Monday, August 30, 2010

इथे चमत्कार नव्हे, माणसं घडतात!



‘व्यसनमुक्त समाजनिर्मिती हे आमचे ‘स्वप्न’ आहे,’ या ध्येयातून 29 ऑगस्ट 1986 रोजी पुण्यातील येरवडा भागात सुरू झालेलं ‘मुक्तांगण’हे व्यसन मुक्ती केंद्र आज रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. व्यसनमुक्तीच्या कामाची निराळी पद्धत राबवणा-या, पेशंटला केंद्रस्थानी मानणा-या या केंद्राच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा..

‘मुक्तांगण’ हे राज्यातलं पहिलंच व्यसन मुक्ती केंद्र. ते सुरू कसं झालं याची कहाणीही थोडीशी गंमतीशीर आहे. अनिल अवचट त्या वेळी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते, सामाजिक प्रश्नावर लिहीत होते; तर डॉ. सुनंदा (अनिता) अवचट येरवडा मेंटल हॉस्पीटलमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून काम करत होत्या. त्या वेळी व्यसनी व्यक्तीवर उपचार करण्याची खास अशी काही पद्धत नव्हती. उपचार म्हणजे त्याला सरळ मेंटल हॉस्पिटलला पाठवणे. तिथे काही उपचार नव्हते. ते फक्त झोपेच्या गोळ्या द्यायचे. थेरपी वगैरे काही नव्हती. तसे पेशंट येरवड्याच्या रुग्णालयात भरती व्हायचे. पण यांच्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार केले पाहिजेत, यांना इथं ठेवणं बरोबर नाही असं सुनंदा अवचटांना वाटत असे. दरम्यान त्यांच्या मैत्रिणीचा मुलगाच गर्दच्या विळख्यात सापडला. मग सुनंदाताईंनी त्याच्यावर घरीच उपचार सुरू केले. तो ब-यापैकी बाहेर आल्यावर अनिल अवचट त्याला फिरायला नेऊ लागले. त्यातून त्यांना या व्यसनाबाबत माहिती झाली.
तोवर त्यांना वाटायचं की, हे श्रीमंतांचं व्यसन आहे, आपल्याला काही देणंघेणं नाही. सामाजिक प्रश्न असेल तर आपण त्याकडे लिहिण्यासाठी बघू. पण गरीब लोकांमध्येच- कामगार, रिक्षा ड्रायव्हर, कचरा वेचणारे-यांच्यामध्येच हे व्यसन जास्त आहे हे समजल्यावर अवचटांनी त्यावर लिहायचं ठरवलं. आधी‘गर्द’लेखमाला प्रसिद्ध झाली. ती वाचून लोक त्यांच्याकडे जायला लागले. मग अवचट पती-पत्नी खात्री करून त्या पेशंटना ससूनकडे पाठवायचे. पण ससूनच्या लोकांनी एक-दोन दिवसांतच‘आमच्याकडे पाठवू नका’असं सांगितलं. मग करायचं काय? दरम्यान ‘गर्द’ पु. लं. नी वाचलं होतं. त्यानं ते खूप अस्वस्थही झाले होते. त्यांना ही हकिकत समजली. मग त्यांनी अवचट पती-पत्नीला बोलावून घेतलं. ते म्हणाले, ‘यांच्यासाठी तुम्ही काहीतरी सुरू करा. पैशाला आम्ही कमी पडू देणार नाही.’
येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉ. सुनंदा अवचटांकडे अल्कोहोलिक पेशंट यायचे. तेव्हा सुनंदाताईंना वाटायचं की, या लोकांना इथं ट्रीटमेंट देणं काही बरोबर नाही. कारण एक दारूचं व्यसन सोडलं तर ते तसे नॉर्मल असायचे. परंतु त्यांच्यासाठी दुसरी कुठलीच सोय उपलब्ध नव्हती.
पु. लं. च्या आश्वासनानं सुनंदाताईंना हुरूप आला. मेंटल हॉस्पिटलच्या आवारात एक वापरात नसलेली इमारत होती. तिथे ‘मुक्तांगण’ सुरू करायचं ठरलं. मग सरकारी परवानग्या वगैरे सुरू झाल्या. सरकारने ब-याच अटी लादल्या, पण एकदाची परवानगी दिली अन् ‘मुक्तांगण’ सुरू झालं.
सुनंदाताई सायकॅट्रिस्ट असल्या तरी व्यसन मुक्ती केंद्र चालवण्याचा त्यांच्याकडे कुठलाच अनुभव नव्हता आणि अशा प्रकारच्या कामाची त्यांना माहितीही नव्हती. त्यावर त्या म्हणायच्या, ‘गरज आहे, करायचं. आपल्याला जे ज्ञान नाही ते पेशंटकडून शिकायचं.’आणि खरोखरच पेशंटकडून त्या प्रत्येक गोष्ट शिकत गेल्या. त्या येणा-या पेशंटला विचारात, ‘तुझ्यासाठी काय झालं असता तुझं व्यसन सुटेल?’ त्यांचं हे शिकणं कधी थांबलं नाही. आपल्या पेशंटविषयी कमालीची आत्मीयता आणि त्याला विश्वासात घेणं हा त्यांचा मूलमंत्र होता. त्याविषयी अनिल अवचटांनी एका लेखात म्हटले आहे, ‘‘एक उद्योगपती त्यांच्या अ‍ॅडिक्ट मुलाला अ‍ॅडमिट करायला आले. ते सुनंदाला सांगू लागले, ‘याला हे सांगा, ते सांगा.’ सुनंदा त्यांना म्हणाली,‘त्याला काय सांगायचं ते मला कळतं, मी जेव्हा तुम्हाला काही विचारेन, तेव्हा तुम्ही सांगा.’ ते चमकलेच. त्यांच्या आक्रमकतेला असं कुणी अडवलं नव्हतं; पण हे ऐकणारा तिचा पेशंट मात्र खूश झाला, की तो सुनंदाचा भक्तच झाला. सुनंदाला कुठल्याही उच्च पदस्थाचं कधी दडपण येत नसे. एकदा एक खासदार बाई त्यांच्या मुलाला दाखल करायला आल्या. बरोबर इथल्या अ‍ॅडिशनल कमिशनरना घेऊन आल्या. त्या बोलत सुटल्या. सुनंदानं त्यांना थांबवले. म्हणाली, ‘हे तुम्ही आधी सांगितलं आहे. काही नवीन असलं तर सांगा.’ त्या एकदम थांबल्याच. नंतर सावरून शेजारच्या कमिशनरना म्हणाल्या, ‘बघा, आमचं राजकारणी लोकांचं असंच असतं. बोलतच राहतो; पण कोणी अडवत नाही. या बाईंनी हे केलं नसतं, तर समजलं नसतं.’ तिच्यामध्ये गरीब-श्रीमंत असाही कधी वागण्यात फरक पडत नसे. ज्याला कोणी नाही त्याला तर ती अधिक जवळ करीत असे.’’
एक पेशंट दहा-बारा वेळा अ‍ॅडमिट झाले. नंतरनंतर त्याला ‘मुक्तांगण’मध्ये अ‍ॅडमिट करायला घरचे वैतागायचे. पण सुनंदाताई मात्र शांत असायच्या. त्या म्हणायच्या, ‘तो दमतोय का मी दमतेय ते मी बघणार. तोपर्यंत मी त्याला उपचार देणार.’ शेवटी त्या पेशंटने हार मानली. नंतर तो अतिशय चांगला राहिला. या उलट एखादा पेशंट परत पिऊन यायचा, तेव्हा त्या त्याला म्हणायच्या, ‘हरकत नाही. आपलं मागच्या वेळेला काय चर्चा करायचं राहिलंय. आपण परत चर्चा करू. ही तुझी पहिलीच अ‍ॅडमिशन आहे, असं समजू.’ हे लोक चुकताहेत, वाईट वागताहेत या दृष्टीनं त्यांनी कधी पेशंटकडे पाहिलं नाही.
सुनंदाताईंनी एक उपचाराची पद्धत शोधून काढली, ती फॉलो करणारा स्टाफ तयार केला. तोही नव्वद टक्के ‘मुक्तांगण’मध्ये व्यसनमुक्त झालेल्या लोकांमधूनच. शिक्षण कमी असलं तरी ती इथं आडकाठी ठरत नाही. कामावर निष्ठा आणि निष्ठेनं काम हाच प्राधान्यक्रम मानला जातो. आता सुनंदाताई नाहीत, तरीही ‘मुक्तांगण’चे काम याच पद्धतीने चालले आहे. त्याविषयी अनिल अवचट म्हणतात, ‘‘आम्हाला फक्त ‘मुक्तांगण’ चालवायचं होतं. लोक म्हणत होते, तुमचं सेंटर बंद पडणार. कारण डॉक्टरच्या नावावर दवाखाने चालतात. हासुद्धा सुनंदाचा एक प्रकारे दवाखाना होता. पण तसं काही झालं नाही. तिच्या काळात पेशंटला जी आत्मीयता मिळायची, जो अनुभव मिळायचा तसाच आताही मिळेल अशा जिद्दीनं आम्ही ‘मुक्तांगण’ चालवलं. त्यामुळे अनेक पेशंट सांगतात, ‘आम्हाला जावंसं वाटत नाही.’ ते येतात तेव्हा त्यांना इथं थांबायचं नसतं. ते पळून जायचे प्रयत्न करतात. खूप आरडाओरडा करतात. ते एका आठवड्यानंतर शांत होताना आम्ही पाहतो. जाताना त्यांचा पाय निघत नाही, याचा अर्थ सुनंदानं घालून दिलेला रस्ता नीट आहे.’’
1997 साली डॉ. सुनंदा अवचटांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यानंतर ‘मुक्तांगण’च्या ट्रस्टींनी मुक्ता पुणतांबेकर यांच्यावर उपसंचालक म्हणून जबाबदारी सोपवली. मुक्ताताई सांगतात, ‘आईबरोबर मला चार वर्षे काम करायला मिळालं. सुरुवातीचे एक-दोन महिने तर मी फक्त तिच्या रूममध्ये बसून ती रुग्णांशी कसं बोलते, कसं वागतं हे शिकू लागले. मला तिचा काम करतानाचा उत्साह बघायला खूप आवडायचं, ती आजारी असली तरी. आमच्याकडे जे रुग्ण मित्र येतात. त्या प्रत्येकाला एकच गोष्ट खूप वेळा सांगायला लागते. आई पहिल्या पेशंटशी ज्या उत्साहाने बोलायची त्याच उत्साहाने ती शेवटच्या पेशंटशीही बोलायची. ती याबाबतीत दमायची नाही. मी तिला एकदा विचारलं, ‘तुला कसा एवढा उत्साह?’ तेव्हा ती म्हणाली, ‘तो माणूस हे पहिल्यांदाच ऐकतोय याचं भान मला ठेवावं लागतं.’ आईच्या अशा छोट्या छोट्या गोष्टींतून मी खूप शिकत गेले.’’
‘मी कधीच लीडर नव्हते. आय वाज ऑलवेज फॉलोअर. पण ती लीडरशिप माझ्यावर पडली.’ असं मुक्ताताई म्हणत असल्या तरी ही लीडरशिप त्या उत्तम प्रकारे निभावत आहेत.
2000 साली ‘मुक्तांगण’ येरवडय़ाच्या जागेतून प्रतीकनगरातल्या स्वत:च्या स्वतंत्र वास्तूत गेलं. सध्या ‘मुक्तांगण’मध्ये एका वेळी 120च्या आसपास रुग्ण असतात. त्यातील सत्तर टक्के दारूचे असतात. पूर्वी ब्राऊन शुगरचे 80 टक्के आणि दारूचे 20 टक्के असायचे. आता ते उलट झालं आहे. सध्या मेडिसिनल अ‍ॅब्यूजचं प्रमाण खूप वाढतंय. औषधांचा दुरुपयोग केला जातो. हे प्रमाण बायकांमध्येही वाढतंय. व्हाइटनर आणि इंटरनेटचेही ‘व्यसनी’ असतात. या वर्षात मुक्ताताईंनी इंटरनेटचे व्यसन असलेल्या तिघांवर उपचार केले. फक्त जुगाराचे व्यसन असलेले पेशंट येतात; पण यातल्या 90 टक्के लोकांना निकोटीनचंही व्यसन असतं.
ज्याचा त्या लोकांना अजिबात सिरिअसनेस वाटत नाही.
आतापर्यंत ‘मुक्तांगण’ने 18,500 पेशंटवर उपचार केले आहेत. ‘मुक्तांगण’कडून प्रेरणा घेऊन दुसरीकडे सुरू झालेलीही काही व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. नागपूरला ‘मुक्तांगण’चा पूर्वीचा एक पेशंटच केंद्र चालवतो आहे, महेश फडणीस हेही ठाण्यानजीक, कळवा इथं केंद्र चालवत आहेत. शिवाय अशा प्रकारचे काम जे करू इच्छितात, त्यांना प्रशिक्षण देण्याचंही काम ‘मुक्तांगण’मध्ये केलं जातं. महाराष्ट्राखेरीज छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात या राज्यांतल्या 92 केंद्रांना असं प्रशिक्षण देणारी संस्था, म्हणूनही ‘मुक्तांगण’ कार्यरत आहे.
‘मुक्तांगण’चा 18,500 हा आकडा महाराष्ट्राच्या तुलनेत लहान असला तरी एका संस्थेसाठी तो खूप मोठा आणि आश्वासक आहे. आजकाल व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. अ‍ॅडिक्ट असणा-यांची मोठी फौज तयार होते आहे.‘मुक्तांगण’त्यातल्या काहींनाच दुरुस्त करू शकते. अनिल अवचटांच्या भाषेत सांगायचं तर ‘हे गणित कायमच विसंगत दिसणार. या परिस्थितीत आम्ही काय करू शकतो? जो माणूस अडकला आहे, त्याला मदत करणं हे आमचं काम आहे.’ नुसतं कामच नाही तर स्वप्न आणि ध्येयही. ‘मुक्तांगण’ सुरू झाले तेच मुळी ‘व्यसन मुक्त समाज निर्मिती हे आमचे ‘स्वप्न’ आहे’ या ध्येयातून. गेल्या पंचवीस वर्षातली ‘मुक्तांगण’ची त्या वाटेवरील कामगिरी कौतुकास्पद म्हणावी अशीच आहे।
.........................................................................................................................................
महिलांसाठी ‘निशिगंध’
अलीकडच्या काळात महिलांमध्येही व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन ‘मुक्तांगण’ने जानेवारी 2009मध्ये खास अशा महिलांसाठी ‘निशिगंध’ हा वेगळा विभाग सुरू केला. या विभागात एका वेळी आठ-नऊ महिला उपचारासाठी अ‍ॅडमिट होतात. त्याविषयी मुक्ताताई सांगतात, ‘‘एक गोष्ट चांगली की, बायकांचा रिकव्हरी रेट जास्त चांगला आहे. तो जवळपास 85 टक्के दिसतो.’ मात्र बायका सुरुवातीला जास्त त्रास देतात, खूप आरडाओरडा करतात, सारखं रडत राहतात.. असाही अनुभव आहे. पण आठवडा झाला, त्या नीट सेट झाल्या की अगदी भरभरून प्रतिसाद देतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपला असा समज असतो की, व्यसनाधीनतेमध्ये एकतर झोपडपट्टीतल्या किंवा श्रीमंतच बायका असतात. ‘मुक्तांगण’मध्ये मात्र अगदी टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणीही पाहायला मिळतात. त्याखालोखाल कॉल सेंटर, आयटी क्षेत्रातल्या महिलांचं प्रमाण वाढतं आहे. विशेष म्हणजे ज्या स्त्रिया ‘निशिगंध’मध्ये काऊन्सिलर म्हणून काम करतात, त्यांचे नवरे आधी व्यसनाधीन होते. त्यांचा ‘मुक्तांगण’मध्ये ‘सहचरी’ नावाचा ग्रूप होता. त्यातल्याच काही महिला ट्रेनिंग घेऊन आता ‘निशिगंध’मध्ये काम करतात

Monday, August 23, 2010

जगण्या-लढण्यातली शहाणीव



नारायण सुर्वे यांनी राजकीय विचारांशी बांधिलकी कधी नाकारली नाही। पण त्या विचारधारेशी निव्वळ बांधलेली त्यांची कविता कधीच राहिली नाही. सुर्व्यांनी युटोपियावर विश्वास न ठेवता, त्या प्रेरणेसाठी लढणा-यांवर विश्वास ठेवला. स्वत:च्या मर्यादा ओलांडून विश्वमानवाला पाहणारी शहाणीव बहिणाबाई चौधरींप्रमाणे सुर्वेच्याही कवितेत होती. माणसांना समपातळीवरून पाहणा-या या कवीनं पुढारपणाच्या ऊर्मी नेहमी नाकारल्या, त्याही बहुधा याच शहाणिवेतून.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जॉर्ज ऑर्वेल या जगप्रसिद्ध लेखकानं ‘व्हाय आय राइट’ असा लेख 1946 साली लिहिला आहे. त्यात लेखक का लिहितो त्याची आर्वेल यांनी चार कारणे सांगितली आहेत. ती अशी Sheer egoism, Aesthetic enthusiasm, Historical impulse and Political purpose.राजकीय दृष्टिकोन म्हटलं की बहुतेक मराठी लेखकांच्या कपाळावर आठय़ा पडतात. लेखकाला राजकीय भूमिका/निष्ठा नसते, नसावी असा युक्तिवाद ते करत असतात. अशा लोकांसाठी आर्वेल यांनी ‘राजकीय दृष्टिकोना’ची फोड करताना म्हटले आहे, ''Using the word ‘political’ in the widest possible sense. Desire to push the world in a certain direction, to alter other peoples’ idea of the kind of society that they should strive after. Once again, no book is genuinely free from political bias. The opinion that art should have nothing to do with politics is itself a political attitude.''
नारायण सुर्वे या बाबतीत मात्र जॉर्ज आर्वेलच्या वंशाचे म्हटले पाहिजेत. कारण त्यांचे लेखनही ‘राजकीय दृष्टिकोन’ व्यक्त करणारे आहे. त्यांनी लिहिले आहे,‘‘सर्व माणसांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी लेखन करतो. व्यक्तिगत जीवनापासून तो सर्व समष्टीपर्यंतचा आलेख मला काढायचा आहे. माणसातले सौंदर्य व त्याच्या बावन्न कला मला चित्रित करायच्या असतात. मी चित्रित केलेला माणूस पराभूत किंवा क्षणभर निराश जरी वाटला तरी तो पुन्हा नव्या संघर्षातही उभा राहणारा, ताठ पोलादी मानेचा आहे. पराभव हा मानवी इतिहासाचा एक भाग असला तरी प्रगतीचाही तो मोठा वाटेकरी आहे हे विसरता येत नाही. माणसातले केवळ हरलेपण दाखवण्यापेक्षा त्याचे लढलेपण दाखवणे मला मोलाचे वाटते ते याचसाठी. माझे लेखनसुद्धा याचसाठी असते.’’
सुर्वे यांच्या कवितेने मराठी कवितेत एक नवे युग सुरू केले ते या अर्थाने. लढणा-या सामान्य माणसाचा पराक्रम त्यांनी महत्त्वाचा मानला. कारण प्रत्यक्षात हीच माणसं इतिहास घडवणारी असतात. त्यांचं योगदान सुव्र्याच्या कवितेचा आत्मा झाला. कुणाही लेखकाचा जगण्याचा अनुभव, त्याचं थिंकिंग एखाद-दुस-या पुस्तकात येऊन जातं, त्यामुळे त्याची तेवढीच पुस्तकं चांगली होतात. अगदी जागतिक लेखकांनाही हा नियम लावता येईल. नारायण सुर्वे यांना यापैकी कुठल्याच मर्यादा पडल्या नाहीत. कारण त्यांनी आयुष्यभर आपल्या जगण्याच्या, अनुभवांच्या पलीकडे फारसं काही लिहिलं नाही. त्यांनी मुळात लिहिलंच फार कमी. गेल्या दहा-पंधरा वर्षात तर एकही कविता लिहिली नाही. त्यांच्या म्हातारपणाचा फायदा घेऊन काहींनी त्यांच्याकडून लेख लिहून घेतले, तर काहींनी त्यांच्या एरवी पुस्तकरूपात आले नसते अशा लेखनाची पुस्तकं करायचा प्रयत्न केला. तरीही, खूप कमी लिहून साहित्यिक म्हणून किती मानाचा धनी होता येतं, याचं सुर्वे हे उत्तम उदाहरण आहे.

