Monday, January 13, 2014

वाचण्याचा जागतिक आनंद!



द प्लेजर ऑफ रीडिंग या अँटोनिया फ्रेजर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात जगभरातल्या चाळीस लेखकांनी आपल्या वाचनानंदावर लिखाण केलंय. या चाळीस लेखांसाठी चाळीस चित्रकारांनी चित्रंही काढली आहेत.



 

मातृभाषा ही निसर्गत: आणि जन्मत: मानवप्राण्याला मिळते. त्यामुळे ती बोलायला शिकण्यासाठी फारसे काही प्रयत्न करावे लागत नाहीत. लहान मूल इतरांचे शब्द ऐकत ऐकत बोलायला शिकतं. पण भाषा लिहायला मात्र रीतसर शिकावी लागते. त्यासाठी अक्षरांची ओळख करून घ्यावी लागते. आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तर आणखी रीतसर प्रयत्न करावे लागतात. असंच वाचनाचं असतं. भाषा बोलायला-लिहायला यायला लागली की वाचताही येतं. त्यामुळे वाचन ही गोष्टही आपल्याला निसर्गत: मिळालेली गोष्ट असावी असा अनेकांचा समज होतो. पण लिखित भाषेवर चांगलं प्रभुत्व मिळवण्यासाठी जसं मार्गदर्शन, अभ्यास, शिस्त आणि काटेकोर नियोजन करावं लागतं, तसंच वाचनाच्या बाबतीतही करावं लागतं. त्याशिवाय चांगला वाचक होता येत नाही.  पण अर्थार्जनासाठी रीतसर शिक्षण घ्यावं लागतं, तसंच वाचक म्हणून प्रगल्भावस्था गाठण्यासाठीही रीतसर मार्गदर्शन घेण्याची गरज असते, हे अनेकांच्या गावीही नसतं. त्यामुळे बहुतेक जण आयुष्यभर मिळेल ते वाचत राहतात. काय वाचावं हेच अनेकांना आयुष्यभर कळत नाही. त्यासाठी कुणा चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा असंही त्यांना वाटत नाही. परिणामी ही माणसं कायम कविता-कथा-कादंबऱ्याच वाचत राहतात. वय आणि वाचन यांची सांगड तर अनेकांना घालता येत नाही.

वाचनाच्या बाबतीत प्रगल्भावस्था गाठावयाची असेल तर मार्गदर्शन, शिस्त आणि काटेकोर नियोजन गरजेचं असतं. तरच त्या वाचनाचा फायदा होतो. बालपण, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढपण आणि वृद्धावस्था हे आपल्या आयुष्याचे टप्पे. यानुसार आपलं वाचन बदलायला हवं. कविता-गोष्टी, कथा-कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्र, वैचारिक साहित्य आणि तत्त्वज्ञानात्मक साहित्य अशा चढत्या क्रमानं वाचनाचा प्रवास झाला तर त्या वाचनाला एक निश्चित दिशा आहे असं म्हटलं जातं.
त्यामुळे चांगलं वाचन करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. असे मार्गदर्शक आई-बाबा, शिक्षक, मित्र हे जसे असू शकतात, तसेच चांगल्या लेखकांनी आपल्या वाचनाविषयी लिहिलेले लेख वा पुस्तकंही असू शकतात. मराठीमध्ये ज्याला 'बुक ऑन बुक्स' म्हणतात अशा प्रकारची पुस्तकं फारशी नसली तरी इंग्रजीमध्ये मात्र अशा प्रकारच्या पुस्तकांचं समृद्ध असं दालन आहे. 'द प्लेजर ऑफ रीडिंग' (एडिटेड बाय अँटोनिया फ्रेझर, ब्लूम्सबरी, लंडन, पाने : २५२, किंमत : १७.९९ पौंड.) हे पुस्तक त्यापैकीच एक. रॉयल आकाराचं आर्टपेपरवर छापलेलं आणि संपूर्ण रंगीत असलेलं हे पुस्तक फारच सुंदर आहे. 


हे पुस्तक संपादित केलं आहे अँटोनिया फ्रेझर यांनी. ऐतिहासिक चरित्रकार, रहस्यकथा लेखक आणि लंडनमधील पेन या संस्थेच्या माजी अध्यक्ष असलेल्या फ्रेझर यांना नामवंत साहित्यिक-कलांवत कुठली पुस्तकं वाचतात याविषयी अतोनात कुतूहल आहे. म्हणून त्यांनी या पुस्तकासाठी इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या जगभरातल्या ४० नामवंत साहित्यिकांना त्यांच्या वाचनाविषयी लिहायला सांगितलं. त्यानुसार स्टिफन स्पेंडर, मायकेल फूट, डोरिस लेसिंग, जॉन मार्टिमर, रुथ रेंडेल, सायमन ग्रे, मार्गारेट अ‍ॅटवुड, मेल्विन ग्रेग, गीतचा मेहता, वेंडी कोप यांसारख्या लेखकांनी सुरुवातीला केलेलं वाचन, आपल्या वाचनावर झालेला घरचा - आजूबाजूच्या वातावरणाचा, सहवासातल्या लोकांचा-शिक्षकांचा परिणाम, मनावर परिणाम करून गेलेली पुस्तकं, प्रभावित केलेली पुस्तकं याविषयी समरसून लिहिलं आहे. शिवाय प्रत्येकानं लेखाच्या शेवटी 'माझी आवडती पुस्तकं' म्हणून दहा पुस्तकांची यादी दिली आहे. काहींनी तीच का आवडली याची कारणमीमांसा केली आहे, तर काहींनी आवडती दहा पुस्तकं सांगणं कठीण आहे, तरीही फार विचार करून ही दहा नावं देत आहे, असा अभिप्राय दिला आहे.
 मायकेल फूट या ब्रिटिश पत्रकार आणि मार्क्‍सवादी खासदाराचे वडील उत्तम वाचक होते, त्यामुळे घरात भरपूर पुस्तकं होती. तरीही तो वाचनाकडे जरा उशिराच वळला. बट्र्राड रसेल त्याला शिकवायला होते. त्यामुळे रसेलचे 'द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस' हे फूटचे आवडते पुस्तक. याशिवाय अनरेल्ड बेनेटच्या 'हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे' आणि 'लिटररी टेस्ट -हाऊ टू फॉर्म इट' या दोन छोटय़ा पुस्तकांविषयी लिहिलं आहे. 'हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे' या पुस्तकानं माझं आयुष्य बदलवलं असं फूटनं म्हटलंय. फूट लंडनचा पंतप्रधान होता होता राहिले.


मार्गारेट अ‍ॅटवुड या प्रसिद्ध कादंबरीकर्तीवर एडगर अ‍ॅलन पोचे 'ग्रीम्स फेअरी टेल', मेल्विनची 'मॉबी डिक', जेन ऑस्टिनची 'प्राइड अँड प्रेज्युडिस', 'वुदरिंग हाइट्स', ऑर्वेलची '१९८४', कोत्स्लरची 'डार्कनेस अ‍ॅट नून' या कादंबऱ्यांचा प्रभाव पडला असल्याचं ती मान्य करते. उतारवयात मात्र ती वाङ्मयीन मासिकांपासून ते शब्दकोशापर्यंत वेगवेगळे वाचन करते. तिला आपल्या दहा पुस्तकांची यादी द्यायला आवडत नाही. तरीही तिने अलीकडच्या वाचलेल्या पाच कादंबऱ्यांची आणि पाच पुन: पुन्हा वाचलेल्या पाच कॅनडिअन कादंबऱ्यांची नावं दिली आहेत.

मेल्विन ब्रॅग या ब्रिटिश कादंबरीकाराने 'टेल्व्ह बुक्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड' हे पुस्तक लिहिलं असून इंग्रजी भाषेचं चरित्र सांगणारं 'द अ‍ॅडव्हेंचर ऑफ इंग्लिश' हे पुस्तकही लिहिलं आहे. ब्रॅगनं वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत केशकर्तनालयात बसून अनेक पुस्तकं वाचली. तरुणपणी तो बेडवर पडून वाचू लागला. रॉबिनहूडच्या पुस्तकांचं त्याला काही काळ व्यसनच लागलं होतं. ब्रॅगला जेन ऑस्टिन किंवा ई.एम. फोर्स्टर, पुश्किन, हॉथॉर्न यांची पुस्तकं प्रौढवयात पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. ब्रॅगलाही आपली दहा पुस्तकं सांगताना बरेच प्रयास करावे लागले. शेवटी त्यानं टॉलस्टॉय, डी.एच. लॉरेन्स, चेखॉव्ह, चार्ल्स डिकन्स, विल्यम फॉकनर यांच्या पुस्तकांची नावं दिली आहेत. त्यानं म्हटलंय की, चांगलं लेखन करण्यासाठी तुम्हाला वाचावंच लागतं.
 ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या कन्या, लेखक-पत्रकार आणि लघुपट दिग्दर्शिका असलेल्या गीता मेहतांना शिक्षणासाठी बोर्डिगमध्ये राहावं लागल्यानं पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असताना, घराची खूप आठवण येत असताना त्यांना पुस्तकांनी सोबत केली. घरी गेल्यावर तर किती तरी पुस्तकं त्यांची कायम वाट पाहात असायची. एके काळी त्यांनी वाचनालयातून अधाशासारखी पुस्तकं वाचली. आता त्या हवी ती पुस्तकं विकत घेऊ शकतात. भारतातली वाचनालयं आणि रस्त्यावरील पुस्तक विक्रेते यांच्याविषयी त्यांनी ममत्वानं लिहिलं आहे. विमान चुकल्यावर आपल्याला रहस्यमय कादंबऱ्या वाचायला आवडतात असं त्या म्हणतात.
हरमायनी ली या ब्रिटिश समीक्षिकेला नातेसंबंधांची गुंतागुंत उलगडून दाखवणाऱ्या कादंबऱ्या वाचायला आवडतात. त्यातल्या दोन कादंबऱ्या- ज्या तिला आजही आवडतात आणि ज्यांचा खूप प्रभाव पडला-त्या म्हणजे एलिझाबेथ बोवेन्सची 'टु द नॉर्थ' आणि सोसमंड लेहमनची 'द वेदर इन द स्ट्रीट्स'.

या चाळीस लेखांसाठी तब्बल चाळीस चित्रकारांनी चित्रं काढली आहेत. प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला एक पानभर चित्र आणि लेखामध्ये तीन-चार छोटी छोटी चित्रं असं त्यांचं स्वरूप आहे. म्हणजे चाळीस भिन्न स्वभावधर्माचे, निरनिराळ्या सामाजिक-कौटुंबिक परिस्थितीतले लेखक आणि तसेच चाळीस चित्रकार यांचा समसमायोग या पुस्तकाच्या निमित्तानं जुळून आला. सर्वच चित्रकारांनी काढलेली चित्रं इतकी सुंदर आहेत की, बऱ्याचदा आपण मध्येच लेख वाचायचं थांबून चित्रंच पाहू लागतो. काही नुसती पाहून पटकन लक्षात येत नाहीत. मग त्यासाठी लेख वाचायला लागतो. आधी सर्व लेखच वाचावेत आणि मग सगळी चित्रं पाहावीत असंही ठरवता येत नाही आणि आधी सर्व चित्रंच पाहावीत आणि मग सगळे लेख वाचावेत असंही करता येत नाही. या चाळीस चित्रकारांनी पुस्तकांचे उपयोग, त्यांचे महत्त्व, ते वाचत असताना वाचकाची होणारी अवस्था, त्याच्या मनात येणारे विचार यातून पुस्तकांची जी दुनिया उभी केली आहे, ती केवळ प्रेक्षणीयच नाही तर उत्फुल्ल करणारी आहे. त्याविषयी स्वतंत्रपणे सविस्तर लेखच लिहायला हवा.
असो. वाचनानंदाची खुमारी सांगणारं हे पुस्तक वाचनीय आणि प्रेक्षणीय तर आहेच, पण ते फँटसीसारखं आपल्यावर गारूड करतं, भारावून टाकतं. 'बुक ऑन बुक्स' या वाङ्मय प्रकारातील हे एक नितांतसुंदर पुस्तक आहे. ज्याला चांगलं वाचन करायचं आहे त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर ज्याला वाचनाला सुरुवात करायची आहे त्याच्यासाठीही एक चांगला मार्गदर्शक ठरेल असं.


