’ या संकल्पनेची पुनर्माडणी करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे यासंदर्भात नेमाडे यांनीच ‘हिंदू’च्या प्रकाशनाआधी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

‘हिंदू’ प्रकाशित झाल्यापासून त्यावर बोलण्याची, लिहिण्याची अहमहमिकाच महाराष्ट्रात सुरू झाली आहे. गेल्या दीडेक वर्षात हिंदूवर लिहिल्या गेलेल्या लेखांचे पाच-सहाशे पानांचे स्वतंत्र पुस्तकच होऊ शकेल. याशिवाय औरंगाबाद आणि नांदेड इथं ‘हिंदू’वर चर्चासत्रं झाली. या निमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली की, ‘हिंदू’कडे आपली वैयक्तिक मतं, राग-लोभ, पूर्वग्रह, संस्कार यापलीकडे जाऊन पाहू शकतील असा आवाका मराठी समीक्षकांकडे नाही. त्यामुळे ‘हिंदू’ची यथायोग्य समीक्षा अजून तरी होऊ शकलेली नाही. 

‘हिंदू’ची समीक्षा करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं ‘खंडेराव, अडगळ आवरत जा राव!’ हा सुहास पळशीकर यांचा, ‘हिंदू : एक महाकथन’ हा विनय हर्डीकर यांचा आणि ‘हिंदू कशी वाचावी?’ हा डॉ. सदानंद मोरे यांचा लेख, असे तीनच लेख करतात. पळशीकर-हर्डीकर यांनी राजकीय-सामाजिक दृष्टिकोनातून ‘हिंदू’कडे पाहिले आहे, तर मोरे यांनी ‘‘हिंदू धर्म नावाच्या चमत्कारिक चीजेला इतक्या विविध अंगांनी भिडणारी, अभ्यासाचा पाया आणि वास्तवाची चौकट न सोडता सिद्ध झालेली ही कलाकृती सध्या तरी एकमेवाद्वितीयच म्हणावी लागेल’’, असे लिहून ‘हिंदू’चा परिप्रेक्ष्य नेमका काय आहे, याची दिशा सांगितली आहे. मोरे सांगतात त्या पार्श्वभूमीवर ‘हिंदू’ समजून घ्यायची तर मराठी समीक्षकांना खूपच अभ्यास करावा लागेल. तशी तयारी आणि क्षमता निदान सध्यातरी कुणा मराठी समीक्षकामध्ये आहे, असे दिसत नाही. त्यामुळे ‘हिंदू’ची सम्यक आणि समग्र समीक्षा व्हायला पुढची 25-30 वर्षे लागणार.

तोवर ‘कोसला’ टिकून राहिल का? आणि राहिली तर ते नेमाडे यांना स्वत:ला तरी आवडेल का हाही प्रश्न आहे. पण नेमाडे यांनी ‘हिंदू’चे उर्वरित भाग लवकरात लवकर लिहून प्रकाशित करावेत, असे नक्की वाटते.

कुचकामी आणि निरुपयोगी परिभाषा
कादंबरीलेखनाबरोबरच नेमाडे यांनी समीक्षालेखनात जे योगदान दिलेलं आहे, त्याचीही सम्यक चर्चा होण्याची गरज आहे. विद्यापीठीय पातळीवरील मराठी समीक्षा ही कुचकामी आणि निरुपयोगी परिभाषेत अडकून पडल्याने ती कधीचीच कालबाह्य झाली आहे. या प्राध्यापकी भाषेनेच मराठी भाषेच्या प्रवाहीपणाचं ब-याच प्रमाणात वाजीकरण करण्याचं काम केलं आहे. शिवाय या मराठी प्राध्यापकांचं राजकीय-सामाजिक-आर्थिक विषयांबाबतचं आकलन अतिसुमार असतं. सर्जनशील साहित्य कसं जन्माला येतं? ते समाजातल्या नैतिकतेच्या गोष्टी उचलूनच जन्माला येतं की नवी नैतिकता जन्माला घालतं, याचं उत्तर दिल्याशिवाय सर्जनशील साहित्याचा नेमका काय उपयोग असतो याचा न्यायनिवाडा कसा करता येईल?
‘बहुधा पंचविशीत जे पुस्तक लिहिलेलं असतं, ते लेखकाच्या बरोबर नेहमी जात असतं. कारण त्या लेखकासोबत लोक वाचत असतात आणि तेही लेखकाबरोबर मोठे होत होत पन्नाशीपर्यंत तरी ते पुस्तक तरंगत वर राहतं. नंतर पंचविशीतली नवी पिढी येते आणि ही मागची पिढी आपोआप बाद होत जाते,’ असं स्वत: नेमाडे यांनीच एका भाषणात म्हटलं आहे. ‘कोसला’च्या बाबत तसं झालं का? नसेल तर का झालं नाही? 

