Friday, October 16, 2015

विकेंद्रित एकाधिकारशाही

दादरीमधील पीडित कुटुंब
‘तत्त्वहीन राजकारणा’चे प्रसंग भारतीय राजकारणात सर्वाधिक काँग्रेसच्या काळात भरतील हे खरे, पण त्याचे सर्वोच्च  हिमनग पहिल्यांदा वाजपेयी सरकारच्या काळात दिसले होते. आता त्याखालचा संपूर्ण भाग उघड झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही सरसकट विचारवंतांच्या-लेखकांच्या-कलावंतांच्या हत्या करण्याचे, त्यांना धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबता येईल तेवढा दाबवण्याचे, मुस्लिम समाजाला येनकेनप्रकारेण टार्गेट करण्याचे राष्ट्रीय धोरण जाहीर केलेले नाही. पण तरीही हे सर्व प्रकार घडत आहेत. या घटनांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये कितीही चर्वितचर्वण केले गेले, विरोधी पक्षांनी कितीही टीका केली, मोर्चे निघाले, आंदोलने झाली, तरी मोदी त्याविषयी अवाक्षर बोलत नाहीत. पण ते मौनीबाबा मात्र नक्कीच नाहीत. ते बोलतात खूप आणि अनेकदा जरुरीपेक्षा जास्त बोलतात. पण केवळ त्यांना सोयीचे असते तेवढेच ते बोलतात. म्हणजे काँग्रेस, विशेषत: गांधी घराणे आणि इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना ते यथेच्छ बडवत असतात. अगदी त्यांच्या डीएनएची तपासणी करण्यापर्यंत खाली उतरतात.
संसदेत विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात कितीही गदारोळ माजवला, त्यांच्या सरकारने मांडलेली विधेयके हाणून पाडली, तरी ते त्यावर मार्ग काढण्यासाठी विरोधी पक्षांना चर्चेसाठी बोलावत नाहीत. किमान सहमतीसाठी प्रयत्न करत नाहीत. पण ‘मन की बात’मध्ये मात्र आम्ही शेतकऱ्यांच्याविरुद्ध नाही हे ठणकावून सांगतात. मोदी परदेशात जाऊन लंबीचौडी भाषणे ठोकतात, परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आवाहने करतात. भारतात येतात तेव्हा भारतीयांचे राहणीमान उंचावेल, त्यांचा विकास होईल हे सांगत ‘स्वच्छ भारत’, ‘जनधन योजना’, ‘स्मार्ट सिटी’, ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, अशा भरमसाठ योजना-सवलती जाहीर करतात. जपानला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतात, आशा भोसले यांना झालेल्या पुत्रशोकाबद्दल खेद व्यक्त करतात, पण मोहम्मद अख़लाक़ या दिल्लीपासून अवघ्या ५० किलोमीटरवर राहणाऱ्या मुस्लिम व्यक्तीची जमावाने ठेचून हत्या केली, तरी त्याबाबत साधा खेदही व्यक्त करत नाहीत. कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांची दिवसाढवळ्या हत्या होते, पण त्यांच्या कुटुंबियांची साधी विचारपूस त्यांना करावीशी वाटत नाही.
मोदी कुठल्याच विषयावर कुठलेच मत व्यक्त करत नाहीत. ते फक्त टीका करतात किंवा कोण आमच्या सोयीचा तेवढे सांगतात (उदा. गांधी, पटेल, डॉ. आंबेडकर). ते बोलतात तेव्हा विकासाची किंवा द्वेषाची भाषा बोलतात, किंवा मग आपल्या सोयीची तरी. गेल्या दीडेक वर्षांत पंतप्रधान मोदींच्या कुठल्याही विधानावरून वाद झालेला नाही, त्यांच्या कुठल्याही विधानाचा विपर्यास झालेला नाही किंवा कुठल्याही विधानावर त्यांना खुलासा करायची वेळ आलेली नाही. याचा अर्थ मोदी कमालीचे हुशार आहेत. मोदी यांच्याविषयी त्यांच्या सरकारमधील मंत्री, खासदार कधीही नापसंतीचे अवाक्षरही बोलत नाहीत. असे केवळ सर्वशक्तिमान देवाच्याच बाबतीत घडू शकते. पण हेच त्यांचे मंत्री-खासदार सतत वावदूक विधाने मात्र करत असतात. याचाच अर्थ मोदींची कितीही कडक प्रशासक अशी प्रतिमा उभी केली जात असली तरी त्यांच्या मंत्र्यावर त्यांचा वचक नसावा किंवा त्यांचा नियंत्रक दुसराच कोणीतरी असावा.
