Monday, August 23, 2010

जगण्या-लढण्यातली शहाणीव



नारायण सुर्वे यांनी राजकीय विचारांशी बांधिलकी कधी नाकारली नाही। पण त्या विचारधारेशी निव्वळ बांधलेली त्यांची कविता कधीच राहिली नाही. सुर्व्यांनी युटोपियावर विश्वास न ठेवता, त्या प्रेरणेसाठी लढणा-यांवर विश्वास ठेवला. स्वत:च्या मर्यादा ओलांडून विश्वमानवाला पाहणारी शहाणीव बहिणाबाई चौधरींप्रमाणे सुर्वेच्याही कवितेत होती. माणसांना समपातळीवरून पाहणा-या या कवीनं पुढारपणाच्या ऊर्मी नेहमी नाकारल्या, त्याही बहुधा याच शहाणिवेतून.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जॉर्ज ऑर्वेल या जगप्रसिद्ध लेखकानं ‘व्हाय आय राइट’ असा लेख 1946 साली लिहिला आहे. त्यात लेखक का लिहितो त्याची आर्वेल यांनी चार कारणे सांगितली आहेत. ती अशी Sheer egoism, Aesthetic enthusiasm, Historical impulse and Political purpose.राजकीय दृष्टिकोन म्हटलं की बहुतेक मराठी लेखकांच्या कपाळावर आठय़ा पडतात. लेखकाला राजकीय भूमिका/निष्ठा नसते, नसावी असा युक्तिवाद ते करत असतात. अशा लोकांसाठी आर्वेल यांनी ‘राजकीय दृष्टिकोना’ची फोड करताना म्हटले आहे, ''Using the word ‘political’ in the widest possible sense. Desire to push the world in a certain direction, to alter other peoples’ idea of the kind of society that they should strive after. Once again, no book is genuinely free from political bias. The opinion that art should have nothing to do with politics is itself a political attitude.''
नारायण सुर्वे या बाबतीत मात्र जॉर्ज आर्वेलच्या वंशाचे म्हटले पाहिजेत. कारण त्यांचे लेखनही ‘राजकीय दृष्टिकोन’ व्यक्त करणारे आहे. त्यांनी लिहिले आहे,‘‘सर्व माणसांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी लेखन करतो. व्यक्तिगत जीवनापासून तो सर्व समष्टीपर्यंतचा आलेख मला काढायचा आहे. माणसातले सौंदर्य व त्याच्या बावन्न कला मला चित्रित करायच्या असतात. मी चित्रित केलेला माणूस पराभूत किंवा क्षणभर निराश जरी वाटला तरी तो पुन्हा नव्या संघर्षातही उभा राहणारा, ताठ पोलादी मानेचा आहे. पराभव हा मानवी इतिहासाचा एक भाग असला तरी प्रगतीचाही तो मोठा वाटेकरी आहे हे विसरता येत नाही. माणसातले केवळ हरलेपण दाखवण्यापेक्षा त्याचे लढलेपण दाखवणे मला मोलाचे वाटते ते याचसाठी. माझे लेखनसुद्धा याचसाठी असते.’’
सुर्वे यांच्या कवितेने मराठी कवितेत एक नवे युग सुरू केले ते या अर्थाने. लढणा-या सामान्य माणसाचा पराक्रम त्यांनी महत्त्वाचा मानला. कारण प्रत्यक्षात हीच माणसं इतिहास घडवणारी असतात. त्यांचं योगदान सुव्र्याच्या कवितेचा आत्मा झाला. कुणाही लेखकाचा जगण्याचा अनुभव, त्याचं थिंकिंग एखाद-दुस-या पुस्तकात येऊन जातं, त्यामुळे त्याची तेवढीच पुस्तकं चांगली होतात. अगदी जागतिक लेखकांनाही हा नियम लावता येईल. नारायण सुर्वे यांना यापैकी कुठल्याच मर्यादा पडल्या नाहीत. कारण त्यांनी आयुष्यभर आपल्या जगण्याच्या, अनुभवांच्या पलीकडे फारसं काही लिहिलं नाही. त्यांनी मुळात लिहिलंच फार कमी. गेल्या दहा-पंधरा वर्षात तर एकही कविता लिहिली नाही. त्यांच्या म्हातारपणाचा फायदा घेऊन काहींनी त्यांच्याकडून लेख लिहून घेतले, तर काहींनी त्यांच्या एरवी पुस्तकरूपात आले नसते अशा लेखनाची पुस्तकं करायचा प्रयत्न केला. तरीही, खूप कमी लिहून साहित्यिक म्हणून किती मानाचा धनी होता येतं, याचं सुर्वे हे उत्तम उदाहरण आहे.