खरा प्रतिभावंत
सुर्व्यांना ख-या अर्थानं आणि पुरेशा गांभीर्यानं ‘प्रतिभावंत’ म्हणता येईल। मराठीत ‘विचारवंत’ या शब्दाची अलीकडच्या काळात जी फरफट झाली आहे, तीच ‘प्रतिभावंत’ या शब्दाचीही झाली आहे. आणि ती ज्यांना हे दोन्ही शब्द नीट समजलेले नाहीत त्यांनी केली आहे. इतरांच्या विचारांची पुनर्माडणी करणा-यांना विचारवंत आणि कल्पनांच्या बेगडी महिरपी रंगवणा-यांना प्रतिभावंत म्हटले जाते! सुर्वे विचारवंत नव्हते पण ते अस्सल प्रतिभावंत होते. एका अभागी आईनं रस्त्यावर टाकून दिलेलं पोर गंगाराम नावाच्या गिरणीकामगारानं काही काळ सांभाळलं खरं, पण त्यांनाही मर्यादा असल्यानं सुर्वे पुन्हा अनाथ झाले, अनाथ म्हणून मोठे झाले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत, शाळेत शिपाई ते शिक्षक असा प्रवास. पण कविता मात्र त्या वेळच्या साहित्याला सुभेदारी मानणा-यांना इशारा देणारी. अवघ्या मानवी विश्वाला कवेत घेऊ पाहणारी, कष्टक-यांसाठी पसायदान मागणारी. अशी शहाणीव असायला प्रतिभाच लागते. जगण्याच्या बाबतीत एका मर्यादेपर्यंत सुर्व्यांचं कबीराशी नातं होतं, तर कवितेच्या बाबतीत बहिणाबाई चौधरींशी. जगण्याचा सच्चा अनुभव गाठीला असेल, मनगटात बळ असेल आणि सोबतीला प्रतिभा असेल तर काय करता येऊ शकतं, याची बहिणाबाई आणि सुर्वे ही दोन उत्कृष्ट उदाहरणं आहेत.
बाजारीकरणापासून दूर
सुव्र्याना आपली कविता नेमकी कशी आहे याचं पुरेपूर भान होतं। चांगल्या जगण्याचा युटोपिया करत राहणं ही जगण्याची प्रेरणा असते. सुव्र्यानी या युटोपियावर विश्वास न ठेवता, त्या प्रेरणेसाठी लढणाऱ्यांवर विश्वास ठेवला. माणसांवर थेट समपातळीवरला विश्वास ठेवणारी ही कविता असल्यामुळे त्यांनी या ‘लोकां’चं पुढारपण केलं नाही॥ तसल्या पुढारपणासाठी कवितेतून क्रांतीच्याही फाजील अपेक्षा बाळगल्या नाहीतच; पण लोकरंजन हाही उद्देश मानला नाही. थोडक्यात त्यांनी कवितेचं बाजारीकरण होऊ दिलं नाही. ‘कविता बरी आहे; पण कवीला छंदशास्त्राचं ज्ञान नाही,’ असं वसंत दावतरांनी सुर्वेबद्दल तीन दशकांपूर्वी म्हटलं होतं. मानवी जगणं प्रत्यक्षात छंदोमय नसतं, याची जाणीव त्या काळीही कविताव्यवहाराशी जोडलेल्या फार थोडय़ा मंडळींना होती. आपल्या कवितांना कुणाही संगीतकाराला चांगल्या चाली लावता आल्या नाही तरी उत्तम पण त्यासाठी मी शब्द मोडून देणार नाही, असे ठणकावून सांगणारे सुर्वे हे बहुधा मराठीतले एकमेव कवी असावेत. (हृदयनाथ मंगेशकरांना तर त्यांनी पुन्हा पुन्हा मागूनही कविता दिल्या नाहीत ही तर फारच थोर गोष्ट म्हटली पाहिजे!)
कवितासंग्रहांचं वेगळेपण
सुर्व्यांचे चारही संग्रह व्यवस्थेवर भाष्य करणारे आहेत. त्यांची भाषा अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. सुव्र्याचा ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ हा पहिला कवितासंग्रह 1962 साली प्रकाशित झाला. इथल्या प्रस्थापितांविरुद्ध दिलेला तो एल्गार होता. स्वत:च्या आगमनाची अतिशय रास्त आणि निर्धोक आत्मविश्वासानं ललकारी देणारी सुर्व्यांची कविता वेगळी ठरली ती इथेच. त्यानंतरच्या ‘माझे विद्यापीठ’चं शीर्षक मॅक्सिम गॉर्कीच्या ‘माय युनिव्‍‌र्हसिटीज’शी साधर्म्य सांगणारं आहे. सुर्व्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तोवर गॉर्की वाचला नव्हता हे खरे असले तरी सुव्र्याच्या विद्यापीठाची जातकुळी नेमकी कोणती आहे हे यातून स्पष्ट होते. तर ‘जाहीरनामा’ हा सरळसरळ मार्क्‍स-एंजल्स यांच्या ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’ याच्याशी नातं सांगणारा होता. ‘सनद’चे शीर्षक सुर्वे यांच्या अजेंडय़ाला मान्यता मिळाल्याचे द्योतक आहे. ‘नव्या माणसाचे आगमन’ हा शेवटचा संग्रह लेनिनच्या तत्त्वज्ञानाशी, आम्हाला कुठल्या प्रकारचा नवा माणूस घडवायचा आहे, याच्याशी जुळणारा आहे.
या तुलनेमुळे त्यांच्या कवितेला कमीपणा येण्याचे काहीच कारण नाही. उलट सुव्र्याचे हे मोठेपण की, त्यांनी आपली बांधिलकी कधी दडवली नाही. बांधिलकी हा अनेक लेखक-कवींसाठी अडथळा ठरतो, पण सुव्र्याची कविता त्यापल्याड जाणारी आहे. म्हणूनच तर ती सर्व थरांतल्या, सर्व वयोगटांतल्या, सर्व समाजगटातल्यांपर्यंत पोहोचू शकली, त्यांची मान्यता मिळवू शकली. अशी सर्वमान्यता मिळवणारे बहुधा सुर्वे शेवटचेच ठरावेत.
सुर्व्यांचं लिहिणं हीच त्यांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा होती. लिहिणं हे जगण्याशी किती सम साधून असतं, याचं उदाहरण म्हणूनही सुर्व्यांचं नाव घ्यावं लागेल. त्यामुळेच सुर्व्यांच्या प्रत्येक कवितेत त्यांचं थोडं थोडं आत्मचरित्र आलं आहे. सुर्व्यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही कारण ते त्यांच्या कवितेत आलं होतं. आणि ते लिहिलं असतं तर ‘बाळगलेला’ हे त्याचं नाव त्यांनी ठरवलं होतं. कोल्हापूरच्या रिमांड होममधल्या मुलांशी बोलतना सुर्वे म्हणाले होते,‘मी बाळगलेला पोर होतो, तुम्ही सांभाळलेली मुलं आहात.’ सुर्व्यांनी आपल्या अनाथपणाचं कधी भांडवल केलं नाही. लेखन ही अतिशय गंभीरपणे करायची गोष्ट आहे असे मानणारे, जाणणारे आणि जगणारे सुर्वे होते. म्हणूनच त्यांच्या कवितेत जगण्याची उमेद आणि ऊर्जा दिसते. साहित्याच्या श्रेष्ठतेची मानकं अशा गोष्टींमुळेच तयार होत असतात. समूहाची भाषा बोलणारे लेखन नेहमीच क्लासिक सदरात मोडत आले आहे. सुर्व्यांच्या लेखनाचाही तोच दर्जा आहे.

Wednesday, August 4, 2010

‘हिंदू’ -चर्चा,गप्पा आणि मतमतांतरे


सध्या मराठी वाचकांमध्ये एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे नेमाडय़ांच्या ‘हिंदू’ची। जो तो ‘हिंदू’ वाचतोय आणि रोज आपल्या मित्राला ‘माझी अमूक पानं आता वाचून झाली, तुझी किती पानं वाचून झालीत?’ मराठी वाचकांना चार भागातली कादंबरी वाचण्याचा सराव नाही. त्यात ‘हिंदू’चा पहिलाच भाग प्रकाशित झालाय. त्यामुळे या कादंबरीबद्दल जाम उत्सूकता आहे. ती अशीच चवथ्या भागापर्यंत टिकून राहिली तर मग ‘कोसला’, चांगदेव चतुष्टय आणि ‘हिंदू’ची तुलनात्मक चर्चा रंगणार असं विचारतोय.
पण सध्या मात्र पहिल्या भागाचीच चर्चा रंगतेय। काही हार्ड कोअर वाचकांनी मात्र सलग दोन-तीन दिवसांत कादंबरी वाचून संपवली आहे, तर काही मात्र थांबून थांबून वाचताहेत. ‘पुरवून पुरवून वाचन’ असा हा काहीसा प्रकार आहे. नेमाडय़ांचे हार्ड कोअर चाहते मात्र रोजची पानं वाचून झाल्यावर आपल्या मित्रांशी फार भारावून जाऊंन चर्चा करताहेत. आणि आपल्याला म्हणण्याला आता नेमाडय़ांच्या मांडणीचा आधार मिळालाय, या संतोषानं समाधान पावताहेत.
तर दुसरीकडे नेमाडय़ांनी ‘हिंदू’ ‘ज्ञानपीठ’ समोर ठेवून लिहिली आहे, ‘कोसला’ला साहित्य अकादेमी देता आले नाही म्हणून यू. आर. अनंतमूर्तीनी ‘टीकास्वयंवर’ला दिले. आता नेमाडय़ांचीही दिल्लीत वट वाढली असून ‘ज्ञानपीठ’ मिळवणं त्यांच्यासाठी काही कठीण काम नाही. ‘हिंदू’ लिहून त्यांनी त्याची सोय करून ठेवली आहे, असंही बोललं जात आहे.
तिसरीकडे ‘हिंदू’ची रचना एवढी मोठी करून नेमाडय़ांनी मराठी वाचकांची मोठी गोची करून ठेवली आहे. कारण या कादंबरीचे चारही भाग प्रकाशित होईपर्यंत त्याविषयी ठोसपणे भाष्य करता येणार नाही, विश्लेषणही करता येत नाही. त्यामुळे चवथा भाग येईपर्यंत थांबणं भाग आहे. आणि नेमाडय़ांच्या अलीकडच्या मुलाखती पाहता ते ही कादंबरी पूर्ण करतील असं वाटत नाही. चौथा भाग लिहायला त्यांनी आणखी २०-२५ वर्षे घेतली तर काय घ्या? आपण त्यांच्यावर दबावही आणू शकत नाही. एकंदर नेमाडय़ांनी त्यांच्या चाहत्यांना टांगणीवर ठेवलं आहे आणि त्यांच्या विरोधकांची सॉलिड गोची करून ठेवली आहे, अशीही चर्चा रंगत आहे.
चौथा जो वर्ग आहे, त्याचं म्हणणं आहे की, नेमाडय़ांनी ‘हिंदू’च्या पहिल्या भागात जी ऐतिहासिक दृष्टीने अनेक विधाने केली आहेत, त्यांचे पुरावे कादंबरीत कुठे दिले नाहीत. कादंबरीत पुरावे, संदर्भ देणं शक्य नसतं हे खरं पण त्यांचा आधार तर त्यांना स्पष्ट करता आला असता. तेही त्यांनी कुठं केलं नाही, तेव्हा त्यावर विश्वास कसा ठेवायचा? नेमाडे सतत काहीतरी तिरपागडं बघत संभ्रमात टाकणारी विधानं करत असतात. तसाच प्रयत्न त्यांनी या कादंबरीतही केला आहे. शिवाय पुरावे मागणाऱ्यांना ‘माझ्या वर्गात तासाला येऊन बसा म्हणजे स्पष्टीकरण देतो’, असं तिरपागडं उत्तर देतात. आता त्यांचा हा वर्ग भरतो कुठं आणि त्यात ते शिकवतात काय, हे पाहत बसण्याएवढा वेळ कुणाकडे आहे?
पाचवा वर्ग मात्र ‘हिंदू’चं वाचन झपाटय़ाने संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी मोठी आशा आहे की, ‘हिंदू’त अनेक गडबडी असणार आणि आपल्याला त्या आधारे नेमाडय़ांवर शरसंधान करता येईल. त्यामुळे ते अगदी बाह्या सावरून कादंबरी वाचताहेत.
तर एकंदर मराठी साहित्यातलं वातावरण असं ‘हिंदू’मय झालेलं आहे.

Monday, August 2, 2010

राम पटवर्धन उवाच....


‘सत्यकथा’ हे मासिक बंद पडून आता जवळपास तीस वर्षे होत आलीत. पण अजूनही चांगल्या मासिकांचा विषय निघाला की, ‘सत्यकथा’चा हमखास उल्लेख केला जातो. आणि ‘सत्यकथे’चा उल्लेख आला की, श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धनांचीच नावं आठवतात. ‘सत्यकथे’ला या दोघा संपादकांनी लौकिक मिळवून दिला, तो मर्मज्ञ दृष्टी आणि साहित्यावरच्या अपार प्रेमाच्या बळावर. त्या आठवणी पुन्हा जागवण्याचा हा प्रयत्न, राम पटवर्धन यांच्याबरोबर...