या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नसण्याचं एक कारण म्हणजे नेमाडे यांच्या लेखनाबद्दल असलेले गैरसमज वा त्याविषयी भक्तिभावानं केलं जाणारं लेखन हे तर नाही ना, याचाही विचार झाला पाहिजे.

कारण साहित्यिकांपासून पत्रकारांपर्यंत नेमाड्यांची ‘कावीळ’ झालेले लोक खूप आहेत. पण त्यांची विश्वासार्हता कवडीमोलाची असल्याने त्यांना कुणीही गंभीरपणे घेत नाही. पण हे लोक तरीही नेमाडेंचा द्वेष करत असतात. अशा लोकांना पुरून उरत नेमाडे यांनी ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार असा प्रवास केला आहे. शिवाय कादंबरीसारख्या सशक्त वाङ्मयप्रकाराची त्यांनी उत्तम समीक्षा केली आहे. चांगला लेखक आपल्यानंतर चार-दोन चांगले लेखक घडावेत यासाठी प्रयत्नशील असतोच. नेमाडे यांच्या कादंब-यांनी तशी सोय करून ठेवली आहे, एवढं नक्की!

Friday, July 13, 2012

वाचावे; पण काय, कसे, किती?


गोविंद तळवळकर यांना व्युत्पन्न पत्रकार, प्रकांड वाचक आणि साक्षेपी संपादक असे म्हणता येईल. महाराष्ट्र टाइम्सचे ते सलग 29 वर्षे संपादक होते. त्यामुळे त्यांना `संपादक' म्हणून खरोखर काहीतरी करून दाखवता आले. राजकारण-साहित्य-कला-संस्कृती अशा सर्व विषयांबाबतची मर्मदृष्टी आणि वाचन असल्याने त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला सांस्कृतिक चेहरा मिळवून दिला. वेगवेगळी सदरे, नवनवे विषय यांचा पाठपुरावा केला. नामांकितांपासून नवोदितांपर्यंत अनेक लेखकांना लिहिते केले. स्वत: ही पुस्तकांविषयी, साहित्या (मराठी-भारतीय आणि जागतिक)विषयी, विपुल म्हणावे इतके लेखन केले. इंग्रजी भाषेवर आणि लंडन या शहरावर तर तळवळकरांचे नको इतके प्रेम. त्यामुळे त्यांना काही लोक गंमतीने ब्रिटिश-भारतीय म्हणत. अर्थात हे तळवळकरांच्या पाठीमागे. समोर म्हणायची कुणाची बिशाद होती?

तळवळकरांनी लिहिलंही खूप. पण तळवळकरांच्या लेखणीला विश्लेषणाची जोड नसे, नसते. कारण ते अजून ही लेखन करतात. पण ही काही त्यांच्यावरील टीका होऊ शकत नाही. कारण वर्तमानपत्रांतमध्ये सामान्य वाचकांना गृहीत धरून लिहावे लागते. त्यात या सामान्य वाचकाला अजिबात माहीत नसलेल्या विषयाबद्दल सांगायचे असेल तर त्याचा रसाळ परिचय करून देणे, हा चांगला मार्ग असतो. तळवळकरांनी तेच केले. पण हेही खरे की, तळवळकरांनी महाराष्ट्राला इंग्रजी पुस्तकं वाचायची सवय लावली.