दुसरी गोष्ट आहे गांधी, पटेल, डॉ. आंबेडकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, सावरकर, विवेकानंद या राष्ट्रपुरुषांचा सोयीस्करपणे वापर. आपल्याला सोयीचे ते निवडायचे आणि गैरसोयीच्या भागाबाबत काहीच बोलायचे नाही. नेहरूंनी पटेलांवर अन्याय केल्याचे सांगत त्यांचे जगातील सर्वोत्कृष्ट स्मारक उभारायची घोषणा करायची, गांधींच्या नावाने ‘स्वच्छ भारत योजना’ सुरू करायची, आंबेडकरांचे महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या मनातील स्थान लक्षात घेता त्यांचे स्मारक उभारायची घोषणा करायची, सुभाषचंद्रनाही आपलेसे करायचे. गोवंश हत्याबंदीविषयी गांधींचे दाखले द्यायचे, पण हिंदुत्ववादी मानल्या जाणाऱ्या सावरकरांची गायीबाबतची मते मात्र विचारात घ्यायची नाहीत. यातून या राष्ट्रपुरुषांना मानणाऱ्यांचा सरकारला असलेला विरोध दुबळा होतो. त्यांना कलेकलेने आपल्या बाजूला वळवता आले नाही तरी त्यांच्या विरोधाची धार बोथट करता येते. राष्ट्रपुरुषांबाबत भारतीय समाज नेहमीच हळवा असतो. त्यामुळे त्याविषयी कुणी बरे बोलत असेल तर त्याला आनंद होतो. म्हणून ही रणनीती विचारपूर्वक आखलेली आहे. डॉ. कलाम मुस्लिम असले तरी राष्ट्रप्रेमी होते, असे सांगण्याचा प्रकारही त्यातलाच.
केंद्र सरकारने एनजीओविरोधात धडक मोहीम सुरू केली. ग्रीनपीससारख्या संस्थांना भारतातून गाशा गुंडाळायची वेळ आली. पण सर्वाधिक त्रास मात्र तीस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांना दिला जातो आहे. त्यांच्या एनजीओला व्यापक जनाधार नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात आघाडी उघडल्याने सामाजिक उद्रेक होण्याचा कुठलाही धोका नाही, हे लक्षात घेऊनच कारवाई केली जात आहे.
याच जोडीला छोट्या छोट्या दंगली घडवून सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मुझफ्फरनगर, दादरी ही त्याची उदाहरणे आहेत. गोध्रानंतर गुजरातमध्ये केवळ मुस्लिमांना टार्गेट करून एक मोठी दंगल घडवली गेली होती. त्याचा जगभर ब्रभा झाला. आता त्याची पुनरावृत्ती केली तर पुन्हा जगभरची प्रसारमाध्यमे टार्गेट करतील. एखाद्या कुटुंबाला टार्गेट केल्याने त्याला फार व्यापक कटाचा भाग मानता येत नाही. पण दहशत आणि घबराट यांचा परिणाम सारखाच होतो. जनसामान्य भयभीत व्हायचे ते होतातच.