पुन्हा एकदा अनंत अंतरकर

Published in Loksatta, Sunday, December 29, 2013
भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या बरोबर एक र्ष आधी अनंत अंतरकर यांनी 'हंस' हे वाङ्मयीन मासिक सुरू केलं, तर स्वातंत्र्यानंतर एक वर्षांनी 'मोहिनी' हे मासिक सुरू केलं. त्याआधी त्यांनी 'सत्यकथा' आणि 'वसंत' मासिकांतही काही काळ काम केलं होतं. पुढे १९५३ साली अंतरकरांनी 'नवल' सुरू केलं. अशा या तीन भिन्न प्रकृतीच्या आणि स्वभावधर्माच्या मासिकांचे संस्थापक-संपादक असलेल्या अनंत अंतरकर यांचं जन्मशताब्दी वर्ष २०१०-११ साली साजरं झालं. त्यानिमित्तानं त्यांच्या एका मुलीनं अनुराधा औरंगाबादकर यांनी 'अनंता'ची फुलं' हे त्यांचं चरित्र लिहिलं, तर दुसऱ्या मुलीनं, म्हणजे प्रस्तुत संपादिकेनी त्यांच्याविषयीच्या या स्मृतिगौरवग्रंथाचं संपादन केलं आहे.
या पुस्तकाचे एकंदर चार विभाग आहेत. 'सुहृदांची अंतरे' या पहिल्या विभागात विविध लेखक, पत्रकार यांनी अंतरकरांविषयी लिहिलेले लेख आहेत. 'निवडक अंतरकर' या दुसऱ्या विभागात अंतरकरांच्या 'चोरटे हल्ले' व 'गाळीव रत्ने' या पुस्तकातील आणि इतर काही लेख आहेत. 'सहचरी-निर्मला अंतरकर' या तिसऱ्या विभागात स्वत:च्या आईविषयी अरुणा अंतरकर यांनी लिहिलं आहे.
'सुहृदांची अंतरे' या पहिल्या विभागात एकंदर एकवीस लेख आहेत. त्यात ना. सी. फडके, पु. भा. भावे, अरविंद गोखले, बाळ सामंत, विजय तेंडुलकर, रमेश मंत्री, शि. द. फडणीस, यशवंत रांजणकर, इंद्रायणी सावकार, वसंत शांताराम देसाई,    शं. ना. नवरे,  इत्यादींचा समावेश असून, आनंद आणि अरुणा (प्रस्तुत पुस्तकाच्या संपादक) या अंतरकरांच्या मुलांचेही लेख आहेत. लेखांचा क्रम पुस्तकात जो दिला आहे तो तसाच का दिला आहे, याचा संपादिकेनी खुलासा केलेला नाही. पण सर्व लेख वाचल्यावर लक्षात येतं की, यातील बरेचसे लेख हे अंतरकरांच्या निधनानंतर म्हणजे १९६६ नंतर लिहिले गेले असावेत. जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखांची संख्या त्या तुलनेत कमी असावी. इतक्या उशिरा लेख छापताना त्या लेखांची पूर्वप्रसिद्धी, वर्षे इत्यादी तपशील लेखासोबत दिला असता तर तो लेख वाचताना अधिक सोयीचं ठरलं असतं. संपादनाची शिस्त म्हणून ते गरजेचं होतं, पण तसं झालेलं नाही. (त्याचा अतिशय त्रोटक उल्लेख शेवटच्या विभागात केला आहे.) शिवाय लेखांचा क्रमही फारसा व्यवस्थित वाटत नाही. ना. सी. फडके यांचा पहिलाच लेख अतिशय जुजबी आणि सामान्य आहे. शिवाय त्यातली माहिती इतर लेखांतही आली आहे. तेव्हा हा लेख आणि मजकुराची पुनरावृत्ती व नावीन्य वाटावं असं काही नसल्यानं शं. ना. नवरे, भा. ल. महाबळ, श्रीराम शिधये आणि आशा काळे यांचे लेखही वगळता आले असते तर जास्त बरं झालं असतं. विजय तेंडुलकर, अरविंद गोखले, शि. द. फडणीस, यशवंत रांजणकर यांचे लेख अंतरकरांचे संपादक म्हणून आणि माणूस म्हणून वेगवेगळे पैलू प्रत्ययकारीरीत्या उलगडून सांगणारे आहेत. त्यातून अंतरकरांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची चांगल्या प्रकारे ओळख होते. आनंद आणि अरुणा या अंतरकरांच्या मुलांचे लेख तसे वाचनीय आहेत, पण त्यात काही अनावश्यक ठिकाणी अतिशयोक्ती, उपमा-अलंकार यांची भरमार झाल्याने ते विशेष पकड घेत नाहीत. वडिलांबद्दल लिहिताना फारसं तटस्थपणे पाहणं शक्य नसल्याने असं होणं साहजिक आणि समजण्यासारखंही आहे.
यानंतरचा तब्बल २४४ पानांचा दुसरा विभाग आहे अंतरकरांच्या निवडक साहित्याचा. सुरुवातीला 'चोरटे हल्ले' या पुस्तकातील निवडक लेख आहेत. त्यानंतर 'मौज', 'सत्यकथा', 'विविधवृत्त' या तीन नियतकालिकांमध्ये १९४० साली त्यावर आलेली परीक्षणे दिली आहेत. शिवाय नामवंतांची प्रशस्तीही. त्यानंतर 'गाळीव रत्ने' या पुस्तकातील निवडक लेख आहेत. त्यानंतर या पुस्तकावरील १९४३ साली 'सत्यकथा'त प्रकाशित झालेला वि. ह. कुळकर्णी यांचा लेख आणि 'विविधवृत्त'मधील एक परिच्छेद दिला आहे. त्यानंतर अंतरकरांच्या इतरत्र प्रकाशित झालेल्या एक हास्यकथा, एक सांगीतिका, दोन ललित लेख आणि एक रहस्यकथा या लेखनाचा समावेश आहे. १९४०-४३ साली लिहिलं गेलेलं विनोदी साहित्य आज तेवढं विनोदी वाटणार नाही ही उघड गोष्ट आहे. त्यामुळे 'चोरटे हल्ले' आणि 'गाळीव रत्ने' या पुस्तकातील निवडक लेख आता वाचनीय वाटत नाहीत. 'संपादकांची सुखदु:ख' आणि 'घाईत घाई' हे ललितलेख मात्र अंतरकरांच्या संपादकीय अनुभवांशी निगडित असल्याने ते चांगले जमले आहेत. या दोन लेखांतून मासिकाच्या संपादकाला कोणकोणत्या व्यवधानातून जावं लागतं, याची तोंडओळख होते.
या पुस्तकाच्या मलपृष्ठावर अंतरकरांविषयीचे विविध लेखकांचे  अभिप्राय छापले आहेत आणि त्यांचेच पहिल्या विभागात अंतरकरांविषयीचे लेख आहेत. या सर्वानी अंतरकरांच्या संपादक असण्याविषयी भरभरून आणि अभिमानानं लिहिलं आहे. एका ध्येयनिष्ठ, कष्टाळू आणि निस्सीम वाङ्मयप्रेमी संपादक म्हणून अंतरकर कसे होते, याचं सम्यक आणि समतोल चित्रण त्यांच्या लेखातून उभे राहतं. पण इथेच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या मान्यवरांनी अंतरकरांविषयी ज्या आदरानं आणि प्रेमानं लिहिलं आहे, तसं त्यांनी अंतरकरांच्या लेखनाविषयी लिहिलेलं नाही. किंबहुना, तो उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक टाळला असावा, असं त्यांचे लेख वाचताना वाटतं. ही गोष्ट बरीच सूचक आणि बोलकी आहे. अंतरकर संपादक म्हणून श्रेष्ठ होते, यात काही वाद नाही, पण ते चांगले लेखक होते का, याचा विचार करण्यासारखा आहे. किमान त्यांचं या पुस्तकातलं लेखन वाचून तसा प्रश्न नक्कीच पडतो. त्यामुळे त्यांच्या साहित्याला इतकी पाने देऊन निव्वळ पुस्तकाचा आकार आणि किंमत वाढण्यापलीकडे फार काही साध्य झालेलं नाही. पुस्तक लिहिताना किंवा संपादित करताना त्याचा आकार आणि किंमत यांचाही विचार करायला हवा. कारण पुस्तक विनाकारण मोठं केलं की त्याची किंमत वाढते आणि मग अशी पुस्तकं वाचक आकार आणि किमतीच्या निकषावर मागे टाकतात. परिणामी, संबंधित लेखकाचे वा संपादकाचे काम दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. या पुस्तकाचंही काटेकोरपणे संपादन केलं असतं तर किमान १००-१५० पानं कमी होऊ शकली असती. परिणामी पुस्तक अधिक वाचनीय झालं असतं.
तिसऱ्या विभागात संपादिकेनी आपल्या आईविषयी लिहिलं आहे. त्यात शेवटी संपादिका लिहितात- ''तू तिथे मी' जातीचं प्रेम तिनं अण्णांवर केलं. त्यांचं समरसत्व इतकं होतं की, ती त्यांच्याबरोबर सतीच जायची! पण शेवटी तिच्यातली आई जिंकली!' या एकाच वाक्यातून या लेखाची जातकुळी लक्षात येते. आई-वडिलांचं एकमेकांवरील नितांत प्रेम सांगण्याच्या नादात सती जाण्यासारख्या अमानुष प्रथेचं आपल्याकडून नकळतपणे समर्थन केलं जात आहे, याचंही भान राखलं गेलेलं नाही.
चौथा विभाग हा परिशिष्टे, संकीर्ण, अनंत-पत्रे यांचा आहे. त्यातील शेवटचा भाग हा अंतरकरांच्या निधनोत्तर निवडक प्रतिक्रियांचा आहे. तो असला काय अन् नसला काय, त्यानं पुस्तकाच्या गुणवत्तेत काहीही फरक पडत नाही. पण आपल्या वडिलांविषयी मान्यवर साहित्यिक काय म्हणतात, याचा सोस अधिक असल्यानं या गोष्टी घेतल्या असाव्यात. ''अनंता'ची फुलं'मधून जसा अनंत अंतरकर यांना पूर्ण न्याय मिळत नाही, तसा या स्मृतिगौरवग्रंथातूनही मिळत नाही. 'अभिजात साहित्यिक रुचीमुळे अनंत अंतरकर मर्यादित अर्थबळावर मात करून व्यवसायात अग्रभागी पोचले आणि तसेच टिकून राहिले.' असं अतिशय नेमकं आणि सार्थ वर्णन विजय तेंडुलकरांनी केलं आहे. 'सत्यकथा' ते 'हंस' असा अभिरुचीसंपन्न प्रवास करणाऱ्या, 'हंस'सारखं दर्जेदार मासिक काढणाऱ्या आणि 'मोहिनी', 'नवल'सारखे वेगळे प्रयोग करणाऱ्या अंतरकरांना आता एका समर्थ चरित्रकाराची नितांत गरज आहे. त्याशिवाय त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाची ओळख पुरेशा गांभीर्यानं होणार नाही असं वाटतं. त्यासाठी 'अनंत अंतरकर आमचे वडील' या मानसिकतेतून त्यांच्या मुलांनी बाहेर पडायला हवं, असं नम्रपणे सुचवावंसं वाटतं. कारण त्याशिवाय तरणोपाय नाही.
'अक्षरयोगी' (अनंत अंतरकर : व्यक्ती आणि कार्य) - संपादन- अरुणा अंतरकर, प्रकाशक- अरुणा अंतरकर, पुणे, 

पृष्ठे - ४१५, मूल्य - ४५० रुपये.

'पुन्हा एकदा अंतरकर?' छे:, पुन्हा एकदा कुरापत!

Published in Loksatta, Sunday, January 5, 2014
२९ डिसेंबरच्या 'लोकरंग'च्या अंकात राम जगताप यांनी 'अक्षरयोगी' या माझ्या पुस्तकाबद्दल लिहिलेला द्वेषमूलक व अभिरुचिहीन मजकूर वाचून सखेदाश्चर्य वाटलं आणि करमणूकही झाली. यापूर्वी 'अनंताची फुलं' या अनुराधा औरंगाबादकर (माझी मोठी बहीण) यांच्या पुस्तकाबद्दल त्यांनी असाच थयथयाट केला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान ठेवून त्या उपद्व्यापाकडे आम्ही दुर्लक्ष केलं होतं. परंतु आता त्याच बेतालपणे अंतरकरांवरच्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल त्यांनी लिहिलं, तेव्हा त्यांच्या लिखाणामागचा आकस आणि अंतरकरद्वेष उघड झाला आहे.
'अक्षरयोगी'ला अपशकुन करण्याचा हा विघ्नसंतोषी प्रयत्न असेल, तर तो पूर्णपणे फसणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांनी आणि सुजाण वाचकांनी 'अक्षरयोगी'चं स्वागत केलं आहे. साहजिक राम जगताप यांनी या पुस्तकाचं कितीही अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला तरी काही बिघडत नाही. त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टीने केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून मी गप्प राहिले असते. पण दु:खाची गोष्ट म्हणजे तरीही या नगण्य प्रतिक्रियेची दखल घेणं मला भाग आहे. कारण त्यांनी त्यात काही आरोप करून माझी अकारण बदनामी करण्याचा उपद्व्याप केला आहे. तसंच काही ठिकाणी संदर्भ आणि सभ्यता यांच्या मर्यादेबाहेर जाऊन सवंग शेरेबाजी केली आहे. माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणाखातर तिचा समाचार घेणं भाग आहे.
या पुस्तकात निर्मला अन्तरकर यांच्यावरील लेखात ''(अण्णांबरोबर) ती सतीच जायची..,'' असं वाक्य मी लिहिलं आहे. त्यातून मी 'सतीच्या अमानुष प्रथेचं समर्थन करीत आहे याचं मला भान राहिलेलं नाही, असा अजब निष्कर्ष काढला आहे. हा लेख मी सतीच्या प्रथेवर लिहिला नसून माझ्या आईवर लिहिला आहे. तिच्या समर्पण भावनेचं वर्णन करण्यासाठी मी मराठी भाषेतल्या, रूढ झालेल्या एका वाक्प्रचाराची मदत घेतली आहे. त्या एका वाक्यातून एका दुष्ट प्रथेचं समर्थन कसं होऊ शकतं? कुसुमाग्रज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या थोर साहित्यिकांनीसुद्धा आपल्या काळांमध्ये सतीत्वाच्या गुणाचा (कृतीचा नव्हे!) दाखला दिला आहे. कुसुमाग्रजांच्या काव्यात 'आता तर आहे पुण्य सतीचेच उणे' असा उल्लेख आहे, तर 'बुद्धय़ाचि वाण धरिले करी हे सतीचं' असं सावरकरांनी कवितेत म्हटलं आहे. यावरून या दोघांनी सतीप्रथेचं समर्थन केलं आहे, असा निष्कर्ष कुणी काढला, तर मराठी भाषेच्या अज्ञानापोटी केलेला अर्थाचा अनर्थ होईल किंवा दुसऱ्याचा हेतूपुरस्सर केलेला अपमान होईल; त्या व्यक्तीची बदनामी होईल.
या ताशेऱ्यात त्यांनी 'यावरून या लेखाची जातकुळी कळते' अशी भर घातली आहे. 'जातकुळी' हा शब्द वापरताना या थोर समाजसुधारकाला आपण जातपातीच्या अमानुष प्रथेचं भान आहे का, असा सवाल का करू नये? समीक्षकानं कोणत्याही लेखनाचं संपूर्ण वाचन करून व संदर्भ समजून घेऊन मतं व्यक्त करायची असतात. एखाद्या वाक्यावरून लेखनाची समीक्षा होत नसते. 'समीक्षा' या शब्दाची फोड 'सम+ईक्षा' अशी आहे व या शब्दाचा अर्थ सम्यक दृष्टीनं, समतोल वृत्तीनं केलेली पाहणी- असा आहे. समीक्षेच्या या व्याख्येत त्यांचं लेखन बसतं का?
समीक्षकाला वाक्यामागचा अर्थ तर कळत नाहीच; पण जे डोळ्यासमोर आहे, तेही दिसत नाही. याचं उदाहरण म्हणजे 'पुस्तकाच्या मलपृष्ठावर अंतरकरांविषयीचे (लेखकांचे) अभिप्राय छापले आहेत आणि त्यांचेच लेख पहिल्या भागात छापले आहेत..' हा त्यांचा दुसरा शेरा. हे अभिप्राय त्या लेखकांनी स्वतंत्र लिहिलेले नाहीत आणि लेख वेगळे लिहिलेले नाहीत. त्यांच्या लेखनातूनच हे अभिप्राय संकलित करून मलपृष्ठावर छापले आहेत. अशा प्रकारे मलपृष्ठावर अभिप्राय देऊन पुस्तकाच्या स्वरूपाविषयी वाचकांना कल्पना देणं, हा प्रकाशनाच्या क्षेत्रातला जुना प्रघात आहे. एवढी सर्वसामान्य गोष्ट लेखन क्षेत्रात काम करणाऱ्याला माहीत नसेल, तर त्याला समीक्षा करण्याचाअधिकार नाही, असं खेदानं व नाइलाजानं म्हणावं लागेल. मुळात, मलपृष्ठावरच्या मजकुराचा पुस्तकाच्या मूल्यमापनाशी आणि समीक्षेशी संबंधच नसतो. तो जोडून टीका करणं हे अज्ञानमूलक आहेच; शिवाय आकसानं व उरकून टाकण्याच्या वृत्तीनं पाटय़ा टाकणंही आहे.
जगताप पुस्तक नीट वाचत नाहीत आणि समजून घेत नाहीत याचा ठळक पुरावा म्हणजे त्यांचा पुढील शेरा : 'या पुस्तकात मान्यवर लेखकांनी अंतरकरांबद्दल लेखक म्हणून बोलण्याचं टाळलं असावं.' जगतापांना व्यक्तिश: अंतरकरांचं लेखन आवडलं नसेल तर ते त्यांचं मत आहे; ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. पण आपलं मत सांगण्यासाठी त्यांनी दुसऱ्या लेखकांचा गैरवापर करू नये. ना. सी. फडके, अरविंद गोखले, शं. ना. नवरे, प्र. श्री. नेरूरकर आणि यशवंत रांजणकर यांच्या या पुस्तकातल्या लेखांमध्ये अंतरकरांच्या लेखनगुणाची स्पष्ट व गुणग्राहक दखल आवर्जून घेतलेली आहे. मलपृष्ठावर गोखले व नवरे यांच्या अभिप्रायांचाही समावेश आहे. पुस्तकाचं मलपृष्ठसुद्धा वाचण्याचं सहजसोपं काम ज्यानं केलेलं नाही, त्यानं आतल्या लेखांचं वाचन उचित गांभीर्यानं, प्रामाणिकपणे केलं असेल का, शंकाच आहे.
राहता राहिली बाब- या पुस्तकातल्या इतर मान्यवरांनी अंतरकरांच्या लेखनाचा उल्लेख वा अनुल्लेख करण्याची! तर या पुस्तकातले काही लेखक दुसऱ्या व तिसऱ्या पिढीतले आहेत. त्यांना अंतरकर लेखक म्हणून ठाऊक नसणार, हे उघड आहे. संपादक म्हणून ते अंतरकरांच्या संपर्कात होते. साहजिकच त्यांच्या लेखांमध्ये 'संपादक अंतरकर' दिसतात. याचा अर्थ- लेखक म्हणून अंतरकर त्यांना मान्य नव्हते, असा जगतापांना लावायचा असेल तर त्यांनी खुशाल लावावा. या पुस्तकात अनंत काणेकर, चिं. वि. जोशी, ग. त्र्यं. माडखोलकर आदी प्रभुती त्या काळातल्या दिग्गज लेखकांनी आणि १९४० च्या- म्हणजे अंतरकर लिहीत होते त्या काळातल्या मान्यवर समीक्षकांनी अंतरकरांच्या लेखनगुणाची घेतलेली दखलही नोंदलेली आहे. या काळातल्या जाणकारांनादेखील अंतरकरांचा लेखनगुण मान्य आहे, हे 'अक्षरयोगी' वाचून आलेली वाचकांची पत्रं माझ्याकडे आहेत. 'अक्षरयोगी' वाचल्यानंतर(च) मुंबईच्या 'महाराष्ट्र सेवा संघ' या मान्यवर साहित्यसंस्थेनं त्याची दखल घेणारा कार्यक्रम अलीकडेच आयोजित केला होता. तेव्हा अंतरकरांचा लेखनगुण नव्यानं सिद्ध करण्याची वेगळी गरज नाही.
समीक्षकानं पुस्तक जसं आहे त्यानुसार त्याची समीक्षा करावी, हा नियम जगताप यांना ठाऊक नसावा. ते कसं असावं, याबद्दलची आपली अपरिपक्व मतं दुसऱ्यांवर लादण्याची दंडेली ते करत राहतात. वेगवेगळ्या लेखांमधून तीच ती माहिती पुन्हा पुन्हा आल्याची तक्रार ते करतात. ही माहिती नसून अंतरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू आहेत, हा साधा फरक त्यांना कळत नाही? एकाच व्यक्तीबद्दल अनेक जण लिहितात तेव्हा काही गोष्टींची पुनरावृत्ती अपरिहार्य आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवं होतं.
समीक्षेशी व पुस्तकाच्या मूल्यमापनाशी काडीचा संबंध नसलेल्या किरकोळ गोष्टींची जंत्री करून खुसपटं काढण्याचा त्यांचा उपद्व्याप अनाकलनीय आहे. पुस्तकाची जास्त पृष्ठसंख्या व किंमत, पुस्तकातल्या पुनर्प्रकाशित लेखांच्या प्रसिद्धी तारखा यांच्याबद्दल त्यांच्या तक्रारी अनाठायी आहेत. पूर्वप्रकाशित लेखांच्या नियतकालिकांना श्रेय मी दिलंच आहे. ते म्हणे जुजबी आहे. म्हणजे काय? ते स्वतंत्र पानावर सोनेरी वेलबुट्टी काढून द्यायला हवं का? आणि त्यामुळे पृष्ठसंख्या वाढली, की हे मग छडी मारण्याची संधी घेणार! पुस्तकाचं स्वरूप व पृष्ठसंख्या ठरवणं हा त्याच्या संपादकाचा व किंमत ठरवणं हा प्रकाशकाचा अधिकार आहे. त्याबद्दल समीक्षकानं बोलण्याचं काम नाही. गंमत पाहा- समीक्षेशी संबंध नसलेल्या अशा गोष्टी (उणीदुणी) जगताप बघतात; पण पुस्तकाचं मुखपष्ठ, मांडणी, छपाई यांच्याबद्दल ते ब्र काढत नाहीत.
मात्र, त्यांची उलटतपासणी सुरू होते.. 'या पुस्तकाचं आणि अंतरकरांबद्दलचे १९६६ मध्ये प्रसिद्ध झालेले लेख इतक्या उशिरा छापण्याचं कारण काय?' अंतरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि त्यांचं कार्य व लेखन यांची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी हे पुस्तक काढलं आहे, ही माझी भूमिका पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केली आहे. ते वाचलं असतं तर हा प्रश्न त्यांना पडला नसता. १९६६ साली प्रसिद्ध झालेले लेख २०१३ मध्ये छापू नयेत, असा कायदा आहे का? हे लेख वाचनात आल्यामुळेच खरं तर मला हे पुस्तक काढण्याची प्रेरणा मिळाली. मला नेहमीसारखा चरित्रग्रंथ किंवा नातलग, स्नेही परिवारांचे लेख असलेला गौरवग्रंथ काढायचा नव्हता. अंतरकरांचं साहित्यिक व्यक्तिमत्त्व दाखवणारं आणि विशेषत: त्यांच्या संपादनाची प्रक्रिया स्पष्ट करणारं साहित्य मला या पुस्तकासाठी हवं होतं. संपादक व प्रकाशक यांच्या कार्याची व परिश्रमांची मराठी साहित्यात अजूनही दखल घेतली जात नाही. माझा उद्देश या लेखांमधून पूर्ण होतो असं मला वाटतं. या पुस्तकात अन्य लेखकांचे १९ आणि अंतरकर कुटुंबातल्या फक्त दोन जणांचे लेख आहेत. त्यात आनंद अंतरकरांचा लेख संपादक व गुरू असलेल्या अंतरकरांबद्दल आहे. त्यांच्या आणि माझ्या लेखांबद्दल जगताप यांची पिरपिर आहेच. हे लेख तसे वाचनीय आहेत, असं म्हणण्याचं औदार्य ते एकीकडे दाखवतात, आणि हे आपण भलतंच काय लिहिलं असं वाटून लगेचच आम्हाला छडीही मारत गरजतात- 'पण या लेखामध्ये अतिशयोक्ती, उपमा, उत्प्रेक्षा यांचा मारा आहे!' पण अतिशयोक्ती कुठे आहे आणि तो मारा कुठे आहे, याची उदाहरणं ते देत नाहीत. जगताप पुढे आम्हाला हुकूम देतात : 'अनंत अंतरकर आमचे वडील या मानसिकतेतून त्यांच्या मुलांनी बाहेर यावं.' अरे वा! आणि ते काय म्हणून? अनंत अंतरकर आमचे वडील होते, हे जैविक सत्य आहे. आणि केवळ जैविक नव्हे, तर अभिमानास्पद सत्य आहे. आजवर आम्ही 'साक्षेपी टीका' ऐकून होतो. जगतापांमुळे मराठी साहित्यात 'आक्षेपी टीका' या नव्या प्रकाराची मूल्यवान भर पडली आहे.
- अरुणा अन्तरकर