गोविंद तळवलकर संपादक असतानाच्या `महाराष्ट्र टाइम्स'च्या `मैफल' पुरवणीत `ग्रंथांच्या सहवासात' हे सदर प्रसिद्ध होत असे, त्यातलेच निवडक लेख सध्या `महाराष्ट्र टाइम्स'मध्ये पत्रकार असलेल्या सारंग दर्शने यांनी पुस्तक रूपाने आणले आहेत. शांताबाई शेळके, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गाबाई भागवत, श्रीराम लागू, सोली सोराबजी, जयंत नारळीकर, मे. पुं. रेगे, शामलाल, एस. एल. भैरप्पा, . प्र. प्रधान, शा. शं. रेगे, मधु लिमये, गुलजार, श्री. बा. जोशी इत्यादी 23 मान्यवरांच्या वाचन-ग्रंथसंग्रहाविषयी लालित्यपूर्ण लेख आहेत. यातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या. पण हवी ती पुस्तके मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि यातायात यात्र समान.

शामलाल हे `टाइम्स ऑफ इंडिया'चे माजी संपादक. त्यांनी जागतिक साहित्यातील तीन पिढय़ांचे साहित्य वाचले. शिवाय स्वत:च्या संग्रहातील 20 हजार पुस्तकांपैकी प्रत्येक पुस्तक स्वत: निवडूनच घेले. तरी आपण कोणत्याही विषयातले तज्ञ नाही, असे ते नम्रपणे  सांगतात.

डॉ. श्रीराम लागू यांचे वाचन चौफेर, पण बेशिस्त. रसेलच्या निखळ बुद्धिप्रामाण्यवादाने त्यांना चांगलेच प्रभावीत केले. `मॅरेज आणि मॉरल्स' या रसेलच्या पुस्तकाने आपण आतून हलून गेलो, याची कबुली त्यांनी जाहीरपणे नेकदा दिली आहे.

एस. एल. भैरप्पा भारतीय पातळीवरील एक आघाडीच्û कादंबरीकार, ते `क्लासिक' सदरात मोडणारीच पुस्तके विकत घेतात. `पर्व' ही कादंबरी लिहिण्याआधी तब्बल साडेसहा वर्ष केवळ महाभारत जीवनावरील पुस्तकांचे  वाचन ते करत होते. (अर्थात, भैरप्पा आपल्या प्रत्येक कादंबरीविषयी असेच करतात.)

दुर्गाबाइचा लेखही चांगला आहे. `मराठी संतसाहित्याने संस्कृत साहित्यात असलेली शास्त्री-वैज्ञानिक प्रवृत्ती नष्ट केली, नुसतेच भाषावैभव वाढवले,' हे त्यांचे निरीक्षण अतिशय नेमके आणि धारदार आहे.

खुशवंतसिंग यांचा छोटेखानी लेख त्यांच्या एकूण बिनधास्त आणि स्वच्छंदी व्यक्तिमत्त्वासारखाच आहे. `मी नको इतके वाचन करतो, कधी कधी दिवसाला एक पुस्तके वाचतो,' असे ते  म्हणतात. शिवाय स्वत:च स्वत:ला दरमहा तीन हजार रुपयांचा बुक अलाऊन्स देतात, जो त्यांचा आयकरही वाचवतो!

रमेशचंद्र सरकार हे तत्त्वज्ञानाचे  प्राध्यापक. त्यांनी माथेरानला घोडय़ावर बसण्याचा प्रयत्न फसल्यावर त्या विषयावरची दोन पुस्तके वाचून, त्यातल्या सूचना व छायाचित्रे अभ्यासून नाठाळ घोडय़ांना कसे इशाऱयाप्रयाणे वागवले, याचा किस्साही मस्तच आहे.

खरे तर या पुस्तकात असे कितीतरी किस्से आहेत.
काही गमतीजमतीही आहेतच. मे. पुं. रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक `शनिमहात्म्य' आणि `शिवलीलामृत' यांना अवीट गोडीची पुस्तके असे सर्टिफिकेट देतात, वर `प्रत्येकाने ती वाचलीच पाहिजेत' अशीही शिफारस करतात!

शांताबाइचा लेखही चांगला, प्रामाणिक, पण वाचन बेशिस्त आणि ग्रंथसंग्रहही. वर शिस्तीच्या वाचकांना टोमणा की, `केवळ व्हिटामिन्सच्या पिल्सवर जगावे, फक्त पौष्टिक आणि भरपूर जीवनसत्वे असलेलाच आहार घ्यावा, तसे या मंडळींचे वाचन असते.' पण शेवटच्या काळात खुद्द शांताबाइनी आपल्या या बेशिस्त आणि स्वैरवाचनाबद्दल जाहीरपणे खेद व्यक्त केला. या पुस्तकात त्याचा उल्लेख नसला तरी वाचनापायी आपण आयुष्यातला बराचसा वेळ वाया घालवला अशी त्यांनी जाहीरपणे कबुली दिलेली आहे.