‘‘क-हाडच्या कृष्णाकाठाविषयीची कथा दीपा गोवारीकरनं लिहिली होती. ती वाचल्यावर मी दीपाबाईंना म्हणालो, ‘‘हे कुठल्या ऋतूत चाललं आहे?’ त्या म्हणाल्या, ‘नवरात्र.’ मी म्हटलं, ‘अच्छा. बघू या.’ मग सरळ पंचांग काढलं. ते पाहिल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘हे अतिशय गारव्याचे दिवस आहेत. तुमच्या कथेत तर हा गारवा कुठे आलेलाच नाही!’
‘‘आशा बगे यांनी एकदा ‘सत्यकथे’कडं कथा पाठवली. त्या कथेला त्यांनी ‘गादी’ हे नाव दिलं होतं. कथा वाचल्यावर मला वाटलं की, या नावातून अर्थबोधच होत नाही. कथेतला काळ मध्ययुगीन होता. त्यातल्या कीर्तनांचं, त्यातल्या रागाचं फार सुंदर वर्णन त्यांनी केलं होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की, हा संध्याकाळचा राग आहे. आपण या कथेला ‘मारवा’ असं नाव देऊ. कथा प्रकाशित झाल्यावर हे नाव खूप क्लिक झालं.
‘‘थोडक्यात मी कलाकृती घेऊन बसतो. त्यात कुठलाही अहंकार नसतो. ते सगळं लेखक आणि माझ्या एक्सचेंजमधून होत असतं. या लेखकाचा कोअर अनुभव काय? त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का? की पुरेसं मिळत नाहीये? त्या दृष्टीनं मी संबंध कथा वा लेख वाचत असे. संपादन म्हटलं की, थोडासा मास्तरकीचा वास येतो. चुका काढणं वगैरे. पण संपादन म्हणजे संगोपन.’’
मराठी साहित्याचं अशा प्रकारे संगोपन करण्याचं काम श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथे’च्या माध्यमातून एकेकाळी केलं. त्यामुळं त्यांच्या नावांचा महाराष्ट्रात खूप दबदबा होता. नवकथा आणि नवकाव्याच्या परंपरेतील साहित्यिकांच्या लेखनाला पैलू पाडून ते अधिकाधिक फुलवण्याचं, शैलीदार बनवण्याचं काम श्री. पु. भागवत-राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथे’च्या माध्यमातून केलं. ‘तुमच्या कथेला टोक नाही, तिला टोक आणलं पाहिजे’ या त्यांच्या विधानाची तेव्हा खूप टवाळीही केली जायची. श्री. पु.-राम पटवर्धन कथा वा लेख पुन्हा पुन्हा लिहायला सांगत. त्यांच्या मनासारखं लेखन होईपर्यंत ते ‘सत्यकथे’त छापलं जात नसे. मराठी लेखकांनाही आपलं लेखन या दोन चिकित्सक संपादकांच्या पसंतीला उतरणं आणि ‘सत्यकथे’त छापून येणं हा मोठा गौरव वाटत असे. पण काही लेखक त्यांच्या या संपादनाची टवाळीही करत.
श्री. पु.- राम पटवर्धन हे मराठी साहित्यात कडक शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखले जातात. श्री. पु. आता नाहीत. राम पटवर्धनांचं वयही 83 आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली तीच मुळी या प्रवादापासूनच. आमच्याबद्दलच्या सगळ्या समजुती या निव्वळ प्रवाद आहेत, असं सांगून पटवर्धन म्हणाले,‘‘आम्ही प्रत्येक कथेला भरपूर वेळ देत असू. अन् तोही लेखकावर बळजबरी न करता. हे काढा, ते काढा, असं आम्ही कधी केलं नाही. संपादन असं नसतं. ते फुलवणं असतं. आतमध्ये गुदमरलेली थीम फुलून आली पाहिजे.’’
राम पटवर्धनांनी अनेक नव्या आणि तरुण लेखकांना प्रोत्साहन दिलं, लिहितं केलं. आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर, सानिया, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा वेगवेगळ्या शैलीच्या आणि प्रकृतीच्या लेखकांना त्यांनी ‘सत्यकथे’त आणलं. ढसाळ ‘सत्यकथे’कडे कसे आले त्याचा किस्साही मोठा मजेशीर आहे. पटवर्धन सांगतात, ‘‘अनंत काणेकरांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन चालू होतं. तेव्हा नामदेव ढसाळ पुढे आला आणि म्हणाला, मला कविता वाचायची आहे. काणेकर म्हणाले, काय करता तुम्ही? तो म्हणाला, मी टॅक्सी ड्रायव्हर आहे. मी काही मोठं विशेष लिहिलेलं नाही, पण ही कविता मला श्रोत्यांना ऐकवायची आहे. त्या वेळी नामदेवनं जे वाचून दाखवलं, त्यानं अंगावर काटा आला. तो एका वेगळ्या जगाचा अनुभव होता. मी मनात म्हटलं, अरेच्चा हे पात्र जरा लक्षात ठेवलं पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर तो जायला निघाला तेव्हा मी त्याला थांबवून म्हटलं, उद्या मौजेत या. ढसाळ त्याप्रमाणे आला. त्यामुळं नामदेवच्या सुरुवातीच्या कविता सत्यकथेत आल्या.’’ चांगलं साहित्य कुठं दिसलं की, त्या लेखकाला आणि पर्यायानं त्याच्या साहित्याला उचलायचं हा पटवर्धनांचा कार्यक्रम होता. या धोरणामुळे ‘सत्यकथा’ पटवर्धनांच्या काळात वेगळ्या वळणानं जायला लागली. दलित, कामगार या वर्गातील लोकांबद्दल त्यांना अतिशय आदर होता. या लेखकांनी पटवर्धनांना पुष्कळ सहकार्य केलं आणि प्रेमही दिलं.
मौजेमध्ये फक्त लेखकांचाच राबता असायचा असं नाही. तर चित्रकला, शास्त्रीय संगीत, नाटक, चित्रपट या क्षेत्रातले लोकही तिथं येत असत. त्यात जे बंडखोर लोक होते, त्यांचे नेहमी इतरांशी वाद-संवाद चालायचे. ‘ये भडव्या’ अशा भाषेत ते बोलायचे. राम पटवर्धनांची त्यावर प्रतिक्रिया असायची, ‘ठीक चाललंय. चालू द्या.’ त्यांना खेचायचं काम कधी त्यांनी केलं नाही. त्यांना ते त्यांच्या पद्धतीनं जाऊ द्यायचे. त्यावर ते गंमतीनं म्हणतात, ‘‘अशा पद्धतीनं बघू शकलो तर आपण रिलॅक्स राहतो. कुठल्याही साहित्यिक वादामध्ये हिरिरीनं पडत नाही. हळूहळू नामदेव ढसाळचे वीकपॉइंट दिसायला लागले. पुढे तर तो शिवसेनेत गेला. मग राहिलं काय? मला वाटतं, ठीक आहे. असंच चालायचं.’’
राम पटवर्धन ‘सत्यकथे’चे संपादक असताना त्यांची सतत श्री. पु. भागवतांशी तुलना केली जात असे. अर्थात दोघांच्या कामाची पद्धत वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच असल्यानं त्यांना एकमेकांना कधी काही सांगावं लागलं नाही. मात्र काही वादाचे, गैरसमजाचे प्रसंग आलेच. पण त्या वेळी श्री. पु. पटवर्धनांना एवढंच म्हणाले की, ‘पटवर्धन, तुम्ही उत्साहाच्या भरात काही लोकांवर अन्याय केलाय.’ तेवढंच. बाकी त्यांनी पटवर्धनांना असं करा, तसं करा असं कधीही सांगितलं नाही. पटवर्धनांनी ‘सत्यकथे’त दिलीप चित्रे यांचा एक लेख छापला होता. त्यात त्यांनी ग. दि. माडगूळकर हे कवी नसून गीतकार आहेत, असं म्हटलं होतं. त्यामुळे माडगूळकर नाराज झाले. असे आणखी एक-दोन प्रसंग घडले.
साहित्याच्या एवढय़ा सान्निध्यात राहूनही पटवर्धनांनी स्वत: मात्र फारसं लेखन केलं नाही. नाही म्हणायला त्यांनी केलेला मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या ‘यार्लिग’चा ‘पाडस’ हा अनुवाद मात्र अप्रतिम म्हणावा असा आहे. ‘नाइन फिफ्टी टू फ्रिडम’चा ‘अखेरचा रामराम’ आणि बी. के. अय्यंगार यांच्या पुस्तकाचा ‘योगदीपिका’ या नावाने असे दोन मराठी अनुवाद केले खरे, पण ‘पाडस’चे अनुवादक अशीच त्यांची ओळख आहे. (पुष्कळ लोक अय्यंगारांच्या त्यांच्या अनुवादाला ‘तुमची योगायोगदीपिका’असं म्हणतात.) त्यांच्या वकील आणि ऑडिटर असणाऱ्या दोन्ही मुलांना ‘पाडस’ जवळपास तोंडपाठ आहे. अर्थात हे पुस्तक पटवर्धनांकडे अनुवादासाठी आलं ते अगदी योगायोगानं. जयवंत दळवी यांना ‘युसिस’साठी या पुस्तकाचा अनुवाद करून हवा होता आणि तो मौजेकडून प्रकाशित व्हावा अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांनी विष्णुपंत भागवतांना बोलून दाखवली. त्यांनी हा अनुवाद आमचे राम पटवर्धन करतील आणि श्री. पु. तपासतील असं त्यांना सांगून टाकलं. या पुस्तकाच्या रूपानं पटवर्धनांच्या हाती घबाडच लागलं. म्हणून पटवर्धन म्हणतात, ‘‘अनुवादाची एक प्रक्रिया असते. मूळ इंग्रजी पुस्तक आपण वाचतो, ते आपल्याला आवडतं. मग आपण त्याचा अनुवाद करतो. ‘पाडस’च्या बाबतीत असं काहीही झालेलं नाही. तो एक अपघात आहे.’’
पटवर्धन यांनी कुठल्याही गोष्टीसाठी कधी धडपड केली नाही. सर्व गोष्टी त्यांना विनासायास मिळत गेल्या. पण त्याचा त्यांनी कधी अहंकार बाळगला नाही. ते याचं वर्णन ‘केवळ योगायोग’ अशाच शब्दात करतात. ‘‘मी ‘सत्यकथे’त गेलो ते योगायोगानंच! त्याआधी मी रुइया कॉलेजमध्ये शिकवत होतो. एके दिवशी श्री. पु. आले आणि म्हणाले,‘ग. रा. कामत फिल्मलाइनमध्ये चालले होते. मी तुमचे निबंध वाचलेले आहेत. मला असं वाटतं की, तुम्ही ‘सत्यकथे’चं काम चांगलं कराल. येता का मौजेत?’ आम्ही काय तयारच. मौजेसारख्या संस्थेत काम करायला मिळणं ही मोठी गोष्ट होती.’’
एकेकाळी महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण धगधगतं ठेवणारी ‘अभिरुची’, ‘हंस’, ‘सत्यकथा’ ही मासिकं काय किंवा लघुअनियतकालिकांची चळवळ काय, या शेवटी अल्पजीवीच ठरल्या. आधी ‘अभिरूची’ मग ‘हंस’ बंद झालं. आणि ऑगस्ट 1982 मध्ये ‘सत्यकथा’ही बंद झालं. त्यानंतर काही काळ लघुअनियतकालिके निघाली, पण त्यांचा वकुब खूपच मर्यादित राहिला. आणि त्यातल्या कुणालाच संपादक म्हणून श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्यासारखी मोहोर उठवता आली नाही. सगळ्याच चांगल्या गोष्टी शेवटी अल्पजीवीच ठरतात काय? पण पटवर्धनांना मात्र तसं वाटत नाही. ते म्हणतात,‘‘त्याला अल्प वगैरे आपण म्हणतो. त्यांचा जो जीव असतो, तेवढी ती टिकतात. आपले कम्युनिस्ट घ्या. पूर्वेला लालरंग वगैरे देण्याचे त्यांचे मनसुबे होते. चीनमध्ये झाली तशी क्रांती आपल्याकडे व्हायला पाहिजे अशी ते स्वप्नं पाहायचे. क्रांतीची अशी कलमं लावता येतात काय? त्याचं एक गणित असतं त्यानुसार ते चाललेलं असतं. त्यात आपण बदल करायचा प्रयत्न करायचा म्हणजे फक्त शिव्याच द्यायच्या, कुणाला काही कदर नाही वगैरे. कशाला पाहिजे हे? जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत, त्यांचा तुम्ही धांडोळा घेऊ शकता. ते सोडून आहे त्या गोष्टीला चिकटून बसणं हे चूक आहे. सध्या आपल्या आजूबाजूला जे काय चाललं आहे, त्याला सामावून घेणं मराठी साहित्यिकांच्या आणि मासिकांच्याही हातात नाही. सगळाच काळ आता बदलला आहे हे आपण लक्षात ठेवावं. आता कुठलीही सांस्कृतिक चळवळ निर्माण होणार नाही. तशा अपेक्षाही बाळगूही नयेत. आपण शांत बसावं. धडपड करू नये. यात साहित्याचं काही नुकसान वगैरे होत नाही. साहित्य नावाच्या गोष्टीला पूर्वी जे महत्त्व होतं ते आता उरलं नाही. वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या. मला वाटतं, हे उत्तम आहे. सगळं स्वीकारावं लागतं! अट्टाहास कशाला करायचा? हे बदल सगळ्याच जगात होत आहेत. तिथे कुठल्याच एकटय़ादुकटय़ा माणसाचा पाड लागणार नाही.’’
राम पटवर्धन असं बोलू शकतात यावर विश्वास बसणं जरा कठीण जातं. पण त्यामागचा त्यांचा विचार समजून घेतला की, त्यांच्या काळाच्या बरोबर राहण्याचं आणि भूतकाळाच्या समंधाला मानगुटीवर बसू न देण्याचं कौतुकही वाटतं. सध्या वयोमानानं पटवर्धनांना वाचन करणं शक्य होत नाही. तरीही पुस्तकांबद्दलची उत्सूकता त्यांना शांत बसू देत नाही. वाचता येत नसलं तरी ते पुस्तकांबद्दल जाणून घेतात. वर्तमानपत्रं वाचतात. त्यामुळे नेमाडय़ांची ‘हिंदू’ एवढे दोन शब्द उच्चारताच ते म्हणाले, ‘‘आता ‘हिंदू’ची बरीच चर्चा चालली आहे. मी त्याकडे वेगळ्या त-हेने बघतो. आपली संस्कृती केवढय़ा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्याला नाव देण्यासाठी ‘हिंदू ’हा शब्द कशाला वापरायचा? ते ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ असं म्हणू शकले असते. मुळात भारतीय संस्कृती हे अजब मिश्रण आहे. नेमाडय़ांनाही शेवटी म्हणावं लागलं, ‘ही अडगळ आहे पण ती समृद्ध आहे. आणि समृद्ध असली तरी ती अडगळच आहे.’ मला हा खुळेपणा वाटतो. नेमाडय़ांनी ही मांडणी त्यांच्यापुरतीच ठेवावी.’’
भविष्यात साहित्याला काही स्थान असेल का? की नसेलच? असे प्रश्न हल्ली निर्माण होत असतात. त्याचं कुठल्याच प्रकारे चित्रं रंगवता येत नसल्याने काळजीत आणखीनच भर पडते. असेच प्रश्न पटवर्धनांना पडतात का, म्हणून विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मोठं मजेशीर होतं. ते म्हणाले,‘‘या प्रश्नांची उत्तरं शोधायची गरज काय? साहित्याला माणसाच्या आयुष्यात स्थान असलं पाहिजे आणि नसलंही पाहिजे. साहित्याबद्दल कसलाही विचार न करता अतिशय समृद्ध जीवन जगलेली पुष्कळ मंडळी आहेत. त्यामुळे साहित्यवादी मंडळींनी यांच्याकडे तुच्छतेने बघू नये आणि यांनीही त्यांच्याकडे तुच्छेतेने बघू नये. या जगामध्ये सगळ्यांना जागा आहे आणि सगळ्यांनी राहावं.’’ ही एवढी स्वागतशील वृत्ती पटवर्धनांमध्ये कुठून आली असावी? अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘माझा डावा डोळा सुरुवातीपासूनच दुबळा आहे. तो इतका की, मला कधी चष्माही लावता आला नाही. पण ते एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळं जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ओपन राहिला.’

Wednesday, July 28, 2010

‘हिंदू’च्या निमित्ताने...


समर्थक आणि विरोधक
सध्या सगळीकडे डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ची जोरदार चर्चा होते आहे. नेमाडपंथी आणि नेमाडेंचे चाहते ही कादंबरी झपाटल्यासारखी वाचत आहेत, तिचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे नेमाडेंचे विरोधक या कादंबरीच्या माध्यमातून नेमाडेंवर शरसंधान करण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे ते अगदी सुक्ष्मदर्शकातून पाहावे तसे कादंबरीचे वाचन करत आहेत. मात्र त्यातल्या काहींच्या पदरी निराशा पडत आहे, कारण कादंबरी वाचून संपल्यावर तिला वाईट म्हणणे त्यांना शक्य होत नाहीये. तर तिसरीकडे ज्या वाचकांनी उत्सूकतेपोटी या कादंबरीची आगावू नोंदणी केली होती, ते मात्र आपली प्रत नेमाडय़ांच्या स्वाक्षरीसह मिळण्याची वाट पाहात आहेत. ‘हिंदू’विषयीची उत्सूकता मात्र सर्व थरांपर्यंत पोहचते आहे, ही फार चांगली आणि सुखद घटना म्हणावी लागेल.
पॉप्युलर प्रकाशनाने ‘हिंदू’ची पहिली आवृत्ती २५ हजार प्रतींची छापायची ठरवली होती, असं म्हणतात. पण त्यांच्या अपेक्षेनुसार तर ‘हिंदू’ची नोंदणी झाली नाहीच पण ती पाच हजाराचाही आकडा गाठू शकली नाही अशीही चर्चा आहे. मात्र मराठी साहित्याचा आजवरचा लौकिक आणि परिघ पाहता ही संख्याही काही कमी म्हणता येणार नाही.


नेमाडे आणि भैरप्पा
नेमाडे यांच्या ‘हिंदू’चे प्रकाशनाआधीच एकदा पुनर्मुद्रण करण्यात आले. १८ जुलैला ‘हिंदू’चे प्रकाशन झाले, त्याआधी किमान दोन महिने तिची आगावू नोंदणी चालू होती. प्रकाशनाच्या दिवशीही अनेक जण उत्साहाने ५०० रुपये खर्चून ‘हिंदू’ची प्रत विकत घेत होते. याच सुमारास म्हणजे २८ जुनला कर्नाटकात एस. एल. भैरप्पा यांच्या ‘कवलू’ या नव्या कादंबरीचे प्रकाशन झाले. तिचे प्रकाशनाआधीच दोनदा पुनर्मुद्रण करण्यात आले तर पुढच्या दहा दिवसात पाच वेळा पुनर्मुद्रण करण्यात आले. आतापर्यंत हा आकडा दुप्पट झाला नसला तरी दीडपट नक्कीच झाला असणार. भैरप्पा गेली चाळीस वर्षे कन्नडमधील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार मानले जातात. गेल्या चाळीस वर्षात त्यांनी वीसपेक्षा अधिक कादंब-या लिहिल्या आहेत. म्हणजे दोन वर्षाला एक कादंबरी. इथे नेमाडे आणि भैरप्पा अशी तुलना करायची नाही तर कन्नड वाचक आणि मराटी वाचक अशी तुलना अपेक्षित आहे.


नेमाडेंचे आयकॉनिक छायाचित्र
डॉ. भालचंद्र नेमाडे यांची मी ‘दै. प्रहार’साठी २२ जुनला मुलाखत घेतली. कांदिवलीच्या नेमाडे यांच्या घरी ही मुलाखत झाली. त्यासाठी आमचा दै. ‘प्रहार’चा सिनिअर फोटोग्राफर संदेश घोसाळकरला घेऊन गेलो होतो. नेमाडे यांच्या अभ्यासिकेत मुलाखत सुरू झाली आणि तसा संदेशचा कॅमेराही. मुलाखत जवळपास तासभर झाली. तोवर संदेशचा कॅमेरा चालूच होता. मुलाखत संपल्यावरही तो नेमाडे यांना हात वर करा, इकडे पाहा, तिकडे पाहा, असे उभे राहा, तसे उभे राहा अशा सुचनांबरहुकूम वागायला लावत होता. त्याचा तो बिनधास्त उद्योग पाहून मलाच मनातल्या मनात भीती वाटत होती, याच्या या सुचनांनी नेमाडे वैतागणार तर नाहीत ना. पण नेमाडे सर त्यांच्या झुपकेदार मिशांमुळे (आणि त्यांच्या तिखट बोलण्यामुळेही) उग्र आणि रागीट वाटत असले तरी प्रत्यक्षात ते फारच साधे आणि प्रेमळ असल्याचा प्रत्यय आला.
असो. मुलाखत सुरू असताना नेमाडे यांचा बोलण्याचा ओघात संदेशने टिपलेला आणि आम्हा सर्वाना आवडलेला फोटो दै. ‘प्रहार’च्या ‘कोलाज’ (२७ जुन) पुरवणीच्या पहिल्या पानावर मुलाखतीसह छापला. या मुलाखतीची बरीच चर्चा झाली. अनेकांना आवडली. तसे फोन, एसएमएसही मला आले. विशेष म्हणजे नेमाडेंनाही आवडली.