Sunday, January 12, 2014

कडेलोटाकडून 'क्रांती'कडे!

भारतात  आर्थिक उदारीकरणाची सुरुवात झाली त्याआधी सोनं गहाण ठेवण्याची नामुष्की आली होती हे बहुतेकांना माहीत असतं. ती- सोनं गहाण ठेवल्याची- बातमी ज्यांनी प्रथम बाहेर आणली, ते ज्येष्ठ पत्रकार शंकर अय्यर यांनीच भारतातल्या आणखी सहा क्रांतिकारी बदलांकडे जरा बारकाईने पाहिलं.. या सात बदलांमागची निकड काय नि किती होती, हेही..
आर्थिक उदारीकरणानं १९९१ ते २०११ या दोन दशकांत भारतीय जनमानस चांगलंच ढवळून काढलं. या घुसळणीमुळेच, हा २० वर्षांचा काळ स्वातंत्र्योत्तर भारतातील एक महत्त्वाचं पर्व मानला जाण्याची शक्यता निर्माण झाली. शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमं, नाटक, चित्रपट, साहित्य अशा अनेक क्षेत्रांवर उदारीकरणाचा बरा-वाईट परिणाम झाला आहे. या काळात भारतातील सर्व सेवासुविधा आणि क्षेत्रं उदारीकरणाच्या तडाख्यात सापडली आहेत. गेल्या काही वर्षांत कुठल्याही क्षेत्राचा आढावा घेताना ९१ पूर्व आणि नंतर अशीच मांडणी केली जात आहे. (किंवा तशी मांडणी केली जायला हवी, असा बदल या दोन दशकाने घडवला आहे.) मग ते शिक्षण असो की सेवा उद्योग. बर्लिनची भिंत पडल्यानंतर केवळ पूर्व आणि पश्चिम जर्मनीतच बदल झाला असं नाही तर जगही बर्लिन िभतपूर्व आणि नंतर असं विभागलं गेलं. नव्वदच्या दशकात भारतात सुरू झालेल्या आर्थिक उदारीकरणाने भारताचीही अशीच विभागणी केली आहे.
पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना या उदारीकरण पर्वाचे शिल्पकार मानले जाते. पण या पर्वाची सुरुवात झाली तरी कशी? कुठल्याही मोठय़ा बदलाची सुरुवात ही छोटय़ा गोष्टीमधूनच होते. १९९१ मध्ये परकीय गंगाजळी आटली आणि भारतावर सोने गहाण टाकण्याची वेळ आली. प्रसंग म्हटला तर बाका होता. त्या वेळी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांना संभाव्य आणि बऱ्याचशा अपरिहार्य परिस्थितीची कल्पना आली. त्यांनी नरसिंह राव यांना ही बिकट परिस्थिती सांगितली आणि त्यांनी दूरदृष्टीने निर्णय घेत मनमोहन सिंग यांच्या धोरणांना पाठिंबा दिला आणि उदारीकरण पर्वाला सुरुवात झाली.
या साऱ्या घडामोडीचा साक्षीदार होण्याची संधी सर्वप्रथम पत्रकारांना मिळते. इंडियन एक्स्प्रेसचे पत्रकार शंकर अय्यर यांना ती मिळाली. एवढेच नव्हे तर त्यांनी तिचा पुरेपूर फायदाही उठवला, असंच म्हणावं लागेल. कारण परकीय गंगाजळी आटल्याने भारतावर सोने गहाण टाकण्याची वेळ आली आहे, ही बातमी अय्यर यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये दिली.. देशातील जनतेला याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे या बातमीने भारतीय अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले. अय्यर यांनी नंतरच्या घडामोडींचेही वृत्तांकन केले. म्हणजे एका ऐतिहासिक घडामोडीची सुरुवात त्यांनी अतिशय जवळून पाहिली, अनुभवली.
त्या आधारावर त्यांनी 'अ‍ॅक्सिडेंटल इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे. याचे उपशीर्षक आहे 'अ हिस्ट्री ऑफ द नेशन्स पॅसेज थ्रू क्रायसिस अँड चेंज'. एकंदर नऊ प्रकरणांतून त्यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला आहे. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १९४७ ते १९९१ आणि १९९१ ते २०११ या दोन टप्प्यांमध्ये भारताने नेमकी कशी वाटचाल केली, याचा आढावा घेताना अय्यर यांनी एक प्रमेय मांडले आहे. ते म्हणजे स्वातंत्र्यापासूनचा कुठलाही महत्त्वाचा बदल हा पेचप्रसंग निर्माण झाल्यावरच घडला आहे. १९६४ ची हरित क्रांती, १९६९ मधील बँकांचे राष्ट्रीयीकरण, १९७०ची श्वेतक्रांती, १९८२ ची महत्त्वाकांक्षी माध्यान्ह आहार योजना, १९९० मधील सॉफ्टवेअर क्रांती आणि २००५ मधील माहितीच्या अधिकाराचा कायदा या सात गोष्टींनी अभूतपूर्व म्हणावे असे बदल केले. भारतीय जनमानसासह इतरही अनेक गोष्टींचा कायापालट केला. त्यामुळे भारतीयांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला. पांढरपेशा म्हटल्या जाणाऱ्या मध्यमवर्गाचे निम्न, मध्यम आणि उच्च असे तीन स्तर तयार झाले. शिवाय त्याची संख्याही किती तरी पटीने वाढली. खेडय़ांचा कायापालट झाला, शहरांचा चेहरामोहरा बदलला. एक ना अनेक. पण वरील सातही बदलांची सुरुवात अपरिहार्यतेच्या टकमक टोकावर पोहोचल्यानंतरच झाली, असे हे अय्यर यांचे प्रमेय आहे. किंबहुना त्यांचा काहीसा ठाम दावा आहे. वरील सातही बदल कोणते पेचप्रसंग उद्भवल्यावर घेतले गेले त्यांची तपशिलासह त्यांनी प्रकरणनिहाय मांडणी केली आहे. म्हणजे त्यांनी आपले प्रमेय माहिती, संदर्भ आणि पुराव्यांसह मांडले आहे. अर्थात तरीही तो वादाचा विषय होऊ शकतो, तो भाग वेगळा.
पण त्यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की, भारताची आजवरची प्रगतीही द्रष्टेपणातून आणि भविष्याचा विचार करून झालेली नाही तर ती कडेलोटाच्या टोकावर पोहोचल्यावर निर्माण झालेल्या आणीबाणीतून झालेली आहे.
भारतीय जनमानसाचा हा स्वाभाविक धर्म आहे. त्यामुळे आला दिवस साजरा करायचा, उद्याचा विचार करायचा नाही, ही विचारसरणी राज्यकर्त्यांच्याही हाडीमांसी भिनली असल्याने बाका प्रसंग निर्माण होईपर्यंत सर्व जण गाढ झोपलेले असतात.
लोकानुनयी राजकारण, आघाडय़ांची सरकारे, प्रांतिक अस्मिता आणि दबावगट; जातीय-धार्मिक भेद अशा अनेक कारणांनी कटू पण अपरिहार्य निर्णय घेण्याचे सरकार टाळते तरी किंवा आधी घेतलेले निर्णय मागे तरी घेते. जग ज्या गतीने आणि रीतीने बदलत आहे, त्याचा नुसता कानोसा घेतला तरी 'सर्व पर्याय संपल्यावर येणारी जाग' या मानसिकतेतून बाहेर पडण्याची नितांत निकडीची गरज आहे, याचे भान हे पुस्तक वाचल्यावर येते.
हे पुस्तक केवळ भारताच्या आर्थिक बदलांचा आढावा घेणारे नाही, तर ते त्यामागे असलेल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि इतर क्षेत्रांचाही आढावा घेते. तो घेताना अय्यर यांनी भरपूर कष्ट घेतले आहेत. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, उद्योग अशा क्षेत्रांतील मान्यवरांच्या पन्नासहून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. याशिवाय इतर लेखकांनी लिहिलेली पुस्तके, खासगी अभ्याससंस्थांचे तसेच सरकारी अहवाल, लेख, प्राथमिक व दुय्यम संदर्भ साधने यांचाही बारकाईने अभ्यास केला आहे. त्यामुळे या पुस्तकाला विशेष संदर्भमूल्य प्राप्त झालेले आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, इतिहास आणि वर्तमान या सर्व पातळ्यांवरील आधुनिक भारताचा प्रवास कसा झाला, कसा होत आहे, याचा हा साक्षात्कारी 'इतिहास' आहे.
हे पुस्तक वाचून झाल्यावर खरं तर थोडी विषण्णता येते आणि कडेलोटाच्या टोकावर पोहोचल्यावरच भानावर येण्याच्या आपल्या भारतीय मानसिकतेवर काही तरी अक्सीर इलाज करायची गरज आहे, याची तीव्रतेने जाणीव होते.
अ‍ॅक्सिडेंटल इंडिया : शंकर अय्यर,
अलेफ बुक कंपनी, नवी दिल्ली,
पाने- ३५२, किंमत : ६९५ रुपये

