Monday, April 27, 2015

गांधी मला नडला

वसंत दत्तात्रेय गुर्जर हे प्रसिद्धिपराङ्मुख कवी मागच्या आठवड्यात एकदम चर्चेत आले. गुर्जरांचं वयवर्ष ७१. या वयात मराठीतल्या हिकमती वा प्रसिद्धिलोलुप कवीला चांगले दिवस येतात. म्हणजे त्याला अधूनमधून जाहीर कार्यक्रमांची निमंत्रणं येतात, मधूनमधून त्याच्या वाट्याला एखादा पुरस्कारही येतो. यापैकी काहीच नाही झालं, तर शालेय कार्यक्रमातल्या बक्षीस वितरणाचा वा गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा वगैरे होण्याचं भाग्य त्याला लाभतंच लाभतं. फेसबुकमुळे आणि वॉट्सअॅपमुळे हल्ली स्वत:च्या कविता स्वत:च प्रकाशित करण्याची सोय झाल्याने या वयातही अनेकांना आपलं मन हिरवंगार ठेवता येतंच. गुर्जरांना याही गोष्टी नडल्याच. कारण ते पडले लघुनियतकालिकांच्या चळवळीतले कवी. त्यात पुन्हा अबोल, प्रसिद्धिपराङ्मुख. लघुनियतकालिकांच्या चळवळीतले सगळेच लेखक-कवी असे नाहीत. त्यातल्या अनेकांना आपल्या ‘प्रतिमा उत्कट’ करण्याच्या खुब्या माहीत आहेत. गुर्जरांकडे तेही नाही. त्यावाचून त्यांचंही काही नडलेलं नाही म्हणा; पण त्यांच्यातल्या कवीचं नडलंच म्हणायचं.
पण गुर्जरांना सगळ्यात जास्त कुठली गोष्ट नडली असेल, तर ती म. गांधी. त्यांनी ‘गांधी मला भेटला’ ही दीर्घ कविता लिहिली. जानेवारी, १९८३मध्ये ती अशोक शहाणे यांनी ‘प्रास प्रकाशन’तर्फे पोस्टर स्वरूपात प्रकाशित केली. ऑक्टोबर, १९८६मध्ये ति्ाची दुसरी आवृत्तीही काढावी लागली. पुढे तिचा हिंदी अनुवादही झाला. ही कविता तेव्हा बरीच गाजली, काहींना आवडली. ज्या अर्थी ही गांधींवरची कविता काहींना आवडली, त्याच अर्थी ती अनेकांना आवडली नाही, हेही उघडच आहे.
गंमत पाहा. १९८३ मधली ही कविता ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या जुलै-ऑगस्ट, १९९४च्या द्वैमासिकात पुनर्प्रकाशित झाली आणि एकदम, तिच्यामुळे गांधीजींची प्रतिमा डागाळली. पुण्याच्या पतित पावन संघटनेने गुर्जर, वरील द्वैमासिकाचे प्रकाशक देविदास तुळजापूरकर आणि मुद्रक धनंजय दादासाहेब कुलकर्णी यांच्याविरोधात खटला भरला. लातूर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या खटल्यात तिघेही दोषी ठरले. त्याला मुद्रक-प्रकाशकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडंपीठात आव्हान दिलं. २०१०मध्ये ‘अश्लील, बीभत्स आणि अनुचित’ असा निर्वाळा या खंडपीठाने देत, “या कवितेतील ओळींमुळे महात्मा गांधी यांची प्रतिष्ठा व प्रतिमा डागाळली,” असा निवाडा दिला. त्यालाही प्रकाशकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्याची सुनावणी मागच्या पंधरवड्यात सुरू झाली. तेव्हा गुर्जरांच्या या कवितेविषयीच्या आधी इंग्रजी व मग मराठी वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या.
समीक्षक प्रा. राजशेखर शिंदे गुर्जरांवरील लेखात म्हणतात, “गांधीजींवर टीका झाली म्हणून या कवितेवर कोणी प्रतिकूल लिहिले-बोलले असतील; पण प्रतिकूल मतं व्यक्त झाली, ती कारणं निराळी आहेत. त्यामध्ये गुर्जरांनी अनेक सांप्रदायिक विचारांचं-आचारांचं बिंग फोडलं म्हणून त्यांची ‘गांधी मला भेटला’ ही कविता स्फोटक ठरली. गांधीसारखा महात्मा देवासारखा मोठा असतो. एवढं महात्म्य गांधीजींना लाभलं, म्हणून ते प्रत्येकाचे वाटतात. गुर्जरांना गांधी भेटले, ते विवेकशून्य समाजमनात. गांधी स्वत: हतबल, निराश, न्यूनगंडबाधित अशा मनोवस्थेत.” अशा समाजात भेटलेले गांधी नडल्याशिवाय कसे राहतील?
हे जे नडणारे गांधी आहेत, ते खरं तर गांधींनंतरचे गांधी आहेत. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांनी या गांधींनंतरच्या गांधींची चार वर्गांत विभागणी केली आहे. पहिले- भारतीय राज्यसंस्था व भारतीय राज्यवादाचे गांधी, दुसरे- गांधीवाद्यांचे गांधी, तिसरे- हे लहरी, मनमानी आणि कलंदर व्यक्तींचे गांधी आणि ‘चौथे गांधी हे सहसा वाचले जात नाहीत, ते फक्त ऐकले जातात आणि तेही अप्रत्यक्षपणे. मार्टिन ल्युथर किंगसारखा एखादाच माणूस काळजीपूर्वक व साक्षेपाने वाचून त्यांच्या कामाचं मूल्यमापन करतो. बाकीच्यांना त्यांनी काय लिहिलं, हेदेखील ठाऊक नसतं.’ गांधी न वाचताच, गांधीवादी असणाऱ्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. त्यातल्या काहींची आकलनक्षमता इतकी तोकडी आहे की, त्यांनी गांधी वाचले, तरी त्यांना ते समजत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरुंधती रॉय. त्या नक्षलवाद्यांना ‘छोटे छोटे गांधी’ म्हणतात. 
या गांधींनंतरच्या गांधींचं भारतात मोठं पीक आहे. सध्या मोदी सरकारच्या कृपेने ‘कृतघ्न गांधीवाद्यां’मध्ये भरच पडत आहे. हे सर्वच ‘गांधींनंतरचे गांधी’ स्वत:ला सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश समजतात. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयातही मुख्य न्यायाधीश एकच असले, तरी यातले अनेक गांधी एकाच वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या थाटात वावरत असतात. त्यांचा तसा नुसता समजच नाही, तर खात्रीच आहे. आता जी गोष्ट सर्वोच्च आहे, तिच्याविरुद्ध ‘ब्र’ उच्चारायचा म्हणजे? गुर्जरांनी नेमका त्यांच्याच शेपटीवर पाय दिला. मग, ते नडणारच ना?
हे चारही गांधी गुर्जरांना भारतात कुठे-कुठे भेटले, त्याचं वर्णन त्यांनी ‘गांधी मला भेटला’ या कवितेत केलं आहे. हे गांधी त्यांना बनियाकडे पैसे मोजत एक नोट हळूच लंपास करताना, बौद्धमठात बीफचिली ओढताना, अस्पृश्य म्हणून पुनर्जन्म मिळावा म्हणताना, हेमामालिनीच्या नावानं हस्तमैथुन करताना, रजनीश आश्रमात संभोगाच्या समाधीतून शेळीकडे वळताना, कामगारांवरील पिक्चर बघताना, शेतकऱ्यांच्या वेशात शहरात स्थायिक होताना, दवाखान्यात सॅम्पलची बाटली सावरकरांना विकताना, छत्रपतीछाप बिडी ओढताना, हाजी मस्तानच्या साम्राज्यात पंचा सोडताना, न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात, अत्र्यांच्या शिवशक्तीत देशी घेताना, विनोबांच्या धारावीत अशा ३२-३३ ठिकाणी भेटतात. हे गांधी राजरोसपणे नंगानाच करताना गुर्जर यांनी त्यांना पकडलं आणि आपल्या कवितेत आहे तसं, एका रांगेत उभं केलं. कल्पना करा राव, कुणालाही असं भररस्त्यात विवस्त्र केल्यावर ते गप्प थोडेच बसणार? खरा प्रकार आहे तो इतकाच; पण त्याचा त्रास गुर्जरांना गेली २० वर्षं होतो आहे. या काळात या तथाकथित गांधींनंतरच्या गांधींमध्ये कितीतरी भर पडली आहे. 