या पुस्तकाचे संपादन मात्र काटेकोरपणे झालेले नाही. लेखांचा अनुक्रम व्यवस्थित नाही. पहिलाच लेख वाईट आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व धर्मवीर भारती यांचे लेख त्रोटक तर त्र्यं. वि. सरदेशमुख, गंगाधर गाडगीळ, जयवंत दळवी यांचे ले ख भरकटलेले आहेत. मधु लिमये आणि शां. शं. रेगे यांचे लेख नको इतके मोठे आहेत. त्यामुळे या पुस्तकाला `संपादन' से न म्हणता `संकलन' म्हणणे योग्य ठरले असते. संपादकांचे  मनोगतीही अतिशय मोघम आहे. मूळ सदराची कल्पना काय होती, त्यानुसार लेखन आले  का, सदर चालू असताना त्यावर होत असले ली चर्चा, याविषयी त्यात काहीच नाही...

निर्मितीच्या अंगाने  पुस्तक उत्तम आहे, विविध क्षेत्रांतल्या मान्यवर वाचकांच्या लेखांमुळे वैचित्र्यपूर्ण आणि रोचक झाले आहे. हे पुस्तक वाचून काय वाचावे, से वाचावे आणि किती वाचावे हे जाणकारांना ठरवता यावे.

ग्रंथांच्या सहवासात - संपादन : सारंग दर्शने 
मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
पाने  : 198 (1/4), किंमत : 250 रुपये

Monday, July 9, 2012

शहाणे करून सोडावे सकल जन...

शिक्षक, प्राध्यापक या शब्दांचे हल्ली नको तेवढे अवमूल्यन झाले आहे, तर विचारवंत हा शब्द स्वस्त झाला आहे. पण ज्यांना गंभीरपणे ‘विचारवंत’ हे विशेषण वापरता येईल, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये प्रा. रामचंद्र महादेव उर्फ राम बापट यांचा समावेश होता. अगदी नेमकेपणाने सांगायचे तर बापटसर हे ‘लोकाभिमुख विचारवंत’ होते. पेशाने प्राध्यापक असलेल्या आणि वृत्तीने शिक्षक असलेल्या बापटसरांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या, तशाच महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींतील कार्यकर्ते घडवण्याचेही मोठे काम केले!
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
काही योगायोग मोठे करुण असतात. बापटसरांच्या निधनाची बातमी सोमवारी सक्काळी सक्काळी समजली. त्यानंतर तासा-दोन तासाने इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरचे पत्र वाचायला मिळाले. ते पत्र होते, बापटसरांच्या परामर्शया पहिल्यावहिल्या पुस्तकाला उत्कृष्ट मराठी गद्याचा पुरस्कार जाहीर झाल्याचे. बापट सर गेले काही दिवस आजारी होते. पण तरीही त्यांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते, प्राध्यापक आणि बुद्धिवाद्यांना खचल्यासारखे वाटले असेल

आपल्या मृदू स्वभावाने आणि प्रकांड व्यासंगाने गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील कितीतरी नेते-कार्यकर्ते बापटसरांकडे आकर्षित झाले होते. बापट सर कित्येक चळवळी-संघटनांचे मेंटॉर होते

आयडेंटिटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’ 
1960 ते 80 या काळात महाराष्ट्रातली तरुण पिढी समाजबदलाच्या ध्येयाने झपाटून गेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून बारा-तेरा वर्षे झाली होती. त्यामुळे उज्ज्वल आणि संपन्न भारताची स्वप्ने पाहणारी आधीची पिढी आणि विशी-बाविशीची तरुण पिढी स्वप्नाळू होती. पण स्वतंत्र भारताची सुरुवातीची पंधरा-सोळा वर्षे मोठी धामधुमीची होती. त्यातच 1962च्या युद्धात भारताला चीनकडून पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. त्यानंतर अशा नामुष्कीची एक मोठी मालिकाच घडत गेली64 साली भारताचे आशास्थान असणा-या नेहरूंचे निधन झाले65 साली पाकिस्तानबरोबर युद्ध झाले. ताश्कंदमध्ये दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले. त्यातच 67- 68 साली उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले.

साधारणपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. फिडेल कॅस्ट्रो, चे गव्हेरा हे तरुणाईचे हिरो म्हणून पुढे येत होते, तर शेजारच्या पाकिस्तानमध्ये लष्कराचे वर्चस्व वाढत होते आणि पूर्व पाकिस्तानमध्ये बरेच अराजक माजले होते.

या सा-या परिस्थितीचा आणि अस्वस्थतेचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. ‘युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी आयडेंटिटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढीअसे त्या वेळच्या त्यांच्या पिढीचे वर्णन करतात. ‘भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज आहे. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक क्रांती आणि मग सर्वागीण क्रांती करायची,’ असा मूलमंत्र काही जाणत्या लोकांनी तरुणाईला दिला. त्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. त्यातून महाराष्ट्रभर तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी उभी राहिली.

ही फळी शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रबोधन या मार्गाने उभी करणा-यांमध्ये गं. बा. सरदार, आचार्य जावडेकर, प्रा. राम बापट यांचा समावेश होता

निराशाजनक चित्र आणि समस्यांचा बागुलबुवा
महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी म्हणताना एक लक्षात घेतले पाहिजे की, तो काही एकट समूह नाही. त्यात अनेक त-हा आणि परी आहेत. लहान-मोठे अनेक गट आहेत. त्यांचा दृष्टिकोन वेगळा आणि कार्यपद्धतीही तितकीच भिन्न. यात पुरोगामी, सामाजिक, राजकीय चळवळी आहेत, तशा स्त्रीवादी, डाव्या चळवळी-संस्था-संघटनाही आहेत. पण या सर्वाना बापटसरांविषयी आस्था होती. थोडय़ाफार फरकानं या सर्वच संस्था त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून, आपला पाठिराखा म्हणून पाहत

सामाजिक चळवळींचा उद्देश कितीही नेक असला तरी त्या व्यवस्थेविषयी आणि सभोवतालच्या परिस्थितीविषयी जरा जास्तच निराशाजनक चित्र रंगवत असतात. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तच फुगवून सांगितल्याशिवाय आणि समस्यांचा बागुलबुवा केल्याशिवाय कार्यकर्ते पेटून उठत नाहीत, असा त्यांच्या नेत्यांचा समज असतो. आणि तशी कार्यपद्धतीही. शासनयंत्रणेविषयीची नकारात्मकता हा तर सर्वामध्ये कॉमन म्हणावा असा फॅक्टर असतो. अशा या चळवळी-संस्था-संघटनांचे शिक्षण करण्याचे काम बापटसरांनी आयुष्यभर केले.

जगाला एका विशिष्ट दिशेने ढकलण्याचे काम करण्यासाठी आपल्या परिघापुरते काम करून भागत नाही तर त्यासाठी आधी जगाचे नीट आकलन करून घेण्याचीही गरज असते. जग जसे आहे, ते तसे का आहे हे समजून घेतल्याशिवाय त्याविषयी काही विधाने करणे हे फारसे बरोबर ठरत नाही. हे तारतम्य आपल्या भाषणांमधून कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचे, त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम बापटसरांनी केले

 आत्मटीका करणे हे खरे मर्म
माणूस, निसर्ग व पर्यावरणया 1998 साली लेखात बापटसरांनी लिहिले आहे, ‘‘गांधी, मार्क्‍स व बुद्ध यांचा वारसा आपल्याला लाभला पाहिजे. त्यातील सत्त्वांश उचलून व त्यावर परिस्थितीनुसार योग्य ते संस्कार करून आपली नवी पर्यावरणविषयक भूमिका निश्चित केली पाहिजे. गरिबीच्या प्रश्नावर तोडगा काढला तर पर्यावरणाचा गुंता सुटेल आणि पर्यावरणाच्या गुंत्यात लक्ष घातले तर गरिबीची पाळेमुळे कुठे कुठे दडलेली आहेत, हे पुरतेपणी समजून येईल. पर्यावरणाच्या प्रश्नाकडे पाहण्याची सत्याग्रही भूमिका यापेक्षा फार वेगळी असणार नाही.’’ आपल्याकडच्या तथाकथित पर्यावरणवाद्यांना आणि घायकुत्या पर्यावरणप्रेमींना या विधानात सणसणीत अशी चपराक आहे. पर्यावरणाच्या प्रश्नाचा गुंता कसा समजून घ्यायचा, याची दिशा यातून बापटसरांनी सूचित केली आहे