Sunday, December 8, 2013

बाजारू पुरस्कार संस्कृती

Published in Loksatta: Sunday, December 8, 2013
वर्षांची अखेर आणि नववर्षांरंभ हा दीड-दोन महिन्यांचा काळ मराठी साहित्यासाठी नवी उभारी देणारा, चतन्याचा, कुतूहलाचा आणि उत्साहाचा असतो. कारण या काळात भैरूरतन दमाणी, महाराष्ट्र फाऊंडेशन, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, पद्म सन्मान इत्यादी महत्त्वाच्या पुरस्कारांसह राज्यपातळीवरील अनेक छोटे-मोठे पुरस्कार जाहीर होतात. त्यामुळे या काळात मराठी साहित्यविश्व एका अनावर ओढीने भारलेले असते. जसजसे पुरस्कार जाहीर होत जातात, तसतशी काहींच्या आनंदात भर, तर काहींच्या आनंदावर विरजण पडते. मग दबक्या आवाजात, खाजगी गप्पांमध्ये आपल्याला कसे डावलले गेले आणि अमक्याने कशी वशिलेबाजी करून आपली वर्णी लावून घेतली असे चर्वितचर्वण सुरू होते.
एखाद्या व्यक्तीला वा पुस्तकाला पुरस्कार मिळतो, याचा अर्थच असा असतो की, त्या व्यक्तीचा वा पुस्तकाचा विचार हा अनुकरणीय आहे, समाजाला पुढे नेणारा, निदानपक्षी विचारप्रवृत्त करणारा आहे. पण आपल्यालाच पुरस्कार मिळावा यासाठी मराठी लेखकच मोठय़ा प्रमाणावर लॉबिंग करताना दिसतात.
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार निवड समितीवर मराठवाडय़ातले संतसाहित्याचे एक अभ्यासक होते. त्यांची इच्छा होती की, हा पुरस्कार आपल्यालाच मिळावा. तसे त्यांनी जाहीरपणे समितीतल्या सदस्यांना बोलूनही दाखवले. आणि त्यांचे वय पाहता त्याविषयी कुणी ब्र उच्चारला नाही. परिणामी निवड समितीच्या शेवटच्या बैठकीत हा पुरस्कार 'त्या' सन्माननीय सदस्यालाच दिला गेला.
असेच दुसरे एक मराठवाडय़ातलेच उदाहरण देता येईल. हेही वयोवृद्ध साहित्यिक. त्यांनी अलीकडेच महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांना स्वत:च फोन करून सांगितले की, महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार तुम्ही इतक्या साहित्यिकांना दिला आहे, पण अजून मला दिलेला नाही.
एक तरुण कवी राज्य सरकारचे पुरस्कार जाहीर झाले की, आपल्या कवितेची मुद्दाम दखल न घेता आपल्याला कसे डावलले गेले, याची शोककहाणी ऐकवीत असे.
दोनेक वर्षांपूर्वी ज्ञानपीठ पुरस्कारासाठी मराठीतील नावे सुचवण्यासाठीचे पत्र एका मान्यवर साहित्यिकाकडे आल्यावर त्यांनी इतरांचे नाव सुचवण्याऐवजी 'या पुरस्कारासाठी काय करावे लागते?,' याचीच विचारणा इतरांकडे करायला सुरुवात केली होती.
'माझे आता शेवटचे दिवस आहेत. निदान या काळात तरी मला हा पुरस्कार मिळावा,' असे बोलून दाखवणारे साहित्यिक आणि 'अमुक लेखक आता उतारवयात आहेत, त्यामुळे त्यांचा प्राध्यान्यक्रमाने विचारू करू, अमुक लेखक अजून तरुण आहेत, त्यांचा नंतरही विचार करता येईल,' अशी अनुकंपा दाखवणाऱ्या पुरस्कार निवड समित्या अशा दोहोंची वाढती संख्या पुरस्कारांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारी आणि त्यांची प्रतिष्ठा कमी करणारी आहे. हे प्रकार मराठी साहित्यातल्या अनेक पुरस्कारांबाबत नियमितपणे घडत आहेत. तशी आर्जवे करणाऱ्या साहित्यिकांना आणि पुरस्कार देणाऱ्या संस्थांना याचे काहीही सोयरसुतक वाटत नाही.
पुरस्कारासाठी खटपटी-लटपटी करणाऱ्या साहित्यिकांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रात काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत. त्यामुळे या लेखातील चर्चा अन्य बहुतांविषयीची आहे. पण असे म्हटले की काहीजण सोयीस्करपणे स्वत:चा 'सन्माननीय अपवादा'त समावेश करून घेतात. नुकत्याच पद्म पुरस्कारासाठी लता मंगेशकर यांनी उषा मंगेशकर यांची, तर अमजद अली खॉं यांनी त्यांच्या मुलाचीच शिफारस केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठीतल्या अनेक लेखकांकडून असे प्रयत्न केले जातात. किंवा त्यांच्या वतीने त्यांचे मित्र-आप्त ते करतात. अनेक पुरस्कार हे कुणाला तरी खूश करण्यासाठी, त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी किंवा त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठीच सुरू झाले आहेत की काय असे वाटते. (कै.) रवींद्र पिंगे यांनी काही वर्षांपूर्वी एक आठवण सांगितली होती. प्रकाश नारायण संत यांच्या एका पुस्तकाला एक पुरस्कार जाहीर झाला होता. त्या पुरस्कार निवड समितीत स्वत: पिंगेच होते. नंतर काही महिन्यांनी पिंगे कऱ्हाडला गेले असता त्यांनी संत यांचे पुरस्कारासाठी अभिनंदन करून आपणच त्या निवड समितीत होतो असे सांगितले. पिंग्यांची अपेक्षा होती की, संत खूश होऊन निदानपक्षी आपल्याला धन्यवाद देतील. पण संतांनी शांतपणे 'बरं' एवढेच उत्तर देऊन त्यांना वाटेला लावले. पण अशी उदाहरणे कमी.
ही परिस्थिती केवळ राज्यस्तरीय पुरस्कारांबाबतच आहे असे नाही, तर राष्ट्रीय पुरस्कारांबाबतही कमी-अधिक फरकाने हेच प्रकार घडताना दिसतात. यासंदर्भात साहित्य अकादमी पुरस्कारांचे उदाहरण देता येईल. साहित्य अकादमीचे पुरस्कार हे २४ भारतीय भाषांतील लेखकांना दिले जातात. या पुरस्कारांसाठी अलीकडच्या काळात कथा, कविता, कादंबरी या लेखनप्रकारांचाच प्रामुख्याने विचार केला जातो आहे की काय असा प्रश्न पडतो. २००० नंतरच्या मराठीला मिळालेल्या अकादमी पुरस्कारांवर नजर टाकली तर असे दिसते की, गेल्या बारा वर्षांत तीन कवितासंग्रह, पाच कादंबऱ्या, एक नाटक, एक चरित्र, एक समीक्षा आणि एक  लघुनिबंध यांना हे पुरस्कार दिले गेले आहेत. याचा एक अर्थ असा होतो की, या बारा वर्षांच्या काळात मराठीत एकही चांगले वैचारिक पुस्तक लिहिले गेले नाही आणि एकही चांगले आत्मचरित्र लिहिले गेले नाही. खरेच अशी स्थिती आहे का? मराठीमध्ये वैचारिक लेखन होतच नाही, की जे होते ते पुरस्काराच्या गुणवत्तेचे नसते? (अर्थात हेही तितकेच खरे आहे की, अलीकडच्या काळात वैचारिक लेखन म्हणजे गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, टिळक, भांडवलवाद, समाजवाद, जातिवास्तव याच विषयावरील लेखन असा समज अनेकांनी करून घेतला आहे. म्हणजे भूतकाळाचेच पुनर्मूल्यांकन करण्यात सारी ऊर्जा खर्च केली जाते. आजच्या समाजवास्तवाचा वेध घेणारी,  समस्या-प्रश्नांची उकल करणारी पुस्तके मराठीत फारशी लिहिली जात नाहीत. पण तो स्वतंत्र विषय आहे.) 

या ज्या बारा पुस्तकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत, त्यातील सर्वच्या सर्व पुस्तके निर्विवादपणे चांगली म्हणावीत अशी आहेत का? ज्या पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो, त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करता येईल अशीच स्थिती असते. पण तसे कुणी करत नाही. २०११ चा पुरस्कार कवी ग्रेस यांना त्यांच्या 'वाऱ्याने हलते रान' या पुस्तकासाठी देण्यात आला. एरवी आपल्या बाणेदार वक्तव्यासाठी आणि विक्षिप्तपणासाठी प्रसिद्ध असलेले ग्रेस तेव्हा शारीरिकदृष्टय़ा खूपच विकल झालेले होते. किंबहुना म्हणूनच त्यांना हा पुरस्कार दिला गेला असावा. अन्यथा 'वाऱ्याने हलते रान' हे त्यांचे ललितलेखांचे पुस्तक त्यामानाने खूपच सामान्य दर्जाचे म्हणावे लागेल. पण त्याविषयी उघडपणे बोलणार कोण? दुसरे असे की, अकादमीच्या निवड समितीवर बहुतांशी सर्जनशील लेखक असल्याने ते इतर लेखनप्रकार विचारतच घेत नसावेत. निदान तसे चित्र तरी निर्माण होते आहे.
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कारांचीही काहीशी अशीच तऱ्हा आहे. अलीकडच्या काळात फाऊंडेशनचे पुरस्कार ज्या पुस्तकांना दिले जातात, ती पाहून, वाचून काहीशी निराशा होते. कारण त्यातल्या बहुतांशी पुरस्कारप्राप्त लेखकांची मनोगते आणि त्यांची पुस्तके नकारात्मक असतात. (या पुरस्कारांच्या निमित्ताने जी स्मरणिका काढली जाते. त्यातही दोन वर्षांपूर्वीच्या संपादकीयात याचा उल्लेख केलेला आहे.) त्यातून व्यवस्थेविषयी आणि सभोवतालच्या परिस्थितीविषयी जरा जास्तच निराशाजनक चित्र रंगवताना ते दिसतात. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तच फुगवून सांगण्याचा प्रकार आणि समस्यांचा बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केलेला असतो. सध्याच्या व्यामिश्र वास्तवाचे योग्य ते आकलन करून घेता येत नाही म्हणून काहींनी पुनरुज्जीवनवादाची वाट धरली आहे. 'आमच्या काळी असं होतं' वा 'अमुक काळी असं होतं' हा ज्येष्ठांचा शिरस्ताच असतो. पण चाळिशी न उलटलेले साहित्यिकही जेव्हा वर्तमानाविषयी नकारात्मक होऊन आजच्या काळाकडेही जुन्या चष्म्यातूनच पाहू लागतात तेव्हा मात्र आश्चर्य वाटते. ज्यांचे समाजाविषयीचे, राजकारणाविषयीचे आणि लोकशाहीविषयीचे आकलन अगदीच तोकडे म्हणावे असे आहे, असेच लोक त्याविषयी बेधडक विधाने करताना दिसतात. यात अलीकडच्या काळात मराठीतल्या सर्जनशील साहित्यिकांची संख्या सर्वाधिक आहे.
इथे साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र फाऊंडेशनचे उदाहरण दिले असले तरी मराठीतल्या बहुतांश पुरस्कार निवड समित्यांवर सर्जनशील साहित्यिक किंवा दुय्यम दर्जाचे समीक्षकच असतात. सर्जनशील लेखकांचा अहम् इतरांपेक्षा जरा जास्तच मोठा असतो. आपल्यापेक्षा इतर कुणी चांगले लिहीत नाही, अशी त्यातल्या काहींची धारणा असते. (यातूनच काही वर्षांपूर्वी एका मान्यवर कवीने ते साहित्य अकादमीच्या निवड समितीवर होते तोवर कुणाही कवीला हा पुरस्कार मिळू दिला नव्हता.) आणि त्यांचे राग-लोभही तीव्र असल्याने आपल्या विरोधकांना डावलण्याची संधी ते सोडत नाहीत. या सर्जनशील लेखकांच्या बरोबरीनेच अशाच प्रवृत्तीच्या दुय्यम दर्जाच्या समीक्षकांचा नंबर लागतो. दुय्यम दर्जाचे लोक प्रथम दर्जाची निवड करू शकत नाहीत, असे गृहीत धरले तरी त्यांनी किमान दुय्यम दर्जाची निवड करणे अपेक्षित आहे. पण तेही होताना दिसत नाही. त्यांचा सरळसोट हिशोब असतो- आपल्याला मानणारा, भविष्यात आपल्या कामी येणारा आणि आपल्या फायद्याचा माणूस हा त्यांचा प्राधान्यक्रम असतो. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे सर्जनशील लेखकांच्या आणि समीक्षकांच्या निवड समितीने स्वत: वाचलेल्या, प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि त्यांना माहीत असलेल्या पुस्तकांची संख्या खूपच कमी असते. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी पुरस्काराच्या निर्धारित कालातील किमान महत्त्वाची सर्व पुस्तके पाहिलेली असतात असेही नाही. आणि तशी गरजही त्यातल्या अनेकांना वाटत नाही. त्यामुळे सामान्य पुस्तकांचा उदोउदो होतो.
समाजातील विशिष्ट वास्तवाला भिडणाऱ्या साहित्यिकांकडे किमान काही विचार असावा आणि किमान काही कृती असावी- जी उल्लेखनीय म्हणावी अशी आहे, अशी अपेक्षा असते. पण अनेक मराठी साहित्यिकांकडे नेमका कोणता विचार आहे, हे त्यांच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकांमधूनही दिसत नाही आणि त्यांच्या बोलण्यातूनही दिसत नाही. आणि तरीही अशा लोकांच्या वाटय़ाला पुरस्कार, मानसन्मान येत असतील तर ते एकंदरच सामाजिक अनारोग्याचेच लक्षण नव्हे काय?
आपल्या आई-वडिलांच्या नावे साहित्य पुरस्कार सुरू करण्याची टूमही अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. असे पुरस्कार सुरू करून केवळ पैशाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणे आणि साहित्यिकांना उपकृत करणे, हा काहींचा व्यवसाय झाला आहे. त्याला मराठी साहित्यिक मोठय़ा प्रमाणावर बळी पडत आहेत. शिवाय या पुरस्कारांच्या रकमा बऱ्यापैकी घसघशीत असतात. एका पुस्तकाच्या आवृत्तीतून चार-दोन वर्षांनी जेवढे मानधन मिळते तेवढे पैसे असे पुरस्कार एकरकमी देतात. त्यामुळे या 'रमण्या'चा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात.
पुरस्कारांची दरवर्षी नित्यनेमाने खिरापत वाटणाऱ्या सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्था किती पारदर्शक व्यवहार करतात, हाही प्रश्नच आहे. यासंदर्भात इंग्रजीतील पुरस्कारांचे एक उदाहरण पाहता येईल. इंग्रजीतील अनेक पुरस्कार देणाऱ्या संस्था त्यांनी पहिल्या व दुसऱ्या फेरीत निवडलेल्या पुस्तकांच्या शॉर्ट-लिस्ट जाहीर करतात आणि मग त्यातून अंतिम पुरस्कारांची निवड करतात. या पारदर्शकतेमुळे पुरस्कारांसाठी निवडलेल्या पुस्तकांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचून कुठली पुस्तके स्पर्धेत होती, त्यातून अंतिमत: कुठल्या पुस्तकाला पुरस्कार दिला गेला, याची त्यांना कल्पना येते. शिवाय या पारदर्शकतेमुळे परीक्षकांवरचे दडपणही आपोआप वाढते. त्यामुळे चांगल्या पुस्तकावर अन्याय होण्याची शक्यता कमी होते. इतरांनाही फार आरोप करता येत नाहीत. हा 'लोकशाही मार्ग' मराठीतल्या पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी अवलंबला तर त्यांच्या विश्वसार्हतेला अधिक बळकटी येईल.
कुठल्यातरी प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्याची बातमी दस्तुरखुद्द लेखकानेच अनेकांना फोन करून सांगणे, पुन: पुन्हा मेलवरून पाठवणे, फेसबुकवर टाकणे, कुणालातरी त्यानिमित्ताने आपल्यावर लेख लिहायला सांगणे, या गोष्टी जेवढय़ा उत्साहाने केल्या जातात, तेवढय़ाच उत्साहाने पुरस्कार देणाऱ्या संस्थेची विश्वासार्हता, त्यांचे पुरस्कारासाठीचे निकष व हेतू आणि आपली निवड निव्वळ गुणवत्तेवरच झाली आहे ना, याची शहानिशा करावीशी वाटते का? गेल्या २०-२२ वर्षांत पुरस्कार देणाऱ्या संस्था-प्रतिष्ठाने यांचा महाराष्ट्रात सुळसुळाट झाला आहे. त्यांच्या हेतूंची खातरजमा न करता केवळ आपल्याला पुरस्कार मिळतोय तर घ्या, एवढाच विचार केला जात असेल तर ते ढोंगाला आमंत्रण देण्यासारखेच नाही काय?
सत्याचे आकलन करून घेण्यासाठी 'सत्यनिष्ठ' असणे ही पूर्वअट असते. पण सत्याची व्याख्याच व्यक्तिसापेक्ष असेल तर कोणताही उपाय चालत नाही. सत्याचा संबंध मूल्यांशी, नीतिमत्तेशी असतो. पण मराठीतल्या सर्जनशील लेखकांची सत्यनिष्ठा, नीतिमत्ता आणि मूल्यव्यवस्था कायमच संशयास्पद राहिलेली आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, लोकशाही, शासनव्यवस्था याविषयीचे त्यांचे आकलन तोकडे असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्याकडून सत्याचा अपलाप, मूल्यांची धरसोड, तारतम्यपूर्ण विवेकाशी फारकत, नीतिमत्तेला तिलांजली हे अपराध कमी-अधिक प्रमाणात सतत घडत आले आहेत.
अशा सोंगढोंगाच्या दुनियेत बजबजपुरीच माजते. ही बजबजपुरी साहित्यबाह्य़ अवगुणांना जन्म देते. लिहिणारे उदंड, समीक्षा करणारे उदंड, पुरस्कार देणाऱ्या संस्था उदंड अशा कोलाहलात कोणतेच तारतम्य राहत नाही. परिणामी विवेकहीन, पण खोटय़ा प्रतिष्ठेला महत्त्व येते. अशा परिस्थितीत कंपूबाजी, वशिलेबाजी, नातीगोती एवढीच अनेकांच्या आकलनाची आणि सर्जनशीलतेचीही उंची होते. महाराष्ट्रातल्या अनेक पुरस्कारांची, ती देणाऱ्या संस्थांची, घेणाऱ्या साहित्यिकांची अवस्था सध्या अशीच झालेली आहे आणि या बाजारू पुरस्कार संस्कृतीमुळे  दिवसेंदिवस सामाजिक-सांस्कृतिक अनारोग्यात वाढ होत आहे.