प्लेटो यांनी आदर्श राज्याची मांडणी करणाऱ्या ‘रिपब्लिक’ या आपल्या ग्रंथात कवी लोकांना अजिबात स्थान दिलं नव्हतं. या लोकांचा काही उपयोग नसतो, असं त्यांचं म्हणणं होतं. आपला देश म्हणजे काही प्लेटोचं आदर्श राज्य नाही; पण तो ‘गांधींनंतरचा भारत’ मात्र नक्की आहे. या भारतात गांधीजींच्या विचाराला तिलांजली देणाऱ्या सगळ्या गोष्टी मौजूद आहेत. गांधींचं नशीबच म्हणायला हवं की, हे सर्व पाहायला ते नाहीत. आिण असते तर मंदिरं वगैरे बांधून त्यांचा ‘गणपती’ केला गेला असता.
गांधीजींनी ‘रामराज्या’ची संकल्पना मांडली होती खरी; पण ती त्यांच्या हयातीतही शक्य झाली नाही आणि भविष्यात कधी होईल, याची शक्यताही दुरापास्त आहे. त्यामुळे भारतासारख्या आदर्श नसलेल्या देशात आणि त्यातही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात गुर्जरांसारख्या कवीला धोकादायक मानलं जात असेल, तर तो
प्लेटोच्या सिद्धांताचा मूर्तिमंत व्यत्यास म्हणावा लागेल.
पण गुर्जर हे एकच कवी आहेत, तो काही कविसंप्रदाय नाही. अनेक कवी असते, तर आपण समजूही शकलो असतो. अनेकांच्या कविता, त्यातील शब्द एकत्र आल्याने त्यांचं ग्रेनेडसारख्या स्फोटकात रूपांतर होतही असेल (मराठीतल्या नसल्या, तरी इतर देशांतल्या कवींच्या शब्दांचा महिमा तसा आहेच ना!); पण इथे तर गुर्जर या एकाच कवीची मोजून एकच कविता आहे. गेली २० वर्षं सत्र व उच्च न्यायालयांना या एका कवितेचा निकाल लावता येऊ नये, यावरूनच तिच्या भयानकतेची कल्पना यावी. आता सर्वोच्च न्यायालयात तरी तो लागतो की, नाही ते कळेलच म्हणा. तोवर गुर्जरांनी ‘गांधी मला नडला’ असा या कवितेचा उत्तरार्ध लिहायला घ्यायला हरकत नाही. ‘गांधी मला नडला’ असं म्हणणाऱ्याला कुणी नडायला जाणार नाही. कारण गांधींच्या नादी लागून वाया गेलो म्हणणाऱ्याचं फारफार तर प्रबोधन केलं जाऊ शकतं, त्याला कोणी न्यायालयात खेचायला जाणार नाही.  

पादस्पर्शे क्षमस्व मे...

अर्कचित्र - सुरेश लोटलीकर
नेमाडेमास्तरांचे भाषण वाचोन वा लेखन वाचोन काहीएक तात्पर्यवजा निष्कर्ष काढण्याची फ्याशन पूर्वीपासोन मराठी भाषेंत पडली म्हणतात, ती चांगली गोष्ट म्हटली पाहिजे शेवटी. त्यांत काहीएक बरा वाटावा असा तथ्यांश दडून बसलेला असण्याची हमी देता येत नसली, तरी ती सपशेल करोन नाकारावी अशी सांप्रत परिस्थिती दुर्लभ म्हणावी इतकी दुर्घट नाही, हे आम्हांस कळून चुकले. आता रा. रा. नेमाडेमास्तर, जे की, देशीवादाचे जन्मदाते मानिले जातात, नव‘देशी’वादाचे शिल्पकार नमोजी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारून वर हितोपदेश सांगते जाहले की, देशीवाद संकुचित नाही. ते म्हणतात म्हण्जे तो तसा नसणारच. देशीवादाला ताणले की मूलतत्त्ववाद जन्म घेऊ शकतो, हे आत्मज्ञान उशिरा का होईना नेमाडेमास्तरांस झाले, हे ऐकोन संतोष जाहला. प्रंतु नेमाडेमास्तर भारतीय लोक विवेकवादी असल्याचे सूचित करितात, तो मूलतत्त्ववादी होणार नाही, असा आशावाद व्यक्त करितात. तो खचितच समाधानास पात्र म्हणून वाटावा असा नाही. नेमाडेमास्तरांस जें जें म्हणून बरें वाटतें तें तें सर्व उत्तमच असें सर्वांनी मानिल्यास त्यांच्या भक्तांना परमसुख लाभेलही, न जाणो.
नेमाडेमास्तर आतां बरें बोलतील, मग बोलतील यांची आम्हांस आंस लागलेलीं, प्रंतु त्यांनी कशास कांहीं हातीं लागूं देऊ नये व एकंदरींत आम्ही जे दुर्भागीच कीं नुसती आशा करीत बसावें. त्यांतहि त्यांनी टाळ्याखाऊं मजकूर ओरडून बोलावा आणि वेळ मारून न्यावीं, असा एकंदरीने सारा भाषणप्रपंच म्हणावयाचा. अरुण शौरीनामक मजकूरमहाशय जीं जीं लबाडी करितात, इतरांच्या बुकांतून खचित अभ्यासाचा बहाणा करितात, कुणाची मुरवत न धरतां बेलाशक नापसंत असे दाखले जुळवितात आणि दांडगे शब्द वापरितात व अर्थांनी भेडसावितात. तशा तऱ्हेचें आपमतलबी वर्तन शौरीस शोभा देत नाही तद्वत आम्हांसही देत नाही. सबब आम्हीही तो मार्ग पत्करण्यास नाखूशच आहो. प्रंतु नेमाडेमास्तरांचे काही मासले मांडावयास अपरिहार्य करितात, सबब त्यांची अनिवार्यता नोंदविलेली बरीं. ‘...विकास हे काही संस्कृतीचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण नाही’ ह्या नेमाडेमास्तरांच्या सिद्धांतात तदंतर्गत कस असा नाहीं कीं ज्यामुळें त्यास महत्त्व द्यावें अथवा त्याचा कांहीं कुणास उपयोग व्हावा. ‘...भारतीय नृत्य आणि भारतीय संगीत हे दोन कला प्रकार कोणत्याही परकीय प्रभावापासून दूर आहेत. म्हणून त्या महान आहेत.’ हाही नेमाडेमास्तरांचा सिद्धांत नव्या देशीचाच प्रकार म्हणावयाचा. त्यात नावीन्य म्हणून काडीचें नाही. इतरांच्या अनेक प्रकारच्या मजकुरांचा गडबुडगुंडा करोन व आपल्या तिरकस संमोहनविद्येचा प्रयोग करून पामर वाचकांस उगाचच चमकाविण्याची ही बहादुरी म्हटली पाहिजे. त्यांकरिता चिंतनाचा आव आणावयाची काहींएक गरज नव्हतीं.
‘आपले पूर्वज आपल्यापेक्षा अधिक बुद्धिवादी आणि हुशार होते, यात काही शंकाच नाही,’ आणि ‘...गुलामांची पुढील पिढीच अधिक बुद्धिमान असते,’ असे नेमाडेमास्तर बोलोन बैसले. व स्वत:बद्दलही मूळ मुद्दा भुलून होत्साते तारतम्य सोडून दिले, ह्यास काय म्हणावें? शब्दांच्या एकंदर कल्पनेमध्येंच कांहीं फेरफार करावयाचें तेवढें स्वातंत्र्य त्यांस घेण्यास कोणा गनिमाने आडकांठीं केलीं म्हणायची? स्वत:बद्दल कांहीं टीकाविवेचन न करणें हें शहाणपणाचेंच ठरेल असें कांहीं त्यांस वाटले नाहीं, हे नि:संशय कांहीं भलतेंच धारिष्ट्य म्हणावें लागेल.
असो. तर पुढील मुद्द्याकडे काळजीपूर्वक वळूं. ते म्हणतात कीं, ‘वैश्विकीकरण ही शुद्ध फसवणूक आहे.’ येथें आपल्या बेलाशक देशीवादाचे समर्थन करावयाचें असल्यानें त्यांनीं अर्धसत्याची भाषा सुरूं केली! वस्तुत:  अशा प्रकारचे सिद्धांत गेल्या २५ सालांत इतक्यांदा सिद्ध करून झाले आहेत म्हणतां, त्यांस पुन्हा सिद्ध करण्याजोगेंहि कांहीं उरलेलेंच नाहीं. ‘जागतिकीकरण ही शुद्ध भांडवलशाही आहे’ म्हणून ज्या कशास म्हणतात कीं जें ऐकतां ऐकतां आमचे कान दुखले आहेत असें अतिपरिचित कांहीं गृहीत धरणें हा एक धाडसी प्रकारच आहे असें म्हणावें लागतें.
‘माझ्यावरही परकीय प्रभाव आहे आणि मी तो नाकारत नाही,’ या नेमाडेमास्तरांच्या विधानाचें महत्त्व स्पष्टीकरण दीर्घ करण्याइतके आहे खास. केवळ हे शब्द वापरोन मोकळे झाले असें समजून न चालतां तें त्याविषयी लिहिते होतील याची आशा नजरअंदाज करूं नये.
नेमाडेमास्तरांस ‘हिंदू’चे पुढील भाग लिहायला सवड कशी म्हणतां ती गवसत नाही, मात्र भाषणे द्यायला, देशीवादाच्या टीकाकारांना बदडून काढायला, उपहासाचे डोस पाजायला, विरोधकांना अनुल्लेखाने जिवंतपणीच मारून टाकायला सवडच सवड काढिता येतें. त्यापरांस त्यांनीं देशीवादाची तरी अंमळ सवड काढून संगतवार तपशिलाबरहुकूम मांडणी करावी की नाही?
प्रंतु त्यांस देशीवादाची सविस्तर मांडणी करण्यास अंमळ खटाटोप करूनहि आजवर काही साधता आलें असें कांहीं वाटत नाहीं. प्रेमचन्द यांच्याबद्दल आम्हांस आदरच आहे, जसा नेमाडेमास्तरांबद्दलही आहे. पण नेमाडेमास्तरांसारिखे प्रेमचंद यांना मोठे करण्यासाठी आम्हांस शेक्सपीअरांस लहान करण्याची गरज वाटत नाही. नेमाडेमास्तरांस स्वत:कडे विधायकपणा घेण्याची खबरदारी घेतां आली नाही, आम्ही मात्र तो घेऊं इच्छितो. म्हणून होतकरू लेखकूंनी, कवीवंशूनी, कादंबरीगिरमटूंनी नेमाडेमास्तरांचे ठायीं स्वत:बद्दल अप्रीति मात्र उत्पन्न करून घेऊन त्यांच्या या भाषणाकडे दुर्लक्ष करून आपली नुकसानी करून घेऊं नये. एकंदरीने देशीवादाच्या टीकाकारांवर टीका टीका म्हणून म्हणतात ती त्यांस नाना खटाटोप करूनहि साधली आहे, असें कांहीं वाटत नाही. आता तर नेमाडेमास्तरांनी इंग्रजीच्या गुलामगिरीची जबाबदारी सपशेल पुढील पिढ्यांवर ढकलून दिली आहे. आपल्या दारातील घाण दुसऱ्याच्या दारात अशा प्रकारे परभारेच लोटून दिली म्हण्जे आपली जबाबदारी झटकता येते की काय? एकंदरीने हाच तो संकुचित नसलेला देशीवाद म्हणायचा, झाले!