2006 साली प्रकाशित झालेल्या भारतीय राष्ट्रवादापुढील आव्हानेया संपादित पुस्तकात राष्ट्रवाद : काही सैद्धांतिक प्रश्नहा बापटसरांचा प्रदीर्घ लेख आहे. राष्ट्रवादाच्या मूळ संकल्पनेपासून भारतीय राष्ट्रवादाच्या वाटा-वळणापर्यंत जागतिक परिप्रेक्ष्याची ओळख करून देत बापटसर शेवटी म्हणतात, ‘‘आत्मटीका करणे हे राष्ट्रवादाचे खरे मर्म आहे असे मला वाटते. आपण जरी मार्क्‍सवादी असाल, मिलवादी, रेननवादी असाल, धर्मवादी असाल किंवा आंबेडकरांच्या अर्थाने धम्मवादी असाल तरी या सर्वानीच आत्मटीका करणे महत्त्वाचे आहे. कारण ते एक ऊर्जास्थान आहे. आपल्यात सुधारणा घडवून आणण्याचे ते एकमेव साधन आहे. संस्थात्मक पातळीवर आत्मटीका न करणारा राष्ट्रवाद मारकच ठरणार आहे. जागतिकीकरणाच्या युगात तुम्ही जर आत्मटीका केली नाही तर तुम्ही स्मृती हरवाल व त्यातून प्रवाहपतित होण्याचा धोका असतो. मग आजच्या जागतिकीकरणाच्या संदर्भात भूगोल व राष्ट्र यांचे अस्तित्व अप्रस्तुत ठरले आहे, या प्रचाराला आपण बळी पडू.’’ पण आत्मटीकेची सुरुवात दुस-यापासून व्हावी, अशी आपल्या समाजाची धारणा असल्याने बापटसर म्हणतात, त्या प्रचाराला आपण बळी पडतो आहोत. सामाजिक चळवळी, साहित्य, राजकारण, सर्वत्र याचा अनुभव येतो

बापट यांनी 1972 साली समाजवादी मित्रांना अनावृत पत्रलिहून त्यांच्या समाजकारणाची व राजकारणाची जी चिरफाड केली आहे, ती तर अफलातून आहे

लोकाभिमुख विचारवंत
थोडक्यात, बापट सर समाजशिक्षक, लोकाभिमुख विचारवंत होते. शिक्षक-प्राध्यापक या शब्दांना हल्ली जवळपास शिव्यांचे स्वरूप आले आहे. इतके या शब्दांचे अवमूल्यन अलीकडच्या काळात झाले आहे. त्याला अपवाद असणाऱ्या मोजक्या प्राध्यापकांमध्ये बापटसरांचा प्राध्यान्याने समावेश केला जाई

लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारणे, ही खायची गोष्ट नाही. तिच्यासाठी प्रचंड मोठा त्याग करावा लागतो. डोक्यावर सतत बर्फाची लादी ठेवावी लागते. आणि एकच मुद्दा परत परत समजावून सांगावा लागतो. शिवाय एखाद्या प्राध्यापकाने असे उद्योग करणे, कमीपणाचे मानले जाते. स्वतंत्र लेखन सोडून असे उद्योग करणाऱ्याला विद्यापीठीय बुद्धिवाद्यांच्या जगात फारसे स्थान नसते. पण बापटसरांनी त्याची कधी तमा बाळगली नाही. प्राध्यापकाने लेखक असलेच पाहिजे, या दांभिक अट्टाहासाला ते कधी बळी पडले नाहीत. याउलट या अपप्रचाराला बळी पडलेले पुस्तकी पंडित, गेल्या वीस वर्षात ज्या जागतिकीकरणाच्या नावाने बोंबा मारत आहेत, नेमके याच काळात कालबाह्य होऊ लागलेत

या पार्श्वभूमीवर बापटसरांसारख्या लोकाभिमुख विचारवंतांची गरज पुन्हा पुन्हा अधोरेखित होते. आता बापट नाही पण पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रा. यशवंत सुमंत त्यांचा हा वारसा गेली काही वर्षे नेटाने आणि समर्थपणे चालवत आहेत. एवढेच नव्हे तर पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाला बापट, सुमंत, सुहास पळशीकर, राजेश्वरी देशपांडे या तत्त्वनिष्ठ प्राध्यापकांनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिला आहे.