पुढे १८ जुलैला ‘हिंदू’च्या प्रकाशनासाठी साडेचार वाजता मी रवीन्द्र नाटय़ मंदिरात गेलो, तर व्यासपीठावर संदेशने काढलेला आणि आम्ही ‘प्रहार’मध्ये छापलेला फोटो मोठय़ा आकारात बॅनरवर झळकत होता. दुस-या दिवशी या कार्यक्रमाची बातमी दै. ‘लोकमत’ने पहिल्या पानावर छापली. त्यासोबत जो फोटो छापला त्यात खुर्चीत बसलेले नेमाडे आणि त्यांच्या पाठीमागे हाच फोटो बॅनरवर झळकत होता. त्यानंतर समीक्षक शांता गोखले यांनी २२ जुलै रोजी ‘मुंबई मिरर’मध्ये ‘हिंदूज अँड हराप्पा’ हा लेख लिहिला. त्यातही हाच फोटो छापण्यात आला. संदेशच्या नावात थोडीशी चूक झाली पण त्याला क्रेडिट दिले गेले, पण त्यासाठीची पूर्वकल्पना मात्र संदेश आणि ‘प्रहार’ला देण्यात आली नव्हती. हे समजल्यावर स्वत: शांताबाईंनी दिलगिरी व्यक्त केली. प्रश्न तसा छोटाच होता. पण त्यातही शांताबरईनी स्वत: लक्ष घातले, हा त्यांचा मोठेपणा. असो.
तर सांगायचं असं की, नेमाडे यांचा संदेशने काढलेला हा फोटो असा आयकॉनिक होत चालला आहे.


सध्या मीही ‘हिंदू’ वाचतोय. आतापर्यंत शंभरेक पानं वाचली आहेत. लवकरच स्पीड वाढवून ती संपवण्याचा विचार आहे. तेव्हा तिच्यावर सविस्तर लिहिनच. तुर्तास एवढेच.

Monday, July 12, 2010

‘आवरणा’खालचे भैरप्पा समजून घेण्यासाठी


एस. एल. भैरप्पा हे गेली पंचवीस-तीस वर्षे कन्नडमधील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार मानले जातात. गेल्या चाळीस वर्षात भैरप्पा यांनी वीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांतील बऱ्याच कादंबऱ्यांचे हिंदी, मराठीसह इतरही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. या कादंबऱ्यांचे सामान्य वाचकांनी मोठय़ा प्रमाणावर स्वागत केले तर जाणकारांनी त्यांच्यावर जोरदार टीका-टिप्पणीही केली. लेखन हाच धर्म मानणारे भैरप्पा मूलत: तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि प्राध्यापक आहेत. त्या विषयातील त्यांची चार पुस्तकेही प्रकाशित आहेत. तत्त्वज्ञान, इतिहास आणि समाजशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय. ‘केवळ गंभीर प्रकृतीची पुस्तकंच आपण विकत घ्यायला हवीत. हलकीफुलकी पुस्तकं कुणी फुकट दिली तरी ती वाचायला आपल्या आयुष्यात वेळ नाही’ अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे भैरप्पा कुठल्याही विषयावर कादंबरी लिहिताना त्या विषयाचा सांगोपांग अभ्यास-वाचन करतात. ‘पर्व’ ही बहुचर्चित कादंबरी लिहिण्याआधी ते तब्बल साडेसहा वर्षे केवळ महाभारतकालीन जीवनाविषयीच्या पुस्तकांचेच वाचन करत होते.
तर अशा या नामवंत कादंबरीकाराची ‘आवरण’ ही एकविसावी कादंबरी फेब्रुवारी २००७ मध्ये प्रकाशित झाल्यापासून चर्चेत आहे. कन्नडमध्ये तर तिने पुस्तकाच्या खपाचे आजवरचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत. (त्यात भैरप्पांच्या आधीच्या विक्रमाचाही समावेश आहे.) कन्नडमध्ये ही कादंबरी ५ फेब्रुवारी २००७ रोजी प्रकाशित झाली, १० फेब्रुवारी रोजी तिची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली; तर पुढच्या पाच महिन्यांत तिच्या एकंदर दहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. २००९ पर्यंत या कादंबरीच्या एकंदर बावीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या. या कादंबरीचे कन्नड वाचकांनी उत्स्फूर्त स्वागत केले तर दुस-या बाजूला यू. आर. अनतंमूर्ती, गिरीश कार्नाड, चंद्रशेखर कंबार, जी. के. गोविंद राव अशा नामवंत कन्नड साहित्यिकांनी तिच्यावर भरपूर टीकाही केली. या कादंबरीवर कर्नाटकामध्ये एकंदर दहा चर्चासत्रे झाली. त्यांत वाचल्या गेलेल्या निबंधांची तेवढीच पुस्तकेही प्रकाशित झाली. त्यांतील सहा या कादंबरीच्या बाजूने आहेत, तर चार विरुद्ध.
‘आवरण’ म्हणजे विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणारी माया! ‘सार्थ’नंतरची भैरप्पांची ऐतिहासिक विषयावरची ही दुसरी कादंबरी. ‘सार्थ’मध्ये भैरप्पांनी आठव्या शतकातील संधिकाळाचे वर्णन केले आहे तर ‘आवरण’मध्ये नंतरच्या म्हणजे मध्ययुगीन काळाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचा संबंध त्यांनी थेट वर्तमानकाळापर्यंत आणून भिडवला आहे. सुरुवातीच्या प्रास्ताविकपर निवेदनात भैरप्पांनी म्हटले आहे, ‘या कादंबरीतल्या विषयात माझं स्वत:चं असं काहीही नाही. यातला प्रत्येक तपशील आणि चलन यांचा आधार कादंबरी या साहित्य-प्रकाराला पेलवेल एवढय़ाच प्रमाणात देण्यात आला आहे.’
कादंबरीत त्यांनी काही ठिकाणी संदर्भग्रंथांची नावे दिली आहेत, आणि शेवटीही तब्बल १३६ संदर्भग्रथांची सूची दिली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक विषयावरची कादंबरी असली तरी ती पूर्णपणे ऐतिहासिक कादंबरी नाही अन् चरित्रात्मकही नाही. किंबहुना भैरप्पांच्या आजवरच्या कादंबऱ्यांपेक्षा ही कादंबरी अतिशय वेगळ्या आणि अभिनव स्वरूपाची आहे. ही कादंबरी एकाच वेळी वर्तमान आणि ऐतिहासिक अशा दोन पातळ्यांवर घडत जाते.
हम्पा, काशी येथील हिंदू देव-देवतांच्या मंदिरांचा विध्वंस मुस्लीम राज्यकर्त्यांनी केला, पण हे ऐतिहासिकसत्य निधर्मीवादी आणि डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी कायम दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असून, हम्पीतील मंदिरांचा विध्वंस शैव-वैष्णवांनी केला असल्याचा निधर्मीवादी मंडळींचा दावा खोटा आहे आणि मुस्लीम राज्यकर्त्यांचा विशेषत: औरंगजेब बादशहाचा एकूण कारभार कसा रगेल आणि रंगेल होता, हे या कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे.
‘आवरण’ची नायिका लक्ष्मी उर्फ रझिया आपला नवरा अमीरसह हम्पीवर लघुपट निर्माण करण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणाला भेट देते. तिथल्या मंदिरांचा विध्वंस पाहून लक्ष्मी निराश होते. मग लघुपटाचे काम सोडून ती हम्पीचा नाश नेमका कोणी केला याचा शोध घ्यायला लागते. त्याविषयी मान्यवर अभ्यासकांशी चर्चा करते, स्वत: पुस्तके मिळवून वाचते. सत्याच्या शोधाच्या या प्रवासात तिला तिच्या गांधीवादी वडिलांनी करून ठेवलेल्या टिपणांचा आणि जमवलेल्या संदर्भग्रंथांचा मोठा उपयोग होतो. त्या टिपणांच्या आधारे ती औरंगजेबाच्या काळातील सरदार-मनसबदार-जहागीरदार यांच्या जनानखान्यांविषयी एक छोटी कादंबरी लिहिते. लक्ष्मीची ती कादंबरी आणि सत्याच्या मार्गात काटे पेरणाऱ्यांविरुद्ध तिने दिलेला संघर्ष, असे ‘आवरण’चे थोडक्यात कथानक आहे. त्यामुळे भैरप्पांनी कुणा एका व्यक्तीला नाही तर निधर्मीवादाच्या नावाखाली सत्य दडपून ठेवणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाला खलनायक केले आहे. त्याचे प्रतीक म्हणून प्रा. शास्त्रींसारख्या निधर्मी,मार्क्‍सवादी विचारवंतांची त्यांनी निवड केली आहे. त्यात हे सर्व कादंबरीच्या माध्यमातून मांडायचे असल्याने भैरप्पा यांनी तशाच पद्धतीची पात्ररचना केली आहे. त्यामुळे त्यातल्या व्यक्तिरेखांचा विचार आणि व्यवहार यात टोकाचा अंतर्विरोध जाणवतो.
हा विरोधाभास प्रा. शास्त्री यांच्याबाबत तर फारच जाणवतो. इंटरनेटवर प्रकाशित झालेल्या काही प्रतिक्रियांमध्ये ही व्यक्तिरेखा यू. आर. अनंतमूर्ती यांच्यावर बेतलेली आहे आणि त्यामुळे अनंतमूर्ती यांनी भैरप्पांवर सडकून टीका केली आहे, असा उल्लेख आहे. अर्थात, या आधीही भैरप्पांच्या दोन पुस्तकांवर अनंतमूर्तीनी टीका केली होती. ‘आवरण’विषयी अनंतमूर्ती म्हणतात,‘‘Bhyrappa does not know either Hindu religion or the art of story-telling. He is only a debater. He does not go beyond his opinions. He constructs opinions and end up as a bedater, rather than a creative writer.’’ ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांनी टिपू सुलतानला ‘राष्ट्रीय हिरो’ केले असले तरी तो प्रत्यक्षात तसा नव्हता, तर मुस्लीम राज्यकर्त्यांप्रमाणेच हिंसक आणि क्रूर होता, अशी मांडणी भैरप्पांनी केल्याने गिरीश कार्नाड यांनीही भैरप्पांच्या हेतूंविषयी शंका उपस्थित केली आहे. काही मान्यवरांनी मात्र या कादंबरीचे जोरदार समर्थन केले आहे. ‘हिडन टॉरिझन्स-१००० इअर्स ऑफ इंडियन सिव्हिलायजेशन’ या ग्रंथाचे सहलेखक एन. एस. राजाराम यांनी तर या कादंबरीची तुलना थेट डॅन ब्राऊनच्या ‘दा-विंची कोड’शी केली आहे. ‘स्वार्थी, पण प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोटय़ा इतिहासाचा प्रचार करणं, हे या दोन्ही कलाकृतींमधलं समान सूत्र’ असे राजाराम म्हणतात!
याशिवाय आणखी एक मतप्रवाह आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एस. एल. भैरप्पा हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत. त्यामुळे त्यांनी कितीही आटोकाट प्रयत्न केला तरी त्यांचा मनोदय या कादंबरीतून आपोआप उघड होतो. भैरप्पांच्या या विचारसरणीमुळे ‘आवरण’ला मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा भाजपाने कर्नाटकातील विदानसभेच्या निवडणुकीत करून घेतला आणि त्यामुळे येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली, असा या तिसऱ्या मतप्रवाहाचा कौल आहे.
भैरप्पा हे चलाख कादंबरीकार आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागते. कारण आपल्या कादंबरीवर निधर्मीवादी मंडळी कोणते आक्षेप घेऊ शकतात, याची त्यांना चांगली जाणीव आहे. त्या आरोपांचा समाचार त्यांनी आधीच कादंबरीतून घेतला आणि तिच्या बचावाची सोय करून ठेवली. त्यामुळे कादंबरीवर कन्नडमधील नामवंत साहित्यिकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली, तेव्हा भैरप्पांनी त्यांची नायिका रझियाप्रमाणे कादंबरीच्या शेवटी दिलेल्या पुस्तकांच्या यादीकडे बोट दाखवले. ‘माझ्या कादंबरीवर बंदी आणायची असेल तर आधी या प्रत्येक पुस्तकावर बंदी आणावी लागेल. कारण मी सर्व या पुस्तकांतूनच घेतले आहे’ असा युक्तिवाद भैरप्पा यांनी केला. परंतु भैरप्पांची कादंबरी मात्र रझियाच्या कादंबरीप्रमाणे सरकारने जप्त केली नाही, त्यामुळे भैरप्पांची एका परीने सरशीच झाली. पण जरा बारकाईने पाहिले तर भैरप्पांनी कादंबरीच्या शेवटी दिलेल्या १३६ संदभग्रंथांपैकी किती पुस्तके खरोखरच वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिलेली आहेत आणि त्यांचे लेखक कोण आहेत?
प्रस्तुत लेखकाला माहीत असलेल्या नऊ-दहा हिंदुत्ववादी आणि अ‍ॅण्टी मुस्लीम लेखकांच्या ४०-५० पुस्तकांचा त्यात समावेश आहे. एन. एस. राजाराम यांची आठ, अरुण शौरी यांची दहा, सीताराम गोयल यांची सतरा, अन्वर शेख यांची दोन, स्वामी विवेवाकानंद यांचे समग्र वाडम्म््मय आणि इब्न बाराख, डेव्हिड फ्रॉले, व्ही. एस. नायपॉल, अरुण जेटली यांचे प्रत्येकी एक अशी या लेखकांच्या पुस्तकांची संख्या आहे. यातल्या काहींची विश्वासार्हता आधीच जगजाहीर असल्याने त्याबाबत वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. त्यामुळे भैरप्पांच्या यादीत वरवर देशी-विदेशी, हिंदू-मुस्लीम, प्राचीन-अर्वाचीन लेखकांच्या पुस्तकांचा समावेश दिसत असला तरी तिचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. अ. का. प्रियोळकर, जदुनाथ सरकार, अल्बेरूनी, विल डय़ूरांट यांच्या पुस्तकांचा केवळ माहितीसाठी उपयोग आणि हिंदुत्ववादी लेखकांची पुस्तके सत्य म्हणून ग्राह्य धरण्याची क्लृप्ती भैरप्पांचा मनसुबा उघड करते.
‘सत्याकडून सोयीनुसार उचलेगिरी करून मी केवळ कला-निर्माता आहे, असे म्हणून जबाबदारी झटकणे साहित्यिकाच्या दृष्टीने योग्य नाही’ असे खुद्द भैरप्पांनीच प्रास्ताविकात म्हटले आहे. पण सोयीचे पुरावे निवडणे आणि मागचे-पुढचे संदर्भ वगळून तपशील देण्याचा प्रकार कुद्द भैरप्पांनीच केल्याने त्यांच्यासद्हेतूविषयी शंका आल्याशिवाय राहत नाही. प्रकाशनाआधी भैरप्पांनी ही कादंबरी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश एम. रामाजोईस, कट्टर गांधीवादी, थोर वकील हारनहळ्ळी रामस्वामी आणि प्रख्यात वकील अशोक हारनहळ्ळी यांना अभिप्रायार्थ वाचायला दिली, हा निव्वळ योगायोग मानता येत नाही.
मराठीतील ऐतिहासिक आणि चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांनी अवास्तव कल्पनारंजन आणि सत्यापलाप करण्याचे अपराध खूपच केले आहेत. त्यामुळे ‘ऐतिहासिक आणि चरित्रात्मक कादंबरी’ हा भ्रष्ट साहित्यप्रकार आहे अशी त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली, ती उचितही आहे. पण तरीही या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. सामान्य वाचकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले, पण स्वत:ला विचारवंत म्हणवून घेणाऱ्या मराठी साहित्यिकांनी त्यांच्या विरोधात (यू. आर. अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, चंद्रशेखर कंबार, जी. के. गोविंद राव यांच्यासारखी) स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतल्याची फारसी उदाहरणे नाहीत. भैरप्पांची ‘आवरण’ याही अर्थाने एक वेगळी कादंबरी ठरते. तिच्यावर भरपूर टीका झाली पण बंदी घातली गेली नाही आणि त्यावरून सामाजिक वातावरणही कलुषित करण्याचा प्रयत्न झाला नाही, हे त्या समाजाच्या प्रगल्भतेचे लक्षण मानले पाहिजे. आणि पर्यायाने लोकशाहीच्याही! पण भैरप्पांसारख्या कादंबरीकारालाही आपल्या विचारसरणीच्या मायेने कसे वेढून घेतले आहे, हे समजून घेण्यासाठी तरी ‘आवरण’ वाचायलाच हवी! आता ती मराठीतही उपलब्ध झाली आहे. उमा कुलकर्णी यांनी तिचा नेहमीप्रमाणे चांगला अनुवाद केला आहे।
आवरण : एस. एल. भैरप्पा / अनु. उमा कुलकर्णी
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
किंमत : २५० रुपये

Sunday, June 27, 2010

‘होय, हे पोलिटिकल स्टेटमेंट!’


