Thursday, June 6, 2013

वाचलीच पाहिजेत अशी ४० पुस्तकं


प्रत्येक जण आपल्याला आवडेल ते वाचतच असतो. पण वाचलंच पाहिजे असं काय काय आहे मराठीत.

१) भारतीय संविधान (अधिकृत प्रत)
आपल्या राज्यघटनेत काय काय आहे हे आपल्याला माहीत असलंच पाहिजे. ती वाचणं अपरिहार्यच!


२) स्त्रीपुरुषतुलना - ताराबाई शिंदे
एकोणिसाव्या शतकात स्त्रीवादी मांडणी करणारे, काळाच्या अत्यंत पुढे असलेले हे पुस्तक म्हणजे भारतातील स्त्रीवादी मांडणीचा एन्सायक्लोपीडियाह्णच आहे.


३) स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
एका सामान्य स्त्रीच्या संसारातील साध्यासुध्या, कडू-गोड, आंबट-तुरट आठवणींनी, संगती-विसंगतींनी भरलेली, पण प्राजंळपणे, सूक्ष्मपणे आणि विनोदबुद्धीने सांगितलेली ही असामान्य आणि अद्वितीय कलाकृती आहे.


४) झेडुंची फुले - केशवकुमार
विडंबन या विषयावरचं मराठीतलं एकमेव पुस्तक आहे. यानंतर एकाही पुस्तकाचं नाव घेता येत नाही.


५) मर्ढेकरांची कविता 
ज्या कवितांविषयी गेली साठ-सत्तर र्वष सातत्याने लिहिलं जात आहे, त्या मर्ढेकरांच्या कवितांचा हा छोटासा संग्रह. 


६) मुंबईचे वर्णन - गोविंद नारायण माडगावकर
मुंबईविषयीचं हे पुस्तक मुंबईविषयीच्या आजवर लिहिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांमध्ये श्रेष्ठ आहे.


७) आगरकर वाङ्मय (खंड १ ते ३)- संपा. दि. य. देशपांडे व नातू
आगरकर वाचल्याशिवाय बुद्धिवाद म्हणजे काय आणि विचारकलह म्हणजे काय, हे समजून घेता येत नाही.


८) दिवाकरांच्या नाटय़छटा
नाटय़छटा हा वाङ्मयप्रकार मराठीमध्ये फक्त दिवाकरांनीच लिहिला आणि तोही उत्तम प्रकारे. 


९) भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे
आजच्या र्निबधपूर्ण शरीरसंबंधांच्या काळात एकेकाळी भारतात विवाहाचे आणि शरीससंबंधांचे कोणकोणते मार्ग होते, याचा इतिहास यात वाचायला मिळतो.


१०) युगान्त - इरावती कर्वे
महाभारताकडे कसं पाहावं आणि महाभारत कसं वाचावं याचे वस्तुपाठ जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावं. 


११) निवडक ठणठणपाळ - जयवंत दळवी
मराठीतलं सर्वाधिक काळ चाललेलं सदर आणि मराठी साहित्यिकांची इतक्या निर्भेळपणे टिंगलटवाळी करणारं सदाबहार पुस्तक.


१२) मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास - पु. ल. देशपांडे
पुलंचं हे दुर्लक्षित पण महत्त्वाचं पुस्तक आहे. 


१३) गावगाडा - त्रिंबक नारायण आत्रे
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बारा बलुतेदार व्यवस्थेचं समाजशास्त्रीय रीतीने चित्रण करणारं हे पुस्तक आहे. आत्रे यांच्या करडय़ा नजरेतून ग्रामीण भागाचा कुठलाच भाग आणि विषय सुटलेला नाही. 


१४) साता उत्तराची कहाणी - ग. प्र. प्रधान
समाजवादी, साम्यवादी, रॉयवादी, पत्री सरकार, आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी आणि गांधीवादी अशा सात विचारसरणींची १९४० ते ८० याकाळातली वैचारिक चर्चा ललित अंगाने करणारे आणि त्यासाठी पत्रे, आठवणी, गप्पा आणि फ्लॅशबॅक असा तंत्रांचा वापर करणारे हे पुस्तक. 


१५) न्या. रानडे यांचे चरित्र - न. र. फाटक
ऐन पंचविशीत फाटकांनी लिहिलेलं हे न्या. महादेव गोविंद रानडे यांचं चरित्र वाचल्याशिवाय रानडय़ांविषयी जाणून घेता येणं शक्य नाही.