Saturday, March 28, 2015

लिखों तो डरो कि उसके कई मतलब लग सकतें हैं

तुम्ही इतरांच्या भावना दुखावल्या जातील असं काहीही लिहू-बोलू शकण्याचीही सोय राहिलेली नाही. लेखकांनी, विचारवंतांनी स्वत:वर सेन्सॉरशिप लादून घेतली तरच त्यांचा जगण्याचा हक्क शाबूत राहू शकतो, अन्यथा नाही.
-------------------------------------------------------------------
कहो तो डरो कि हाय यह क्या कह दिया
न कहो तो डरो कि पुछेंगे चुप क्यों हों
सुनो तो डरो कि अपना कान क्यों दिया
न सुनो तो डरो कि सुनना लाज़िमी तो नहीं था
देखो तो डरो कि एक दिन तुम पर भी यह न हों
न देखो तो डरो कि गवाही में क्या बयान दोगे
सोचो तो डरो कि यह चेहरे पर न झलक आया हो
न सोचो तो डरो कि सोचने को कुछ दे न दें
पढ़ो तो डरो कि पीछेसे झांकनेवाला कौन है
न पढ़ो तो डरो कि तलाशेंगे क्या पढ़ते हो
लिखों तो डरो कि उसके कई मतलब लग सकतें हैं
न लिखो तो डरो कि नयी इबारत सिखाई जाएगी
डरो तो डरो कि कहेंगे डर किस बात का है
न डरो तो डरो कि हुकुम होगा कि डर

हिंदीतील प्रसिद्ध कवी विष्णू खरे यांची ‘डरो’ ही कविता कविमित्र गणेश विसपुते यांनी परवा आपल्या फेसबुक वॉलवर टाकली. गणेशनी लिहिलं आहे की, ‘विष्णू खरेंच्या ‘डरो’ या कवितेला उपशीर्षक आहे- १२ जुलै १९७६. पण ते १ मार्च २०१५ असंही असू शकतं. तत्कालीन राजकारणाच्या परिणामांचं परिमाण त्या कवितेला असलं तरी ती भारतातल्या सार्वकालिक राजकारणाबरोबरच समाज, साहित्य, संस्कृती, अर्थकारण अशा सगळ्या क्षेत्रांना सर्व काळात लागू होते.’
ऑगस्ट २०१३ मध्ये ‘अंनिस’चे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. जानेवारीत महिन्यात तामीळनाडूमधील पेरुमल मुरुगन यांनी त्यांच्यातील ‘लेखका’चा मृत्यू घडवून आणला. नुकत्याच कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या गेल्या. त्यात पानसरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी. आता तािमळनाडूमधील पुलीयूर मुरुगेसन यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ‘Balachandran Enra Peyarum Enakkundu’ (Balachandran is also my name) या त्यांच्या कादंबरीतील काही उल्लेखांमुळे हा हल्ला करण्यात आला.
आता बांगलादेशातील अशाच काही घटना पाहू. बांगलादेशात रज़ीब हैदर या ब्लॉगलेखकाला त्यांच्या लिखाणामुळे २०१३ मध्ये ठार मारण्यात आलं, तर गेल्याच महिन्यात अविजित रॉय या आणखी एका ब्लॉगलेखकाची आणि लेखक हुमायून अज़ाद या लेखकाची हत्या करण्यात आली. रॉय यांच्या पत्नीही हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.
म्हणजे बांगलादेशातील इस्लामिक मूलतत्त्ववादी आणि भारतातील हिंदू मूलतत्त्ववादी यांच्यात फारसा फरक उरलेला नाही. फरक आहे तो एवढाच की, बांगलादेशात मुस्लिम धर्मावर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे, तर भारतात हिंदूधर्मावर.
अविजित रॉय हे अमेरिकेत राहत. ते ढाक्यात आपल्या घरी आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी तसा पूर्वइशारा दिला होताच. तर मुरुगन यांच्यावर दबाव आणून त्यांना स्वत:तील लेखकाची हत्या करायला भाग पाडलं गेलं. शिवाय त्यांना वाळीत टाकलं गेलं. शेवटी त्या पती-पत्नीनी चेन्नईला बदली करून आपल्या गावाचा त्याग केला. मुरुगन यांच्यावरील दबावाचा निषेध केला गेला नाही, असं नाही. त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘सपोर्ट पेरुमल मुरुगन’ हे फेसबुक पेज सुरू केलं. तािमळनाडूतील प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशननं मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली. याशिवाय इतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला. दाभोलकर-पानसरे यांच्यासंदर्भातही निषेध सभा, मोर्चे, लेख लिहिले गेले.
पण हे निषेधाचे सूर फार लवकर विरून जाण्याचीही कडेकोट सोय करण्यात आली आहे.
धार्मिक मूलतत्त्ववाद नावाचे छोटे छोटे राक्षस आपल्याजवळ पोहचले आहेत, एवढंच नाही तर ते आपल्या आगेमागे फिरत आहेत. हिंदू धर्म, जात, श्रद्धा-अंधश्रद्धा, देव-धर्म, कर्मकांड-व्रत-वैकल्यं कशाही विरुद्ध ब्र उच्चारायची सोय उरलेली नाही. तुम्ही इतरांच्या भावना दुखावल्या जातील असं काहीही लिहू-बोलू शकण्याचीही सोय राहिलेली नाही. लेखकांनी, विचारवंतांनी स्वत:वर सेन्सॉरशिप लादून घेतली तरच त्यांचा जगण्याचा हक्क शाबूत राहू शकतो, अन्यथा नाही.
हा धार्मिक उन्माद कशाची आठवण करू देतो?
निखालसपणे हिटलरच्या वर्ण-द्वेषाची. जर्मनीच्या या हुकूमशहानं ज्यूंच्या कत्तलीचा सपाटा लावला होता. पण तेव्हाच्या जर्मनीतल्या मध्यमवर्गाचा तो हिरो होता. त्याचं प्रचंड कौतुक होतं जर्मनांना. भारतात अगदी तसंच चित्र नाही. नरेंद्र मोदी काही हिटलर नव्हेत. त्यांनी काही हिंदूविरोधकांची सरसकट हत्या करण्याचं राष्ट्रीय धोरण जाहीर केलेलं नाही. पण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आणि त्यांच्या जेमतेम वर्षभराच्या कारकिर्दीतही हिंदू मूलतत्त्वादाचा उन्माद हिटलरच्या काळातल्या उन्मादी मध्यमवर्गाचीच आठवण करून देणारा आहे. विष्णू खरे म्हणतात तसा सर्वच बाजूंनी लेखक-विचारवंत यांना गॅस चेंबरमध्ये गाठण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
प्रसिद्ध कादंबरीकार श्याम मनोहर यांची एक कथा आहे, ‘छोटे छोटे राक्षस’ नावाची. एक राक्षस कितीही भयानक असला तरी त्याच्याशी लढता येतं. अनेक छोट्या छोट्या राक्षसांशी कसं लढायचं, हा यक्षप्रश्न आहे.
आणि या घडीला तरी त्यावर उत्तर नाही. 