डॉ. भालचंद्र नेमाडे यांची ‘हिंदू’ आता येणार मग येणार असे अनेक वायदे 1973 पासून झाले, होता होता या गोष्टीला आता 36-37 वर्षे उलटली. पण ‘हिंदू’ नेमकी कधी येणार हे समजत नव्हतं. नेमाड्यांचं लेखन चालू आहे एवढंच सांगितलं जात होतं. मात्र आता या सा-या अनिश्चिततेवर स्वत: नेमाड्यांनीच पडदा टाकला आहे. त्यांनी खरोखरच ‘हिंदू’चा पहिला भाग लिहून पूर्ण केलाय. येत्या 15 जुलैला ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ या नावानं तो प्रकाशित होतोय. या कादंबरीतून नेमाड्यांनी ‘हिंदू’ या स्वभावत:च वादग्रस्त आणि स्फोटक असणा-या शब्दाची पुनर्माडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनीभारतीय परंपरेतल्याच बहुविधतेचा आधार घेतला आहे. नेमाड्यांची‘हिंदू’ नेमकी आहे तरी कशी याविषयी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा


या कादंबरीतून तुम्हाला ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ बदलायचा आहे, तो व्यापक करायचा आहे. ते जरा स्पष्ट करून सांगा ना..
-शब्दामागे एक संकल्पना असते. आता परिसर हा शब्द आहे. त्यात झाडं-झुडं, मुनष्यप्राणी सगळे येतात. तसा तो त्या अर्थानेच वापरला जातो. तसाच ‘हिंदू’ हा शब्द आहे. दुर्दैवाने इंग्रजांनी ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या फार संकुचित करून टाकली. त्यांनी तो धर्मच केला. खरं तर तो धर्म नव्हता. सुरुवातीच्या खानेसुमारीमध्ये लिंगायत हासुद्धा स्वतंत्र धर्म होता. पण इंग्रजांनी तो हिंदू धर्माचा एक भाग करून टाकला. त्यांना कळतच नव्हतं की मांसाहार करणारेही हिंदूच आहेत आणि शाकाहार करणारेही हिंदूच आहेत. कृष्णाची पूजा करणारे पण हिंदूच, रामाची पूजा करणारे पण हिंदूच. म्हणून त्यांनी त्यांचे बारके बारके धर्म केले. शिवाय मुसलमान, जैन, बौद्ध आणि शीख यांचं काय करावं हेही कळत नव्हतं. म्हणून त्यांनी १८५१ च्या खानेसुमारीत हे उलटंपालटं करून टाकलं. खानेसुमारीचा संचालक रिस्ने त्यानं हे केलं. पण त्याच्या साथीदारांनी ते मान्य केलं नाही. त्यांचं म्हणणं होतं, आपल्या देशात काही जात वगैरे नाही. अमूक एक माणूस अमूक जातीचा आहे असं काही सांगता येत नाही. अमूक प्रांतातले लोक शेडय़ुल्ड कास्ट आहेत, त्या प्रांतातले लोक वैश्य आहेत, त्या प्रांतातले लोक क्षत्रिय आहेत अशी सगळी सरमिसळ आहे. पण इंग्रजांनी सगळे कप्पे करून टाकले. ते आपण दुर्दैवाने अजूनही चालवतोय. आपले क्षत्रिय म्हणवणारे लोक शिवाजी, महादजी शिंदे, होळकर हे काही क्षत्रिय नव्हते, पण ते झाले. अनेक अस्पृश्य जाती ब्राम्हण झाल्या, अनेक ब्राह्मण जाती अस्पृश्य झाल्या. अनेक जाती वाळीत टाकल्या गेल्या, अशी ती सरमिसळ होती.
स्वातंत्र्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी ‘हिंदू’चा अर्थ आणखी संकुचित केला. मुसलमानांना आपले शत्रू ठरवलं. सावरकरांचं उदाहरण तर परिचितच आहे. हा मुस्लीम द्वेष अजूनही हिंदुत्ववाद्यांमध्ये आहे. असं मुळात चित्र नव्हतं. काही मुसलमान स्वत:ला हिंदू म्हणवणारे होते. अजूनही त्यांचे देव-देवता, पीरबीर कॉमनच आहेत. हिंदुत्ववाद्यांनी टु-नेशन्स थिअरी आणली. मुस्लीम लीगवाल्यांनी ती जोरात उचलून धरली. त्यामुळे आपल्या देशाचे तीन तेरा झाले. अजूनही आपण त्या सावलीतून बाहेर पडलेलो नाही.
या उपखंडात जो कुणी येईल तो आपला असं म्हणायची आधीपासून पद्धत होती. पारशी, शक, हुण हे काही मूळचे इथले नाहीत. पण ते इथले झाले. या सगळ्यांना मानाचं स्थान मिळालं. त्यामुळे सगळ्यांनी यावं आणि राहावं अशी हिंदू धर्माची मुळातली कल्पना होती. हिंदू हे नावसुद्धा नव्हतं. सिंधूच्या अलीकडचे जे कोणी असतील ते सगळेच हिंदू असं मानलं जायचं. अकबर, हुमायून यांनासुद्धा तिकडचे लोक हिंदू म्हणायचे. त्यामुळे मधल्या काळात इंग्रजांनी आणि हिंदुत्ववाद्यांनी बदलवलेली व्याख्या पुन्हा बदलवल्याशिवाय आपले प्रॉब्लेम काही सुटायचे नाहीत.


-म्हणजे भारताची जी बहुविधता आहे, त्याच्याशी ‘हिंदू’ ही संकल्पना जोडली पाहिजे.
- हो, आपल्याला ती भौगोलिक संकल्पनाच करायला पाहिजे. भूगोलाशी जुळणारे सगळे हिंदू असं मानायला पाहिजे. आपल्याकडच्या सगळ्या विचारवंतांचंही तेच म्हणणं होतं. टागोरांनी राष्ट्रगीतात असा धार्मिक भेद केलेला नाही. जैन, बौद्ध, शीख, मुसलमान हे वेगवेगळे नाहीत, वंशाने ते एकच आहेत. पहिल्या खानेसुमारीत तर शिखांना ‘जटाधारी हिंदू’ असं नाव होतं. पुढच्या दोन-तीन खानेसुमारीनंतर इंग्रजांनी त्यांना वेगळं केलं. अनेक हिंदूमधला मोठा भाऊ शीख व्हायचा अशी पूर्वी चाल होती. हे धर्म असे कसे बदलू शकतात? आपल्याच कुटुंबातला एक माणूस शीख होत असेल तर मग तो वेगळा धर्म कसा काय होऊ शकतो? तो आपलाच भाग म्हणायला पाहिजे. तेव्हा ‘हिंदू’ही उज्ज्वल आणि उदार संकल्पना केल्याशिवाय आपले प्रश्न मिटत नाहीत.


-म्हणजे विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी सोयीस्करपणे लावलेले हे अर्थ आहेत् असंच ना?
-अगदी. स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी. आपण वरचे राहावे म्हणून अनुलोम विवाह करायचे. ब्राम्हण पुरुषाने शूद्र मुलीशी विवाह केला की, त्याला प्रतिलोम विवाह म्हणायचं. आता एक स्त्री आणि एक पुरुष लग्न करत असतील तर संतती ५०-५० टक्के तरी आहेच ना? पण पूर्णच ब्राम्हण करून टाकणं किंवा पूर्णच शूद्र करून टाकणं हे शास्त्रीयसुद्धा नव्हतं. पण हे वाढत गेलं. अल्बेरुनीच्या काळापर्यंत (आठव्या शतकापर्यंत) तर हे अगदी पक्कं झालं होतं. ब्राम्हण श्रेष्ठ, त्यानंतर क्षत्रिय. नंतर ते ब्राम्हणांनी नाहिसेच केले. मग वैश्य. हळूहळू वैश्यही गेले अन् ते शूद्रच झाले. शिवाजीला आणि तुकारामालासुद्धा ब्राम्हण शूद्र समजायचे. ही परिस्थिती इंग्रज येईपर्यंत होती. इंग्रजांनीही हेच पुढे वाढवलं. मनस्मृती ही बेकायदा आहे वा अशास्त्रीय आहे असंही इंग्रजांनी जाहीर केलं नाही. आम्हाला राज्य करू द्या आणि व्यापार करू द्या एवढंच त्यांनी पाहिलं.


-‘हिंदू’ला तुम्ही संशोधित कादंबरी म्हणणार का? तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की, तुम्ही रितसर संशोधन करून ‘हिंदू’ लिहिली आहे..
- मी व्यवसायाने प्राध्यापक आहे. त्यामुळे वेगळं काही करावं लागत नाही. विशेषत: मी तौलनिक साहित्य, भारतीय साहित्य शिकवतो, त्यात हे सगळं येतंच. त्यामुळे मुद्दाम काही करावं लागलं नाही. १९७३ ते २०१० या काळात खूप शिकवून झालं, अनेक पुस्तकं वाचून झाली. प्राकृत वाचून झालं, संस्कृत वाचून झालं. शिकवावंच लागतं ते. त्याचा आपण जे लिहितो त्यावर आपोआपच परिणाम होतो. त्याच्यासाठी प्रोजेक्ट घेऊन कादंबरी लिहिता आली असती असं मला काही वाटत नाही. मला बौद्ध साहित्य शिकवावं लागतं. त्यातून त्याचा आणि आपल्या रामायण-महाभारताचा काय संबंध आहे हे समजलं. मूळचं रामायण-महाभारत वेगळंच होतं. बौद्ध धर्म मधे खूप गाजल्यामुळं हे सगळं बदलावं लागलं. मग रामायण-महाभारतातले भीष्मासारखे नायक अहिंसाप्रेमी व्हायला लागले. ते कायम मारामारी करणारेच होते, पण त्यांना अहिंसेबद्दल बोलावं लागलं असं शिकवताना-वाचताना लक्षात येतं. त्याचा आपल्या लेखनावरही परिणाम होतो.


-‘हिंदू’ लिहीत असताना आपल्या आजूबाजूला जे काय घडतंय त्याचाही तुम्ही लेखनात वापर करून घेतला आहे..
-त्याची मी एक स्टट्रेजी केली की, ‘हिंदू’चा नायक खंडेराव पुरातत्त्वज्ञ आहे. एका बाजूला त्याचं खाजगी आयुष्य चालूच असतं. तो शाळेत जातो, मग त्याचा अभ्यासाचा विषय पुरातत्त्व होतो. हे चालू असतानाच त्याचे जे विचार असतात, त्याची जी स्वप्नं असतात, मध्येच त्याला काहीतरी भूतकाळातलं जाणवतं. पुरातत्त्व हाच त्याचा अभ्यासाचा विषय असल्याने काहीतरी करून तो त्यात जात असतो कायम. ते दुस-या भागात खूप वाढत जातं. त्याला लग्न करायचं असतं. त्यामुळे तो एका लैंगिक वातावरणातच असतो. म्हणजे जुन्या काळातली स्वयंवरं, लैिगक व्यवहार यातच त्याचं डोकं चालतं. म्हणून घरचे त्याला म्हणतात, ‘बाबा, तू लग्न तरी करून टाक. म्हणजे तुझ्या डोक्यातलं हे कमी तरी होईल.’ मग लग्न झाल्यावर त्या वेळची आपली संयुक्त कुटुंबव्यवस्था कशी होती? समजा तो अजिंठय़ात असेल तर अजिंठय़ातली त्या वेळची बौद्ध संस्कृती त्याच्या मनात आपोआपच येत असते. असं ते नैसर्गिक पद्धतीनं होत जातं. शेवटच्या भागात तो इंग्लंडला जातो, तोपर्यंत हे इतिहासाचं भूत त्याच्या डोक्यात असतंच कायम. ते त्याला सोडत नाही. मौर्य काळ, बौद्ध काळ, सिंधू काळ..आपल्या संस्कृतीचे जे देदीप्यमान काळ होते, मौर्य काळ विशेषत: त्या काळात बरेच शोध लागले. भौतिकबाबतीतही आपण मागे नव्हतो. आर्यभट्टापासूनचे लोक त्या काळात होऊन गेले. त्याची काय कारणमीमांसा असेल आणि आजची परिस्थिती किती वाईट आहे हे तो सारखं जोडून पाहत असतो. हे कुठल्याही विचार करणाऱ्या माणसाला करावंच लागतं. त्या काळात जर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आंतरजातीय विवाह होत असतील तर आज आपल्याला आपल्याच जातीतली मुलगी का स्वीकारावी लागते? आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जातीबाहेर का टाकलं जातं? हे विचार त्याच्या डोक्यात सतत चालतात आणि त्यातून कादंबरी पुढे जाते.


-तुम्ही स्वत: नोकरीच्या निमित्ताने अनेक शहरात राहिलात. पुणे, नगर, औरंगाबाद, गोवा, लंडन, मुंबई वगैरे. या तुमच्या प्रवासाचं खंडेरावशी काही नातं आहे का? कारण नगरला असताना तर तुम्ही काही काळ घोडय़ांच्या तबेल्यात राहिला होतात. त्यात तुम्हाला मलिक अंबरच्या काळातले काही अवशेष बघायला मिळाले..
-हे जे मी अनुभवलं ते जसंच्या तसं काही कादंबरीत घेता येत नाही. पण मी जे पाहिलंय त्या त्या ठिकाणी खंडेराव काहीतरी कारणानं बरोबर जातो. त्यामुळे ते मला काही प्रमाणात कादंबरीत वळतं करून घेता आलंय. त्यामुळे वास्तवाचा स्पर्श राहिला. कथावस्तूलाही ते पोषक ठरलं. गोव्यात असताना मी कॅथालिक लोकांमध्ये राहत होतो. ते सगळे हिंदूच आहेत मुळातले. त्यांना बळजबरीनं कॅथालिक केलं गेलं. त्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम झाले, त्यांचे रितीरिवाज, गाण्याच्या पद्धती, संगीत या सगळ्यांचा मला त्या काळात परिचय झाला. कॅथॉलिकांनी बौद्ध धर्मापासून खूप तत्त्वं उसनी घेतलेली आहेत. थोडक्यात, गोव्यात राहिल्यामुळे कॅथॉलिक धर्माचा परिचय झाला, तर अभ्यासामुळे ही सगळी बौद्ध धर्माची परंपरा आहे हेही पटलं.


-‘हिंदू’चे चार भाग असले तरी प्रत्येक भाग स्वतंत्र कादंबरी आहे?
-हो. पहिला भाग आता येतोच आहे. त्यातून लक्षात येईल की, खंडेरावला शिक्षण संपून घरी यावं लागतं तिथपर्यंतचा हा भाग आहे. तो पुरातत्त्वज्ञ झालाय आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं पोस्टिंग होतं इथपासूनचा भाग दुस-या कादंबरीत येतो. त्या नंतरच्या भागात त्याच्यावर सोन्याची नाणी चोरल्याचा काहीतरी आळ येतो. पण ती नाणी सोन्याची नव्हतीच असं नंतर सिद्ध होतं. पण त्यामुळे तो वैतागतो आणि परदेशात निघून जातो. तिकडे गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की, तिकडे काही इतिहासच नाही. ४००-५०० वर्षाच्या पलीकडे इंग्लंड काही जात नाही. याउलट आपल्याकडे तर २०००-४००० वर्षापूर्वीच्या गप्पा. पुरातत्त्वाच्या माणसाला काही हा देश उपयोगाचा नाही म्हणून तो सगळं सोडून परत येतो, असा तिसरा भाग आहे.


-चौथा भाग खंडेराव लंडनहून परत येतो, त्याचा आहे?
-लंडनचा आणि लंडनहून परत मायदेशात येतो असा त्याचा विषय आहे. त्याचं नाव अजून ठरायचं आहे. आधीचे भाग लिहून झालेत तसा अजून हा भाग लिहून झाला नाही.


-पहिल्या कादंबरीचं जे उपशीर्षक तुम्ही दिलं आहे, जगण्याची समृद्ध अडगळ. ते जरा स्पष्ट करून सांगा ना...
-मी एकदा आमच्या एका देशपांडे नावाच्या मित्राकडे गेलो होतो. पुण्यात शनिवारवाडय़ाजवळ त्याचं जुनं घर आहे. घरात आजी-आजोबा, आजोबांची खाट, लहानपणीचे खेळ, मोडकी सायकल, काठी, आई-वडिलांचं सामान घरभर.. तो म्हणाला, ‘आमच्या घरात फार गर्दी आहे.’ म्हटलं, ‘चांगलं आहे. ही जगण्याची समृद्ध अडगळच आहे. याच्याशिवाय जगण्याला काय अर्थ आहे?’ नाहीतर चकचकीत घरं..टीपॉय, खुर्ची, कोच त्यांच्या त्यांच्या जागेवर हे काही जगणं नाही. जगणं म्हणजे अडगळ झालीच पाहिजे. त्या वेळी मला हे शीर्षक सुचलं.
‘हिंदू’ची ही नावं माझ्या कवितातूंन घेतली आहेत. त्या त्या वेळी ज्या कविता सुचल्या त्याच्याशी ती जुळणारी आहेत. ‘साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ’ अशी ती ओळ आहे. म्हणजे घर जगण्याच्या अडगळीने भरलं पाहिजे. रिकामं राहिलेलं काही घर नाही. ते आपल्या संस्कृतीचंही प्रतीक आहे. आपली संस्कृतीही भरलेलीच आहे. अमेरिकेची संस्कृती खूप चकचकीत आणि श्रीमंत आहे, पण ती रिकामी असते, असं तिथले लोक सांगतात. घरात भावंड नाही, वडील नाहीत, आई नाही. आजी-आजोबा तर सोडाच, ते माहीतही नसतात कोणाला! आजी कुठे आहे आणि तिचं नाव काय आहे हे कुठल्याही अमेरिकन मुलाला माहीत नसतं हल्ली. आपल्याकडे तर पणजोबा-खापर पणजोबा असतात. त्यांच्याकडं आपलं येणं-जाणं असतं, आजोळ असतं. अनेक नातेवाईक असतात. कुणी पोरकं झाला की, तो कुणा मामीकडे, कुणा भावाकडे राहतो. हे आपल्याकडे चालतं. ही समृद्धी संबंध देशभर पसरलेली आहे.


-म्हणजे अमेरिका-लंडन यांच्या संस्कृतीपेक्षा आपली संस्कृती श्रेष्ठ आहे?
-समृद्ध. श्रेष्ठ म्हणणं चुकीचं आहे. समृद्धी म्हणजे प्लेण्टी असणं. आपल्याकडे गावातल्या प्रत्येकाला प्रत्येक जण ओळखत असतो. कुटुंब असतं. त्यात आजी-आजोबापासून आत्या, मावशी, बहिणी, चुलते-पुतणे सगळे असतात. भावंडं खूप असतात. ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अमेरिकेत बहीण म्हणजे काय किंवा भाऊ कोण आहे हे माहीत नसतं. एकच मूलाचं फॅड असतं. आपल्याकडे ही परिस्थिती येईलच पण आज तरी आपल्याकडे ही समृद्धी काही कमी झालेली नाही. याला काही लोक दारिद्रय़ाचं लक्षण म्हणतीलही पण हा आपण सांभाळलेला वारसा आहे. तो आपण मायनस समजता कामा नये. अडगळ आहेच, पण ही समृद्धीची अडगळ आहे. ती त्रासदायक नाही. त्याच्यातून संस्कृती वाढते आणि नवीन नवीन बदल होतात. लग्न झालं की घर सोडा वगैरे असं आपल्याकडे होत नाही. तिकडे लग्न झालं की, ‘अरे, तू अजून आई-बापांकडेच कसा राहतो?’ असं विचारलं जातं. आपल्याकडे तर लग्न काय अन् मुलं काय, नातवंडांपर्यंत सगळं एकत्रच चाललेलं असतं. मानसोपचारतज्ज्ञांचंही असं म्हणणं आहे की, लहान मुलाला घरात जितकी माणसं जास्त तितकी त्याची मॅच्युरिटी जास्त असते.


