Monday, June 4, 2012

पाश्चात्य चष्म्यातून भारताकडे...


एक नवा प्रयत्न काही अनिवासी भारतीय आणि भारतीय मित्रांनी ‘otherwise’ या नव्या नियतकालिकाच्या निमित्ताने सुरू केला आहे. आणि म्हणून तो दखलपात्र आहे. A socio-literary effort of of friends from USA and India ’ अशी या नियतकालिकाची टॅगलाईन आहे.
१७ जानेवारी २०११ रोजी प्रहारमध्ये लिहिलेली नोंद. 

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
एकेकाळी परदेशात जाणा-या भारतीयांकडे उच्च शिक्षण, करिअर आणि पैसा मिळवणं अशी प्रलोभनं असायची. अजूनही ती काही प्रमाणात आहे. केवळ पैशासाठी इग्लंड-अमेरिका आणि इतरत्र जाणा-या तरुणांची संख्या आजही आहेच. तिकडे शिक्षण घेऊन हे लोक करिअर वगैरे करतात, पण कधीतरी भारतात येतात तेव्हा ते तिकडच्या देशाबद्दल तोंड भरून कौतुक करत असतात आणि भारताबद्दल मात्र तेवढीच तोंडभरून नाराजी बोलून दाखवतात. अर्थात याला काही सन्माननीय अपवाद आहेत. हे लोक आपल्यापरीनं आपल्या मातृभूमीसाठी काय करता येईल याचा प्रयत्न करतात, किमान भारतातल्या आपल्या मित्रांना, स्नेह्या-सोबत्यांना त्यांच्यापरीनं मदत करतात. समाजाच्या एकंदर चलणवलनात या गोष्टींचं महत्त्व फार नसेलही. पण त्या पॉझिटिव्हगोष्टी नक्कीच असतात.
 
असाच एक नवा प्रयत्न काही अनिवासी भारतीय आणि भारतीय मित्रांनी ‘otherwise’  या नव्या नियतकालिकाच्या निमित्ताने सुरू केला आहे. आणि म्हणून तो दखलपात्र आहे. A socio-literary effort of of friends from USA and India  अशी या नियतकालिकाची टॅगलाईन आहे. कृष्णन किशोर हे या नियतकालिकाचे मुख्य संपादक आहेत तर सुखजोत हे संपादक आहेत. कृष्णन हे कवी, निबंधलेखक असून सध्या ते अमेरिकेतल्या सेंट पॉल या ठिकाणी राहतात. सुखजोत हे लुधियाना येथे राहत असून या अनियतकालिकाचे कामकाज त्यांच्या या पत्त्यावरून चालते आहे.
www.otherwisejournal.com   या नावाने वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे, पण अजून तिचे काम बहुधा पूर्ण झाले नसावे. त्यामुळे तूर्त ती कार्यरत नाही.
otherwise’ चा पहिलाच अंक वैविध्यपूर्ण आणि भरगच्च म्हणावा असा आहे. इश्श्यू, फिक्शन, इंटरव्ह्यू, लिटररी पस्र्पस्पेक्टिव्ह, पोएट्री, प्रिव्ह्यू, अ‍ॅटोबायोग्राफी, द अदर वे असे मोठे सात विभाग आणि आर्ट, बुक रिव्ह्यू, म्युझिक असे छोटे विभागही आहेत. इश्श्यूया विभागातील पाचही लेख हे समाज-राजकारणाविषयीचे आहेत. मृदुला गर्ग या हिंदीतल्या आघाडीच्या लेखिकेने द क्वेश्चेनेबल राईज ऑफ द मिडल क्लास इन इंडियाअसा लेख लिहिला आहे. सध्या देशभरातील मध्यमवर्गाबद्दल सुलटसुलट चर्चा चालू असते. भारतीय मध्यमवर्ग हा जागतिकीकरणाचा खंदा पुरस्कर्ता आहे आणि सर्वात मोठा लाभार्थीही. पण याच वर्गावर सामाजिक नेतृत्वाची जबाबदारी असते. त्यामुळे या वर्गावर अलीकडच्या काळात जोरदार टीकाटिप्पणी होत असते. गर्ग यांनीही मध्यमवर्गासमोरची आव्हाने आणि आवाहने या दोन्हींचा चांगला आढावा घेतला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आर्थिकदृष्टीनं विचार केला तर मध्मयवर्गापेक्षा लाभार्थी आणि न-लाभार्थी असे दोनच वर्ग भारतात आहेत.
 
मुस्लिम धर्माचे गाढे अभ्यासक असगर अली इंजिनिअर यांची नासीरुद्दीन हैदर खान यांनी घेतलेली मुलाखतही वाचनीय आहे. शीबा असलम फ़हमी या स्त्रीवादी लेखिकेने भारतीय मुस्लिम स्त्रियांच्या सद्यस्थितीबद्दल अतिशय परखड लेख लिहिला आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पीएच.डी.च्या विद्यार्थिनी असलेल्या शीबा या हंसया हिंदी मासिकामध्ये मुख्यधारा के अहंकारया नावाने सदरही लिहितात. त्याआधीही त्या हंसमध्येच जेंडर जिहादहे सदर लिहीत.
 