खरा प्रतिभावंत
सुर्व्यांना ख-या अर्थानं आणि पुरेशा गांभीर्यानं ‘प्रतिभावंत’ म्हणता येईल। मराठीत ‘विचारवंत’ या शब्दाची अलीकडच्या काळात जी फरफट झाली आहे, तीच ‘प्रतिभावंत’ या शब्दाचीही झाली आहे. आणि ती ज्यांना हे दोन्ही शब्द नीट समजलेले नाहीत त्यांनी केली आहे. इतरांच्या विचारांची पुनर्माडणी करणा-यांना विचारवंत आणि कल्पनांच्या बेगडी महिरपी रंगवणा-यांना प्रतिभावंत म्हटले जाते! सुर्वे विचारवंत नव्हते पण ते अस्सल प्रतिभावंत होते. एका अभागी आईनं रस्त्यावर टाकून दिलेलं पोर गंगाराम नावाच्या गिरणीकामगारानं काही काळ सांभाळलं खरं, पण त्यांनाही मर्यादा असल्यानं सुर्वे पुन्हा अनाथ झाले, अनाथ म्हणून मोठे झाले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत, शाळेत शिपाई ते शिक्षक असा प्रवास. पण कविता मात्र त्या वेळच्या साहित्याला सुभेदारी मानणा-यांना इशारा देणारी. अवघ्या मानवी विश्वाला कवेत घेऊ पाहणारी, कष्टक-यांसाठी पसायदान मागणारी. अशी शहाणीव असायला प्रतिभाच लागते. जगण्याच्या बाबतीत एका मर्यादेपर्यंत सुर्व्यांचं कबीराशी नातं होतं, तर कवितेच्या बाबतीत बहिणाबाई चौधरींशी. जगण्याचा सच्चा अनुभव गाठीला असेल, मनगटात बळ असेल आणि सोबतीला प्रतिभा असेल तर काय करता येऊ शकतं, याची बहिणाबाई आणि सुर्वे ही दोन उत्कृष्ट उदाहरणं आहेत.
बाजारीकरणापासून दूर
सुव्र्याना आपली कविता नेमकी कशी आहे याचं पुरेपूर भान होतं। चांगल्या जगण्याचा युटोपिया करत राहणं ही जगण्याची प्रेरणा असते. सुव्र्यानी या युटोपियावर विश्वास न ठेवता, त्या प्रेरणेसाठी लढणाऱ्यांवर विश्वास ठेवला. माणसांवर थेट समपातळीवरला विश्वास ठेवणारी ही कविता असल्यामुळे त्यांनी या ‘लोकां’चं पुढारपण केलं नाही॥ तसल्या पुढारपणासाठी कवितेतून क्रांतीच्याही फाजील अपेक्षा बाळगल्या नाहीतच; पण लोकरंजन हाही उद्देश मानला नाही. थोडक्यात त्यांनी कवितेचं बाजारीकरण होऊ दिलं नाही. ‘कविता बरी आहे; पण कवीला छंदशास्त्राचं ज्ञान नाही,’ असं वसंत दावतरांनी सुर्वेबद्दल तीन दशकांपूर्वी म्हटलं होतं. मानवी जगणं प्रत्यक्षात छंदोमय नसतं, याची जाणीव त्या काळीही कविताव्यवहाराशी जोडलेल्या फार थोडय़ा मंडळींना होती. आपल्या कवितांना कुणाही संगीतकाराला चांगल्या चाली लावता आल्या नाही तरी उत्तम पण त्यासाठी मी शब्द मोडून देणार नाही, असे ठणकावून सांगणारे सुर्वे हे बहुधा मराठीतले एकमेव कवी असावेत. (हृदयनाथ मंगेशकरांना तर त्यांनी पुन्हा पुन्हा मागूनही कविता दिल्या नाहीत ही तर फारच थोर गोष्ट म्हटली पाहिजे!)
कवितासंग्रहांचं वेगळेपण