-या टोकाच्या व्यक्तिवादाची शिकार आपल्याकडच्या संस्था, चळवळीसुद्धा झालेल्या आहेत..
-या सगळ्याची सुरुवात आगरकरांनी केली. ह. ना. आपटे यांच्या कादंबऱ्यातही हा व्यक्तिवाद येतो. त्यांची ‘मी’ नावाची एक कादंबरी आहे. त्यात सासू सुनेचा छळ करते. छळ करणाऱ्या सासवा असतात तशा प्रेम करणाऱ्याही सासवा असतातच. पण घरदार सोडून एकटं राहणं हे त्यांना फार सुधारणेचं लक्षण वाटायचं. याची दुसरी बाजू त्यांच्या लक्षात आली नाही. मूल झाल्यावर ती लक्षात येते. तिकडे तर म्हाताऱ्या बाया तीस-तीस, चाळीस-चाळीस वर्षे एकटय़ा राहतात. वाढदिवसाला मुला-नातवाचा फोन आला तरी खूप झालं असं त्यांना वाटतं. आई नाही, बाप नाही, अशी तिकडे अनेक कुटुंब असतात. दुस-याच्या संस्कृतीवर टीका करणं बरोबर नाही पण आपण दारिद्रय़च समजू या गोष्टीला. व्यक्तिवादाचा शेवट यात होणार असेल तर तो व्यक्तिवाद काही कामाचा नाही. आणखी एक गडबड अशी की, मुळात व्यक्तिवादाचाच आपल्याकडे चुकीचा अर्थ लावला जातो. आपले लोक मुळात व्यक्तिवादीच आहेत. ते एका ठरावीक पातळीपर्यंत सहन करतात आणि मग एकदम बंड करतात. आपल्याकडे जेवढी बंडं झाली तेवढी जगात इतर कुठेही झाली नाहीत. व्ही. एस. नायपॉलने त्यावर ‘इंडिया- अ मिलिअन म्युटिनीज् नाऊ’(१९९०) हे पुस्तक लिहिलं आहे. आधी तो ‘अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’ (१९६४) म्हणायचा. या म्युटिनी आधीसुद्धा होत्या, नंतरसुद्धा होत्या. हे नायपॉलच्या उशीरा लक्षात आलं. माणूस मुळात एकटा नसतोच. तो वेगवेगळ्या गोष्टींशी जोडलेलाच असतो. एकटं राहायचं आणि बाकी सगळं कट ऑफ करायचं हा दुराग्रह झाला. आपल्याकडे नव्यकाव्यात हे मोठय़ा प्रमाणावर झालं. असं कधी नसतं.


-म्हणजे जगण्याची अडगळच तुम्हाला समृद्ध करत राहते.
-हो. ही समृद्धी तुम्हाला एकटं राहू देत नाही. ती कशाशी तरी जोडून घेते. त्यात मोठे समूहसुद्धा येतात. गाव येतं, जमात येते, जात येते, भाषा येते, प्रांत येतो. संबध मराठी भाषिक असणं हे जोडून घेणंच आहे. आम्ही सिमल्यात आठ-दहा मराठी कुटुंब राहतो. पण ते सगळे गणपतीच्या वेळी एकत्र येतात. हे जोडलं जाण्याचं लक्षण आहे.


-पण राज ठाकऱ्यांसारखे काही लोक आहेत. त्यामुळे तिकडे सिमल्यात तिथल्या लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला का? त्यात काही फरक झाला का?
-हो, झाला ना. गैरसमज जास्त झाले. मग त्यांना सांगावं लागलं की, मुंबईत आमच्या बिल्डिंगच्या खाली बिहारी माणसं राहतात. त्यांच्याशी आमचे फार चांगले संबंध आहेत. राज ठाकरेंसारखे काही सगळे लोक वागत नाहीत. मराठी लोकांनी कधीही कुणाला हुसकून लावलेलं नाही. राजकारणासाठी कुणी तसं करत असेल तर मीडियानं त्याला तेवढं महत्त्व देणं हेच मुळात चुकीचं आहे. ते काही प्रातिनिधिक उदाहरण नाही. मीडियामुळे गैरमसमज मात्र जास्त होतात. मुंबईभर लाखो भारतीय लोक राहतात आणि त्यांचं चागलं चाललेलं आहे. त्यांच्याशिवाय आपलं घर चालणारच नाही. आपला वॉचमन, इस्त्रीवाला, दुधवाला, भाजीवाले हे सगळे परभाषिकच लोक आहेत. त्यांना आपण बाहेर हाकलून कसं चालेल?


-‘हिंदू’च्या दुस-या भागाकडे वळू या. या भागाला तुम्ही ‘केवळ वंशवृक्षपारंबी’ असं म्हटलं आहे.
-या काळात खंडेराव लग्न करतो, त्याला मुलं होतात. आपली गृहस्थाश्रमाची आपली पुरातन संकल्पना आहे. त्याचं एक तत्त्वज्ञान आहे. मुलं-आई हे अतिशय शुद्ध असं नातं असतं. मुलांमुळे प्रेमाची एक वेगळी लेवल लक्षात येते. थोडक्यात वरती मुळं आणि खाली फांद्या असा उलटा वाढत जाणारा हा वंशवृक्ष आहे.


-तिसरा जो भाग आहे, त्याला तुम्ही ‘बाहेर काळ तर मोठा कठीण आहे’ असं म्हटलंय. नावावरून तरी हा महत्त्वाचा भाग आहे असं वाटतं.
- खंडेराव देश सोडून लंडनला जातो तो हा भाग आहे. हा शेतकरी कुटुंबातला मुलगा, एकत्र पद्धतीनं वाढलेला. घर-दारं, गाई-म्हशी, शेत, झाडा-झुडपांवरसुद्धा त्याचं प्रेम असतं. ते सर्व टाकून, विकून तो लंडनला जातो. सध्या आपल्या देशात मोठय़ा प्रमाणावर एनआरआय होत चाललेत बघा, ते बरंचसं त्यात आहे. फेमिनिझम आहे, कुटुंब संस्था आहे. हे परदेशात जाणं म्हणजे नेमकं काय ते या भागात येतं. सोन्याच्या नाण्यांच्या चोरीचं प्रकरण खंडेराववर शेकतं, त्यात त्याला बाहेरून बोलावणं येतं. मी लंडनला असताना माझी परिस्थिती तशीच होती, वारंवार मुलाखत देऊनही ते वरची जागाच देत नव्हते. तसंच खंडेराव लंडनला जातो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, काळ फार कठीण असतो. अशा वेळी तुम्हाला आतही राहता येत नाही आणि बाहेर जाणं एक चॅलेंज असतं. तो शेत विकतो, घर विकतो. कायमचंच जायचं म्हणून सर्वाना गुडबाय करतो. कारण त्याला तो निर्णय घ्यावा लागतो. तर शेवटच्या चौथ्या भागात परदेशात गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की, आपली संस्कृती किती समृद्ध होती, त्यात किती पदर होते! त्याच्या गावात दहा वेगवेगळ्या जातींचे लोक होते. वेगवेगळ्या सात-आठ धर्माचे लोक होते. कधी कुणाशी कुणाचं भांडण नाही, तंटा नाही. ते प्रेमाने राहत होते. हे नेमकं परदेशात नाही. तिथं एकाच जातीचे, एकाच भाषेचे आणि एकाच धर्माचे लोक झापडं लावल्यासारखी जगतात.


-लंडनमध्ये तर एकाच भागातल्या लोकांची घरेसुद्धा एकाच छापाची असतात..
-ते राहूच देत नाहीत दुस-यांना. मी लंडनमध्ये असताना अनेक दिवस प्रयत्न करत होतो, पण मला गोऱ्या लोकांच्या वस्तीत घर मिळत नव्हतं. इतकी परिस्थिती भीषण आहे तिकडे. आपल्याकडे असं कधी होत नाही. जातीभेद-वर्णभेद आपल्याकडेही आहे, पण त्याची इतकी तीव्रता नाही. सगळे लोक एकमेकांना सांभाळून राहतात. म्हणून खंडेराव ठरवतो की, इथे इतिहासच नाही तर इथे राहा कशाला? इथे फक्त पैसे मिळतात! सगळ्या एनआरआय लोकांचं तेच म्हणणं असतं की, इकडे रुपयात काहीच मिळत नाही, तिकडे डॉलरमध्ये इतके मिळतात! ते बिनकामाचं असतं असं मानून खंडेराव पुन्हा आपल्या देशात परततो.


-‘हिंदू’चा नायक खंडेराव हा सीकेपी आहे का?
-नाही. खंडेराव हे नाव सगळ्याच जातींमध्ये असतं. आपल्या महाराष्ट्रभर खंडेराव हे नाव आहे. महार, कोळी लोकांमध्ये खूप आहे. सीकेपींचं मला माहीत नाही, पण खंडोबा आणि भवानी ही महाराष्ट्राची दैवतं आहेत. कृष्ण-राम हे नंतर आले. या सर्व अनार्य देवता आहेत, त्यामुळे त्या संबंध महाराष्ट्राच्या आहेत. सोन्थायमरनं खंडोबावर मोठा ग्रंथ लिहिलाय. त्यात त्यानं खंडोबा हे महाराष्ट्राचं दैवत आहे हे मांडलंय. पांडुरंग हे नाव मी ‘कोसला’च्या नायकासाठी घेतलं होतं, ते अवघ्या महाराष्ट्रासाठी प्रातिनिधिक होतं. तसंच खंडेराव हे नाव आहे. त्यामागे आदीदैवतांचं नाव ठेवावं असा उद्देश नव्हता. ते एक कॉमन नाव आहे. खरं तर आधी ते विठ्ठल असं ठेवायचा विचार होता, पण ते त्याच्या वडिलांचं नाव आहे. शिवाय ते काही सगळ्या महाराष्ट्राचं होत नाही, कारण महानुभवांचा काही विठ्ठल नसतो.


-खंडेराव पुरातत्त्वज्ञ आहे. तो सारखा इतिहासात डोकावत असतो. म्हणजे कादंबरीचं स्वरूप ऐतिहासिक कादंबरीसारखं आहे?
-नाही. ऐतिहासिकता दुस-या भागात मोठय़ा प्रमाणावर येते खरी पण ती पहिल्या भागात फारशी नाही. वर्तमानकाळ त्यात जास्त आहे. मात्र दरवेळेला वर्तमानकाळाला फाटे फुटून तो सारखा मागे जातो. कारण त्याचा धंदाच पुरातत्त्वशास्त्राचा असतो. एखाद्या लेण्याची दुरुस्ती करायची असेल तर त्याचा अभ्यास करावा लागतो. ही चित्रं बौद्ध काळातली आहेत का, शैव आहेत का वैष्णव आहेत हे पाहावं लागतं. कुठल्याही शिल्पाचा एक विशिष्ट काळ असतो. त्या काळातच ते तयार होतं. आजिंठय़ात इ. स. दुसरे शतक (वाकाटक) ते इ. स. चौथे शतक (गुप्त काळ) या काळात शिल्पं कोरण्यात आली. त्या प्रत्येक काळाची त्यावर छटा आहे. त्यामुळे तसा अभ्यास करूनच डागडुजीचं काम करावं लागतं. त्यातून खंडेरावला आपोआपच इतिहासाचं भान येत जातं. त्यामुळं रुढार्थाने ही ऐतिहासिक कादंबरी नाही. आपला भूतकाळ हा आहे नेहमी वर्तमानाचाच भाग असतो.


-म्हणजे ‘हिंदू’च्या मध्यमातून तुम्हाला एक पोलिटिकल स्टेटमेंट करायचं आहे?
-अगदी बरोबर. मात्र मी ते राजकीय म्हणून करत नाही. पण ते राजकीय होऊ शकतं. मला एक व्याख्या अशी करायची आहे की, या पद्धतीनं जगता आलं तर आपले अनेक प्रॉब्लेम कमी होतील. आपली विविधता जपता येईल. एरवी आपल्याला ते टिकवता येणार नाही. आपल्या संसदीय लोकशाहीचे काय वांधे झाले ते आपण पाहतो आहोतच.


-‘कोसला’ तुम्ही १९६३ साली लिहिली. त्याचा नायक पांडुरंग सांगवीकर अजूनही टिकून आहे. पण ‘हिंदू’चा नायक खंडेराव त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्या खूप पुढे जाणारा आहे. जगण्याचं व्यापक भान देणारा आहे असं वाटतं..
-लेखकाची त्या त्या वेळची जी संवेदनशीलता असते त्यानुसार तो नायक निर्मित असतो. तो नुसता लेखकाच्या आतून येत नाही तर तो त्या वेळच्या समाजाची सुद्धा एक गरज म्हणून येतो. असं म्हणता येईल की, जे नायक गाजतात, ती त्या काळाची गरज असते. काही कादंबरीकार आपले नायक तयारच करतात पण ते काही सगळ्यांचे होत नाहीत. जे नायक सगळ्यांचे झालेले असतात ते सामाजिक नेणीवेतून आलेले असतात. ‘कोसला’च्या वेळी खेडय़ातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या पहिल्या पिढीवर जे दबाव होते, त्यामुळे त्या काळात तसाच नायक येणं गरजेचं होतं. तेव्हा वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ आली, रणजित देसाईंची ‘स्वामी’ आली. ययाती, माधवराव पेशवा हे नायक त्या वेळी आले. पण पांडुरंग सांगवीकर हा जास्त लोकांचा नायक झाला. तो पुढच्या पिढीत टिकला. त्यानंतरच्या पिढीतही टिकला. आता चौथ्या पिढीतही तो टिकून आहे. त्याऐवजी मी दुसराच नायक लिहिला असता, श्री. ना. पेंडसेंच्या नायकासारखा, यशस्वी असा, तो पास होतो, फर्स्टक्लास येतो तर कदाचित लोकांनी तो रिजेक्ट केला असता.


‘हिंदू’त मी असा प्रयत्न केलाय की, आज जे आपल्यावर दबाव आहेत, एनआरआय होणं, परदेशातल्या नोकऱ्या इथपासून ते शिवसेना-राज ठाकरे यांचं काय करायचं? कॉंग्रेसवाल्यांचं काय करायचं? आपल्या जातीजातींचं काय करायचं? हे सगळे दबाव आपल्या मनात असतातच. बाहेर कुणी बोललं नाहीतरी ते आत मनात सतत छेडत असतात. या सर्वाना हात घालणं अणि तसाच नायक तयार करणं हे मोठं आव्हान असतं. बघू या ते मला ‘हिंदू’तून किती जमलंय!


-तुम्ही आधी म्हणालात की, ‘ ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ बदलवणं हे माझ्यासाठी एक चॅलेंजच आहे.’
-मी एकटय़ाने ते बदलून उपयोगाचं नाही. इतरांच्या नेणीवेतून ते आलं आणि माझ्या लेखनाशी जुळलं तर ते होईल. नाही तर काही इलाज नसतो. कारण ते काही आपोआप ठरत नाही. त्याच्यासाठी काही व्होटिंग होत नाही. दुस-या पिढीतल्या लोकांना आधीच्या पिढीतल्यांनी वाचायला लावलं तर ते एक यशस्वी चॅलेंज ठरतं. पांडुरंग सांगवीकर टिकला. पण लिहिताना मला ते माहीत नव्हतं. मात्र त्या वेळी फडके-खांडेकर या गाजलेल्या लेखकांसारखा आपला नायक करायचा नाही एवढं मला माहीत होतं. ते माझं अगदी ठरलेलं होतं.


-‘हिंदू’चा पहिला भाग १५ जुलैला येतोय खरा, पण पुढचा भाग कधी येणार?
-पुढच्या भागात मी अध्र्यावर आलोय. तो पाच-सहा महिन्यात होईल. आता पहिला भाग आला म्हणजे दुसरा भागही ताबडतोब देणं ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी आणखी सहा महिने मला पुन्हा कुठेतरी जाऊन बसलं पाहिजे. ते सहा महिने मिळाले की मी दुसरा भाग नक्की पूर्ण करतो.


(‘दै. प्रहार’मध्ये संपादित स्वरूपात प्रकाशित झालेली मूळ मुलाखत.) (नेमाडे छायाचित्र-संदेश घोसाळकर)

Monday, June 21, 2010

प्रधान मास्तरांची श्रीशिल्लक



राजकीय विचारसरणींची वैचारिक चर्चा ललित अंगाने करणारे आणि त्यासाठी पत्रे, आठवणी-गप्पा आणि ञ्ज्लॅशबॅक अशा लेखकीय तंत्रांचा मार्मिक वापर करणारे ‘साता उत्तरांची कहाणी’ हे पुस्तक, हीच ग. प्र. प्रधान यांची श्रीशिल्लक ठरेल.. प्रधान नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले; पण त्यांचे हे पुस्तक कालातीत आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