हा मोदी सरकारचा अजेंडा आहे. पण तो राबवला जातो आहे हिंदुत्ववादी संघटनांकडून. त्याला समाजातला पहिला गट -विचारवंत-लेखक-कलावंत यांच्याकडून विरोध केला जाणे साहजिक आहे. पण हे लोक अल्पसंख्य असल्याने त्यांना हिंदूविरोधी ठरवून टाकण्याचे काम सरकारपेक्षा याच संघटना परस्पर करतात. त्यानंतरचा जो समाजगट असतो त्याला आपल्याला विचार करता येतो याचेच अप्रूप अधिक असते. या लोकांचा विचार म्हणजे इतरांच्या वाणी-उक्ती-कृतीतील उणीवांवर बोट ठेवणे. अशा लोकांना अधूनमधून खाद्य पुरवले की, त्यांचे व्यवस्थित चालू राहते. सध्या हे लोक देशभरातील साहित्यिक जे पुरस्कार परत करत आहेत, त्यांच्यावर तोंडसुख घेण्यात गढून गेले आहेत. समाजाचा तिसरा गट हा जीव गेला तरी बेहत्तर- पण कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही अशांचा असतो. यांची संख्या ९० टक्क्यांच्या घरात असते. हा वर्ग आपल्या वतीने कुणीतरी विचार करावा याच्या शोधात असतो. ते इतरांकडून स्वत:मध्ये विचार पंप करून घेतात. त्यांच्यात विचार पंप करण्याचे काम सध्या मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देशभरातल्या हिंदुत्ववादी संघटना यांनी वाटून घेतले आहे.
आजचा परिस्थितीचे वर्णन काही राजकीय अभ्यासक आणि बरेच विचार करू पाहणारे लोक ‘हुकूमशाही’ असा करून आणीबाणीची आठवण काढत आहेत. पण आजच्या परिस्थितीची तुलना आणीबाणीशी करता येणार नाही. कारण तेव्हा ‘इंदिरा इज इंडिया’ अशी परिस्थिती होती. म्हणजे त्या अठरा महिन्यांच्या काळात सर्व सत्ता केवळ आणि केवळ इंदिरा गांधी यांच्याच हाती एकवटली होती. आता तसे नाही. ‘मोदी इज इंडिया, इंडिया इज मोदी’ असा काही प्रकार देशात दिसत नाही. सर्व सत्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही हाती एकवटलेली नाही. म्हणजे मोदी यांचा रिमोट संघाच्या हाती असाही प्रकार नाही. तर वरवर विखुरलेले दिसत असलेले, पण हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर एकत्र असलेले एक मोठे नेटवर्क आहे. त्यात टीव्ही, रिमोट, वेगवेगळे केबल ऑपरेटर, सेटटॉप बॉक्स, चॅनेल्स असे अनेक घटक आहेत. शिवाय या प्रत्येकाचा प्रेक्षकवर्गही वेगवेगळा आहे. पण या साऱ्यांचा उद्देश एकच आहे, जयतु हिंदुराष्ट्रम. त्याचे साधन आहे द्वेषभावना. या भावनेतून काय काय साध्य होते आहे?
‘द्वेषाच्या नावाने माणसे जितकी पटकन एकत्र येतात तितकी ती प्रेमाच्या नावाने एकत्र येऊ शकत नाहीत.’
‘द्वेषविषय समान असेल तर ज्यांचे एरवी पटू शकले नसते असे लोकसुद्धा एकत्र येतात.’
‘शत्रू समान असेल तर कालचे विरोधकही आपला विरोध विसरून हातमिळवणी करण्यासाठी पुढे सरसावतात.’
‘शत्रू हा कधीही घरचा असत नाही. घरचा असला तरी त्याला बाहेरचा ठरवण्यात येते. शत्रू परका, परक्या वंशाचा असेल तरच लोक संघटित करण्यासाठी तो उपयुक्त ठरू शकतो.’
‘स्वत:च्या कुचकामीपणाची, नालायकपणाची आणि अन्य उणीवांची जाणीव दडपून टाकण्यासाठी जो आटोकाट प्रयत्न केला जातो त्याचा दृश्य परिणाम म्हणजे हा अकारण द्वेष.’
(सर्व अवतरणे विश्वास पाटील यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकातून.)
भारतात आजघडीला कधी नव्हे एवढी असहिष्णुता निर्माण होण्याची कारणे ही अशी आहेत.