Friday, December 6, 2013

वर्ष दोन, आवृत्त्या चार

गिरीश सहस्रबुद्धे यांचे नवे मुखपृष्ट
आमच्या 'मराठा समाज- वास्तव आणि अपेक्षा'  पुस्तकाची चौथी आवृत्ती लवकरच नव्या मुखपृष्ठासह राजहंस प्रकाशन बाजारात आणत आहे. गिरीश सहस्रबुद्धे यांचे नवे मुखपृष्ट वाचकांना आवडेल असे वाटते. सप्टेंबर २०१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि गेल्या तीन वर्षांत तीन आवृत्त्या संपल्या. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद वाचकांनी दिला. आता या पुस्तकाचा दुसरा भाग आम्ही संपादित करत आहोत. तो लवकरच बाजारात येईल असा प्रयत्न आहे.  
आधीचे कमल शेडगे यांचे मुखपृष्ट

Wednesday, November 27, 2013

सयाजीराव आणि यशवंतराव

Published in Loksatta- Saturday, March 9, 2013.
११ मार्च रोजी बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या १५०व्या जयंती वर्षांची, तर १३ मार्च रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने आधुनिक भारताच्या इतिहासात असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या या दोन समाजपुरुषांचं स्मरण करणं समयोचित आणि न्यायोचित ठरेल. एक 'न्यायी राजा' मानला गेला, तर दुसरा 'जनतेचा राजा' मानला गेला. दोघंही सामान्य कुटुंबातून पुढे आलेले. सयाजीराव गुराख्याचं पोर, तर यशवंतराव शेतकऱ्याचं पोर. सयाजीराव बडोदा संस्थानचे राजे झाले, तर यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. एकाचा काळ स्वातंत्र्यपूर्व, तर दुसऱ्याचा स्वातंत्र्योत्तर. एकाचा नियंत्रक ब्रिटिश, तर दुसऱ्याचा हायकमांड. पण दोघांनीही आपल्या कुशल नेतृत्वाने, बहुजनवादी राजकारणाने, संघटन कौशल्याने कालच्या-आजच्या आणि उद्याच्या पिढय़ांसाठी आदर्शाचे मानदंड उभे करून ठेवले आहेत.
या दोघांनाही तळागाळातल्या जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण होती. बहुजन समाजाला बरोबर घेत, अभिजनांचा आदर करत केवळ बेरजेचंच राजकारण करण्यावर त्यांनी भर दिला. यशवंतरावांचं राजकारण सयाजीरावांसारखंच बहुजनवादी होतं. असं राजकारण करण्यासाठी आयडिऑलॉजी असावी लागते. सयाजीरावांची लोकशाहीवर अढळ निष्ठा होती, तर यशवंतराव रॉयिस्ट होते.
विचारवंत, कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ व संशोधक यांचा योग्य मानसन्मान करण्याचं, त्यांची कदर करण्याचं सांस्कृतिक भान दोघांकडेही होतं. 'राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे' अशी यशवंतरावांची तळमळ होती आणि सयाजीरावांचं तर ते जणू ब्रीदवाक्यच होतं. राजकारण हा समाजकारणाचाच भाग असतो. सर्वसमावेशक राजकारण करण्यासाठी कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि समाजभान यांची चांगली जाण असावी लागते. त्याचा प्रत्ययही या दोघांमध्ये येतोच.
आपल्याला आखून दिलेल्या चौकटीतही चांगलं काम करता येतं. एवढंच नव्हे तर आतून ढकलून ढकलून ती चौकट रुंदावताही येते, याचं उत्तम उदाहरण म्हणूनही सयाजीराव आणि यशवंतराव यांच्याकडे पाहता येतं. सयाजीरावांनी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा यांची पायाभरणी केली, तर यशवंतरावांनी साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ यांसारख्या संस्थांची निर्मिती केली. पण नुसत्या चांगल्या संस्था उभारून भागत नाही. त्या योग्य माणसांच्या हातीही सोपवाव्या लागतात. त्यांना पुरेसं स्वातंत्र्य द्यावं लागतं. सयाजीराव आणि यशवंतराव यांनी अनुक्रमे दामोधर सावळाराम यंदे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची निवड केली, त्यांनीही त्या संस्थांना लौकिक मिळवून दिला. सयाजीरावांनी हरहुन्नरी व कल्पक यंदे यांना महाराष्ट्रातून बडोद्याला बोलावून घेऊन त्यांना छापखाना व प्रकाशन संस्था सुरू करण्यास सांगितली. यंदे यांनी 'सयाजी विजय' हे वर्तमानपत्र चालवलं, 'ग्रंथमाला', 'श्रीसयाजी साहित्यमाला', 'श्रीसयाजी-बालज्ञानमाला' प्रकाशित करून अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची, 'व्यायामकोशा'सारख्या कोशांची निर्मिती केली. 'श्यामची आई' हे आज अभिजात मानलं जाणारं साने गुरुजी यांचं पुस्तक यशवंतरावांच्या शिफारशीमुळेच 'इंद्रायणी साहित्य'कडून प्रकाशित होऊ शकलं. सयाजीरावांमुळे डॉ. आंबेडकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकले. स्वत: त्यांनीही इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, आफ्रिका या देशांचे दौरे करून तेथील आधुनिक बदल समजावून घेतले. सयाजीरावांनी १९३२ साली कोल्हापूरमध्ये भरलेल्या अ.भा.म.साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं, तसंच १९३३ साली शिकागो इथं झालेल्या दुसऱ्या  जागतिक धर्म परिषदेचं उद्घाटनही केलं. यशवंतरावांनी १९६५च्या हैदराबादमधील साहित्य संमेलनाचं उद्घाटकपद तर १९७५च्या कराडमधील साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद भूषवलं. कराडच्या साहित्य संमेलनात सरकारचा प्रतिनिधी म्हणून दुर्गा भागवत या नैतिक तोफखान्यापुढे आपल्यावर नामुष्की ओढवली जाणार, याची पूर्ण कल्पना असतानाही यशवंतराव त्या प्रसंगाला सामोरे गेले आणि ती परिस्थिती सावरून घेऊन त्यांनी संमेलन निर्विघ्न पार पडू देण्याचा उमदेपणाही दाखवला!
यशवंतराव अनेक साहित्य संमेलनांना हजर राहत. व्यासपीठावर जाऊन स्वत:चाच सत्कार-समारंभ घडवून आणण्याऐवजी श्रोत्यांत बसून संमेलनाचा आस्वाद घेत. स्वत:च्या अंगावरची सत्तेची झूल अशी सहजतेनं उतरवता येणं, हे सयाजीराव-यशवंतरावांना जमायचं. सयाजीरावांनी बडोदा संस्थानात वस्त्रोद्योगाची स्थापना केली. बालविवाह बंदी, अस्पृश्यता निर्मूलन, घटस्फोट याविषयीचे कायदे केले. ग्रंथालयं काढली, शाळा-कॉलेजेस काढली. विद्यापीठाची स्थापना केली. तर यशवंतरावांनी सहकार उद्योगाची पायाभरणी करतानाच त्याची सत्ता एकवटू नये यासाठी त्याच्या  विकेंद्रीकरणावर भर दिला.  सयाजीरावांचं वैभव आणि राजेपण यामुळे सामान्य जनता त्यांच्याकडे आकर्षित व्हायची, तर यशवंतरावांना तळगाळातल्या प्रश्नांची कल्पना असल्याने ते कुणाशीही सहजतेनं संवाद करू शकायचे. लोकांनाही त्यांच्याबद्दल आपलेपणा आणि विश्वास वाटायचा. संवदेनक्षम मन आणि मनमिळाऊ स्वभाव ही दोघांचीही वैशिष्टय़ं होती. त्यामुळेच त्यांच्या वाटय़ाला आलेलं जनतेचं प्रेम, विलोभनीय होतं.
गेल्या वर्षी दोघांवरही दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, त्या सामान्य वकुबाच्या आहेत ही गोष्ट वेगळी. दोघांच्याही भाषणांचे-लेखांचे संग्रह प्रकाशित झाले. याआधीही सयाजीरावांना केवळ ब्रिटिशांचे मांडलिक ठरवणारं आणि त्यांचा भाबडेपणाने उदो उदो करणारं लेखनही झालं आहे, तसंच यशवंतरावांविषयीही अभिनंदन, गौरवपर लेखन जसं कमी नाही, तसंच अकारण अभिनिवेशी आणि पूर्वग्रहदूषित लेखनही कमी नाही. पण दोघांचीही चिकित्सक, सत्यान्वेषी आणि तटस्थ पण सविस्तर चरित्रं मात्र अजून प्रकाशित होऊ शकलेली नाहीत. सयाजीराव-यशवंतराव यांच्यासारख्या समाजपुरुषांची पुन:पुन्हा चरित्रं लिहिली जाणं, त्यांच्या कामाचं पुन:पुन्हा मूल्यमापन  होणं, हे त्यांच्या कर्तृत्वाचं यथायोग्य मूल्यांकन करण्यासाठी गरजेचं असतं. आणि भावी पिढय़ांसाठीही. पण तसे समर्थ चरित्रकार अजूनपर्यंत या दोघांनाही मिळालेले नाहीत. यापुढच्या काळात तरी मिळावेत आणि आपला बौद्धिक आळसही संपावा, अशी आशा करू या. 'विचारांची, माणसांच्या मनांची मशागत करणे आणि त्याचे आदर्श परिणाम घडवून आणणे या नेतृत्वाच्या कसोटय़ा असतात' असं यशवंतरावांनी म्हटलं आहे. ते या दोघांनाही लागू पडतं.

Thursday, October 31, 2013

काय करावं आणि कसं पाहावं?

मूर्ती यांनी प्रत्येक विषयाला स्वानुभवाकडे तरी वळवलं आहे किंवा स्वानुभवाकडून तरी ते विषयाकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यात सच्चेपणा आहे, कळकळ आहे आणि बांधीलकीही. त्यामुळे या पुस्तकातून काय करायला हवं आणि कसं पाहायला हवे, याबाबतचा दृष्टिकोन मिळू शकतो. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, हेही खरे.

हे पुस्तक म्हणजे इन्फोसिसचे एक संस्थापक एन. नारायण मूर्ती यांनी वेळोवेळी दिलेल्या भाषणांचा आणि लिहिलेल्या काही नैमित्तिक लेखांचा संग्रह आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर या संग्रहाविषयी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा अभिप्राय छापला आहे. तो असा- ‘‘लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासामोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहर्‍याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणा-या पिढय़ांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.’’

त्याखाली मायक्रोसॉफ्ट कॉपरेरेशनच्या बिल गेट्स यांचा अभिप्राय आहे- ‘‘नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली आहे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायामधील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे.’’

खरं तर या दोन्ही प्रतिक्रियांमधून या पुस्तकाचं स्वरूप पुरेसं स्पष्ट होतं. या पुस्तकाकडे कसं आणि कोणत्या अपेक्षेनं पाहायला हवं याचंही सूचन या प्रतिक्रियांमध्ये आहे. नारायण मूर्ती यांनी आपल्या अतिशय साध्या घरातून सुरू केलेली ‘इन्फोसिस’ ही कंपनी आज जगातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. तिचा इथपर्यंतचा प्रवास हा सचोटी, मेहनत, सक्षम नेतृत्व, मूल्यं आणि सामाजिक बांधीलकी या पायावर उभा राहिला आहे. पण हे सगळं कसं जुळून आलं, हा वारसा कसा आणि कुठे मिळाला, याची स्पष्टीकरणं या संग्रहातील भाषणं आणि लेखांमध्ये सापडतात.

वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकाचे एकंदर दहा भाग केले आहेत. विद्यार्थ्यांना संदेश, मूल्ये, महत्त्वाचे राष्ट्रीय मुद्दे, शिक्षण, नेतृत्वासमोरील आव्हानं, कॉपरेरेट आणि सार्वजनिक व्यवस्थापन, औद्योगिक सामाजिक जबाबदारी आणि समाजसेवा, उद्योजकता, जागतिकीकरण आणि इन्फोसिस या दहा विभागांमध्ये 38 भाषणं व लेखांचा समावेश आहे. ‘विद्यार्थ्यांना संदेश’ या पहिल्याच विभागात आठ भाषणं आहेत. तेवढे लेख वा भाषणं इतर कुठल्याच विभागात नाहीत. हे कदाचित जाणीवपूर्वक केलं आहे का, हे माहीत नाही! मात्र ही सर्वच भाषणं देशात आणि जगातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभात केलेली भाषणं आहेत, हेही नोंद घेण्यासारखं आहे.

ही भाषणं फार चमकदार नाहीत की फारशी प्रभावित करणारीही नाहीत. पण साध्या साध्या प्रसंगांतून मूर्ती यांनी ज्या गोष्टी त्यात सांगितल्या आहेत, त्यांनी त्यांचं आयुष्य कसं बदललं याचा प्रत्यय येतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने शिक्षण संपवून बाहेरच्या जगात पाऊल ठेवताना ते जग नेमकं कसं आहे, हे समजावून घेतलं पाहिजे, स्पर्धेची-कष्टाची-गुणवत्तेची नेहमी तयारी ठेवली पाहिजे, हे मूर्ती थोडाफार बदल करत परत परत सांगतात, तेव्हा त्यांची जडणघडण कोणत्या मूल्यांच्या पायावर झाली आहे, हे स्पष्ट होत जातं.

म्हणजे या पुस्तकातून मूर्ती यांच्या अभ्यासाचे विषय कोणते आहेत, त्यांचा व्यासंग कसा आहे, त्यांनी कोणापासून प्रेरणा घेतली आणि भारताबद्दलची त्यांची व्हिजन काय आहे, यापेक्षा मूर्ती यांची जडणघडण कशी झाली, इन्फोसिसचा प्रवास कसा झाला आणि तिला प्रचंड यश कसं मिळालं, याची गुपितं समजावून घेता येतात.

‘जागतिकीकरण’ या भागात मूर्ती सरळ सरळ जागतिकीकरणाचा पुरस्कार करतात. त्यावर मूर्ती मोठय़ा कंपनीचे मालक असल्याने ते तसं करणारच, असा प्रश्न बहुधा हे पुस्तक वाचणारा तरी उपस्थित करणार नाही. कारण जागतिकीकरणाची अपरिहार्यता आणि त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मूर्तीनी करण्याचा प्रयत्न केला आहे. सेवा-उद्योगात जागतिकीकरणाने जी क्रांती केली आहे, त्याचाही आढावा त्यांनी घेतला आहे.

परंतु यातील काही भाषणं वा लेख फारच त्रोटक आहेत. उदाहरणार्थ ‘मी माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक असतो तर..’, ‘चक दे इंडिया’ इत्यादी. ते लेख वगळायला हवे होते असं वाटतं. त्यामुळे पुस्तक आणखी सुटसुटीत झालं असतं.

पश्चिमेकडून भारतानं काय शिकायला हवं आणि भारताकडून पश्चिमेनं काय शिकायला हवं, याविषयी मूर्ती बोलले आहेत, तसंच देशातील भ्रष्टाचार कसा थांबवता येईल याविषयी त्यांनी एक भाषण दिलं आहे. शहरनियोजन, धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व, कॉपरेरेट गव्हर्नन्स, भांडवलवाद, उद्योजकता या विषयांवरही मूर्ती बोलले आहेत किंवा त्यांनी लिहिलं आहे.

एखादी व्यक्ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचते, तेव्हा समाज तिच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा करायला लागतो. ‘तुम्ही यावर बोललं पाहिजे’, ‘त्याविषयी बोललं पाहिजे’, ‘अमुक अमुकवर तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे’ असे आग्रह केले जातात. त्याचं प्रतिबिंब यातील काही भाषणांमध्ये आणि लेखांमध्येही पाहायला मिळतं. पण ‘आपण त्याविषयातले तज्ज्ञ अभ्यासक नाही आहोत’, हे लक्षात घेऊन मूर्ती यांनी चतुरपणे प्रत्येक विषयाला स्वानुभवाकडे तरी वळवलं आहे किंवा स्वानुभवाकडून तरी ते विषयाकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यात सच्चेपणा आहे, कळकळ आहे आणि बांधीलकीही. म्हणून या पुस्तकातून काय करायला हवं आणि कसं पाहायला हवं, याबाबतचा दृष्टिकोन मिळू शकतो. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, हेही खरं.

मात्र हे पुस्तक वाचून कुणी फार झपाटून जाणार नाही. हे सेल्फ हेल्प वर्गातलं पुस्तक नाही. त्यामुळे ते वाचून मूर्तीसारखं यश आपल्याला मिळवता येईल, असा दृष्टिकोन असणा-यांसाठीही हे पुस्तक नाही. तर मूर्ती यांनी इन्फोसिस कोणत्या मानदंडावर उभा केला. ते मानदंड उभारले कसे आणि त्यांचं संवर्धन कसं केलं, हे समजावून देणारं हे पुस्तक आहे. ते त्यासाठीच वाचायला हवं.

अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड : एन. नारायण मूर्ती, मराठी अनुवाद : चित्रा वाळिंबे, मेहता पब्लिशिंग हाऊस.

Sunday, October 27, 2013

(मराठी साहित्याची) कत्तल करणारा माणूस!