मला उमजलेले
बापट हे काही बैठक मारून लिहिणारे लेखक नव्हते. ते त्यांच्या स्वभावातच नव्हते आणि बहुधा त्यांना ते करायचेही नव्हते. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षात त्यांचे एकही स्वतंत्र पुस्तक प्रकाशित झालेले नाही. वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले काही लेख आणि मराठीतल्या काही महत्त्वाच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना एवढेच काय ते लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. मात्र त्यांचा राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, नाटय़शास्त्र, कला, सौंदर्यशास्त्र, संरक्षणशास्त्र, सामाजिक चळवळी, महाराष्ट्राची वैचारिक परंपरा यांचा गाढा अभ्यास होता.

गेल्या वर्षी त्यांचे परामर्शहे संकलित पुस्तक प्रकाशित झाले. ते त्यांचे पहिले पुस्तक. (इतर दोन लेखसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.) या पुस्तकात त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि न्याय’ (मे. पुं. रेगे), ‘न्याय आणि धर्म’ (अशोक चौसाळकर), ‘इतिहासचक्र’ (राम मनोहर लोहिया), ‘तुकारामदर्शन’ (सदानंद मोरे), ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य’ (गो. मा. पवार), ‘कथा मुंबईच्या गिरणगावची’ (नीरा आडारकर व मीना मेनन) या सहा पुस्तकांना लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनांचा समावेश आहे. यातील काही प्रस्तावना पन्नास-साठ पानांच्या आहेत

या प्रस्तावना त्या त्या पुस्तकाचे मर्म आणि त्यामागची संबंधित लेखकांची भूमिका उलगडून दाखवतात. (. प्र.) प्रधानमास्तरांनी अशाच इतरांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांच्या संग्रहाला मला उमजलेलेअसे अन्वयर्थक शीर्षक दिले आहे. बापटांची भूमिकाही त्यापेक्षा वेगळी नाही. प्रस्तावना नेमकी कशासाठी आणि कशी लिहायची याचा वस्तुपाठ म्हणाव्या अशा आहेत

समाजशिक्षक
पण बापटसरांचं मुख्य योगदान त्यांच्या समाजशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यांनी गेल्या 40-50 वर्षात सामाजिक संस्था- संघटना व चळवळी यांच्या विविध उपक्रमांत, अभ्यासवर्गात व शिबिरांत विश्लेषक व चिकित्सक मांडणी करणारी काही हजार भाषणे तरी दिली असतील. महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके इतकेच काय पण छोटी-मोठी खेडीही त्यांनी अभ्यासवर्ग, शिबिरे आणि व्याख्यानांसाठी पालथी घातली आहेत. नियोजित कार्यक्रम कितीही आडबाजूला असो, वाहतुकीची कशीही सोय असो ते तिथे जाणार. सलग दीड-दोन तास आपला विषय रसाळपणे मांडणार. बापट हे दीर्घ पल्ल्याचे वक्ते होते. दहा-पंधरा मिनिटांत त्यांना विषय मांडता येत नसे. त्यासाठी त्यांना दीड-दोन तास लागत. मग त्यांनाही समाधान मिळत असे आणि समोरच्या श्रोत्यांची अवस्था तर अजि म्या ब्रह्म पाहिलेअशीच होई

बापट यांची भाषणे विचारप्रवर्तक असत. ती एकाच प्रश्नाला किती बाजू असतात, याचा पट उभा करत. प्रश्नाची व्यामिश्रता सांगताना त्यावरील मार्ग सांगण्याचे कामही करत. त्यांच्या भाषणामुळे आपल्या विचारांना दिशा मिळते. मुख्य म्हणजे विचार कसा करावा, याचा परिप्रेक्ष्य मिळतो. लोकाभिमुख विचारवंताचे हेच काम असते. ते बापटसरांनी अगदी शेवट शेवटपर्यंत निष्ठेने केले.