सुर्व्यांचे चारही संग्रह व्यवस्थेवर भाष्य करणारे आहेत. त्यांची भाषा अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. सुव्र्याचा ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ हा पहिला कवितासंग्रह 1962 साली प्रकाशित झाला. इथल्या प्रस्थापितांविरुद्ध दिलेला तो एल्गार होता. स्वत:च्या आगमनाची अतिशय रास्त आणि निर्धोक आत्मविश्वासानं ललकारी देणारी सुर्व्यांची कविता वेगळी ठरली ती इथेच. त्यानंतरच्या ‘माझे विद्यापीठ’चं शीर्षक मॅक्सिम गॉर्कीच्या ‘माय युनिव्‍‌र्हसिटीज’शी साधर्म्य सांगणारं आहे. सुर्व्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तोवर गॉर्की वाचला नव्हता हे खरे असले तरी सुव्र्याच्या विद्यापीठाची जातकुळी नेमकी कोणती आहे हे यातून स्पष्ट होते. तर ‘जाहीरनामा’ हा सरळसरळ मार्क्‍स-एंजल्स यांच्या ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’ याच्याशी नातं सांगणारा होता. ‘सनद’चे शीर्षक सुर्वे यांच्या अजेंडय़ाला मान्यता मिळाल्याचे द्योतक आहे. ‘नव्या माणसाचे आगमन’ हा शेवटचा संग्रह लेनिनच्या तत्त्वज्ञानाशी, आम्हाला कुठल्या प्रकारचा नवा माणूस घडवायचा आहे, याच्याशी जुळणारा आहे.
या तुलनेमुळे त्यांच्या कवितेला कमीपणा येण्याचे काहीच कारण नाही. उलट सुव्र्याचे हे मोठेपण की, त्यांनी आपली बांधिलकी कधी दडवली नाही. बांधिलकी हा अनेक लेखक-कवींसाठी अडथळा ठरतो, पण सुव्र्याची कविता त्यापल्याड जाणारी आहे. म्हणूनच तर ती सर्व थरांतल्या, सर्व वयोगटांतल्या, सर्व समाजगटातल्यांपर्यंत पोहोचू शकली, त्यांची मान्यता मिळवू शकली. अशी सर्वमान्यता मिळवणारे बहुधा सुर्वे शेवटचेच ठरावेत.
सुर्व्यांचं लिहिणं हीच त्यांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा होती. लिहिणं हे जगण्याशी किती सम साधून असतं, याचं उदाहरण म्हणूनही सुर्व्यांचं नाव घ्यावं लागेल. त्यामुळेच सुर्व्यांच्या प्रत्येक कवितेत त्यांचं थोडं थोडं आत्मचरित्र आलं आहे. सुर्व्यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही कारण ते त्यांच्या कवितेत आलं होतं. आणि ते लिहिलं असतं तर ‘बाळगलेला’ हे त्याचं नाव त्यांनी ठरवलं होतं. कोल्हापूरच्या रिमांड होममधल्या मुलांशी बोलतना सुर्वे म्हणाले होते,‘मी बाळगलेला पोर होतो, तुम्ही सांभाळलेली मुलं आहात.’ सुर्व्यांनी आपल्या अनाथपणाचं कधी भांडवल केलं नाही. लेखन ही अतिशय गंभीरपणे करायची गोष्ट आहे असे मानणारे, जाणणारे आणि जगणारे सुर्वे होते. म्हणूनच त्यांच्या कवितेत जगण्याची उमेद आणि ऊर्जा दिसते. साहित्याच्या श्रेष्ठतेची मानकं अशा गोष्टींमुळेच तयार होत असतात. समूहाची भाषा बोलणारे लेखन नेहमीच क्लासिक सदरात मोडत आले आहे. सुर्व्यांच्या लेखनाचाही तोच दर्जा आहे.

No comments:

Post a Comment