विनोद मेहता नावाचा मानदंड

''गिरीलाल जैन, नानपोरिया, सुरेंद्र निहाल सिंग, प्रेम भाटिया, शामलाल वगैरे लोक ग्रेट होते, तपस्वी होते. समाज, संस्कृती आणि राजकारणाच्या धारणा आणि प्रेरणा त्यांना अवगत होत्या. आपल्या लिखाणात ही संपादक मंडळी भारतीय समाजमनाची स्पंदनं आणि लक्षणं अचूक मांडत. या व्रतस्थ, ज्ञानवंत विद्वानांच्या सभेत विनोद उपरा वाटायचा.
म्हणूनच आपला वाटायचा. कारण तो आपल्या प्रत्येक वार्ताहराचं मोल जाणून होता. संपादकीय लिहिलं की आपलं अाणि पेपरचं नातं संपलं अशा निर्लेपवृत्तीने त्याला ग्रासलं नाही. म्हणूनच विनोद संपूर्ण पेपरचा विचार करतो. वर्तमानपत्राचं रूप सुबक, आकर्षक असावं याचा आग्रह धरतो... बातम्या बोजड, कंटाळवाण्या असू नयेत म्हणून धडपडतो. वाचकांशी दोस्ताना करण्याची वृत्ती वर्तमानपत्रांनी ठेवावी, ही विनोदची कल्पना.''