१६) बहिणाबाईची गाणी 
जगण्याचं तत्त्वज्ञान इतक्या सोप्या आणि नेमक्या शब्दांत तत्त्वज्ञानाच्या पुस्तकातही सापडत नाही.


१७) आधुनिक भारत- आचार्य शं. द. जावडेकर
‘गीतारहस्य’नंतरचा थोर ग्रंथ असं या पुस्तकाचं वर्णन प्रसिद्ध लेखक वा. म. जोशी यांनी केलं आहे. याच वर्षी या पुस्तकाला पंचाहत्तर र्वष पूर्ण होतील. 


१८) मी कसा झालो- आचार्य अत्रे
अत्रे यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, त्यांची भाषा, वाक्यरचना आणि विचारसौंदर्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक लेखन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.


१९) निवडक म. श्री. माटे (खंड १ व २)
विचार असाही करायचा असतो आणि खरं तर असाच करायचा असतो, याचं तारतम्य माटेंच्या या निवडक लेखनातून ठसठशीतपणे दृग्गोचर होते.


२०) खरे मास्तर - बाळुताई खरे
मराठीमध्ये एकंदरच वडिलांविषयी लिहिलेली पुस्तके फारच कमी आहेत. हे पुस्तक वडिलांविषयी मुलीने लिहिलेले असले तरी त्यातून दोन पिढय़ांतील बदल, ताणेबाणे आणि बदलते प्राधान्यक्रम यांची ही कहाणी आहे. यातून विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ चांगला टिपला गेला आहे.


२१) वाचू आनंदे (बालगट व कुमारगट) - संपा. माधुरी पुरंदरे
बालवयीन आणि कुमारवयीन मुलांचे भावविश्व आणि जाणिवा समृद्ध करणारा हा पुस्तकसंच (मुले आणि पालकांसाठीही) नितांत वाचनीय आहे.


२२) जागर - नरहर कुरुंदकर
विचार कसा करावा हा कुरुंदकरांच्या एकंदरच लेखनाचाच गाभा आहे. जागरह्णमध्ये तो अधिक तीव्रपणे समोर येतो आणि आपले विचारविश्व बदलून टाकतो.


२३) रामनगरी - राम नगरकर
स्वत:कडे इतक्या तटस्थपणे पाहून, स्वत:च्याच बावळटपणाची, चुकांची खिल्ली यात लेखकाने ज्या खिळाडूवृत्तीने सांगितली आहे, तशी मराठीतल्या इतर आत्मचरित्रांमध्ये क्वचितच दिसते.


२४) नपेक्षा - अशोक शहाणे
मराठी लघुनियतकालिकांचे जनक असलेल्या अशोक शहाणेंचं हे एकमेव पुस्तक. अतिशय बेरकीपणाने मराठी वाङ्मय व वाङ्मय संस्कृतीची झाडाझडती त्यांनी यात घेतली आहे. 


२५) निशाणी डावा अंगठा - रमेश इंगळे उत्रादकर
कोटय़वधी रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या साक्षरता मोहीमेचं नेमकं काय झालं, याचं भेदक चित्रण या कादंबरीत आहे. 


२६) विठोबाची आंगी - विनय हर्डीकर
१९८०ते २००० या दोन दशकातील फर्स्ट पर्सन डाक्युमेंटरीह्ण या प्रकारातील दीर्घ लेखांचा संग्रह. यातला प्रत्येक लिहिताना आपला घाम निघाला असे लेखकाने म्हटले आहे आणि यातला प्रत्येक लेख वाचताना वाचकाचाही घाम निघतो. 


२७) वैचारिक व्यासपीठे - गोविंद तळवलकर
भारतातील सात, युरोप-अमेरिकेतील सात आणि पाकिस्तानतील एक अशा एकंदर पंधरा इंग्रजी नियतकालिकांची वैशिष्टय़ूपर्ण ओळख. ही सर्व नियतकालिके तळवलकर अनेक र्वष सातत्याने वाचत आले आहेत. 


२८) सारांश - अरुण टिकेकर
आजच्या सामाजिक अनारोग्याची कारणं आणि त्यावरील उपाय या पुस्तकातील सात निबंधांतून जाणून घेता येतात. 