Published in Loksatta, Sunday, October 27, 2013
पन्नास वर्षांपूर्वी- १९६३ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी अशोक शहाणे यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'- किरण' या शीर्षकाचा घणाघाती लेख लिहून मराठी साहित्य व साहित्यिकांवर अक्षरश: बॉम्बगोळा टाकला होता. या घटनेच्या र्अधशतकपूर्तीनिमित्ताने या मूळ लेखाचा परामर्श....
वसंत सरवटे यांनी ठणठणपाळसाठी काढलेले मार्मिक चित्र, ललित, जानेवारी १९६४. 
-----------------------------------------------------------------------
अशोक शहाणे यांचं आत्ताचं वय वर्षे ७८ आहे. पन्नास वर्षांपूर्वी- १९६३ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'- किरण' या शीर्षकाचा घणाघाती लेख लिहून मराठी साहित्यावर तेव्हा अक्षरश: आणि शब्दश: बॉम्बगोळा टाकला होता. हा मूळ लेख त्यांनी पुण्यात 'काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम' या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादासाठी लिहिला होता. खरं तर तेव्हा शहाणे यांचं मराठी साहित्यात विशेष काही नाव नव्हतं. बंगाली साहित्यिक मोती नंदी यांच्या काही कथांचा त्यांनी मराठी अनुवाद केला होता, तेवढाच. तेव्हा शहाणे पुण्याचं साहित्यपीठ मानल्या जाणाऱ्या मराठी साहित्य परिषदेपासून दहाएक मिनिटांच्या अंतरावर एक खोली भाडय़ानं घेऊन राहत होते. मधू साबणे, भालचंद्र नेमाडे हे त्यांचे त्यावेळचे मित्र.
त्यांच्या या लेखाचं इंग्रजी नाव 'लिटरेचर अँड कमिटमेंट' असं होतं. हा लेख त्यांनी मासिक 'मनोहर'ला पाठवला. त्याच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या अंकात हा लेख दोन भागांत 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'-किरण' या नावानं छापून आला आणि मराठी साहित्यात एकच खळबळ उडाली. शहाणे यांनी एक प्रकारे मराठी साहित्याचा एक्स-रे काढून त्याचं चारित्र्यहनन केलं होतं. दुसरी गोष्ट अशी झाली की, 'मनोहर' हे मासिकही या लेखामुळे चर्चेत आलं. तोवर या मासिकाकडे साहित्यजगताचं विशेष लक्ष नव्हतं.
''क्ष'-किरण' छापून आल्यावर पुण्यातील मराठी साहित्यविश्वात मोठीच धांदल उडाली. पुढच्या दोन-चार दिवसांत या लेखाचा निषेध करण्यासाठी मसापमध्ये निषेध सभा बोलावण्यात आली. त्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडके होते. ते या लेखानं खूपच चिडले होते. त्यांचं अध्यक्षीय भाषण खूपच आवेशपूर्ण आणि भडकवणारं होतं. त्यांनी- ''जो हात हे लिखाण करू शकला व ज्या हाताने हे प्रसिद्धीसाठी स्वीकारले, ते हात कलम झाले पाहिजेत,'' असे संतप्त उद्गार काढले.
फडके यांच्या या विधानावरून पुण्यातली साहित्यजगतातली परिस्थिती किती स्फोटक बनली होती याची कल्पना येते. जो- तो या लेखावर तावातावानं बोलू लागला.
जानेवारी १९६४ च्या 'ललित'मध्ये ठणठणपाळ यांनी शहाणे यांच्या लेखावर मल्लिनाथी करणारा 'वाङ्मय आणि बांधिलकी' हा लेख लिहिला. ''अलीकडे मराठी साहित्यात, विशेषत: टीकाक्षेत्रात भोंगळपणा खूपच निर्माण झाला आहे. एखाद्या साहित्यकृतीविषयी टीकाकाराकडून स्पष्ट मत मिळणेच दुरापास्त होते. एखादी कृती बरी वाटावी, त्यातल्या त्यात उजवी ठरावी, अशी चमत्कारिक पद्धत रूढ झाली होती. पण अशा अनिश्चित भाषेला मूठमाती देणारा नवा टीकाकार उदयाला आला आहे! 'उदयाला आला' असे म्हणण्यापेक्षा तो 'चक्क डोक्यावर आला' असे म्हणणेच योग्य ठरावे! (तरीही ठरावेच!) हा नवा टीकाकार म्हणजे अशोक शहाणे ( 'मोती नंदी'फेम!). तसे म्हटले तर स्वारीने फारसे काही लिहिलेले नाही. अधिकतर मोती नंदी या बंगाली लेखकाच्या काही कथा त्यांनी भाषांतरित केल्या आहेत. पण स्वारी उपजत टीकाकार (टीकाखोरच!) आहे..'' अशी लेखाची सुरुवात करून ठणठणपाळने पुढे शहाण्यांनी वाङ्मयाची 'जे जे लिहिले गेले ते वाङ्मय' अशी सर्वसमावेशक व्याख्या कशी केली आहे, याचा उल्लेख केला आहे.
''लोकहितवादी चिपळूणकर, आगरकर, टिळक, केतकर वगैरे श्रेष्ठ, ज्येष्ठ विभूतींना त्यांनी एका परिच्छेदात गाडून टाकले आहे. हरी नारायण आपटे हे मोठे कादंबरीकार असे मराठी लोक अभिमानाने म्हणतात.. पण शहाण्यांच्या मते, हरीभाऊंनी स्कॉट आणि डिकन्स यांच्या कादंबऱ्या समोर ठेवून आपले लेखन केले. वा. म. जोशी, खांडेकर आणि विभावरी शिरूरकर ही मंडळी शहाण्यांचे दोन-चार फटके खाऊन जिवानिशी बचावली.. मर्ढेकर हे किमान एक महत्त्वाचेसुद्धा कवी नाहीत; कारण त्यांनी चार-दोन बऱ्या कविता लिहिल्या आणि बाकी जुळवाजुळव केली. 'एवढे कुणीही करतो'असे शहाणे यांचे मत. 'मीच कथा लिहावी' असा गर्व गंगाधर गाडगीळ यांनी आजवर वाहिला. पण फुकट! शहाणे यांनी त्यांना 'खुजे मर्ढेकर' म्हणून चक्क खाली बसवले आहे. (गर्वाचे घर खाली म्हणतात ते हे असे!) आणि ते नवकवी- विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट (चोर लेकाचे!) स्वत:ला नवकवी म्हणवून 'सत्यकथे'त कविता छापून घेत होते. बरे झाले त्यांची खोड मोडली ती! शहाणे यांनी त्यांना टपल्या मारून चक्क रविकिरण मंडळात बसवले आहे..'' असे शहाण्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर बॉम्बगोळे टाकले होते, त्यांच्या त्यांच्या नावानं परत ठणठणपाळनं ठणाणा केला.
शहाणे यांच्या मते, आधुनिक मराठी साहित्यात गोडसे भटजी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, जी. ए. कुलकर्णी, आचार्य अत्रे, काकासाहेब गाडगीळ, पु. शि. रेगे हे मोजून सात लेखक. शहाण्यांना आठवं बोट काही मोडावं लागलं नाही. ए. वि. जोशी, विंदा करंदीकर हे लोक शहाणे यांच्या मते ठीक म्हणावेत असे. शहाणे यांनी विनोबा भावे यांना 'मराठीतला हा एकमात्र समग्र माणूस' असे म्हटले होते, तर बालकवींना 'अलीकडच्या काळात अस्सल कविता लिहिणारा हा एकमेव अस्सल कवी' असे या लेखात म्हटले होते.
शहाण्यांच्या मते, मराठीत थोर कलाकृती किती आहेत? मोजून तीन.
१) माझा प्रवास, २) स्मृतिचित्रे आणि ३) रणांगण.
झालं! यापल्याड शहाणे यांनी मराठी साहित्यात इतर कुणाचीही गणती केलेली नाही. निदान तेव्हा केली नव्हती, असं म्हणू या.
हा घणाघाती लेख पुस्तकरूपाने प्रकाशित व्हायला बराच काळ जावा लागला. शहाणे यांच्या 'नपेक्षा' (२००५) या एकुलत्या एक पुस्तकात या लेखाचा समावेश आहे. छापील २७ पाने भरेल एवढा हा लेख आहे. यात मराठी साहित्यिक आणि साहित्याचं टीकावस्त्रहरण करणारा मजकूर तसा तुलनेनं दहा पानांचाच आहे. बाकी लेखात साहित्याच्या संदर्भात बांधीलकी, साहित्यातली 'बीट' पिढी आणि स्वत:ची पिढी याविषयी लिहिलं आहे. आणि त्यात कुठेही शेरेबाजी नाही. विशेषत: त्यांनी स्वत:च्या पिढीचाही उद्धार केला आहे. 'आमची पिढी ही षंढांची पिढी आहे, असे आम्ही पूर्वीच जाहीर केले आहे,' असंही त्यांनी सांगून टाकलंय. त्याआधी शहाणे यांनी 'षंढांची पिढी' या नावानं एक कविता लिहिली होती. त्याचा हा संदर्भ आहे.

या कवितेचा एक किस्सा आहे. ही कविता ग. दि. माडगूळकर यांच्या वाचनात आली. तेव्हा भाऊ पाध्ये यांच्या पुस्तकावरून सेन्सॉर बोर्डाचा वाद चालू होता आणि गदिमा त्या बोर्डावर होते. डेक्कनला मित्रासोबत फिरत असताना ते सहज म्हणून गदिमांना भेटायला गेले. मित्रानं शहाणे यांची ओळख करून देताच गदिमा म्हणाले, ''अरे, याचं कुणीतरी लग्न लावून द्या रे! म्हणजे हा पुन्हा असं काही लिहिणार नाही.'' तर ते असो.
''क्ष' किरण'मध्ये टिळक, आगरकर, मर्ढेकर, गाडगीळ, बापट, करंदीकर, पु. ल. देशपांडे या आदरणीय आणि प्रात:स्मरणीय व्यक्तिमत्त्वांबद्दल शेरेबाजीवजा विधाने केल्यामुळे खळबळ उडणं साहजिकच होतं.
आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड गेली ३०-४० वर्षे मसाप प्रकाशित करीत आहे. पण तो अजूनही पूर्ण व्हायला तयार नाही. शहाणे यांनी मात्र पन्नास वर्षांपूर्वीच तो अवघ्या छापील २७ पानांमध्ये मांडून दाखवला आणि त्याशिवायही बरंच काही सांगितलं.
तत्कालीन मराठी साहित्यिक आणि साहित्याची अशी कत्तल केल्यावर शहाणे यांनी गप्प बसावं ना! पण गप्प बसतील तर ते शहाणे कुठले! त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, 'आपल्याकडे नाही तरी म्हणायची पद्धतच आहे- गप्प बसायचं काय घेतो? पण मी काही गप्प बसणार नाही. अजून बरंच काम बाकी आहे.' क्ष-किरण टाकल्यापासून शहाणे यांचं मराठी साहित्याचं शल्यचिकित्सा करण्याचं काम चालूच आहे. ते लिहितात कमी; पण बोलतात खूप. जगणं थोर आणि लिहिणं कमअस्सल- अशी त्यांची धारणा तेव्हा होती आणि आजही आहे. ते एका दृष्टीनं चांगलंच आहे. एरवी त्यांच्या साध्या बोलण्यातही चार-दोन साहित्यिकांचे खून पडतातच.
त्यामुळे जरा सावध राहा.

Monday, October 14, 2013

परवानगी आणि श्रेयाचा हक्क


First Published in Loksatta, 13 Oct.2013
अरुण कोलटकरांच्या 'परंपरा' या कवितेच्या स्वामित्व हक्काबाबत (कॉपीराइट) न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे मराठी साहित्यविश्वात नाही म्हटलं तरी थोडीशी खळबळ निर्माण झाली. सकृद्दर्शनी हा निकाल अनेकांना चक्रावून टाकणारा वाटतो आहे. केवळ परवानगी घेतली नाही म्हणून संबंधिताला न्यायालयात खेचणे आणि न्यायालयाने अशी शिक्षा सुनावणे, हे साहित्य क्षेत्रातील अनेकांना गोंधळात टाकणारे वाटते. खरे तर यात काहीही बुचकळ्यात टाकणारे वा गोंधळात पाडणारे नाही. हे सर्व कॉपीराइट कायद्याला धरून आहे.
    
१९१४ साली 'इंडियन कॉपीराइट अ‍ॅक्ट' कायदा प्रथम अस्तित्वात आला. १९५७मध्ये 'द कॉपीराइट अ‍ॅक्ट १९५७' असे त्याचे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून १९९४पर्यंत त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. कोणतीही स्वतंत्र निर्मिती -म्हणजे कलाकृती, रंगमंचीय आविष्कार, संगीत इ. तयार केल्यावर त्याचा स्वामित्व हक्क(कॉपीराइट) त्याच्या कर्त्यांला मिळतो. त्यासाठी लेखी करारच केला पाहिजे असे बंधन नाही. पुस्तकावर लेखक, प्रकाशक यांचे नाव असेल तरी त्यांना हा हक्कनिसर्गत: मिळतो. छापील माध्यम नसेल तेव्हा त्याचा करार करून घ्यायला हवा. स्वतंत्र बौद्धिक प्रयत्नातून जे काही निर्माण होते, त्याचा स्वामित्व हक्क त्याच्या कर्त्यांकडेच असतो. त्याने इतर कुणाला लेखी कराराद्वारे वा इतर मार्गाने तो दिला असला, त्याचा योग्य तो मोबदला घेतला असला तरी त्याचा निर्मितीकर्त्यांचा मूळ हक्क कायम राहतो. म्हणजे मूळ कृतीत बदल करणे, त्यात काटछाट करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्या कृतीला बाधा येत असेल वा त्यायोगे कर्त्यांच्या प्रतिष्ठेला वा कीर्तीला धक्का बसत असेल तर अशा प्रती प्रकाशित करण्यास आणि त्याचे वितरण करण्यास कर्ता कायद्याने रोखू शकतो किंवा संबंधितांकडे नुकसानभरपाईही मागू शकतो. मूळ कर्त्यांच्या निधनानंतर त्याचे वारसदारही हा हक्कबजावू शकतात. लेखकाच्या निधनानंतर ६० वर्षांनी त्याचा वा त्याच्या वारसदारांचा त्या पुस्तकावरील हक्क संपुष्टात येत असला तरी वरील हक्कशाबूत राहतो. 
                    
थोडक्यात कॉपीराइट कायदा हा मूळ लेखकाच्या वा कर्त्यांच्या हक्काचे संरक्षण करणारा कायदा आहे. त्यामुळे इतर कुणालाही परवानगीशिवाय त्याचा वापर वा गैरवापर करता येत नाही. त्याचा भंग केल्यास दिवाणी व फौजदारी या दोन्ही कायद्याप्रमाणे कारवाई करता येते. तो सिद्ध झाल्यास सहा महिने ते तीन वर्षे तुरुंगवास किंवा ५० हजार ते दोन लाख रुपये दंड होऊ शकतो.
बौद्धिक संपदा ही लेखक, गीतकार, संगीतकार यांची वैयक्तिक संपत्ती असते. तो त्याचा एकमेव हक्कदार असतात. त्यांनी त्यांचे हक्क इतर कुणाला दिले तरीसुद्धा त्याचा पूर्णत: वा अंशत: वापर करण्यासाठी मूळ कर्त्यांची आणि ज्याच्याकडे सध्या त्याचे मुखत्यारपत्र असेल त्यांची परवानगी अनिवार्य असते.   


याचा अर्थ असा नाही की, संशोधन वा इतर प्रकारच्या लेखनासाठी इतरांच्या लेखनातील उद्धृते, उतारे वा काही भाग वापरताच येत नाही. मर्यादित उद्दिष्टांसाठी आणि योग्य कारणासाठी असा वापर अवश्य करता येतो, पण ते कसे वा किती प्रमाणात वापरायचे हे समजून घेतले पाहिजे. शिवाय त्याचा आपल्याकडून व्यावसायिक कारणासाठी वापर केला जात नाही ना, हेही पाहिले पाहिजे. विद्यापीठीय पातळीवरील एम.फिल, पीएच.डी. यांसारखे वा तत्सम संशोधन हे जोपर्यंत काही निवडक लोकांपुरतेच मर्यादित असते, त्याचा व्यावसायिक वापर (पुस्तकरूप वा इतर मार्गाने सार्वत्रिक करणे) केला जात नाही, तोपर्यंत ते कायद्याच्या कक्षेत येत नाही. पण जेव्हा ते पुस्तकरूपाने प्रकाशित करावयाचे असते तेव्हा त्यासाठी संबंधित लेखकांच्या लेखी परवानग्या घेणे बंधनकारक असते. संशोधन प्रकल्प वा प्रबंधांसाठीही संबंधितांची परवानगी घेणे गरजेचे असते. निदान मराठीमध्ये तरी अशा प्रकारच्या परवानगीसाठी कुणीही लेखक, त्यांचे वारसदार आणि प्रकाशक अडवणूक करत नाहीत आणि आर्थिक मोबदल्याचीही अपेक्षा करत नाहीत. एखाद्या नाटककाराच्या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि दर प्रयोगाचे मानधनही द्यावे लागते. तशा प्रकारच्या सूचना पूर्वी आणि आताही नाटकांच्या पुस्तकात स्पष्टपणे छापलेल्या असतात.


मर्यादित उद्दिष्ट आणि योग्य कारण म्हणजे नेमके काय याबाबत भारतीय कॉपीराइट कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही. परंतु युरोप-अमेरिकेतील कॉपीराइट कायद्यांमध्ये काही संकेत दिलेले आहेत आणि ते तिकडे यथायोग्य रीतीने पाळलेही जातात. त्यासाठी तिकडील लेखक-प्रकाशकांच्या संघटना पुरेशा सजग आणि सतर्क आहेत. इतर लेखकांच्या लेखनातील भाग वापरताना तो संबंधित पुस्तकाच्या दहा टक्क्यापेक्षा जास्त असू नये वा त्या पुस्तकातील एकच अवतरण वापरायचे असेल तर ते ४०० शब्दांपेक्षा मोठे असू नये. आपल्याकडे असे संकेत निदान अजून तरी तयार केले गेलेले नाहीत. भारतातील सर्व प्रकाशकांची शिखर संघटना असलेल्या 'फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स'ने याबाबतीत पुढाकार घेऊन ते तयार केले तर संशोधक, अभ्यासक आणि इतरांना त्याचा फायदा होऊ शकेल. मात्र ते संकेत आता नाहीत म्हणून इतरांच्या लेखनाचा आपल्याला हवा तसा वापर करता येत नाही, हे लक्षात घ्यायलाच हवे.

