Sunday, December 11, 2011

तुम तो मेरे बच्चे हों

गोष्ट असेल 2003 ची. पदवी परीक्षा पास होऊन वर्षे झाले होते. एका साहित्यिक मासिकात काम करत होतो. मराठी पुस्तकं, वाङ्मयीन मासिकं यांचं वाचन करण्याचा झपाटा लावला होता. त्यात पुण्यात रोज कुठे ना कुठे काही तरी सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रम होत असायचे. पुणे शहराचा सांस्कृतिक परीघ टिळक स्मारक मंदिर, भरत नाटय़ मंदिर आणि बालगंधर्व रंगमंदिर या वर्तुळात संपत असल्याने मजा होती. त्यामुळे रोज एक तरी कार्यक्रमाला जाण्याची आणि साहित्य-कला-संस्कृती या क्षेत्रातल्या एका तरी नव्या माणसाला भेटायची, त्यांच्याशी बोलायची संधी मिळत होती. त्यातल्या बहुतेकांची पुस्तके आधीच वाचलेली असत, काहींच्या मुलाखती वाचलेल्या असत, काहींबद्दल ऐकलेलं असे. त्यामुळे त्यांच्याशी दोन-पाच मिनिटं संवाद करता यायचा. शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्याभोवती इतकी गर्दी असायची की, जास्त वेळही मिळायचा नाही. असे एकंदर बरे दिवस चाललेले होते.
 
माझा रूम पार्टनर एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. हे हॉटेल विजयानगर कॉलनीतल्या मंगेशकर कुटुंबीयांच्या अपार्टमेंटच्या शेजारीच होते. त्यामुळे काही वेळा त्यांच्याकडे येणारे पाहुणे या हॉटेलमध्ये उतरत असत. एके दिवशी पार्टनर म्हणाला की, आमच्या हॉटेलमध्ये पद्मा सचदेव नावाच्या कश्मिरी लेखिका उतरल्या आहेत. त्यांचे नाव ऐकल्याबरोबर माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्यांना मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने दिला जाणारा वाङ्विलासिनी पुरस्कार मिळाल्याची बातमी नुकतीच वृत्तपत्रात वाचली होती. त्याआधीच्या आठवडय़ात साप्ताहिक लोकप्रभामध्ये निरंजन उजगरे यांनी सचदेव यांच्या एका कवितेचा मराठी अनुवाद केला होता. त्यात त्यांचा अल्पपरिचयही दिला होता. तेवढय़ावरून त्यांना भेटायची इच्छा निर्माण झाली. सचदेव मूळच्या काश्मीरच्या असल्या तरी हल्ली त्या दिल्लीमध्ये राहतात. त्यामुळे दिल्लीतल्या साहित्यिक वर्तुळाबद्दल माहिती कळेल असाही होरा होता. पण दुसरं मन सांगत होतं की, आपल्यासारख्या पोराला त्या एवढय़ा लेखिका कशाला भेटतील? आणि आपण काय बोलणार त्यांच्याशी? पण तरीही पार्टनरला म्हणालो, ‘मला त्यांना भेटता येईल का?’ तो म्हणाला, त्यांना विचारून सांगतो. पण मला काही खात्री नव्हती. पण दुस-या दिवशी पार्टनरचा फोन आला की, ‘अध्र्या तासात हॉटेलला ये. पद्माजी तुझी वाट पाहात आहेत.मी रेकॉर्डर घेऊन धावतपळत हॉटेलला गेलो. पार्टनर त्यांच्या खोलात गेऊन गेला. त्यांनी आमचं आनंदानं स्वागत केलं.
 
मला पाहून म्हणाल्या, ‘‘आप तो बडे नौजवान हो, दोस्त.
 
मी म्हणालो, ‘‘हां, अभी डिग्री पुरी की है और एक लिटररी मॅगझिन में काम कर रहा हूँ.’’
 