विनोद मेहता यांनी १९९५च्या अखेरीला दिल्लीहून ‘आऊटलुक’ हे साप्ताहिक सुरू केलं, तेव्हा त्यांचे एकेकाळचे सहकारी पत्रकार अंबरीश मिश्र यांनी त्यांच्याविषयी ‘आज दिनांक’मध्ये ‘आशिक मस्त फकीर’ या नावाने एक लेख लिहिला होता... त्यातील वरील परिच्छेद आहे.
गंमत पाहा. भारतातील बहुतांशी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील वर्तमानपत्रं ही भांडवलदार मालकांची. वर उल्लेख केलेले सर्व याच वर्तमानपत्रांचे ‘नोकरदार संपादक’, पण तरीही त्यांचा व्यासंग, विद्वता, समाजभान आणि जी कुठल्याही संपादकाकडे असायला हवी अशी प्रगल्भ स्वरूपाची दूरदृष्टी याबाबत कधीही, कुणालाही शंका घेता आली नाही. विनोद मेहता व्यासंग, विद्वता याबाबतीत वर उल्लेखित संपादकांपेक्षा काहीसे उणे नक्कीच होते, पण समाजभान आणि प्रगल्भ दूरदृष्टी याबाबतीत ते तितकेच समकक्ष होते. मेहता जातील तिथे आपल्या स्वातंत्र्यासाठी मालकांशी भांडले, मनासारखं काम करता येत नाही हे पाहून त्यांनी सणकीत त्या वर्तमानपत्रांना सोडचिठ्ठी दिली.
अवघ्या वीस वर्षांत विनोद मेहता यांनी ‘डेबोनेयर’ (१९७४), ‘संडे ऑब्जर्व्हर’ (१९८०), ‘इंडियन पोस्ट’ (१९८७), ‘द इंडिपेडंट’ (१९८९) या पाच मुंबईतील आणि ‘पायोनियर’ (१९९२) हे दिल्लीतील एक वर्तमानपत्र वा नियतकालिकांचं संपादक म्हणून काम केलं.
७४ साली ‘डेबोनेयर’ हे मासिक सुरू झालं, तेव्हा त्याच्या संपादकपदी एक परदेशी व्यक्ती होती. ‘डेबोनेयर’ सुरू होऊन सात-आठ महिनेच झाले होते, पण त्याची अवस्था तितकीशी चांगली नसल्यानं ते बंद पडण्याच्या मार्गावर होतं. तेव्हा मेहता मालकाला म्हणाले, ‘मला थोडी संधी द्या. पुढच्या सहा महिन्यांत त्याचा खप वाढवून दाखवतो.’ आणि ते त्यांनी करून दाखवलं. सलग सात वर्षे मेहता ‘डेबोनेयर’च्या संपादकपदी होते. या मासिकाने तेव्हा अभूतपूर्व गोंधळ उडवला होता. मध्यमवर्गीय पांढरपेशा माणसाने तर ‘शांतम् पापम्’ करत या मासिकाचं नावही घरात उच्चारणं टाकलं होतं. ‘डेबोनेयर’चा सेक्स हा प्रमुख घटक होता, पण तेवढीच त्याची आेळख होऊ पाहत होती. मेहता संपादक झाले आणि ‘डेबोनेयर’ला एका गंभीर वाङ्मयीन नियतकालिकाचं स्वरूप आलं. साहित्य संपादक सायरस मिस्त्री, कलासमीक्षक गीता कपूर, काव्यसंपादक इम्तियाज धारकर यांसारखी नामवंत मंडळी त्यांनी एकत्र आणली. शिवाय कितीतरी नव्या लेखकांना मेहतांनी लिहितं केलं. उपमन्यू चटर्जी, गीव्ह पटेल, दिलीप चित्रे, गौरी देशपांडे असे अनेक ‘डेबोनेयर’चे लेखक होते. सामाजिक दांभिकतेवर अतिशय बुद्धिमान आणि धारदार उपरोध करण्याचं काम ‘डेबोनेयर’ करत असे. India’s first real girlie magazine असणाऱ्या ‘डेबोनेयर’ला सेक्स या विषयाचीही खुल्या मनानं आणि कलात्मक मांडणी करणारं मासिक असा मेहतांनी लौकिक मिळवून दिला. पण तो गंभीर अर्थानेच. ‘डेबोनेयर’ला त्यांनी दांभिक उच्चमध्यमवर्गीयांचं ‘प्लेबॉय’ होऊ दिलं नाही. ‘डेबोनेयर’चा प्रत्येक अंक हा वाचकांसाठी धक्का असायचा, पण पुढे मेहतांनी ‘डेबोनिअर’ सोडलं आणि त्याचं स्वरूपही झपाट्यानं बदललं. त्याचा खपही कमी होत गेला.
त्यानंतर मेहता ‘संडे ऑब्जर्व्हर’चे संस्थापक-संपादक झाले. या वृत्तपत्राला मेहतांनी पुढच्या सहा वर्षांच्या काळात ‘आशियातील सर्वात जास्त खप असलेलं रविवार-वृत्तपत्र’ असा लौकिक मिळवून दिला, पण तेही त्यांनी सोडलंच शेवटी. १९८७मध्ये ते ‘दी इंडियन पोस्ट’चे संपादक झाले, पण थोड्याच दिवसांत तिथंही राजीनामा दिला. मग ते अनुक्रमे ‘बॉम्बे’ आणि ‘द इंडिपेडेंट’चे संपादक झाले. ‘द इंडिपेंडंट’ हे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चं भावंड म्हणून सुरू झालं. टाइम्स समूहानं मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भरपूर पगार दिला. ‘टाइम्स’चे तत्कालीन संपादक दिलीप पाडगावकर, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंद तळवळकर आणि ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’चे संपादक प्रीतीश नंदी यांचे डोळे विस्फारले गेले. असं म्हणतात की, तेव्हापासून हे संपादक एका बाजूला आणि मेहता एका बाजूला असे दोन तट पडले. लवकरच या दुसऱ्या टीमकडे एक दणदणीत निमित्तही चालून आलं. मोरारजी देसाई नव्हे तर यशवंतराव चव्हाण हे अमेरिकेच्या सीआयएचे एजंट म्हणून काम करत, अशी बातमी मेहता यांनी ‘द इंडिपेडेंट’मध्ये छापली. आणि पाडगावकर-तळवळकर यांना आयतंच कोलीत मिळालं. परिणामी २९व्या दिवशी मेहता यांना टाइम्सच्या इमारतीचे जिने उतरावे लागले.
त्यानंतर मेहतांनी मुंबईलाच रामराम ठोकला आणि थेट दिल्ली गाठली. तिथं ते ‘पायोनिअर’चे संस्थापक-संपादक झाले, पण तेही त्यांनी १९९४ साली सोडलं. म्हणून ते स्वत:चं वर्णन  ‘Editor Who Has Lost the Most Jobs’ असं करत. वीस वर्षांत सहा वर्तमानपत्रांना सोडचिठ्ठी दिल्यावर मेहता हा ‘बेभरवशाचा संपादक’ आहे अशी प्रतिमा झाली नसती तरच नवल. त्यामुळे १९९५ साली त्यांनी ‘आऊटलुक’ या नव्या इंग्रजी वृत्तसाप्ताहिकाची घोषणा केली, तेव्हा सर्वांनी गृहीतच धरलं होतं की, मेहता आहेत आहे तोवर हेही साप्ताहिक चालेल आणि ते सोडून गेले की, त्याचाही बोऱ्या वाजेल. कारण मेहता होते तोपर्यंत आधीची सारी वृत्तपत्रं गाजली होती आणि ते सोडून गेल्यावर ती वाजलीही होती. पण विनोद मेहतांनी आपल्या आधीच्या प्रतिमेला छेद दिला. अन् तोही एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सतरा वर्षं. केवळ एवढंच नव्हे तर या साप्ताहिकाला भारतातील आघाडीचं साप्ताहिक बनवलं. संपादकपदावरून ते तीन-चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले. तेव्हापासून ते ‘आऊटलुक’चे एडिटोरिअल चेअरमन म्हणून काम पाहत होते, पण ‘आऊटलुक’ त्यांनी ठरवून दिलेल्या ध्येयधोरणांनुसारच आजही चालतो आहे.
Open, Debate-provoking and Liberal journal अशी मेहता यांच्या ‘आऊटलुक’ची सुरुवातीपासून ओळख आहे. याशिवाय विविधता, लेखांचा आवाका, मजकुराची अचूकता, बोलकी छायाचित्रं-ग्राफिक्स, सुबक व उत्तम मांडणी, चांगलं मुद्रण आणि विनोद मेहतांचा अंकावरील खास ठसा ही वैशिष्ट्यही. सातत्यानं चांगले अंक काढणं, आपल्या वाचकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देणं हे शिवधनुष्य पेलणं सोपं नसतं. ‘आऊटलुक’ त्याबाबतीत व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण होतो. एकच विषय घेऊन त्याच्या वेगवेगळ्या बाजू समोर आणण्याचं कामही ‘आऊटलुक’ करतं आणि एकाच विषयाचा बऱ्यापैकी पाठपुरावाही. अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील ए. राजा आणि नीरा राडिया यांच्यातील ध्वनिफीती ‘आऊटलुक’नंच बाहेर काढल्या. त्यात वीर संघवी, बरखा दत्त या इंग्रजीतल्या जान्यामान्या पत्रकारांच्या नावांचा भांडाफोडही ‘आउटलुक’नेच केला. खळबळजनक बातम्या, इंग्रजीत ज्याला ‘स्कूप्स’ म्हणतात, ‘आऊटलुक’ तेही ‘इंडिया टुडे’च्या चालीवर करतंच. ‘आउटलुक’ आणि ‘इंडिया टुडे’ ही इंग्रजी साप्ताहिकं इंग्रजी वर्तमानपत्राच्या दोन पावलं पुढे असतात. अनेकदा या साप्ताहिकांच्या कव्हर स्टोरीज इंग्रजी वर्तमानपत्राच्या हेडलाइन्स होतात.
मात्र हेही खरं की, मेहता यांच्या ‘आऊटलुक’ने काही न पटणाऱ्या भूमिकाही घेतल्या आहेत. काश्मीर प्रश्नाबाबतची टोकदार भूमिका आणि अरुंधती रॉयला अवास्तव महत्त्व देऊन तिचं प्रस्थ वाढवणं ही त्यातली दोन महत्त्वाची उदाहरणं. अरुंधतीचे मोठमोठे आणि प्रचंड एकांगी लेख ‘आऊटलुक’ सातत्यानं छापत असतं. अरुंधतीची भूमिका ही विनोद मेहता यांची वा त्यांच्या ‘आऊटलुक’ची नाही असं मेहता यांनी सांगितलंही, पण वर अशीही टिपणी केली की, ‘रॉय यांचे लेख कितीही मोठे आणि न पटणारे असतील तरी ते वाचले जातात.’ ही भूमिका विनोद मेहतांच्या लिबरल आणि समन्वयवादी भूमिकेला छेद देणारी होती. या संवेदनशील विषयांवर ‘ओपिनिअन मेकर’ची भूमिका घेण्यात ते कमी पडले असं खेदानं म्हणावं लागतं.
नैतिकदृष्टया बेबंद, तात्त्विकदृष्टया स्वैर, वैचारिक भूमिकांबाबत कमकुवत आणि सामाजिक भानाबाबत अजागृत अशी सध्याची इंग्रजी-मराठीतील संपादक मंडळी असतात. शिवाय त्यांचे हेवेदावे इतके टोकाचे असतात की, ते असतील त्या वर्तमानपत्रात त्यांचीच सेन्सॉरशिप असते. आपल्याला ज्यांचे विचार मान्य नाहीत अशा लेखक मंडळींना त्यांच्याकडून ‘बॅन’ केले जाते. आणि जे स्तुतिपाठक असतात, आपल्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत नाहीत अशांनाच स्थान दिले जाते. विरोधाचा ‘ब्र’ उच्चारलेला त्यांच्या वर्तमानपत्रात छापून येऊ शकत नाही.
‘नोकरदार संपादकां’ची ही सेन्सॉरशिप मोदी सरकारप्रणीत ‘बॅनमॅन’ दीनानाथ बात्रा प्रभुतिइतकीच भयानक आहे.
सत्य बोलणं हे वैयक्तिक फायद्याची मान मुरगाळणारं असतं आणि आजकाल ते कोणालाच नको असतं.
त्यासाठी विनोद मेहता यांच्यासारखाच संपादक हवा. जो १०० टक्के सुहृद असतो, जो स्वत:ला न्यायाधीश मानत नाही, जो सर्व विचारसरणीच्या लेखकांना आपल्या वर्तमानपत्रात-नियतकालिकात हक्कानं स्थान देतो, त्यांच्या विरोधी मतांची कदर करतो. मेहता यांच्यासरखे संपादक आपलं नियतकालिक हे केवळ आपलंच मुखपत्र असलं पाहिजे असे अघोषितपणे ठरवत नाहीत, ते सर्वांचं व्यासपीठ मानतात. म्हणूनच ‘आऊटलुक’मध्ये रामचंद्र गुहा लिहितात, तसे अरुंधती रॉय यांचे २०-३० पानी लेखही असतात. सुधींद्र कुलकर्णी असतात, तसे पवन वर्मा असतात. कुमार केतकर असतात, तसे किरण नगरकर असतात. तरुण तेजपाल मित्र असले तरी योग्य वेळी त्यांच्यावरही टीका केली जाते. सेक्ससारख्या विषयावर विशेषांक असतो, तसा सिव्हिल सोसायटीवरही असतो. राजकारणाची सखोल चिकित्सा असते, त्या बरोबरीने सामाजिक प्रश्नांचीही चर्चा असते.
ट्रेंड येतात आणि जातात. परंपरेचं तसं नसतं. ती वटवृक्षासारखी मातीच्या गाभ्याला भिडलेली असते, तिचं खोड वर्तमानाशी झुंज देत असतं आणि फांद्या आभाळाला गवसणी घालायचा प्रयत्न करत असतात आणि त्याची डेरेदार सावली सर्वांना शीतल करायचा प्रयत्न करत असते. विनोद मेहता हे अशा सशक्त परंपरेचे शिलेदार आहेत.
काही संपादकांच्या विद्वत्तेचं आणि तुच्छतेचं महाराष्ट्रात अजूनही कौतुक केलं जातं. मेहता तितके काही विद्वान नव्हते, पण तेवढ्या विद्वत्तेनंही त्यांना पुष्कळ नम्र केलं होतं. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांसह लेखकांपर्यंत कुणालाच कमी लेखत नसत. म्हणूनच त्यांचा संपर्क फक्त दिल्लीतल्या हाय प्रोफाइल, उच्चभ्रू विद्वानांपुरतच मर्यादित नव्हता, तो सामान्यातल्या सामान्य वाचकांशीही होता आणि लेखकांशीही. प्रसारमाध्यमं लोकशाही आणि स्वातंत्र्याची राखणदार असतात, असं मानलं जातं. लोकशाही प्रक्रिया, लोकशाही मूल्यं, सामाजिक व आर्थिक नैतिकता आणि नैतिक सामाजिक व्यवहार यांची राखणदारी करणं म्हणजे पत्रकारिता करणं असं विश्लेषण जुनेजाणते पत्रकार करतात. मेहता यांची पत्रकारिता या प्रकारची होती.