प्रधान मास्तर म्हणजेच मूर्तिमंत चैतन्य, चारित्र्यसंपन्नता आणि नीतिमत्ताही. मास्तर चारित्र्यसंपन्न आणि नीतिसंपन्न होते यासाठी वेगळ्या शब्दांची आणि विशेषणांची गरज नाही. खरे तर मास्तरांची अनेक रूपे सांगता येतील. शिक्षक, लेखक, कार्यकर्ता,आमदार, ‘साधना’चे संपादक इत्यादी. पण मास्तर खऱ्या अर्थाने समाजशिक्षक होते आणि तीच त्यांची खरी ओळख होती. मास्तरांनी समाजशिक्षक म्हणून केलेले काम हे त्यांचे मोठे योगदान आहे. मास्तर मूलत: साहित्याचे विद्यार्थी. त्यांचे साहित्यावर मनापासून प्रेम होते. मास्तरांनी लेखनही भरपूर केले. विशेषत: अलिकडच्या पाच-सात वर्षात तर खूपच. शनिवार पेठेतल्या घरातून हडपसरच्या ‘साने गुरुजी रुग्णालया’त गेल्यावर त्यांच्या लेखनाला आणखीनच बहर आला. शिवाय त्यांचा लेखनाचा झपाटाही मोठा विलक्षण होता. त्यामुळे अलिकडच्या दोनेक वर्षात त्यांनी पंधरा-सोळा पुस्तके लिहिली. ‘आठा उत्तरांची कहाणी’च्या वेळचा प्रसंग. या पुस्तकाचे लेखन पूर्ण करून त्यांनी ते एका तरुण मित्राला वाचायला दिले होते. ते वाचून तो त्यांना म्हणाला, ‘मजा येत नाही वाचताना.’ त्यावर मास्तर शांतपणे त्याला म्हणाले,‘या वयात माझ्याकडून आणखी काय अपेक्षा करणार?’ एका अर्थाने ते खरेच होते. माझ्या मित्राचा त्यांना एवढय़ा स्पष्टपणे सांगण्याचा हेतू एवढाच होता की, ‘साता उत्तरांची कहाणी’ वाचताना जी मजा येते, ती ‘आठा उत्तरांची कहाणी’ वाचताना येत नाही.’ ‘साता उत्तरांची कहाणी’ हे मास्तरांचे काहीसे दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वाचे पुस्तक. ते २ ऑक्टोबर १९८१ रोजी मौज प्रकाशन गृहाकडून प्रकाशित झाले. या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपायला मात्र सात वर्षे लागली. आणि दुसरी आवृत्ती संपायला तर सतरा-अठरा वर्षे. सध्या तिसरी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. मास्तरांचे हे पुस्तक फारसे वाचकप्रिय ठरले नसले, तरी ते त्यांचे सर्वात उत्तम पुस्तक आहे. १९४० ते १९८० या कालखंडात देशात खूप घडामोडी घडल्या. त्याविषयी प्रास्ताविकात मास्तरांनी म्हटले आहे : या कालखंडातील सर्व साधनांची जुळणी करून वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून तपशिलाची चूक होऊ न देता इतिहास लिहिणे हे मोठे काम आहे. हे पुस्तक लिहिताना तो उद्देश नव्हता. या कालखंडातील विविध चळवळीत सहभागी होताना वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात जी आंदोलने झाली त्यांचे चित्रण करण्याचा या पुस्तकात मी प्रयत्न केला आहे.. (वा. म. जोशी यांनी) ‘रागिणी’ या कादंबरीत ज्याप्रमाणे काव्य-शास्त्र-विनोद आणला आहे, त्याप्रमाणे राजकारणातील विविध विचार व समस्या यांची चर्चा करावी असे मला वाटले. मात्र माझं हे पुस्तक ही रूढार्थाने कादंबरी नाही. राजकीय घटनांच्या विस्तीर्ण व बदलत्या पटाची पार्श्वभूमी घेऊन विचारांचे व भावनांचे चित्रण करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. प्रत्येक विचारसरणीची एक व्यक्तिरेखा आणि त्यांना जोडणारा निवेदक अशी या पुस्तकाची मांडणी आहे. समाजवादी (खानोलकर ), साम्यवादी (वैद्य), रॉयवादी (एम. आर.), पत्री सरकार (देशमुख), आंबेडकरवादी (खैरमोडे), हिंदुत्ववादी (जोशी) आणि गांधीवादी (सामंत) अशा या सात विचारसरणी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे. या मित्रांना आपल्याला पटलेला वा भावलेला विचार घेऊन आपण आधुनिक भारत घडवू शकतो, असा आत्मश्विास असतो. आधुनिक भारत घडवण्याची ही त्यांची सात उत्तरे म्हणजे, ‘साता उत्तरांची कहाणी.’ या परस्परविरोधी विचारसरणींचे लोक प्रधान मास्तरांचे चांगले मित्र होते. आणि निदान त्या काळी तरी या विचारसरणींच्या लोकांमध्ये इतरांच्या विचारांबद्दल आदरही होता; भले त्यांची मते पटत नसली तरी. या प्रत्येक विचारसरणीच्या दोन-दोन तीन-तीन लोकांशी प्रधान मास्तरांनी चर्चा केली. पुस्तकाचा खर्डा त्यांना दाखवला. त्यांच्याकडून ‘हेच तुमचे म्हणणे आहे ना, हेच तुमचे युक्तिवाद आहेत ना’ असे वदवून घेतले आणि मगच पुस्तक फायनल केले. त्यामुळे या पाचही विचारसरणींची या पुस्तकातून चांगल्या प्रकारे ओळख होते. त्यांची सामर्थ्ये समजतात, तसेच त्यांच्या मर्यादांचीही ओळख होते. या प्रवाहांची चांगल्या प्रकारे ओळख झाल्याशिवाय भारतीय राजकारण समजून घेता येत नाही. मराठीत राजकीय कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, पण अशा पद्धतीचे पुस्तक मात्र हेच एकमेव म्हणावे लागेल. त्यामुळे प्रत्येक मराठी तरुणाने हे पुस्तक वाचायला हवे. ज्यांना राजकीय विचारप्रणाल्या समजून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी तर हे पुस्तक ‘मस्ट’ आहे. त्याशिवाय भारतीय राजकारण आणि समाजकारण समजून घेता येणार नाही. खरे तर हा स्वतंत्र सात पुस्तकांचा ऐवज आहे. पण मास्तरांनी तो अवघ्या पाचशे पानांत एकाच पुस्तकात मांडून दाखवला. तोही अतिशय साध्या, सोप्या भाषेत. एरवी वैचारिक चर्चा हा तसा काहीसा रुक्ष आणि बोजड विषय. पण मास्तरांनी त्याची मांडणी ललित अंगाने करत पत्रे, आठवणी, गप्पा, ञ्ज्लॅशबॅक आणि चरित्र अशी करत तो सुबोध करून टाकला आहे. त्यामुळे पुस्तक एकदा हातात घेतले की, वाचून होईपर्यंत खाली ठेववत नाही. प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळते तर उत्तरातून हुशारी कळते, असे म्हणतात. तो समसमा योग या पुस्तकाच्या पानोपानी विखुरला आहे. आपल्या विचारांशी सहमत नसणाऱ्यांचेही म्हणणे कसे समजून घ्यावे आणि प्रतिवाद कायम ठेवूनही त्यांच्याशी कशी चांगल्या प्रकारे मैत्री करता येऊ शकते,याचे मूर्तिमंत उदाहरण स्वत: प्रधान मास्तरच होते. हे पुस्तक त्या अर्थानेही त्यांच्या कलात्मकतेचा सर्वोच्च आविष्कार मानता येईल. भारतीय राजकारणाची आणि समाजकारणाची जातकुळीलीच त्यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहे. एकोणिसाव्या शतकाबद्दल असे म्हटले जाते की, ते मूलगामी परिवर्तनाचे शतक होते. त्यामुळे आजची कुठलीही समस्या घ्या, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कलासाहि त्य-संस्कृती, त्याचा ऊहापोह आणि त्याची उत्तरेही एकोणिसाव्या शतकात सापडतात. या शतकाकडे गेल्याशिवाय आजच्या कुठल्याच प्रश्नाची उकल होऊ शकत नाही. ‘साता उत्तरांची कहाणी’ तील सात विचारप्रवाह याच शतकात उदयाला आले. त्यांच्या बहराचा काळ (रॉयवाद वगळता) विसाव्या शतकातला होता. तो नेमका काय आणि कसा होता हे मास्तरांच्या या पुस्तकात वाचायला मिळते. म्हणूनच त्याचे महत्त्व मोठे आहे. आता रॉयवादी माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही, पण एकेकाळी या ‘इझम्स’ने महाराष्ट्रातील अनेकांना कसे आकर्षित केले होते, रॉयवाद नेमका काय होता हेही समजते. या सर्व कारणांमुळे प्रधान मास्तरांचे हे पुस्तक कालातीत आहे. मास्तरांनी लिहिलेले कुठले पुस्तक पन्नास-साठ वर्षानीही शिल्लक राहील तर ते, ‘साता उत्तरांची कहाणी’!

आपला पण परका लेखक



























मनोहर माळगावकर हे महाराष्ट्रीय पण इंग्रजीत लिहिणारे लेखक. त्यामुळे त्यांना नाव-प्रसिद्धी मिळाली ती इंग्रजी वाचकांमध्ये. आणि याच कारणामुळे ते आपले असूनही काहीसे परकेच पाहिले. पण त्यांच्या साहित्याचे विषय मात्र शेवटपर्यंत महाराष्ट्रीय म्हणता येतील असेच होते. नव्हे तोच त्यांचा ‘यूएसपी’चा होता.


स्वातंत्र्योत्तर दोन दशकांत मुल्कराज आनंद, आर. के. नारायण, खुशवंतसिंग, कमला मार्कण्डेय या भारतीय लेखकांनी इंग्रजीत लेखन करून मोठे नाव कमावले. या नामावलीत बसणारे आणि त्यांना समकालीन असणारे आणखी एक नाव म्हणजे मनोहर माळगावकर. माळगावकरांनीही कादंब-या, कथा आणि निबंध या प्रकारात प्रामुख्याने लिहिले. त्यांच्या ब-याच कादंब-यांना ब्रिटिशकालीन भारताची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे एका अर्थाने त्या या काळाचा दस्तऐवज ठरतात. भारत-ब्रिटिश नातेसंबंध आणि पूर्व-पश्चिमेतील झगडा ही त्यांच्या कादंब-यांची वैशिष्टय़े मानली जातात.




मनोहर माळगावकर यांचा जन्म 12 जुलै 1913 साली मुंबई येथे झाला. घराणं गर्भश्रीमंत. माळगावकरांचं कॉलेज शिक्षण मुंबई विद्यापीठात झालं. पुढे त्यांनी ‘मराठा लाइट इन्फन्ट्री’मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून नोकरी केली. भारत-पाक फाळणीच्या काळात आलेल्या विदारक अनुभवानंतर मात्र त्यांनी ती नोकरी सोडली. लष्करातून बाहेर पडल्यानंतर नंतर त्यांनी बेळगाव-गोव्याच्या सीमेवरील जगलपेट येथे निसर्गरम्य ठिकाणी सुंदर बंगला बांधला आणि पुढचा सर्व वेळ लेखन करण्यात घालवण्याचे ठरवले. माळगावकरांचा हा बंगला एकदम घनदाट म्हणाव्या अशा जंगलात आहे. तरीही तो अत्याधुनिक सुखयोयींनी युक्त असा आहे. त्यामागे सुंदर डोंगर आहे. याच बंगल्यात 14 जून 2010 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.




माळगावकरांसारखा ब्रिटिश शिस्तीत वाढलेला आणि ब्रिटिश शिष्टाचार अंगवळणी पडलेला लष्करी अधिकारी एकदम ललितलेखनाकडे कसा काय वळला? त्याचा किस्सा त्यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता. त्यांच्या एका मित्राने थोडेफार पैसे मिळवण्यासाठी माळगावकरांना लघुकथा लिहायला सुचवले. त्यानुसार केवळ पैशाच्या अभिलाषेने त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. त्यांची पहिली लघुकथा ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’च्या अंकात प्रसिद्ध झाली आणि त्यांच्या ललितलेखनाचा श्रीगणेशा झाला. माळगावकर म्हणत, ‘‘लेखन हा माझ्या आयुष्यातील तिसरा व्यवसाय आहे. यापूर्वी मी लष्करी अधिकारी होतो आणि त्याच्याही अगोदर मी शिकारींची व्यवस्था करत असे.’’ यामुळेच वयाच्या 47व्या वर्षी त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.




इतिहास हा त्यांचा खास आवडता विषय. त्यांच्या ब-याच कादंब-यांना ही पार्श्वभूमी आहेच, पण याशिवाय ‘पवार्स ऑफ देवास सीनिअर’, ‘द सी हॉक- लाइफ अ‍ॅण्ड बॅटल्स ऑफ कान्होजी आंग्रे,’ आणि ‘छत्रपतीज ऑफ कोल्हापूर’ ही त्यांची पुस्तके याच इतिहासप्रेमातून लिहिली गेली आहेत. कोल्हापूरचे छत्रपती हे माळगावकरांचे मित्र होते. तेथील संग्रहालयाच्या उभारणीसाठीही माळगावकरांनी बरीच मेहनत घेतली आहे. कोल्हापूरच्या राजघराण्याविषयी त्यांना विशेष आस्था होती.




‘प्रिन्सेस’ ही माळगावकरांची कादंबरी 1963 साली प्रकाशित झाली. ही काही त्यांची पहिलीच कादंबरी नव्हे. पण ती इंग्लंडच्या प्रकाशकाने प्रकाशित करणे आणि लंडनमध्ये तिचे प्रकाशन होणे या गोष्टी माळगावकरांच्या पथ्यावर पडल्या. ही कादंबरी प्रचंड गाजली. तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीने माळगावकरांना प्रचंड पैसा मिळवून दिला. या पुस्तकाची रॉयल्टी त्यांना ब्रिटिश पौंडात मिळत असे. नंतर मात्र माळगावकरांचं प्रत्येक पुस्तक इंग्लंडमध्ये प्रकाशित होऊ लागलं आणि भारतात त्याच्या स्वस्त आवृत्त्या निघू लागल्या. आता त्यांच्या ब-याच कादंब-या भारतात मिळतात.




‘डेव्हिल्स विंड’ ही त्यांची नानासाहेब या 1857च्या उठावातील नेत्याविषयीची चरित्र कादंबरी. ‘द बेंड इन द गॅजेस’ आणि ‘प्रिन्सेस’ या त्यांच्या दोन कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्या आहेत. ‘द सी हॉक-लाइफ अ‍ॅण्ड बॅटल्स ऑफ कान्होजी आंग्रे’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद तर दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे यांनी केला आहे. ‘इनसाइड गोवा’ हे माळगावकरांचे एक वैशिष्टय़पूर्ण पुस्तक. या पुस्तकासाठी त्यांचे जिवलग मित्र आणि प्रसिद्ध कार्टूनिस्ट मारिओ मिरांडा यांनी चित्रे काढली आहेत. गोव्याचा प्राचीन इतिहास, तेथील नमुनेदार माणसे आणि गोव्याच्या अंगाखांद्यावरील पोर्तुगीजपणाच्या खुणा यामुळे हे पुस्तकही खूप गाजले होते. ‘द मॅन हू किल्ड गांधी’सारखे पुस्तक त्यांनी लिहिले, त्यामागेही त्यांच्यातील संशोधक वृत्ती कारणीभूत असावी.




माळगावकर माणूस म्हणूनही ग्रेट होते. अत्यंत सुस्वभावी आणि आदरातिथ्यशील होते. पाहुणचार करायला त्यांना खूप आवडत असे. आपल्या सगळ्याच पुस्तकांच्या अनुवादाचा करार त्यांनी पुण्यातील ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’शी करायची तयारी दाखवली होती. पण काही कारणाने तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची सर्व पुस्तकेही मराठीत येऊ शकली नाहीत. मराठी प्रकाशन परदेशातील प्रकाशन संस्थासारखं चालावं, असं त्यांना वाटत असे.




1960-70च्या दशकात मनोहर माळगावकर यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. सी. राजगोपालाचारी, मिनू मसानी, पिलू मोदी, मधू मेहता आदींच्या ‘स्वतंत्र पक्षा’त ते गेले होते. पण बुद्धिवाद्यांचे हे राजकारण त्यांना मानवले नाही. या पक्षाकडून ते लोकसभेच्या निवडणुकीसाठीही उभे राहिले खरे, परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. शिकारीची मात्र त्यांना मनस्वी आवड होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी काही वाघांची शिकारही केली. पण नंतर त्यांनी शिकार करणे सोडून दिले. ते ‘वाघ बचाव’ मोहिमेत सामील झाले, अगदी पर्यावरणवादी बनले.




माळगावकरांचे अगदी अलिकडचे लेखन म्हणजे, त्यांनी आपले मित्र मारिओ मिरांडा यांच्याविषयी लिहिलेला दीर्घ लेख. 2007 साली मारिओ यांच्या समग्र कारकीर्दीचा आढावा घेणारे पुस्तक गेरार्ड डा कुन्हा यांनी गोव्यातून प्रकाशित केले. त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच माळगावकरांनी मारिओचे व्यक्तिचित्रण करणारा उत्तम लेख लिहिला आहे. तो बहुधा त्यांचा शेवटचाच लेख असावा. माळगावकरांच्या एकूण लेखनाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांची साधी, सोपी आणि रसाळ इंग्रजी आणि छोटी छोटी वाक्यरचना. यामुळे त्यांची पुस्तके मनाची पकड घेतात.


1960च्या दशकात इंग्रजीत लिहू लागलेल्या भारतीय लेखकांना त्या काळात मोठीच लोकप्रियता मिळाली. त्यांना इंग्रजीत मोठा वाचकवर्ग मिळाला. पण तो काळ वेगळा होता, त्या काळाचे लेखकही वेगळे होते. साठीनंतर मराठी साहित्यात मोठी उलथापालथ होऊ लागली. वाचकांच्या जाणीवाही रुंदावत होत्या. ऐंशीनंतर तर काळ खूपच बदलला. त्यात मनोहर माळगावकर तर इंग्रजीत लिहिणारे. मराठीत त्यांच्या अवघ्या तीन-चार पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. त्यामुळे तसेही माळगावकर आधीपासूनच मराठी वाचकांना काहीसे अपरिचितच होते. मुळात ते मराठी, पण त्यांनी जवळपास सर्वच लेखन इंग्रजीत केले. त्यामुळे आपलेपणा-परकेपणा या सीमेवरच त्यांना राहावे लागले. प्रत्यक्षात आणि लेखनातही. महाराष्ट्राबद्दल मात्र त्यांना खूप प्रेम होते आणि महाराष्ट्रीयांबद्दल कमालीचा जिव्हाळाही.

Monday, April 12, 2010

विनय हर्डीकर-मराठीतले जॉर्ज ऑर्वेल?


