Saturday, March 28, 2015

लिखों तो डरो कि उसके कई मतलब लग सकतें हैं

तुम्ही इतरांच्या भावना दुखावल्या जातील असं काहीही लिहू-बोलू शकण्याचीही सोय राहिलेली नाही. लेखकांनी, विचारवंतांनी स्वत:वर सेन्सॉरशिप लादून घेतली तरच त्यांचा जगण्याचा हक्क शाबूत राहू शकतो, अन्यथा नाही.
-------------------------------------------------------------------
कहो तो डरो कि हाय यह क्या कह दिया
न कहो तो डरो कि पुछेंगे चुप क्यों हों
सुनो तो डरो कि अपना कान क्यों दिया
न सुनो तो डरो कि सुनना लाज़िमी तो नहीं था
देखो तो डरो कि एक दिन तुम पर भी यह न हों
न देखो तो डरो कि गवाही में क्या बयान दोगे
सोचो तो डरो कि यह चेहरे पर न झलक आया हो
न सोचो तो डरो कि सोचने को कुछ दे न दें
पढ़ो तो डरो कि पीछेसे झांकनेवाला कौन है
न पढ़ो तो डरो कि तलाशेंगे क्या पढ़ते हो
लिखों तो डरो कि उसके कई मतलब लग सकतें हैं
न लिखो तो डरो कि नयी इबारत सिखाई जाएगी
डरो तो डरो कि कहेंगे डर किस बात का है
न डरो तो डरो कि हुकुम होगा कि डर

हिंदीतील प्रसिद्ध कवी विष्णू खरे यांची ‘डरो’ ही कविता कविमित्र गणेश विसपुते यांनी परवा आपल्या फेसबुक वॉलवर टाकली. गणेशनी लिहिलं आहे की, ‘विष्णू खरेंच्या ‘डरो’ या कवितेला उपशीर्षक आहे- १२ जुलै १९७६. पण ते १ मार्च २०१५ असंही असू शकतं. तत्कालीन राजकारणाच्या परिणामांचं परिमाण त्या कवितेला असलं तरी ती भारतातल्या सार्वकालिक राजकारणाबरोबरच समाज, साहित्य, संस्कृती, अर्थकारण अशा सगळ्या क्षेत्रांना सर्व काळात लागू होते.’
ऑगस्ट २०१३ मध्ये ‘अंनिस’चे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. जानेवारीत महिन्यात तामीळनाडूमधील पेरुमल मुरुगन यांनी त्यांच्यातील ‘लेखका’चा मृत्यू घडवून आणला. नुकत्याच कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यात पानसरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी. आता तािमळनाडूमधील पुलीयूर मुरुगेसन यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ‘Balachandran Enra Peyarum Enakkundu’ (Balachandran is also my name) या त्यांच्या कादंबरीतील काही उल्लेखांमुळे हा हल्ला करण्यात आला.
आता बांगलादेशातील अशाच काही घटना पाहू. बांगलादेशात रज़ीब हैदर या ब्लॉगलेखकाला त्यांच्या लिखाणामुळे २०१३ मध्ये ठार मारण्यात आलं, तर गेल्याच महिन्यात अविजित रॉय या आणखी एका ब्लॉगलेखकाची आणि लेखक हुमायून अज़ाद या लेखकाची हत्या करण्यात आली. रॉय यांच्या पत्नीही हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.
म्हणजे बांगलादेशातील इस्लामिक मूलतत्त्ववादी आणि भारतातील हिंदू मूलतत्त्ववादी यांच्यात फारसा फरक उरलेला नाही. फरक आहे तो एवढाच की, बांगलादेशात मुस्लिम धर्मावर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे, तर भारतात हिंदूधर्मावर.
अविजित रॉय हे अमेरिकेत राहत. ते ढाक्यात आपल्या घरी आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी तसा पूर्वइशारा दिला होताच. तर मुरुगन यांच्यावर दबाव आणून त्यांना स्वत:तील लेखकाची हत्या करायला भाग पाडलं गेलं. शिवाय त्यांना वाळीत टाकलं गेलं. शेवटी त्या पती-पत्नीनी चेन्नईला बदली करून आपल्या गावाचा त्याग केला. मुरुगन यांच्यावरील दबावाचा निषेध केला गेला नाही, असं नाही. त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘सपोर्ट पेरुमल मुरुगन’ हे फेसबुक पेज सुरू केलं. तािमळनाडूतील प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशननं मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली. याशिवाय इतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला. दाभोलकर-पानसरे यांच्यासंदर्भातही निषेध सभा, मोर्चे, लेख लिहिले गेले.
पण हे निषेधाचे सूर फार लवकर विरून जाण्याचीही कडेकोट सोय करण्यात आली आहे.
धार्मिक मूलतत्त्ववाद नावाचे छोटे छोटे राक्षस आपल्याजवळ पोहचले आहेत, एवढंच नाही तर ते आपल्या आगेमागे फिरत आहेत. हिंदू धर्म, जात, श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म, कर्मकांड-व्रत-वैकल्यं कशाही विरुद्ध ब्र उच्चारायची सोय उरलेली नाही. तुम्ही इतरांच्या भावना दुखावल्या जातील असं काहीही लिहू-बोलू शकण्याचीही सोय राहिलेली नाही. लेखकांनी, विचारवंतांनी स्वत:वर सेन्सॉरशिप लादून घेतली तरच त्यांचा जगण्याचा हक्क शाबूत राहू शकतो, अन्यथा नाही.
हा धार्मिक उन्माद कशाची आठवण करू देतो?
निखालसपणे हिटलरच्या वर्ण-द्वेषाची. जर्मनीच्या या हुकूमशहानं ज्यूंच्या कत्तलीचा सपाटा लावला होता. पण तेव्हाच्या जर्मनीतल्या मध्यमवर्गाचा तो हिरो होता. त्याचं प्रचंड कौतुक होतं जर्मनांना. भारतात अगदी तसंच चित्र नाही. नरेंद्र मोदी काही हिटलर नव्हेत. त्यांनी काही हिंदूविरोधकांची सरसकट हत्या करण्याचं राष्ट्रीय धोरण जाहीर केलेलं नाही. पण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आणि त्यांच्या जेमतेम वर्षभराच्या कारकिर्दीतही हिंदू मूलतत्त्वादाचा उन्माद हिटलरच्या काळातल्या उन्मादी मध्यमवर्गाचीच आठवण करून देणारा आहे. विष्णू खरे म्हणतात तसा सर्वच बाजूंनी लेखक-विचारवंत यांना गॅस चेंबरमध्ये गाठण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
प्रसिद्ध कादंबरीकार श्याम मनोहर यांची एक कथा आहे, ‘छोटे छोटे राक्षस’ नावाची. एक राक्षस कितीही भयानक असला तरी त्याच्याशी लढता येतं. अनेक छोट्या छोट्या राक्षसांशी कसं लढायचं, हा यक्षप्रश्न आहे.
आणि या घडीला तरी त्यावर उत्तर नाही. 

1 comment:

  1. मस्त.
    विष्णू खरे यांची कविता तर अप्रतिम आहे.

    ReplyDelete