अनामिका यांनी घेतलेला भारतीय स्त्री लेखिकांच्या लेखनाचा आढावा, अरुण कमल यांनी हिंदी समकालीन कविता आणि समकाल यांची केलेली मांडणी, पंकज राग यांनी चित्रपट आणि साहित्य यांचा लावलेला अन्योन्य संबंध  आणि पंजाबीतले ज्येष्ठ लेखक गुरदयाल सिंह यांचा पंजाबी साहित्याबद्दलचा दृष्टिकोन हे लेखही आवर्जून वाचावेत असे आहेत.
 
एकंदर या पहिल्याच अंकात भारतीय पातळीवरील नामवंत लेखकांचे लेखन मिळवण्यात संपादकांना यश आलेले आहे. त्यामुळे हा अंक दिमाखदार झाला आहे. भारतीय साहित्य आणि समाज यांच्यातील नव्या बदलांचा कानोसा घेण्याचा हा प्रयत्न वाखाणण्यासारखा निश्चितच आहे.
 
मराठीमधील लेखिका उर्मिला पवार यांचीही या अंकात छोटी मुलाखत आहे. आणि त्यांच्या आयदानया गाजलेल्या आत्मचरित्राचा काही भागही सोबत दिला आहे. या मुलाखतीत पवार आपल्या जडणघडणीच्या काळाविषयी  बोलल्या आहेत. मात्र पवार यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर त्यांनी या मुलाखतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. ही मुलाखत मला न्याय देणारी नाही, ज्यांच्या प्रेरणेनं आम्हाला आत्मविश्वास मिळाला त्या बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख करण्याचेच मुलाखतकर्तीने टाळले आहे असे त्या म्हणाल्या.
 
आता थोडे संपादकांच्या लेखाविषयी. कृष्णन किशोर यांनी डू वुई हॅव अ चॉईस?’ या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. त्याची मांडणी मात्र भारतातल्या जवळपास सर्वच गोष्टींबद्दल निराशेचा सूर लावणारी आहे. हा सूर लावताना मात्र त्यांनी नजरेसमोर भारतीय जनमानस आणि राष्ट्रमानस ठेवलेले नाही तर पाश्चात्य फूटपट्टय़ा लावलेल्या आहेत.
 
2007  साली युनायटेड नेशन्सने जगातल्या167   देशांचा सव्‍‌र्हे करून आपला अहवाल तयार केला. निवडणूक पद्धती, प्रशासन, सरकारी व्यवस्था, समाजाचा राजकीय सहभाग आणि त्याची राजकीय संस्कृती या पाच मुद्दय़ांचा आधारावर जगभरातील राज्यव्यवस्थेची पूर्ण लोकशाही’, ‘कमकुवत लोकशाही’, ‘हायब्रिड लोकशाही’, आणि अध्यक्षीय लोकशाहीअशा चार प्रकारात वर्गवारी केली. त्यात भारतीय लोकशाही कमकुवतअसल्याचा आणि डेन्मार्क व स्वीडन यांची लोकशाही पूर्ण लोकशाहीअसल्याचा निर्वाळा दिला आहे.
 
या अहवालाचा हवाला देत किशोर म्हणतात, ‘‘India is a wrong model with countless political parties without much different economic  or political thoughts.’’  या विधानाशी कुठलाही सुबुद्ध माणूस सहमत होणे अवघड आहे. असो. पण हा संपूर्ण लेख अशाच पद्धतीने मांडणी करत संपतो.
 खरं तर किशोर यांनी असे विद्वत मतप्रदर्शन करण्यापेक्षा आपली हे नियतकालिक सुरू करण्यामागची भूमिका सविस्तर मांडली असती तर जास्त बरे झाले असते. पण संपादकांना पाश्चात्य चष्म्यातूनच भारताकडे पाहायचे आहे. त्यांचा हा दृष्टीकोन त्यांच्या बाजूने परिपूर्ण असेलही पण त्यामुळे त्यांची निराशा कमी होण्याऐवजी वाढतच जाण्याचा धोका दिसतो. योग्य मापाचा आणि फायदेशीर चष्मा वापरला तर तो आपली दृष्टी सुधारतो, तसे केले नाही तर आपलीच दृष्टी खराब होते, इतरांचं काही नुकसान होत नाही. हा सिद्धांत किशोर यांनी लक्षात ठेवलेला बरा, असे सुचवावेसे वाटते.
बाकी त्यांच्या या नव्या नियतकालिकासाठी शुभेच्छा!

1 comment:

  1. फारच सुंदर उपक्रम आहे. अश्याच मासिकातून दोन देशातील जनता एकमेकांचा समाज व तेथील घडामोडी समजून घेऊ शकतील.

    ReplyDelete