‘‘बडीं अच्छी बात है. लेकिन कुछ पढते हो या नहीं?’’
 मी म्हणालो, ‘‘पढते तो है. आपके कुछ आर्टिकल हमने साहित्य अकादेमी के समकालीन भारतीय साहित्यमें पढे है. कुछ कविताएँ भी पढी है.’’
यावर त्या खुलल्या. आणि सांगायला लागल्या की, मी मुंबई आकाशवाणीवर काम करत होते. त्यावेळी मराठीमध्ये प्रतिमा आणि प्रतिभाकार्यक्रम दूरदर्शनवर सादर होत असे. तो मी हिंदीमध्ये करत असते. धर्मयुगच्या धर्मवीर भारतींनी मला कसं कवितेकडून गद्य लिखाणाकडे वळवलं, इस्मत(चुगताई)आपाशी कसा संबंध आला, शांता शेळकेंशी कशी मैत्री झाली, मंगेशकर कुटुंबीयांबरोबरचे संबंध कसे जुळले, असं त्या बोलत राहिल्या. मी ते सारं रेकॉर्ड करत होतो.
 
अर्धा-पाऊण तास आमची प्रश्नोत्तरे चालली. पण मग आमच्याकडचे प्रश्न संपले. मात्र त्यांचा आमच्यासाठीचा वेळ संपलेला नव्हता. त्या म्हणायच्या, और पुछो. पण काय विचारणार आमच्याकडचे प्रश्न विचारून झाले होते. बरे त्यांच्या बोलण्यातून नवेनवे प्रश्न शोधून ते विचारण्याएवढी अक्कल तेव्हा नव्हती.
 
मी म्हणालो, ‘‘पद्माजी, आप की कौन कौन सी किताबें आई है?’’ उनके बारे में बताइयें. त्यांनी सांगितलं.
 
मग मी म्हणालो, ‘‘आपको कौन कौन से अ‍ॅवार्ड मिले है?’’ त्यांनी तेही सांगितलं.
 
थोडय़ा वेळाने त्यांच्या लक्षात आलं की, आम्हाला हिंदी आणि भारतीय साहित्यविश्वाची फारशी माहिती नाही. त्यातलं फारसं काही आम्ही वाचलेलं नाही.
 
पण पद्माजींचं मोठेपण असं की, त्यांनी मग आणखी तपशीलवार आणि खुलासेवार माहिती सांगायला सुरुवात केली. माझे एक शिक्षक सांगायचे की, पेपर कसा लिहायचा? तर तो तपासणा-याला त्या विषयातलं काहीही कळत नाही. तेव्हा त्याला नुसतं उत्तर वाचून तो विषय कळेल इतक्या सोप्या पद्धतीने ते लिहायचं. पद्माजी अगदी तसं आम्हाला हिंदी साहित्यविश्व-विशेषत: दिल्लीतलं साहित्यविश्व उलगडून दाखवत होत्या.
 
त्यांच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा साधेपणा होता. तास-दीड तास गप्पा मारल्यावर त्या आम्हाला तीन मजले उतरून खाली सोडायला आल्या. कारण त्यांना लिफ्टची प्रचंड भीती वाटत असे. निघताना त्या म्हणाल्या, ‘‘तुम मेरे बच्चों जैसे हो. कभी कभी फोन किया करो.’’ त्यांनी आपलं व्हिजिंटिंग कार्ड दिलं. त्यावर फक्त त्यांचं नाव आणि दिल्लीचा पत्ता होता. दिल्लीला गेल्यावरही त्यांनी मला एक-दोनदा फोन केला. दोन वर्षानी पुण्यात आल्यावर मला पुन्हा बोलावून घेऊन माझी चौकशी केली.
 सांगायचं असं की, इतकी मोठी लेखिका नवख्या मुलांशी इतक्या आत्मीयतेनं वागू शकते, याचा इतका सुंदर अनुभव नंतर आजवर तरी मला पुन्हा आला नाही.

No comments:

Post a Comment