Friday, January 20, 2012

सुदैवी संधीचे सोने करणा-या छायाचित्रकार

कोणताही पत्रकार हा त्याच्या काळाचा साक्षीदार असतो. वृत्तछायाचित्रकार तर आपल्या काळाला छायाचित्रांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे नोंदवून ठेवतो. एक हजार शब्दांचे काम एक छायाचित्र करते, असे म्हटले जातेच. गेल्या वर्षी 25 फेब्रुवारी ते 10 एप्रिल दरम्यान एनजीएमएमध्ये (मुंबई) भरलेल्या हुमाई व्यारावाला- अ रेट्रोस्पेक्टिव्हया प्रदर्शनातली छायाचित्रे पाहताना निदान काही मुंबईकरांनी तरी याचा पुन:प्रत्यय घेतला असेल. या प्रदर्शनात व्यारावाला यांची सर्व छायाचित्रे, निगेटिव्ह, कॅमेरे यांचा समावेश होता. पण दुर्दैवाने हे व्यारावाला यांचे शेवटचेच प्रदर्शन ठरले.
तसे पाहिले तर व्यारावाला या फार सुदैवी म्हणायला हव्यात. कारण 1930 साली त्यांची करिअर सुरू झाली, तर 1970 साली त्या निवृत्त झाल्या. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतात व्यारावाला यांच्या करिअरला सुरुवात झाली आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात ती बहरत गेली. भारताच्या इतिहासात 1945 ते 1960 हा काळ प्रचंड धामधुमीचा, संघर्षाचा आणि नवनिर्माणाचा होता. नेमक्या याच काळात व्यारावाला यांना फोटोग्राफी करायला मिळाली. ती त्यांनी मनापासून केली. त्यासाठी वेळकाळाचे बंधन मानले नाही. अचूक टायमिंग हा कुठल्याही छायाचित्रकारासाठी क्वेश्चन ऑफ प्रेस्टिजअसतो, याचे भान व्यारावाला यांनी सतत बाळगले. म्हणून त्यांचे काम आणि योगदान यापुढच्या काळातही उल्लेखनीय राहिले.
उण्यापुऱ्या चाळीस वर्षात व्यारावाला यांनी महात्मा गांधी, अब्दुल मौलाना आझाद, लाल बहादूर शास्त्री, सर्वपल्ली राधाकृष्णन, लॉर्ड माउंटबॅटन, पं. नेहरू, इंदिरा गांधी यांची कितीतरी छायाचित्रे आपल्या कॅमे-यात बंदिस्त केली. लाल किल्ल्यावरील पहिला प्रजासत्ताक दिन, १९३० सालचे गेट वे ऑफ इंडिया, ‘फोटो खींचना मना हैया पाटीच्या शेजारीच उभे राहिलेल्या पं. नेहरूंचे (1954) छायाचित्र अशी कितीतरी छायाचित्रे त्यांनी टिपली. पं. नेहरू यांचे वेगवेगळे मूड्स हा तर व्यारावाला यांचा आवडता विषय होता