२९) बदलता भारत - भानू काळे
उदारीकरणाला १९९१मध्ये भारतात सुरुवात झाल्यावर पहिल्या १०-१२ वर्षांतल्या भारतीय समाजमनाचा शोध घेणारं पहिलं पुस्तक. तो लेखकाने भारतभर फिरून घेतला आहे. जागतिकीकरण समजून घ्यायला निदान आत्ता तरी मराठीतलं हे एकमेव पुस्तक आहे.


३०) कथा आणि कथेमागची कथा 
(खंड १ व २) - राजन खान
एक आघाडीचा सर्जनशील कथाकार (आणि कादंबरीकारही) आपल्या कथा लिहिताना काय काय पूर्वतयारी करतो, त्याविषयी कसकसा विचार करतो, त्याला विषय कसे सुचतात, तो ते कसे फुलवतो, अशा वाचकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं एक कथा आणि त्या कथेमागचा लेख या उदाहरणांसह यात वाचता येतो.


३१) श्यामकांतची पत्रे
रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या मुलाने १९१२ ते १९१५ या काळात शांतिनिकेतनमधून वडिलांना लिहिलेल्या १८७ पत्रांचा हा संग्रह. अशा प्रकारच्या पत्रसंग्रहाचं मराठीतला पहिलाच प्रयत्न असलेलं हे पुस्तक नितांत वाचनीय आहे.


३२) तुकारामदर्शन - डॉ. सदानंद मोरे
तुकाराम आधुनिक काळात कुठे कुठे आणि कसेकसे सापडतात, त्याचं हे विविधांगी दर्शन थक्क करणारं आहे. तुकाराम महाराष्ट्राचं जगणं किती व्यापून राहिले आहेत, त्याची यातून प्रचीती येते.


३३) दगडावरची पेरणी - सय्यदभाई
तोंडी तलकाच्या विरोधात हमीद दलवाई यांच्या प्रेरणेने आणि स्वत:च्या बहिणीच्या अनुभवाने गेली ३०-४० र्वष मोहीम चालवणाऱ्या एका जिद्दीच्या कार्यकर्त्यांचे हे कार्यकथन आहे.


३४) शतकांचा संधिकाल - दिलीप पुरुषोत्तम चित्रे
विसाव्या शतकाच्या शेवटाला एक दशक बाकी असतानाच या शतकातल्या उलथापालथींचा आढावा यात घेतला आहे. गेलं शतक किती बदललं याचा अंदाज यावरून येऊ शकतो.


३५) गांधींनंतरचा भारत - रामचंद्र गुहा, अनु. शारदा साठे
भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास अतिशय नेमकेपणाने, तटस्थपणे आणि रंजकपणे सांगणारे हे पुस्तक भारतीय राजकारण समजून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे आहे.


३६) आठवले तसे - दुर्गा भागवत
दुर्गाबाईंच्या परखड समीक्षेचा आणि समतोल दृष्टिकोनाचा प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे.


३७) शाळा - मिलिंद बोकील
पौगंडवस्थेतून प्रत्येक जण जातो. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या मनात एक ‘शाळा’ असते. कधीतरी शाळेत गेलेल्या आणि कधीही न गेलेल्या असा सर्वाची ही कादंबरी आहे. 


३८) चनिया मनिया बोर - चंद्रकांत खोत
मुलांसाठीच्या गोष्टींचं इतकं भन्नाट लिहिलेलं, सजवलेलं आणि छापलेलं दुसरं पुस्तक मराठीमध्ये नसावं.


३९) नक्षलवादाचे आव्हान - देवेंद्र गावंडे
नक्षलवादी चळवळीचे इतके जवळून, इतके सत्यपूर्ण आणि वास्तव चित्रण करणारे हे पुस्तक वाचल्यावर सदसद्विवेदबुद्धी असलेली कुठलीही व्यक्ती नक्षलवादाच्या रोमँटिसिझममध्ये अडकणार नाही.


४०) अरेबियन नाईट्स (खंड १ ते १६)- रीचर्ड बर्टन, अनु. गौरी देशपांडे
माणसांच्या चांगूलपणाच्या, दांभिकतेच्या, नैतिक-अनैतिकतेच्या, वासना-आकांक्षेच्या, असूया-मत्सर-द्वेष आणि सद्भावनेच्या इतक्या धमाल आणि रंजक गोष्टी केवळ याच पुस्तकात वाचायला मिळतात.

No comments:

Post a Comment