भारतात स्वामित्व हक्काविषयीचे अज्ञान आणि बेजबाबदारपणा यातून अनेक प्रमाद घडतात. उदा. आपल्याकडे पुस्तकांच्या पायरेटेड प्रतींचा मोठय़ा प्रमाणावर काळाबाजार होतो. इंग्रजी पुस्तकांबाबत तो जास्त होत असला तरी आता मराठी पुस्तकांबाबतही हे प्रकार होऊ लागले आहेत. 'अग्निपंख', 'मृत्युजंय', 'छावा', 'ययाती' अशा काही पुस्तकांबाबत हे प्रकार अलीकडच्या काळात घडले आहेत. 'फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स'ने २००६ साली प्रकाशित केलेल्या 'अण्डरस्टॅण्डिंग कॉपीराइट लॉ' या पुस्तकानुसार पायरसीमुळे दरवर्षी ब्रिटनमध्ये ८०० कोटी, अमेरिकेत २५०० कोटी तर भारतात ४०० कोटी रुपयांचे संबंधित लेखक-प्रकाशकांचे नुकसान होते.


शिवाय रंगमंचीय, चित्रपटीय आविष्कार, रूपांतर, अनुवाद, या आणि अशा प्रकाराबाबतही पुरेशी सजगता नसल्यामुळे त्यायोगेही होणाऱ्या गैरवापराचे प्रमाणही बरेच आहे. संबंधित लेखकाच्या, प्रकाशकाच्या परवानगीशिवाय त्याच्या लेखनाचे अंश, संक्षिप्त भाग वा उद्धृते बिनदिक्कतपणे वापरली जातात. संबंधितांना कळवण्याचे सौजन्य न दाखवता आणि परवानगी न घेता 'सब कुछ चलता है' या न्यायाने सारे दडपून नेण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व गैरप्रकार थांबवायचे असतील तर लेखक-प्रकाशकांनी वा त्यांच्या वारसदारांनी स्वामित्व हक्क कायदा नीट समजावून घेतला पाहिजे. तो घेतला तर योग्य ती दाद मागता येते. आपले आर्थिक नुकसान आणि गैरवापर या दोन्ही गोष्टी टाळता येतात. 

 सत्य हा बचाव होऊ शकत नाही तसेच अज्ञान हाही बचाव होऊ शकत नाही. त्यामुळे मूळ लेखकाबरोबरच संबंधित प्रकाशकालाही कारवाईला सामोरे जावे लागते. पण लेखक-प्रकाशक सजग असतील तर असे बेजबाबदार प्रकार पूर्णपणे थांबवता येतात, याचे उदाहरण म्हणून शहाणे-सकाळ या खटल्याकडे पाहायला हवे. आपल्या न्याय हक्कासाठी कोर्टाची पायरी चढायला काहीच हरकत नाही, हा धडा या प्रकरणातून लेखक आणि प्रकाशकांनी घ्यायला  हवा.

Thursday, September 19, 2013

वीस सुरस व चमत्कारिक गोष्टी

Published: Loksatta, Saturday, April 20, 2013.

उदारीकरणाच्या गेल्या वीस वर्षांत दळणवळणाची, संपर्काची आणि सोयीसुविधांची साधने इतक्या प्रमाणात वाढली, तंत्रज्ञान इतक्या मोठय़ा प्रमाणावर बदलले की आता पूर्व उदारीकरण आणि उत्तर उदारीकरण अशीच मांडणी करावी लागेल. या प्रकारची मांडणी करणारे लेखन मराठीमध्ये क्वचितच होत असले तरी इंग्रजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर होऊ लागले आहे.

गेल्या तीस-चाळीस वर्षांत - विशेषत: वीस - जग ज्या गतीने आणि पद्धतीने बदलले आहे, त्यात सर्वात जास्त उत्क्रांत कोण होत गेले असेल तर मध्यमवर्ग. उदारीकरणपर्वाचा सर्वात जास्त उपभोक्ता वर्ग कोणता असेल तर तोही मध्यमवर्गच. संपूर्ण बाजारव्यवस्था, मनोरंजनाची साधने, सेवा-सुविधा यांचा सर्वाधिक उपभोग घेणारा वर्ग कोणता तर तोही हाच. राजकारण, समाजकारण, प्रसारमाध्यमे यांवर सर्वाधिक याच वर्गाचा प्रभाव पडत आहे. 


पण अशा या मध्यमवर्गाची उत्क्रांतीची साधने कोणती, तर या पुस्तकातली. (याशिवायही आणखी काही आहेत म्हणा.) त्याला या पुस्तकाचे लेखक आनंद हळवे ‘डार्विन्स ब्रँड्स’ म्हणतात. या मध्यमवर्गाचं मानसशास्त्र वेगवेगळ्या ब्रँड्सनी कसं आपल्या बँडच्या तालावर नाचवलं आहे, त्याच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात. 


‘अपवर्डली मोबाइल’ असा एक शब्द हल्ली निम्नवर्गासाठी वापरला जातो. त्यात थोडं कौतुक, थोडा उपहास असतो. पण समाजातले सर्वच गट आणि थर हे नेहमीच ‘अपवर्डली मोबाइल’ असतात. सरकारी नोकरी करणाऱ्या मूठभर वर्गाला एकेकाळी ‘पांढरपेशा’ म्हटले जायचे आणि तोच मध्यमवर्ग मानला जायचा. आता तो मध्यमवर्ग राहिला नाही. उच्च, मध्यम आणि निम्न असे मध्यमवर्गाचे तीन थर झाले आहेत. आणि ते तीनही ‘अपवर्डली मोबाइल’ आहेत. त्यांची आयुधे कोणती, साधने कोणती याची काही उत्तरे या पुस्तकात सापडतील.


कासवछाप अगरबत्तीच्या दिवाळी अंकातील वैविध्यपूर्ण जाहिराती वा सुरुवातीच्या काळातील टीव्हीवरील जाहिराती या प्रचंड कुतूहलाचा विषय असायच्या. पण गेल्या काही वर्षांत कितीतरी वेगवेगळ्या जाहिरातींनी, त्यांच्या कॅम्पेननी लोकांच्या- खरं तर ग्राहकांच्या मनाचा कब्जा घेतला आहे. एकीकडे मध्यमवर्गाच्या पगाराचे आकडे फुगत गेले तर दुसरीकडे त्यांचा खिसा खाली करणारी अनेक उत्पादने बाजारात आली. हा निव्वळ योगायोग नव्हता आणि नाही. या उत्पादनांच्या गुणवैशिष्टय़ांचा मारा टीव्हीवरून आणि इतर ठिकाणांहून होत गेला. आणि मध्यमवर्गीय ग्राहकांनी त्यांचा लाभ घ्यायला सुरुवात केली. 


त्यामुळे दोन गोष्टी घडल्या. एक मध्यमवर्गाचे ‘
लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड’ बदलले आणि या छोटय़ामोठय़ा कंपन्याही बलाढय़ होत गेल्या. उत्पादनांपेक्षा आकर्षक व कल्पक जाहिरात प्रमाण मानली जाऊ लागली. तिला प्रतिसाद मिळू लागला.

या पुस्तकात थम्स अप, कॅडबरी, सफोला, मॅगी, अमूल, लाइफबॉय, टायटन, एशियन पेंट्स, हिरो होंडा, मारुती, फेमिना, एअरटेल अशाच बारा ब्रँडविषयी हळवे यांनी लिहिले आहे. या नावावरून सहज नजर टाकल्यावर पहिल्यांदा काय लक्षात येत असेल तर हे सर्व ब्रँड मध्यमवर्गीय आहेत, हे.


‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ किंवा ‘व्हॉट अॅन आयडिया, सर’ हे साधं वाक्य असत नाही. ती ग्राहकांचा खिसा खाली करणारी यंत्रणा असते. हा सारा प्रवास या पद्धतीने हळवे यांनी सांगितलेला नाही. पण त्यातून हे चित्र स्पष्ट होतं. अॅड स्लोगन, त्यातील सेलिब्रिटी आणि क्रमाने उत्क्रांत होत गेलेले ब्रँड्स यांची सविस्तर माहिती प्रत्येक लेखात वाचायला मिळते. त्याच्या जोडीला भरपूर छायाचित्रांचा केलेला समावेश त्या त्या अॅड कॅम्पेनच्या आपल्या स्मृती चाळवत जातात. उदा. थम्स अप १९७७ साली बाजारात केवळ एक शीतपेय म्हणून दाखल झाले, तेव्हा बाजारातली इतर शीतपेये कोणती होती, त्या वेळची एकंदर बाजारपेठ कशी होती, कोकाकोला कधी आले त्याची आणि थम्स अपची अॅड कॅम्पेन कशी केली गेली, दोघांनी एकमेकांवर कुरघोडी  करायचा कसा प्रयत्न केला, त्यात त्यांना कसे यश आले, त्यातून त्यांची वार्षिक उलाढाल कशी वाढली, असा आलेख काढत हळवे आपली मांडणी करतात.


या प्रत्येक ब्रँडची सुरुवातीची जाहिरात, त्याला मिळालेले यश, मग त्यात ठरावीक टप्प्याने होत गेलेला बदल, त्याचे फायदे यातून या उत्पादनांची आणि त्यांच्या कंपन्यांची व्यूहरचना कळत जाते. 


यातल्या प्रत्येक उत्पादनाच्या कल्पक जाहिरातींसाठी अनेक सर्जनशील मंडळींनी अहोरात्र मेहनत घेतली, वेगवेगळ्या सेलिब्रिटींचा कल्पक वापर केला आणि त्यातून लोकांच्या मानसिकतेवर पकड मिळवली. आपला ब्रँड यशस्वी करताना, त्यासाठी ग्राहकांना खिसा रिकामा करायला लावताना आणि त्यावर मित्रमंडळी, घरीदारी चर्चा करायला लावताना, काय काय आणि कसकसे प्रयत्न केले, याचीही कहाणी उलगडत जाते.


हे पुस्तक लिहिले गेले आहे ते मुख्यत: ब्रँडनिर्मिती करणारे लोक व संस्था, जाहिरात विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, ब्रँड स्ट्रॅटेजी आणि त्याचा अॅक्शन प्लॅन तयार करणारे लोक यांच्यासाठी. पण ब्रँड्सविषयी उत्सुकता वाटणाऱ्या, त्याविषयीचे कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे. सातत्याने चैतन्यशील होत गेलेली भारतीय बाजारपेठ, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि त्या पुरवण्यासाठी बाजारात उतरलेली उत्पादने..आणि त्यांनी ही दुनिया आपल्या मुठीत कशी केली, याच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी यातून जाणून घेता येतात.

Darwin's Brands - Anand Halve, SAGE Publication, New Delhi, Paages -168, Price - 395. 

दीर्घकवितेचं ‘पोलिटिकल स्टेटमेंट’!

Published: Loksatta, Sunday, February 24, 2013.
या दीर्घकवितेत कोकणातील राजकीय-सामाजिक संघर्ष आहे, जनजीवन आहे, मालवणी बोलीच्या अक्कडबाज आणि ठाशीव शब्दांची पखरण आहे. कविता दीर्घ असल्याने तिला आख्यानाची गती आहे. त्यात उपहास, उपरोध, राग, संताप आहे. तिला लोककथेचाही बाज आहे. शिवाय कोकणापुरतेच भाष्य नसून व्यापक प्रयत्न आहे.

नव्वदोत्तर काळात लिहू लागलेल्या तरुण कवींमध्ये अजय कांडर हे एक लक्षणीय नाव आहे. कोकणासारख्या निसर्गसमृद्ध प्रदेशात वास्तव्याला असलेल्या कांडर यांचं आपल्या तांबडय़ा मातीशी आणि संस्कृतीशी असलेलं नातं अगदी घट्ट स्वरूपाचं आहे. त्यातूनच त्यांची कविता आकाराला आली आहे. सात वर्षांपूर्वी आलेला त्यांचा ‘आवानओल’ हा पहिला कवितासंग्रह त्यांच्या कवितेतील वेगळेपणाची साक्ष देणारा होता. त्यानंतरही कांडर यांचं कवितालेखन सुरूच होतं. पण या कविता संग्रहरूपात यायला मात्र बराच काळ जावा लागला. अलीकडेच त्यांचा नवा संग्रह ‘हत्ती इलो’ प्रकाशित झाला आहे. ही एक दीर्घकविता आहे. अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या दीर्घकविता प्रकाराला नव्वदोत्तर  काळातील काही कवींनी पुन्हा हात घातला आहे. छंदाकडून मुक्तछंदाकडे आणि मुक्तछंदाकडून पुन्हा दीर्घकवितेकडचा हा प्रवास नव्वदोत्तर कवींचा एक विशेष म्हणून सांगता येण्यासारखा आहे. कविता ही मुळातच एक सर्जनात्मक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती कधी कुठले रूप घेऊन जन्माला येईल, याबाबत बऱ्याचदा स्वत: कवीलाही सांगता येत नाही. आणि कवितेचा प्रकार कुठला आहे, यापेक्षा ती कोणत्या प्रकारे अभिव्यक्त होते, हे जास्त महत्त्वाचे ठरते.


कवी आपल्या भोवतालातूनच घटना निवडून कविता लिहीत असतो. पाहणे, ऐकणे, बोलणे आणि वाचणे या प्रक्रियेतून त्याच्या हाताशी समाजव्यवहारातल्या काही घटनांचे धागेदोरे लागत असतात. त्यामुळे तेथील कला, संस्कृती, रूढी-परंपरा, लोककथा, लोकसंगीत, आख्यायिका, मौखिक-अमौखिक इतिहास यांचा तपशील त्याच्या लेखनातून येत राहतो. त्यातूनच त्याची अभिव्यक्ती आविष्कृत होते. कांडरही याला अपवाद नाहीत. ‘हत्ती इलो’ ही त्यांची दीर्घकविता याचेच उदाहरण म्हणून सांगता येईल. 


खेडी आणि शहरे यांतील व्यस्त होत चाललेले जगणे, शहरांची होणारी भरभराट आणि खेडय़ांची ‘जैसे थे’ स्थिती यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातून ग्रामीण जगण्याची फरपट अधिकाधिक दयनीय होत आहे. विकास आणि सामान्यजनांचे जीवन हे बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत असल्याचे सांगितले जाते. किंबहुना, जनजीवन न विस्कटता विकासाला गती देता येऊ शकते, याचा फारसा विचार राजकीय पातळीवर होत नसल्याने खेडय़ांच्या नशिबाचे भोग वाढत चालले आहेत, अशी मांडणी पुन:पुन्हा केली जाते आहे. या सर्वामुळे लोकजीवनच नष्ट होत असल्याचा तीव्र सल अजय कांडर यांनी या दीर्घकवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना, तोच या कवितेचा प्रधान विशेष आहे. हे सर्व ज्या राजकीय धोरणांमुळे होत आहे असे त्यांना वाटते, त्यावरही कांडर थेट भाष्य करण्याचा प्रयत्न या दीर्घकाव्यात करतात. 


मध्यंतरी दक्षिण कोकणातील काही भागांत हत्तींच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले होते. रात्री-अपरात्री शेतांत घुसून हत्तींनी पिकांच्या भयंकर नासधूस केली होती. या हत्तीलाच रूपक बनवून कांडर यांनी आपल्या कवितेत आणले आहे. हत्तीसारखे बलदंड रूपक वापरल्याने साहजिकच राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक- पर्यावरणीय बाजूही अपरिहार्य ठरतात. त्यामुळे कांडर कवितेतून तिकडेही वळतात.


कांडर यांनी या कवितेची निर्मितीप्रेरणा सांगितली आहे ती काहीशी मजेशीर आहे. प्रयोगशील रंगकर्मी अतुल पेठे कणकवलीमध्ये नाटक बसवण्यासाठी गेले असता त्यांनी कांडर यांना कोकणाच्या बदलत्या राजकीय-सामाजिक पाश्र्वभूमीवर नाटक लिहायला सांगितले. पण मूळ प्रकृती कवीची असलेल्या कांडर यांच्याकडे नाटय़धर्माची नव्हे, तर नाटय़प्रेमाची जोड होती. ते चिंतनाला प्रवृत्त झाले आणि त्यातून  नाटक तयार होण्याऐवजी ही दीर्घकविता आकाराला आली. कवी कविता जगतो असं म्हणतात, पण तो कायम कवितेच्या अंगानेच भोवतालाकडे पाहतो. त्यामुळे त्याची परिणती काव्यरूप घेऊनच जन्माला येते. 