मेहता यांनी कुठल्याही पत्रकारितेचा कोर्स केला नव्हता, पत्रकारितेवरच्या एखाद्या कार्यशाळेतही भाग घेतला नव्हता. ट्रेनी म्हणून त्यांनी कुठल्या वर्तमानपत्रामध्येही काम केलं नव्हतं. तरीही ते थेट संपादक झाले. पण मग त्यांनी ती पात्रता अंगीही बाणवत नेली. नवे नवे प्रयोग करत, मोडत शिकत राहिले. त्यातून ‘आऊटलुक’सारख्या उत्तम साप्ताहिकाचा जन्म झाला. असं सुदैव सर्वांनाच लाभतं असं नाही. ज्यांना लाभतं त्यांना ते पेलवतंच असंही नाही. पुन्हा अबंरीश मिश्र यांचेच शब्द वापरायचे तर मेहता ‘टपोरी’, ‘उनाड संपादक’ होते, तरी त्यांनी संपादकपदाची खुर्ची उत्तमरीत्या पेलून दाखवली. त्यांच्या मार्गाने इतरांना जाता येईलच असं नाही, पण नव्यानं पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्या, असणाऱ्या आणि संपादक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने ‘लखनौ बॉय’ आणि ‘एडिटर अनप्लग्ड’ या आत्मचरित्राच्या दोन्ही भागांची पारायणं करायला हवीत. त्यातून फार काही शिकता आलं नाही, तरी किमान ‘वरिष्ठांशी लाचार’ आणि ‘कनिष्ठांशी मुजोर’ वृत्तीने वागू नये, एवढं तरी नक्कीच शिकता येईल.   

गरज ‘हिंदू डाव्यां’ची

मोदी सरकारच्या पराक्रमाच्या बातम्या रोजच्या रोज प्रसारमाध्यमांतून ज्या गतीने येत आहेत, तो माराच इतका जोरदार आहे की, त्यांच्याकडे शांतपणे पाहायला बहुतेकांना जमत नाही. आणि नेमका त्याचाच फायदा उठवला जातो आहे. मोदी सरकारची रणनीती इतकी चाणाक्षपणाची आणि हुशारीची आहे की, त्याचा अजूनही भल्याभल्यांना अंदाज येताना दिसत नाही. किंबहुना, दुसरी शक्यता अशी आहे की, भारतातील पुरोगामी विचारवंत-लेखक यांनी हे सर्व अपरिहार्य आहे असे मानून त्याकडे ‘जे जे होईल ते ते पाहावे’ या न्यायाने शांत बसणेच पसंत केले असावे. या शक्यतांमुळे मागच्या आठवड्यात ‘पांचजन्य’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राचे माजी संपादक बलदेवभाई शर्मा यांची निवड ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या अध्यक्षपदी केली गेली, या बातमीकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. इंग्रजी प्रसारमाध्यमांत त्याच्या तुरळक बातम्या आल्या, पण मराठी प्रसारमाध्यमांनी तर त्याची फारशी दखलही घेतली नाही.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची कामगिरी खरोखरच प्रशंसेस आणि कौतुकास पात्र आहेत, यात काहीच शंका नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ‘इंडियन कौन्सिल ऑफ    हिस्टोरिकल रिसर्च’च्या अध्यक्षपदी वाय. सुदर्शन राव या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या इतिहासकाराची तर विश्राम जमादार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुयायाची ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या अध्यक्षपदी नेमणूक केली.
असाच प्रकार ‘नियोजन आयोगा’बाबतही झाला. त्याचा तर थेट ‘नीती आयोग’च करण्यात आला. हे असेच चालू राहिले तर लवकरच साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी, राष्ट्रीय अनुदान आयोग यांच्या अध्यक्ष वा संचालकपदीही हिंदुत्ववादी, विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निष्ठावान अनुयायांची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शर्मा, राव, जमादार यांच्या पात्रतेचा, क्षमतेचा ऊहापोह इंग्रजी प्रसारमाध्यमांत झाला आहे, होत आहे. राव यांच्या पात्रतेवर थेट बोट ठेवणारे लेख तर रामचंद्र गुहा यांच्यासारख्या आजच्या सर्वात विद्वान इतिहासकारानेच लिहिले होते. हिंदुत्ववादी लेखक-विचारवंतांना विरोध करण्याचे एकमेव कारण असे आहे की, हे लोक विचार, संशोधन, विश्लेषण आणि अभ्यास यांच्याऐवजी केवळ मिथके आणि रूढीप्रामाण्य यांचाच उदोउदो करतात. के. सुदर्शन राव यांनी त्यांची निवड झाल्यावर जातिव्यवस्थेविषयी जी मुक्ताफळे उधळली होती, ती गोष्ट फार जुनी नाही.
डाव्या विचारसरणीला प्रमाण मानणाऱ्या इतिहासकारांना भारतात महत्त्वाचे स्थान आहे, याचे कारण त्यांची मांडणी ही केवळ मार्क्स-लेनिन यांची विचारसरणी पुढे रेटते म्हणून नव्हे तर ते इतिहासाकडे शोषित, कामगार यांच्या बाजूने पाहण्याचे काम करतात म्हणून. तसा प्रकार हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लेखक-विचारवंतांच्या बाबतीत होताना दिसत नाही. कारण ते पुरस्कार करतात तो जातिव्यवस्थेचा, रूढीप्रामाण्य, मिथके आणि कर्मकांडे यांचा. ब्रिटिशांनी या देशाचे वाटोळे केले, हिंदूच या देशाचे खरे रहिवासी आहेत, जातिव्यवस्थेनेच या देशाची एकता टिकवून ठेवली, मुस्लिम-ख्रिश्चन हे परकीय आहेत, अशी शेंडाबुडखा नसलेली मिथके ठासून सांगण्याचे काम सगळे हिंदुत्ववादी लेखक-विचारवंत करत असतात. त्यांना नेहमी सत्ताधाऱ्यांचे स्तुतिपाठक म्हणून राहायला आवडते, आयुष्याचे जीवितकर्तव्य असल्यासारखे. गतानुगतिकतेचे टोकाचे प्रेम आणि आपल्या विचारांना विरोध करणाऱ्यांचा टोकाचा द्वेष, एवढाच कार्यक्रम हिंदुत्ववादी लेखक-विचारवंत राबवतात हा तर नेहमीचा अनुभव आहे.
थोडक्यात, सगळेच हिंदुत्ववादी हे ‘अरुण शौरी’ असतात. म्हणजे ते अभ्यास करतात पण फक्त स्वत:च्या सोयीपुरता, संशोधन करतात पण फक्त आपल्या फायद्याचे असेल तेवढ्यापुरतेच आणि लेखन करतात तेही आपल्याला आपला अजेंडा पुढे रेटता येईल यासाठी. मग संशोधनाच्या नावाखाली मागचे-पुढचे संदर्भ तोडून विधाने निवडायची, निष्कर्ष काढताना जेवढी म्हणून पूर्वग्रहदूषित टीका झालेली असेल तेवढ्याचाच विचार करायचा आणि आजच्या प्रश्नांसाठी मध्ययुगीन नीती-मूल्यांची उदाहरणे द्यायची, असा ‘अरुण शौरी’ पुरस्कृत आदर्श हा सर्वच हिंदुत्ववादी लेखक-विचारवंतांचा असतो.
हिंदुत्ववाद्यांमध्ये सगळेच उजवे असतात, ‘हिंदू डावे’ असा शब्दप्रयोग त्यांच्यातल्या कुणा-लेखक विचारवंतांविषयी वापरला जाताना दिसत नाही. ‘हिंदू डावे’ कधी काळी भारतात होते, असे म्हणतात. पण ते काळाच्या ओघात नामशेष झाले. महात्मा गांधी या हिंदु डाव्यांचे शिरोमणी होते. गांधीच्या हत्येनंतर गांधी आणि त्यांचे ‘हिंदू डावे’ समर्थकही अंतर्धान पावत गेले. आता परत त्या ‘हिंदू डाव्यां’चे पुनरुज्जीवन करण्याची नितांत निकडीची गरज निर्माण झालेली आहे. ‘हिंदू उजव्यां’ना ‘हिंदू डावे’ हाच चांगला पर्याय ठरू शकतो...निदान तूर्तास तरी.
 