व्यारावाला यांचा जन्म 9 डिसेंबर 1913 रोजी गुजरातमधील नवसारी येथील एका पारशी कुटुंबात झाला. माणेकशा या फोटोग्राफीचे वेड असलेल्या तरुणाच्या प्रेमात त्या पडल्या, तेव्हा त्या तेरा वर्षाच्या होत्या आणि जे.जे.मध्ये पेंटिंग शिकत होत्या. माणेकशा यांची फोटोग्राफी पाहून व्यारावाला यांनाही त्याचे वेड लागले. त्यांचे पहिले छायाचित्र बॉम्बे क्रॉनिकलमध्ये प्रसिद्ध झाले तेही पानभर आकारात.
नवऱ्याची कोणतीही मदत न घेता त्यांनी ते टिपले होते. त्या वेळी व्यारावाला यांना एका छायाचित्राचे एक रुपया मानधन मिळे. तीसुद्धा त्यावेळी मोठी रक्कम होती. कारण त्या काळी पेंटिंगमधून फारसे पैसे मिळत नसत. त्यामुळे व्यारावाला यांनी विचार केला की, छायाचित्रकार म्हणून आपल्याला बरे पैसे मिळतील. पण हे क्षेत्र तेव्हा पूर्णपणे नवे होते आणि भारतात तेव्हा एकही महिला या क्षेत्रात नव्हती. व्यारावाला यांच्या या निर्णयाने त्यांना भारतातील पहिली महिला वृत्तछायाचित्रकार बनवले आणि अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदारही ठरवले.
युद्धाच्या वेळेला द इलस्टट्रेट वीकली ऑफ इंडियाया साप्ताहिकाने व्यारावाला यांना युद्धकाळातल्या घडमोडींची छायाचित्रे पाठवण्याची असाइनमेंट दिली. त्यातून त्या या साप्ताहिकासाठी जवळजवळ पूर्णवेळ काम करू लागल्या1942 साली व्यारावाला पती-पत्नींना ब्रिटिश इन्फॉर्मेशन सव्‍‌र्हिसमध्ये नोकरी मिळाली. तोपर्यंत मुंबईतील त्यांची छायाचित्रे तशी सामान्य माणसांची होती, पण दिल्लीला गेल्यानंतर त्यात राजकीय नेते-घडामोडी यांची भर पडली. ‘ब्रिइसने त्यांना
फ्री लान्सर म्हणून काम करायलाही परवानगी दिली. तेव्हा त्यांनी ऑनलुकर’, ‘टाइमआणि लाइफया मासिकांसाठीही छायाचित्रे काढली.
व्यारावाला यांनी त्या काळच्या कुठल्याच सत्याग्रहात, सभा-मोर्चे यांच्यामध्ये भाग घेतला नाही. पण या सर्वाची छायाचित्रे मात्र त्यांनी सातत्याने टिपली. ती आज लाखमोलाची ठरली आहेत2006 साली सबीना गाडीहोक यांनी इंडिया इन फोकस : कॅमेरा क्रॉनिकल्स ऑफ हुमाई व्यारावालाया नावाने त्यांचे चरित्र लिहिले1970 साली व्यारावाला यांनी काम थांबवले आणि त्या बडोद्याला स्थायिक झाल्या. आदल्याच वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. काही वर्षे त्या आपल्या मुलासोबत राहिल्या. नंतर मुलाची बदली बडोद्याला झाली. तेव्हा त्याही बडोद्याला गेल्या. पण १९८९मध्ये कॅन्सरने त्यांच्या मुलाचे निधन झाले. तेव्हापासून त्या एकटय़ाच राहत होत्या. 1970 नंतर त्यांनी एकही छायाचित्र काढले नाही. टाटांनी नॅनोही एक लाख रुपयांची कार 2008 मध्ये लाँच करणार असल्याचे जाहीर केले, तेव्हा पहिल्या गाडीची नोंदणी व्यारावाला यांनी केली. त्या वेळी त्यांचे वय होते 95 वर्षे. तसे पाहिले तर व्यारावालांना त्या गाडीचा किती उपयोग झाला असता माहीत नाही, पण नव्या बदलांना साद देण्याची त्यांची स्वागतशीलता यातून प्रत्ययाला येते. एरवीही व्यारावाला फार साधेपणाने राहत. स्वत:ची सर्व कामे स्वत: करत. स्वत:च स्वत:चे कपडेही शिवत.
ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र झालेला भारत हा खरे तर व्यारावालाच काय पण त्यांच्या समकालीन असणा-या त्या वेळच्या सर्व छायाचित्रकारांसाठी इतिहासाच्या कॅनव्हाससारखा होता! त्यांनी टिपलेले प्रत्येक छायाचित्र लगोलग ऐतिहासिक दस्तावेज ठरत होते. वर्तमानाला इतक्या कमी वेळात इतिहासाचा साक्षीदार बनवण्याची संधी मिळालेल्या व्यारावाला सुदैवी म्हणायला हव्यात त्या या अर्थाने.

No comments:

Post a Comment