कांडर हे पेशाने पत्रकार आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात कोकणातल्या बदलत्या राजकारणाशी त्यांचा या ना त्या कारणाने नित्य संबंध येतो. एरवी शांत असणाऱ्या आणि शांतपणे जगणाऱ्या कोकणवासीयांच्या आयुष्यात या बदलत्या राजकारणाने उलथापालथ घडवायला सुरुवात केली आहे, माणसा-माणसांमध्ये वितुष्ट निर्माण केले जात आहे, असा कांडर यांचा अनुभव आहे. म्हणूनच ते लिहितात, ‘माणूस माणसापासून पारखा झालाच, परंतु कधी नव्हे एवढी राडा संस्कृती इथे बळावली. दर निवडणुकीच्या वेळी माणसाचाच बळी दिला जाऊ लागला.’ पुढे ते म्हणतात, याला कुठलाही एक पक्ष कारणीभूत नसून सर्वच पक्ष जबाबदार आहेत. या राजकारणामुळे कोकणासारख्या निसर्गसंपन्न भागाची मन:शांती ढळू लागली आहे. माणसंच माणसांच्या विरोधात उभी ठाकत आहेत. त्यातून कांडर यांना ‘हत्ती’ हे रूपक सुचले; जे एकाच वेळी व्यक्ती, समाज आणि व्यवस्था यांचे प्रतिनिधित्व करते. हत्तींनी कोकणात उपद्रव द्यायला सुरुवात केली तेव्हाच त्याला काहीही इजा न करता त्यांचं संरक्षण करण्यासाठीही काही लोक पुढे सरसावले. ते म्हणजे तथाकथित पर्यावरणवादी. भ्रष्टाचार करणाऱ्याच्याच पाठीशी उभे राहावे तसा हा प्रकार कांडर यांना वाटला आणि या दोन्ही घटनांमध्ये बरेच साम्यही त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी शोषण करणाऱ्या हत्तीलाच पोसायला निघालेल्या वृत्तीचा माग घेण्याचा प्रयत्न यात केलेला आहे. 


या दीर्घकवितेत कोकणातील राजकीय-सामाजिक संघर्ष आहे, जनजीवन आहे, मालवणी बोलीच्या अक्कडबाज आणि ठाशीव शब्दांची पखरण आहे. कविता दीर्घ असल्याने तिला आख्यानाची गती आहे. त्यात उपहास, उपरोध, राग, संताप आहे. तिला लोककथेचाही बाज आहे. आणि विशेष म्हणजे कांडर कोकणापुरतेच भाष्य करत नसून त्याहून व्यापक विधाने करायचाही प्रयत्न करतात. 
संग्रहाच्या सुरुवातीला कांडर यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे सविस्तर निवेदन लिहिले आहे. त्याला त्यांनी ‘राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अध:पतन’ असे शीर्षक दिले आहे. म्हणजे या दीर्घकवितेच्या माध्यमातून कांडर ‘पोलिटिकल स्टेटमेंट’ करून पाहत आहेत. अशी ‘स्टेटमेंट्स’ करू पाहण्याचं धाडस नव्वदोत्तरीतले बरेच कवी करत आहेत. पण ते करण्याआधी आणि केल्यानंतर त्याचा अनुक्रमे पूर्वविचार आणि उत्तरविचार मात्र फारसा केला जात नाही असे दिसते. निदान त्याची ग्वाही तरी संबंधित लेखनातून मिळत नाही. सर्जनशील साहित्यातून फार ठाम विधाने करता येत नसतात, पण अलीकडच्या काळात सर्जनशील साहित्याच्या माध्यमातून ठाम विधाने करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण साहित्यिकांनी यात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. 


कवितेचा योग्य आणि सर्वमान्य होईल असा अन्वयार्थ लावणे ही तशी कठीणच गोष्ट असते. कारण खुद्द कवीला त्याच्या कवितेतून अभिप्रेत असलेला अर्थ, त्याचा इतरांनी लावलेला अन्वयार्थ आणि खुद्द कवीला जे सांगायचे आहे ते त्याने नेमक्या शब्दांतून मांडलेले असणे- या तिन्हींची सांगड घालता येत नाही. ही दीर्घकविताही त्याला अपवाद नाही. पण हत्ती या भारतीय संस्कृतीत आदरणीय मानल्या गेलेल्या प्राण्याची नव्या रूपकात मांडणी करणारी ही कविता वाचनीय मात्र नक्कीच आहे एवढे खात्रीने म्हणता येईल.
‘हत्ती इलो’ - अजय कांडर, शब्द पब्लिकेशन, मुंबई, पृष्ठे - ७१, मूल्य- १०० रुपये.

Tuesday, August 20, 2013

आगरकरांचा वारसदार

नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली, या धक्यातून बाहेर यायला जर वेळ लागला म्हणून ही नोंद करायला उशीर होत आहे.  दाभोलकरांच्या जाण्याचे भयावह परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी-आंदोलने यांच्यावर होणार आहेत. पुरोगामी महाराष्ट्र या एका घटनेने १०० वर्ष मागे गेला आहे. विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो. लोकशाहीत सतत वाद-संवाद करणारी माणसं असतील तरच लोकशाही अधिकाधिक रुजायला, जीवनप्रणाली म्हणून स्वीकारली जायला मदत होते. कारण आमचे मित्र विनय हर्डीकर म्हणतात त्याप्रमाणे 'शंभरातील एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के लोक आपण विचार करतो असा विचार करतात आणि उरलेले ९० टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, हे लोकशाहीचं दारूण वास्तव असतं. ' त्यामुळे लोकशाहीची सारी भिस्त ही या एक टक्का लोकांवरच असते. समाजावरील बरे-वाईट परिणाम, रूढ संकेतांना धक्के देणे, नव्या दिशेने, विवेकपूर्ण बुद्धीने विचार करायला लावणे, हे या एक टक्का लोकांचे काम असते. आजघडीला महाराष्ट्रात दाभोलकर यांच्या इतका सहिष्णू, उदारमतवादी आणि बुद्धिनिष्ठ सामाजिक कार्यकर्ता दुसरा दाखवता येत नाही. 'बांधव हो विचारकलहाला का भिता?' या 'सुधारक'कार आगरकर यांची उक्ती प्रमाण मानून महिन्याचे २५-२७ दिवस महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून समाज प्रबोधनाचे काम करत होते. निखळ वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टीकोन बाळगत धार्मिक अनाचार, फाजील कर्मकांडे, बुवाबाजी, जादूटोणा यासारख्या गोष्टींविरोधात रणशिंग फुंकत फिरणारे दाभोलकर अफाट आणि अचाट उर्जेने काम करत. त्यांच्या उत्साहाकडे पाहून आम्हा तरुणांनाही लाज वाटत असे. 'हे सर्व कोठून येते?' हा प्रश्नाचे दाभोलकर यांच्यापुरते असे होते कि, समाज कळकळीची आच असल्यावर हे सर्व होते.   

२००४ साली संभाजी ब्रिगेडने पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तेथील दुर्मिळ कागदपत्रांची नासधूस केली. या घटनेने महाराष्ट्रातील बुद्धिवंत बुचकळ्यात पडले आणि त्यांनी मराठा समाजाविषयी बोलणेच थांबवले. परिणामी मराठा समाजाची सरंजामी वृत्ती पुन्हा उफाळून आली. राजकीय हेतूंनी प्रेरित असणाऱ्यांनी याचा फायदा उठवत आरक्षण नामक अफूचे गाजर दाखवायला सुरुवात केली. आणि मग आक्रमक मराठ्यांच्या २२ संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. आणि या संघटनांनी मराठा समाजाला, त्यातही सुशिक्षित तरुणांना मागे खेचायला सुरुवात केली. जातीय विद्वेषाचे विष त्यांच्या मनात पेरायला सुरुवात केली. पण सगळेच संधिसाधू असल्याने त्यांच्यात आता श्रेयाची चढाओढ सुरु झाली आहे. आता या संघटनांचा प्रवास एकमेका नामशेष करू या दिशेने होऊ घातलाय. आणि तसेच होणार होते. यात नुकसान झाले ते सुशिक्षित मराठा तरुणांचे. त्यांना या लोकांनी १०० वर्ष मागे नेऊन ठेवले.  दाभोलकर यांच्या हत्त्येने कोणा एका समाजाचे नुकसान होणार नसून सबंध महाराष्ट्राचेच मोठे नुकसान होणार आहे.  

समाजहितासाठी स्वता:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावावी लागते. दाभोलकर यांनी समाजहित हेच आपले जीवनकार्य मानले होते. समाजाचे नेतृत्व करण्यासाठी स्वताला समाजाबरोबर आणून ठेवावे लागते. तो गुण दाभोलकर यांच्याकडे जन्मजात म्हणावा इतका सहज होता. अतिशय साधी राहणी, कुठलेही व्यसन नाही, बोलण्यात ऋजुता आणि वागण्यात आदाब, ही  त्यांची वैशिष्ट्ये होती. 

देवावर दाभोलकर यांचा विश्वास नव्हता. पण बुवाबाजी आणि कर्मकांड यांना मात्र प्रखर विरोध होता. आणि त्यासाठीचे वैज्ञानिक, तार्किक  आणि बौद्धिक युक्तिवाद त्यांच्याकडे होते. कोणतीही गोष्ट पुराव्याने सिद्ध करता आली पाहिजे आणि बुद्धीच्या कसोटीला उतरली पाहिजे, हा त्यांचा दृष्टीकोन होता. आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या जगात हा दृष्टीकोनच सर्वात महत्त्वाचा आहे, या धारणेने दाभोलकर महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत होते. अनेक बुवा-बाबांचा त्यांनी भांडाफोड केला, महाराजांना जाहीर चर्चेचे आव्हान देऊन त्यांना निरुत्तर केले आणि लेखन करून समाजप्रबोधन केले. पण त्यांचे हे काम काही सनातनी विचाराच्या मंडळींना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या. हल्ली भावना ही इतकी उथळ गोष्ट झाली आहे की ती कशाने दुखावेल याचा काही भरवसा राहिला नाही. भावना दुखावल्या म्हणणारी मंडळी खर तर कांगावखोर असतात. आणि त्यांच्या भावना सोयीस्कर असतात. आपली दुकानदारी राजरोसपणे चालू राहावी म्हणून त्यांनी अनेक सोंगे घेतलेली असतात आणि अनेक मतलबी भ्रमही तयार केलेले असतात. अशा लोकांना दाभोलकर यांचे काम पटणे शक्य नव्हतेच. ही मंडळी सतत त्यांच्याविषयी गरळ ओकत असत. पण ती या धराला जातील याची कल्पना कुणी केली नव्हती. 

दाभोलकर यांच्या हत्त्येने या तथाकथित लोकांची भोंदूगिरी निदान काही काळ चालू राहीलही, पण ती सर्व काळ चालू राहील अशा भ्रमात त्यांनी राहता कामा नये. कारण ऑरवेलने म्हटले आहे की, काही लोकांना काही काळ, सर्व लोकांना काही काळ मुर्ख बनवता येते, पण सर्व लोकांना सर्व काळ मुर्ख बनवता येत नाही.       
  

26 aug
दाभोलकर यांची हत्या होऊन आता पाच दिवस होत आलेत. पण अजूनही हल्लेखोरांचा शोध पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांची अनेक पथके आपआपल्यापरीने शोध घेत आहेत, पण त्यांचा तपास अजून नीट दिशा पकडताना दिसत नाही. तर दुसरीकडे दाभोलकर यांच्यावर कुणी हल्ला केला असावा याचे अनेक तर्क पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर लोक लावत आहेत. प्रत्येक जन आपल्या कुवतीनुसार अंदाज व्यक्त करतो आहे. तर बुद्धिवंत महाराष्ट्र पुरोगामी कधी होता किंवा आज आहे कि नाही याची चर्चा करत आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची चर्चा अधूनमधून होतच आली आहे. त्यात नवीन काही नाही. एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक चळवळी, आंदोलने झाली. सामाजिक बदलांसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधन शतक होते. त्या काळातही महाराष्ट्र १०० टक्के पुरोगामी नव्हता, तर पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल करत होता, असे फारतर म्हणता येऊ शकते. विश्वास दांडेकर यांनी कालच्या लोकसत्ता मधील लेखात म्हटले आहे, त्यानुसार पुरोगामी महाराष्ट्र हे मिथक आहे. आणि त्याकडे तसेच पाहायला हवे. 

या मिथकाला अलीकडच्या काळात बराच धक्का लागला आहे. बलात्कार, खून, अराजक सदृश घडामोडी यांची सातत्याने होत असलेली पुनरावृत्ती, या काही कारणामुळे महाराष्ट्राचे पुरोगामित्व पणाला लागले आहे. त्याची दिशा परत योग्य रीतीने जायची असेल तर सामाजिक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरु व्हायला हव्यात. पण गेल्या दोन दशकात तर सामाजिक चळवळी खूपच थंडावल्यात आणि दुसरीकडे अध्यात्माला चांगले दिवस आले आहेत. बुवा, बाबा, महाराज, साधू यांची लोकप्रियता, त्यांची संपत्ती आणि त्यांचे कारनामे यांची रसभरीत वर्णने सतत वाचायला, ऐकायला मिळतात. या दांभिक लोकांचा सुळसुळाट हा निर्बुद्ध समाजाच्या प्रवृतीचे निदर्शक आहे. झटपट श्रीमंती, मनशांती, सुख-समाधान, कुटुंब कलह अशा प्रश्नांची उत्तरं या बुवा, बाबा, महाराज, साधू यांच्याकडे मिळतील या आशेने लोक त्यांच्याकडे जातात, तसा या बुवा, बाबा, महाराज, साधू यांचा दावा असतो. त्याबदल्यात ते या पीडित लोकांचा ब्रेन वाश करून त्यांना आपल्या भजनी लावतात. आणि आपली दुकानदारी चालू करतात. अशा काळात विज्ञानवादी, विवेकनिष्ठ आणि बुद्धिवादी पद्धतीने जगणे, वागणे, विचार करणे यासाठी काम करणाऱ्या दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्ती समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, तर हे बुवा, बाबा, महाराज, साधू समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न करतात. पण समाजाला श्रेयस-प्रेयस काय याचे तारतम्य नसते. 

तर दुसरीकडे कर्मठ लोक आपल्या संघटना, संस्था चालू करून समाजात अनाचार माजवण्याचा प्रयत्न करतात. अशा आक्रमक आणि जातीयवादी संघटनांची संख्या अलीकडच्या काळात सतत वाढताना दिसते आहे. ब्राम्हण समाज, मराठा समाज आणि दलित समाज या तीन समाजात अशा संघटनांची संख्या सर्वात जास्त दिसते. या संघटना आधुनिक संपर्क साधनांचा वापर करून आपली दांडगटशाही पुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतात. यामुळे समाज चिकित्सा, समाज बदल, टाकाऊ सामाजिक रूढी या विषयी बोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी सामाजिक सहिष्णुता कमी होत चालली आहे, तर आक्रमकता वाढत चालली आहे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. सामाजिक अनारोग्य वाढत चालले की, समाजाची झपाट्याने घसरण सुरु होते. 

दाभोलकर यांच्यासारख्या लोकशाहीवादी कार्यकर्त्याची हत्त्या ही या चढेल आक्रमकपणातून घडली आहे. आणि प्रशासनाच्या पातळीवरही कार्यक्षमपणे काम करण्याची सवय हरवत चालल्यामुळे गुन्हेगारांचा छडा लावण्याची चुरस दिसत नाही. केवळ वरिष्ठांकडून आदेश आला म्हणून प्राथमिकता पूर्ण केली जाते आहे. यामुळे पोलीस नामक यंत्रणेचा धाक वाटेनासा होतो. आणि दाभोलकर यांच्यासारखे प्रामाणिक लोक गमावण्याची पाळी येते. 

हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असेही म्हणता येत नाही, कारण बिहारमध्येही हल्ली असे भीषण प्रकार घडत नाहीत.          

....

दाभोलकर यांच्या जाण्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्रभर पसरलेले काम थांबणार नाही, ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे.  दाभोलकर यांनी आपल्या हयातीतच कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार केली आहे आणि ती समर्थपणे आपले काम करत आहे, राहणार आहे. देवा-धर्माच्या नावाने आपल्या तुंबड्या भरणाऱ्या बुवा-बाबांची दुकानदारी उद्धवस्त करण्याचे काम यापुढेही चालू राहणार आहेच. महाराष्ट्र सरकारनेही वटहुकूम काढून जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. त्याची सरकारकडून नीट अंमलबजावणी झाली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि एकट्यादुकट्या व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवता येईल.