Sunday, February 1, 2015

नवी आत्मकथा, नव्या व्यथा



'आऊटलुक' या इंग्रजीतील चर्चित साप्ताहिकाचे माजी मुख्य संपादक विनोद मेहता हे त्यांच्या काहीशा चमत्कारिक दृष्टिकोनामुळे भारतीय पत्रकारितेत बहुतेकांना परिचित आहेत. एका जागी स्थिर न राहता सतत नव्या ठिकाणी जाऊन ते वर्तमानपत्र चर्चेत आणायचे आणि मग तिथून पोबारा करायचा, असा लौकिक असलेल्या मेहता यांनी तब्बल १७ वर्षे 'आऊटलुक'चे संपादकपद भूषवले. केवळ एवढेच नव्हे तर या साप्ताहिकाला भारतातील आघाडीचे साप्ताहिक बनवले. आणि तरीही त्यातून बाहेर न पडता ते अजून याच ठिकाणी एडिटोरिअल चेअरमन या पदावर कार्यरत आहेत. म्हणजे मेहता एका जागी स्थिर होऊनही पुष्कळ वर्षे लोटली आहेत. त्यामुळे त्याची चर्चा करण्यात काहीच हशील नाही. ..तर सध्या चर्चा आहे त्यांच्या नव्या पुस्तकाची. 'एडिटर अनप्लग्ड : मीडिया, मॅग्नेट्स, नेताज अँड मी'ची. २०११ साली त्यांच्या आत्मकथनाचा पहिला भाग 'लखनौ बॉय' या नावाने प्रकाशित झाला होता. त्याचाच हा पुढचा भाग आहे. 'लखनौ बॉय'मुळे मेहतांचे काही नवे शत्रू निर्माण झाले होते. 'एडिटर अनप्लग्ड'मुळे त्यात आणखी काही नावांची भर पडेल. या पुस्तकात मेहतांनी ख्वाजा अहमद अब्बास, जॉनी वॉकर, सचिन तेंडुलकर, रस्किन बॉण्ड, खुशवंतसिंग आणि अरुंधती रॉय या त्यांना कौतुकास्पद वाटलेल्या सहा व्यक्तींची प्रत्येकी १२०० शब्दांची व्यक्तिचित्रे लिहिली आहेत. नेहरू-गांधी घराण्याविषयीही खास त्यांच्या पद्धतीने लिहिले आहे. नुकत्याच 'आऊटलुक'मधील डायरी या सदरात मेहतांनी 'इंदिरा आणि प्रियांका या दोघींनीही संकटात लोटणाऱ्या नवऱ्यांची निवड केली' असे विधान केले होते. आणि अर्थातच नरेंद्र मोदींविषयीही लिहिले आहेच. त्यांना कसे सोशल लाइफ नाही, ते कसे एकाधिकारवादी आहेत इत्यादी इत्यादी. टाइम्स नाऊ वाहिनीच्या अर्णब गोस्वामी यांच्याबद्दलही तिरकसपणे लिहिले आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयीही. मध्यमवर्ग आणि दिल्लीतील राजकारण यांच्याविषयीची मते आणि निरीक्षणेसुद्धा नोंदवली आहेत. तिरकस, उपहासपूर्ण मते, काही प्रमाणात टवाळकी आणि सेलेब्रिटी गॉसिप्स असलेला मेहतांच्या आत्मकथेचा हा दुसरा भागही काही प्रमाणात वादग्रस्त होण्याची शक्यता आहेच.

गज्वी पोचले इंग्रजीत!

प्रेमानंद गज्वी हे मराठीतील सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारे नाटककार आहेत. त्यांच्या 'घोटभर पाणी', 'किरवंत' आणि 'गांधी-आंबेडकर' या तिन्ही नाटकांनी- अगदी बिनचूक शब्दांत सांगायचे तर पहिल्या एकांकिकेने आणि नंतरच्या दोन नाटकांनी- मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ही तिन्ही नाटके रूपांतराच्या निमित्ताने इंग्रजीमध्ये दाखल झाली आहेत. त्या रंगभूमीवर ती प्रयोगक्षम ठरतात की नाही हे येत्या काळात कळेलच. 'घोटभर पाणी'चे मराठीमध्ये तीन हजार प्रयोग झाले. या एकांकिकेत अस्पृश्यतेच्या शापामुळे पाण्यापासून वंचित राहिलेल्याची वेदना मांडली आहे. त्यानिमित्ताने गज्वी यांनी भारतीय संस्कृतीतील दांभिकतेचे वाभाडे काढले आहेत. 'किरवंत' या नाटकाची प्रशंसा डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. या नाटकात ब्राह्मण 'किरवंत'ला (अंत्यविधीची क्रियाकर्मे करणारी व्यक्ती) कशा प्रकारची वागणूक देतो, याचे भेदक आणि वास्तव चित्रण केले आहे. 'जो ब्राह्मण समाज स्वत:च्याच समाजाला न्याय देऊ  शकत नाही, तो इतर समाजाला काय न्याय देणार आणि सन्मानाने वागवणार,' असा जळजळीत प्रश्न या नाटकातून गज्वी यांनी उपस्थित केला आहे. 'गांधी-आंबेडकर' हे नाटक म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील संघर्षांची मांडणी करते. १९३१ सालच्या पहिल्या गांधी-आंबेडकर भेटीने हे नाटक सुरू होते आणि गांधी हत्येनंतर आंबेडकरांच्या स्वगताने संपते. गांधी-आंबेडकर यांचे संबंध सुरुवातीपासून तणावाचेच राहिले. त्याविषयी त्यांच्या हयातीपासून बोलले जातेच आहे. हे नाटकही त्याचाच एक भाग म्हणून अवतरले.
'घोटभर पाणी'चा इंग्रजी अनुवाद शांता गोखले यांनी तर 'किरवंत' आणि 'गांधी-आंबेडकर' यांचा अनुवाद म. द. हातकणंगलेकर यांनी केला आहे. पहिल्या दोन्ही नाटकांत महाराष्ट्रीय समाजातील भेदक वास्तव तर तिसऱ्या नाटकांत हिंदू आणि दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन भारतीय समाजपुरुषांमधील संघर्ष रेखाटला आहे. मराठीमध्ये ही तिन्ही नाटके नावाजली गेली, वाखाणलीही गेली. महत्त्वाचीही मानली गेली. कारण महाराष्ट्रात त्यांना मोठा इतिहास आहे. तसे इंग्रजीत होईलच असे नाही.
द स्ट्रेंग्थ ऑफ अवर रिस्ट्स : प्रेमानंद गज्वी,
अनुवाद- शांता गोखले, म. द. हातकणंगलेकर,
नवयान पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली,
पाने : १५५, किंमत : २५० रुपये.