कार्यकर्ता, पत्रकार, प्राध्यापक आणि लेखक म्हणून लक्षणीय काम केलेल्या विनय हर्डीकर यांनी नुकतीच आपल्या वयाची 60 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने पुण्यात चार दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचा पूर्वार्ध मागच्या महिन्यात झाला. 10 आणि 11 एप्रिलला झाला. त्यानिमित्ताने...(दै. सकाळ, १२ फेब्रुवारी २०१०) 
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 


विनय हर्डीकर अतिशय मोजकं लिहितात. वर्षाला एखाद्‌ दुसरा लेख. त्यामुळे गेल्या 30-32 वर्षांत त्यांची अवघी चारच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वयाच्या 29 व्या वर्षी लिहिलेले 'जनांचा प्रवाहो चालला' हे त्यांचे पहिलेच पुस्तक चांगलेच गाजले होते. आणीबाणीच्या विरोधात लिहिलेल्या या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारने आधी पुरस्कार जाहीर करून नंतर तो नाकारला होता. बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेवरील 'कारुण्योपनिषद' (1999) साहित्य-समाज क्षेत्रातील मान्यवरांविषयीच्या लेखांचे "श्रद्धांजली' (1997) आणि अलीकडचे 'विठोबाची आंगी' (2005) ही उरलेली तीन पुस्तके.
'माझं लेखन हे फर्स्ट पर्सन डॉक्‍युमेंटरी आहे' असे हर्डीकर स्वतःच्या लेखनाविषयी म्हणतात. कारण स्वतःचे अनुभवसिद्ध विश्‍व (आणि वाचन) हा त्यांच्या लेखनाचा गाभा असतो. हर्डीकरांचे अनुभवविश्‍वही तसे खूपच विस्तृत आणि वैविध्यपूर्ण आहे. साहित्य (मराठी-हिंदी-इंग्रजी), राजकारण, समाजकारण, सामाजिक चळवळी-आंदोलने, शास्त्रीय संगीत अशा क्षेत्रांत त्यांना कमालीचा रस आहे आणि त्यांची उत्तम जाणही.
ज्ञानप्रबोधिनी, न्यू क्वेस्ट, इंडियन एक्‍स्प्रेस, ग्रामायण, शेतकरी संघटना, देशमुख आणि कंपनी, रानडे इन्स्टिट्यूट (पुणे विद्यापीठ) आणि सध्या फ्लेम हे पुण्यातील खासगी विद्यापीठ, असा विनय हर्डीकरांचा आजवरचा प्रवास आहे. या प्रत्येक ठिकाणी ते स्वतःहून गेले आणि मनासारखं काम करता येत नाही हे लक्षात आल्यावर सुरुवातीच्या पाच ठिकाणांहून स्वतःहून बाहेर पडले.
हर्डीकरांनी 'इंडियन एक्‍स्प्रेस' या आघाडीच्या इंग्रजी दैनिकात तब्बल आठ वर्षे शोधपत्रकारिता केली. वस्तुनिष्ठ आणि समतोल बातमी हाच धर्म मानून त्यांनी पत्रकारिता केली. एका बातमीसाठी ते किती यातायात करीत याविषयीचा एक लेख त्यांच्या 'विठोबाची आंगी' या पुस्तकात आहे. तो प्रत्येकाने (आणि पत्रकारांनीही) आवर्जून वाचावा असा आहे. पाच-सात वर्षांपूर्वी त्यानी लिहिलेल्या 'सुमारांची सद्दी' या दोन भागातील लेखाचे बरेच कौतुक झाले होते; परंतु हा लेख लिहून झाल्यावर त्याचे 'सुमारांची सद्दी' हे शीर्षक सुचायला मात्र त्यांना तब्बल एक वर्ष लागले. 'प्रमोद महाजन-एक चिन्हांकित प्रवास' हा त्यांचा 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेखही महाजनांवर लिहिल्या गेलेल्या लेखांतील सर्वोत्कृष्ट लेख होता. नव्वदीनंतरच्या काळात 'विचारसरणीचा अंत' आणि 'मार्क्‍सवादाचा अंत' या संकल्पना लोकप्रिय होत असताना हर्डीकरांनी लिहिलेला 'एण्ड ऑफ आयडिऑलॉजी - एक मतलबी भ्रम' हा लेखही असाच मूलगामी आणि त्यांच्या व्यासंगाची साक्ष पटवणारा होता. अगदी अलीकडे त्यांनी लिहिलेले दोन लेख- पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक अप्पा पेंडसे आणि समाजवादी विचाराचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयीचे- असेच उत्तम लेखाचे नुमने ठरावेत! हर्डीकरांच्या लेखांची अशी मोठी यादीच देता येईल, पण आणखी एकच उदाहरण देतो- "भारतातल्या कोणत्याही पक्षाचे कॉंग्रेसीकरण झाल्याशिवाय त्याला सत्ता मिळवता येत नाही" या आपल्या एकाच विधानाच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी साधना साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीचीही बरीच चर्चा झाली होती.
राजकीय-सामाजिक क्षेत्रातील प्रश्‍नांविषयी योग्य भूमिका असणारा, आपल्या भाषणांतून, लेखनातून तिचा आग्रह धरणारा, थोडक्‍या, 'करेक्‍टिव्ह फॅक्‍टर म्हणून रोल करण्याची' हर्डीकरांची भूमिका असते. मराठीतल्या बहुतांशी साहित्यिकांना राजकीय भूमिकांचे वा आयडिऑलॉजीचे वावडे असले, तरी ते हर्डीकरांना अजिबात नाही. आयडिऑलॉजी मानणारे लेखन हे कसदार असते, असे मराठीतल्या ललित साहित्याच्या बाबतीत त्यांनी (आपल्या पीएच.डी. प्रबंधाच्या निमित्ताने) मांडून दाखवण्याचाही प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने तो पूर्ण होऊ शकला नाही.
विनय हर्डीकर हा काहीसा कलंदर माणूस आहे. काही माणसं विनाकारण स्वतःविषयी गैरसमज निर्माण करून ठेवतात; तर काही माणसांबद्दल इतर लोक गैरसमज निर्माण करून घेतात. हर्डीकर या दोन्ही प्रवादांचे धनी आहेत आणि याची त्यांना स्वतःलाही चांगली जाणीव आहे, पण तरीही 'आपण बुवा असे आहोत आणि असेच राहू' हा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे हर्डीकर इतरांना हेकेखोर वाटतात; तर त्यांना आपण बाणेदार आहोत असे वाटत असावे. हा त्यांचा बाणेदारपणा वयाच्या साठीनंतरही फारसा कमी झालेला नाही.
मूळचा सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड, पत्रकाराची शोधक दृष्टी, चौफेर भ्रमंती आणि जोडीला अनेकविध विषयांचा व्यासंग-अभ्यास आणि प्रत्येक विषयावरची स्वतःची खास ठाम आणि परखड मतं, यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेकांना भुरळ पडते. हर्डीकरांशी मैत्री असणं हा बौद्धिकदृष्ट्या फार आनंदाचा भाग असला, तरी ती सहज परवडणारी नसते. त्यांच्या वागण्या-बोलण्याला एक तीक्ष्ण आणि तिखट धार असते. अघळपघळपणा वा शिळोप्याच्या गप्पा या गोष्टी त्यांचा शब्दकोषात नाहीत.
माणूस म्हणून विनय हर्डीकर काहीसे तऱ्हेवाईक असले, तरी लेखक म्हणून मात्र अतिशय समतोल, तारतम्यपूर्ण आणि समंजस आहेत. त्यांचं बोलणं आणि लिहिणं यात कमालीचं साम्य आहे, त्यामुळे एकदा कागदावर उतरलेला मजकूर हाच त्यांचा अंतिम खर्डा असतो. त्यात काही बदल करण्याची गरज त्यांना पडत नाही. लेखनाबाबतचा त्यांचा हा शिस्तबद्ध आणि काटेकोरपणा वाखाणण्याजोगा आहे. (हर्डीकरांच्या विचार आणि व्यवहारातही असंच साम्य आहे).
तर असा हा स्वतःच्याच "टर्म ऍण्ड कंडिशन'वर जगणारा माणूस. त्यांच्या बेशिस्तीतही एक वेगळ्या प्रकारची शिस्त असते. गेली काही वर्षे विनय हर्डीकर 'मला कुणी मराठीतला जॉर्ज ऑर्वेल म्हटलं तर आवडेल' असं जाहीरपणे बोलून दाखवत आहेत. त्यांचा हा दावा कुणी खोडून काढायचा प्रयत्न केला नसला, तरी ते खरोखरच 'मराठीतले जॉर्ज ऑर्वेल' आहेत का? जॉर्ज ऑर्वेल आणि विनय हर्डीकर यांच्यात 'राजकीय बांधिलकी मानून लेखन करणे' हे अतिशय लक्षणीय साम्य आहे. तेव्हा हर्डीकरांच्या या विधानाचा मराठीच्या प्राध्यापक-समीक्षकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. पण हर्डीकरांचे लेखन पेलवण्याजोगे समीक्षक मराठीत आहेत का हाही प्रश्‍नच आहे.

शहाणे नावाचा ठार वेडा माणूस!

मी मोबाइलवर शहाणे यांचा काढलेला फोटो

 अशोक शहाणे हा कलंदर माणूस 75 वर्षांचा झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्र जमून गप्पा केल्या.आजकालच्या मराठी वाङ्‌मयावर क्ष-किरण टाकणाऱ्या अशोक शहाणे यांच्यावरही या मित्रपरिवारानं आपल्या प्रेमाच्या क्ष-किरणांचा वर्षाव केला.
(पूर्वप्रसिध्दी- सकाळ, ११\०२\२०१०)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अशोक शहाणे हा अवलिया आणि कलंदर माणूस अखेर 75 वर्षांचा झालाच. तेच अशोक शहाणे ज्यांनी मराठीतील लघु-अनियतकालिकाचा पाया घातला, त्याला चळवळीचे रूप दिले आणि काही प्रमाणात तिचे पुढारीपणही केले. शहाणे यांनी 'अथर्व' या लघु-अनियतकालिकाचा पहिला अंक काढला 1961 मध्ये; पण ते पहिल्या अंकानंतर बंद पडले. मग त्यांनी 1964 ला 'असो' काढले; त्याचे जेमतेम 16 अंक निघाले. मग 'वाचा' काढले, त्याचेही अवघे सहाच अंक निघाले. अशोक शहाणे यांच्या या अंकांवरून अनेकांनी स्फूर्ती, प्रेरणा घेतली आणि त्यांच्यासारखेच अल्पजीवी अंक काढून एकेकाळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण तापविण्याचे काम केले. तर अशा या अशोक शहाणे यांनी कालच्या 7 फेब्रुवारीला 75 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांच्याजवळच्या काही मित्रांनी घरगुती स्वरूपाचा एक छोटासा कार्यक्रम गोरेगावमध्ये आयोजित केला होता. त्यानिमित्ताने लघुनियतकालिकांच्या चळवळीतील आणि शहाणे यांच्या मित्रपरिवारातील 50-60 मंडळी एकत्र आली होती. थोडंसं गाणं, थोडंसं खाणं आणि मनसोक्त गप्पा (अशोक शहाणे यांच्याविषयीच्या) असा हा आटोपशीर कार्यक्रम होता.
बंडखोरी करण्याचं वय तारुण्य असतं. या काळात बहुतांश जण ती करतात आणि नंतर मग ते वय संपलं, की प्रस्थापित होऊन जातात. शहाणे यांच्या काही मित्रांनीही हा कित्ता गिरवलाय; पण शहाणे यांचं वयच वाढत नसल्यानं त्यांची बंडखोरी कमी होण्याचं कारण नाही. परवाच्या कार्यक्रमातही ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. काही माणसं कितीही वय झालं तरी आहे त्याच वयाची वाटतात. महाराष्ट्रात अशी बरीच माणसं सापडतात. जयवंत दळवी जयहिंद प्रकाशनाचे ग. का. रायकरांना 'यष्टी म्हणावी अशी शरीरयष्टी' असे म्हणत. ते वर्णन अशोक शहाणेंनाही लागू पडतं आणि त्यामुळेच त्यांच्या वाढत्या वयाचा आपल्याला पत्ता लागत नाही.
आम्ही अशोक शहाणे यांचं अभिनंदन करायला गेलो, तर त्यांनी नेहमीच्या पद्धतीनं स्वतःचीच खिल्ली उडवली. म्हणाले, " 'अमृतमहोत्सव' यातला पहिला शब्द संस्कृत आहे. आता आपल्याला फारसं संस्कृत कळत नसल्यानं त्याचा अर्थही माहीत नसतो. अमृत म्हणजे अ-मृत. अजून मेले नाही म्हणून महोत्सव." काही वर्षांपूर्वी त्यांच्या 'प्रास प्रकाशना'ला 'वि. पु. भागवत' पुरस्कार मिळाला. त्या कार्यक्रमात श्री. पु. भागवतांसह काही लोक शहाणेंबद्दल फारच चांगलं बोलले. तेव्हाही शहाणे म्हणाले होते, "तुम्ही एवढं माझ्याबद्दल चांगलं बोलला आहात की, मला वाटलं मी मेलो की काय!"
स्वतः मात्र फारसं काही लिहायचं नाही; पण इतरांना मात्र लिहायला उद्युक्त करायचं, प्रोत्साहन द्यायचं. त्यांच्या पुस्तकांची बाळंतपणं करायची, हे अशोक शहाणे यांचं योगदान; शिवाय वाचायचं भरपूर. मजेत जगायचं. आपल्याच धुंदीत. त्यामुळे इतरांना सल्ले द्यायचा, मार्गदर्शन करायचा आणि त्यांचा पाणउतारा करायचा अधिकार त्यांना आपोआपच पोचतो. तो ते पुरेपूर वापरतातही.
नाही म्हणायला शहाणेंच्या नावावर 'नपेक्षा' हे एकमेव पुस्तक आहे. तेही त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. बाकी त्यांनी बंगालीमधून मराठीत काही पुस्तकं मात्र अनुवादित केली आहेत. बंगाली साहित्यिक शंकर यांच्या 'जनअरण्य' व 'सीमाबद्ध' या दोन आणि माणिक बंदोपाध्याय यांची 'साईखड्याची गोष्ट' ही कादंबरी, तस्लिमा नसरीन यांच्या 'फेरा' या कादंबरीचा 'फिट्टमफाट' या नावानं अनुवाद. प्रसिद्ध सतारवादक अल्लाउद्दीन खॉं यांचं आत्मचरित्र 'माझी कहाणी' आणि 'माझा भारत' व 'इसम' ही दोन छोटी पुस्तकं. 'प्रचंड विजेरी सुतार' या मूळ बंगाली दीर्घ कवितेचा त्यांनी केलेला अनुवाद अजून लघु नियतकालिकाच्याच अंकात पडून असला तरी तो प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णी यांना प्रचंड आवडला होता. किंबहुना त्यांनी केलेले सर्वच अनुवाद उत्कृष्ट म्हणावे असे आहेत. बंगाली भाषेवर तर त्यांचं कमालीचं प्रभुत्व आहे. दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी आणि त्यांच्या चमूला त्यांनी बंगाली नाटककार अजितेश बंदोपाध्याय यांचं महाभारताच्या शेवटच्या पर्वावरील 'हे समय उत्तान समय' हे मूळ बंगाली नाटक वाचून दाखवलं, तेव्हा त्यांच्या हातात बंगाली पुस्तक होते अन्‌ ते वाचत होते मराठीत आणि ते वाचन अतिशय सुगम आणि अस्खलित होतं, याची आठवण रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी अजूनही सांगतात.
अशोक शहाणे यांनी 'प्रास प्रकाशन' ही संस्था काढली. त्यामार्फत अनेक चांगली पुस्तकं काढली. अरुण कोलटकरांची मराठी-इंग्रजी पुस्तकं काढली. पुस्तकांच्या रूढ होऊ पाहणाऱ्या साचेबद्ध आकारांना सुरुंग लावण्याचं काम केलं. पुस्तक तर काढायचं आहे; पण त्यासाठी पैसे नाहीत, या विवंचनेतून त्यांनी पुस्तकांच्या आकारात, मांडणी, सजावटीमध्ये जे बदल केले आहेत, ते मराठी वाचकांना चांगलेच माहीत आहेत.
अशोक शहाणे हे प्रयोगशील आणि उद्योगी गृहस्थ आहेत. प्रयोग प्रयोगासाठी असतात; त्यांचे सामाजिक सिद्धान्त सहसा होत नाहीत. राजकारण घ्या, समाजकारण घ्या, साहित्य घ्या वा इतर सांस्कृतिक कला घ्या. भरपूर उदाहरणं देता येतीलड पण शहाणे यांना त्याची पर्वा नसते. आधीची प्रमाणकं मानायची नाहीत आणि ती आपल्या प्रयोगांना फूटपट्टीसारखी लावूनही पाहायची नाहीत, हा त्यांचा बाणा आहे.
प्रस्थापितांना सतत आणि सातत्याने विरोध करायला त्यांना जाम आवडतं. त्यामुळे त्यांच्या तडाख्यातून भले भले लोक सुटत नाहीत; अगदी टिळक-आगरकरही. मग इतरांची काय कथा! 40-45 वर्षांपूर्वी त्यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्‌मयावर 'क्ष किरण' आणि त्यानंतर 'तीस वर्षांची पुस्तकी हालहवाल' हे लेख लिहून अशीच खळबळ उडवून दिली होती. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स', 'आज दिनांक', 'महानगर' आणि 'साप्ताहिक सकाळ'मध्ये अल्पकाळ केलेले सदर लेखनही असेच चर्चेचा विषय झाले होते.
म्हणूनच पत्रकार अंबरीश मिश्र त्यांच्याविषयी म्हणतात, "अशोकमध्ये अवाढव्य ऊर्जा आहे. आगीचा किंवा चाकाचा शोध लावलेल्या माणसांमध्ये अशीच ऊर्जा असणार. मन नितळ, स्वभाव बेरका, त्याच्या करड्या नजरेतनं काहीच सुटत नाही." मग तुम्ही-आम्ही कसे सुटणार? 7 फेब्रुवारीला मित्रपरिवारानं त्यांचं कौतुक केलं. त्यांनी स्पष्टपणे 'पुष्पगुच्छ' कुणीही आणू नका' असं सांगितलं असतानाही आणले. त्यांना दिले. एकानं चक्क त्यांच्यावर कविताही केली. मग शेवटी शहाणेच उभे राहिले आणि म्हणाले, "आपल्याकडे नाहीतरी म्हणायची पद्धत आहे, गप्प बसायचं काय घेतो?'
पण मी काही गप्प बसणार नाही. कारण- अजून बरंच काम बाकी आहे... तुम्ही लोक असं समजू नका, की आता मी संपलोय. तुम्हाला वॉर्निंग देण्यासाठी मी बोलतोय." आणि त्यांनी घडाघडा आपल्या आगामी योजना सांगून टाकल्या.
त्यात कवी अरुण कोलटकर यांनी तुकोबांच्या अभंगांविषयी केलेले संशोधन आहे. महाराष्ट्र शासनानं छापलेल्या तुकोबांच्या गाथेतले काही अभंग त्यांचे नाहीत आणि तुकोबांचे म्हणून असलेल्या बऱ्याच अभंगांचाही त्यात समावेश नाही. अशा एकूण जवळपास नऊ हजार अभंगांचा शोध कोलटकरांनी घेतला आहे. ते शहाणेंना छापायचे आहे. कोलटकरांचे आणखी काही अप्रकाशित साहित्य आहे. प्रसिद्ध कॅलिग्राफी तज्ज्ञ र. कृ. जोशी यांच्या मराठी अंकलिपीचे पुस्तक, वसंत गुर्जर यांच्या कविता, सिनेदिग्दर्शक अरुण खोपकरांचे पुस्तक, नुकतेच दिवंगत झालेल्या रघू दंडवते यांची एक कादंबरी आणि कवितासंग्रह, 'असो' आणि 'वाचा'मधील सर्व लेखनाचे स्वतंत्र पुस्तक अशा योजना त्यांच्या हाताशी आहेत.
याशिवाय संगणकावर मराठीची जी हेळसांड चालली आहे, त्याविषयीही ते पोटतिडकीने बोलत होते. मराठीच्या युनिकोडच्या प्रामाणिकीकरणाविषयी काहीतरी करायला हवे, त्याचा सध्या जो गैरवापर चाललाय, त्याने ते अस्वस्थ आहेत.
त्यामुळे अगदी शहाणेंच्याच शब्दांत सांगायचे, तर "गप्प बसण्याचा काळ अद्याप आलेला नाही. तुम्ही जरा सावध राहा!"