गुलज़ार बोलतात त्याची कविता होते

भारतीय मध्यमवर्गाचा ताळेबंद मांडणाऱ्या पवन वर्मा यांनी अलीकडे अनुवादकाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे आणि उर्दू-हिंदीतील लोकप्रिय गीतकार-कवी गुलज़ार यांची पुस्तके इंग्रजीत अनुवादित करण्यास सुरुवात केली आहे. गुलज़ार यांच्या 'सिलेक्टेड पोएम्स', 'निग्लेक्टेड पोएम्स' या दोन कवितासंग्रहानंतर 'ग्रीन पोएम्स' हा त्यांनी अनुवादित केलेला तिसरा संग्रह. दरम्यान 'हाफ अ रुपी' या नावाने गुलज़ार यांच्या निवडक कथांचाही अनुवाद केला आहे. वर्मा यांनी याआधी कैफ़ी आज़्‍ामी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचाही इंग्रजी अनुवाद केला आहे. त्यामुळे कवितांचा अनुवाद करायला ते सरावलेले आहेत, असं समजायला हरकत नाही. या संग्रहात गुलज़ार यांच्या निसर्गाविषयीच्या ५९ कविता आहेत. नदी, तळी, ओढे, पर्वत, बर्फ, पाऊस, ढग, आकाश, जमीन, हवा, झाडे यांच्याविषयीच्या या कविता निसर्गाविषयीची हळुवार आणि चैतन्यशील भावना उजागर करतात. माती, जमीन, पाणी याविषयी गुलज़ार यांचं आतडय़ाचं नातं आहे. निसर्गाला ते आपल्या अवतीभवतीची सर्वात चैतन्यशील आणि रसरशीत दुनिया मानतात. त्यामुळे त्याविषयी लिहिताना गुलज़ार आपली अक्षरे मोरपंखाच्या बोरूने लिहितात. या कविता म्हणजे जणू काही निसर्गातील विविध घटकांची स्वगतं आहेत, फक्त ती गुलज़ार यांच्या शब्दांतून उतरली आहेत. त्यामुळे आपलं म्हणणं सांगताना ती काव्यमय भाषेचा आणि लीनतेचा आधार घेतात. अतिशय प्रेमानं आपल्याशी हिजगूज करतात. त्यामुळे ही निसर्गसूक्तं आवाहनांनी भरलेली आहेत. त्यांच्या हाकांनी आपलं लक्ष वेधून घेतात.
गुलज़ार ज्याला स्पर्श करतील त्याची कविता होते. त्या कवितेला लय, नाद, स्वाद, रुची, गंध, सारं काही असतं. म्हणून ती समोरच्याला वेढून टाकते. या कविता वाचकाला नवी 'नजर' देतात, निसर्गाकडे पाहण्याची. त्याला अनुभवण्याची. त्याच्या जवळ जाण्याची. आणि त्याला आपल्यात सामावून घेण्याचीसुद्धा.
वर्मा यांनी इंग्रजी अनुवादाबरोबर त्यांचे हिंदी लिप्यंतर दिले आहे. त्यामुळे अनुवाद ताडून पाहण्याचीही आयतीच सोय झाली आहे.
ग्रीन पोएम्स : गुलज़ार, अनुवाद - पवन के. वर्मा,
 पेंग्विन बुक्स, गुरगाव,
 पाने : १३१, किंमत : २५० रुपये.



भारत नावाचं डम्पिंग ग्राउंड



भारतातील इंग्रजी प्रकाशन व्यवसाय भारतीय मध्यमवर्गाबरोबरच वाढतो आहे. त्यामुळे अमेरिकेतील मोठय़ा प्रकाशन संस्थाही भारतीय बाजारात पेठेत दाखल होऊ लागल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच अ‍ॅमेझॉन डॉट कॉमनं पुस्तक विक्री आणि इतर वस्तूंच्या ऑनलाइन विक्रीत उडी घेऊन फ्लिपकार्ट, इन्फिबीम, ईबे यांसारख्या काही कंपन्यांपुढे मोठं आव्हान उभं केलं आहे. ही स्पर्धा इतकी अटीतटीची होऊ पाहत आहे की, 'आम्ही आमची कंपनी कुठल्याही परिस्थितीत कुणालाही विकणार नाही,' असं सांगणारे फ्लिपकार्टचे संस्थापक प्रमुख सचिन-बिनी बन्सल आता बंगलुरूमधील Myntra या ऑनलाइन कंपनीबरोबर विलीनीकरणाच्या पवित्र्यात आहेत. असो. सांगायचा मुद्दा असा की, या पाश्र्वभूमीवर 'भारत हे अमेरिकन साहित्याचं डम्पिंग ग्राउंड होण्याची शक्यता आहे,' असं विधान ब्रिटिश लिटररी एजंट डेव्हिड गॉडविन यांनी नुकत्याच कोलकात्यात झालेल्या साहित्य महोत्सवामध्ये केलं आहे. गॉडविन ही प्रकाशनक्षेत्रातील अतिशय जाणकार आणि अभ्यासू व्यक्ती आहे. याशिवाय ते अरुंधती रॉय, विक्रम शेठ, अरविंद अडिगा, किरण देसाई, विल्यम डॅलरिम्पल, जीत थाईल या बुकर प्राइझपर्यंत पोचलेल्या वा त्यासाठी नामांकन मिळालेल्या लेखकांचे 'लिटररी एजंट' आहेत. गॉडविन यांनी पुढं म्हटलं आहे की, 'मोठय़ा प्रकाशन संस्था भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे पण त्यामुळे छोटय़ा प्रकाशन संस्था स्पर्धेतून बाहेर फेकल्या जात आहेत.' मोठय़ा प्रकाशन संस्थांकडे मोठं आर्थिक बळ, यंत्रणा आणि संसाधनं असल्यानं छोटय़ा आणि एकहाती चालणाऱ्या प्रकाशन संस्थांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संस्था प्रकाशन व्यवसायातल्या 'समांतर चळवळी'चे शिलेदार आहेत. त्या प्रवाहाबाहेर फेकल्या जाणं, हे भारतीय प्रकाशन व्यवसायासाठीच नव्हे तर चांगलं साहित्य वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठीच आपत्ती ठरू शकतं. मात्र या नव्या बाजाराचा अमेरिकन प्रकाशन संस्था मोठय़ा प्रमाणावर फायदा करून घेत आहेत. सध्या भारतीय बाजारात ज्या प्रकारचं पल्प फिक्शन दिसतं, ते बहुतांशी अमेरिकन तरी असतं किंवा त्याचं अनुकरण तरी. रॅण्डम हाऊससारख्या मोठय़ा प्रकाशन संस्था भारतीय बाजारपेठेत बेस्टसेलर ठरलेली वा ठरवली गेलेलीच पुस्तकं पाठवतात. याच प्रकाशन संस्थांची चांगली, दर्जेदार म्हणावी अशी पुस्तकं भारतीय पुस्तक विक्रेत्यांनी मागितली तर त्यांच्या मागणीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही वा ते गांभीर्यानं घेतलं जात नाही. बऱ्याचदा भारतात चांगली पुस्तकं विकत मिळत नाहीत, त्याचं कारणही हेच आहे. म्हणजे आपल्याला हवा तोच माल रेटत राहायचा, त्याचीच सवय लोकांना लावायची आणि रग्गड पैसा मिळवायचा, अशी सरळ सरळ व्यावसायिक रणनीती अमेरिकन प्रकाशन संस्थांची आहे.  आणि त्यात आपण फसतो आहोत… निव्वळ कचरा माथ्यावर मारून घेत आहोत.