Monday, April 12, 2010

शहाणे नावाचा ठार वेडा माणूस!

मी मोबाइलवर शहाणे यांचा काढलेला फोटो

 अशोक शहाणे हा कलंदर माणूस 75 वर्षांचा झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्र जमून गप्पा केल्या.आजकालच्या मराठी वाङ्‌मयावर क्ष-किरण टाकणाऱ्या अशोक शहाणे यांच्यावरही या मित्रपरिवारानं आपल्या प्रेमाच्या क्ष-किरणांचा वर्षाव केला.
(पूर्वप्रसिध्दी- सकाळ, ११\०२\२०१०)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अशोक शहाणे हा अवलिया आणि कलंदर माणूस अखेर 75 वर्षांचा झालाच. तेच अशोक शहाणे ज्यांनी मराठीतील लघु-अनियतकालिकाचा पाया घातला, त्याला चळवळीचे रूप दिले आणि काही प्रमाणात तिचे पुढारीपणही केले. शहाणे यांनी 'अथर्व' या लघु-अनियतकालिकाचा पहिला अंक काढला 1961 मध्ये; पण ते पहिल्या अंकानंतर बंद पडले. मग त्यांनी 1964 ला 'असो' काढले; त्याचे जेमतेम 16 अंक निघाले. मग 'वाचा' काढले, त्याचेही अवघे सहाच अंक निघाले. अशोक शहाणे यांच्या या अंकांवरून अनेकांनी स्फूर्ती, प्रेरणा घेतली आणि त्यांच्यासारखेच अल्पजीवी अंक काढून एकेकाळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण तापविण्याचे काम केले. तर अशा या अशोक शहाणे यांनी कालच्या 7 फेब्रुवारीला 75 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांच्याजवळच्या काही मित्रांनी घरगुती स्वरूपाचा एक छोटासा कार्यक्रम गोरेगावमध्ये आयोजित केला होता. त्यानिमित्ताने लघुनियतकालिकांच्या चळवळीतील आणि शहाणे यांच्या मित्रपरिवारातील 50-60 मंडळी एकत्र आली होती. थोडंसं गाणं, थोडंसं खाणं आणि मनसोक्त गप्पा (अशोक शहाणे यांच्याविषयीच्या) असा हा आटोपशीर कार्यक्रम होता.
बंडखोरी करण्याचं वय तारुण्य असतं. या काळात बहुतांश जण ती करतात आणि नंतर मग ते वय संपलं, की प्रस्थापित होऊन जातात. शहाणे यांच्या काही मित्रांनीही हा कित्ता गिरवलाय; पण शहाणे यांचं वयच वाढत नसल्यानं त्यांची बंडखोरी कमी होण्याचं कारण नाही. परवाच्या कार्यक्रमातही ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. काही माणसं कितीही वय झालं तरी आहे त्याच वयाची वाटतात. महाराष्ट्रात अशी बरीच माणसं सापडतात. जयवंत दळवी जयहिंद प्रकाशनाचे ग. का. रायकरांना 'यष्टी म्हणावी अशी शरीरयष्टी' असे म्हणत. ते वर्णन अशोक शहाणेंनाही लागू पडतं आणि त्यामुळेच त्यांच्या वाढत्या वयाचा आपल्याला पत्ता लागत नाही.
आम्ही अशोक शहाणे यांचं अभिनंदन करायला गेलो, तर त्यांनी नेहमीच्या पद्धतीनं स्वतःचीच खिल्ली उडवली. म्हणाले, " 'अमृतमहोत्सव' यातला पहिला शब्द संस्कृत आहे. आता आपल्याला फारसं संस्कृत कळत नसल्यानं त्याचा अर्थही माहीत नसतो. अमृत म्हणजे अ-मृत. अजून मेले नाही म्हणून महोत्सव." काही वर्षांपूर्वी त्यांच्या 'प्रास प्रकाशना'ला 'वि. पु. भागवत' पुरस्कार मिळाला. त्या कार्यक्रमात श्री. पु. भागवतांसह काही लोक शहाणेंबद्दल फारच चांगलं बोलले. तेव्हाही शहाणे म्हणाले होते, "तुम्ही एवढं माझ्याबद्दल चांगलं बोलला आहात की, मला वाटलं मी मेलो की काय!"
स्वतः मात्र फारसं काही लिहायचं नाही; पण इतरांना मात्र लिहायला उद्युक्त करायचं, प्रोत्साहन द्यायचं. त्यांच्या पुस्तकांची बाळंतपणं करायची, हे अशोक शहाणे यांचं योगदान; शिवाय वाचायचं भरपूर. मजेत जगायचं. आपल्याच धुंदीत. त्यामुळे इतरांना सल्ले द्यायचा, मार्गदर्शन करायचा आणि त्यांचा पाणउतारा करायचा अधिकार त्यांना आपोआपच पोचतो. तो ते पुरेपूर वापरतातही.
नाही म्हणायला शहाणेंच्या नावावर 'नपेक्षा' हे एकमेव पुस्तक आहे. तेही त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. बाकी त्यांनी बंगालीमधून मराठीत काही पुस्तकं मात्र अनुवादित केली आहेत. बंगाली साहित्यिक शंकर यांच्या 'जनअरण्य' व 'सीमाबद्ध' या दोन आणि माणिक बंदोपाध्याय यांची 'साईखड्याची गोष्ट' ही कादंबरी, तस्लिमा नसरीन यांच्या 'फेरा' या कादंबरीचा 'फिट्टमफाट' या नावानं अनुवाद. प्रसिद्ध सतारवादक अल्लाउद्दीन खॉं यांचं आत्मचरित्र 'माझी कहाणी' आणि 'माझा भारत' व 'इसम' ही दोन छोटी पुस्तकं. 'प्रचंड विजेरी सुतार' या मूळ बंगाली दीर्घ कवितेचा त्यांनी केलेला अनुवाद अजून लघु नियतकालिकाच्याच अंकात पडून असला तरी तो प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णी यांना प्रचंड आवडला होता. किंबहुना त्यांनी केलेले सर्वच अनुवाद उत्कृष्ट म्हणावे असे आहेत. बंगाली भाषेवर तर त्यांचं कमालीचं प्रभुत्व आहे. दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी आणि त्यांच्या चमूला त्यांनी बंगाली नाटककार अजितेश बंदोपाध्याय यांचं महाभारताच्या शेवटच्या पर्वावरील 'हे समय उत्तान समय' हे मूळ बंगाली नाटक वाचून दाखवलं, तेव्हा त्यांच्या हातात बंगाली पुस्तक होते अन्‌ ते वाचत होते मराठीत आणि ते वाचन अतिशय सुगम आणि अस्खलित होतं, याची आठवण रंगकर्मी डॉ. हेमू अधिकारी अजूनही सांगतात.
अशोक शहाणे यांनी 'प्रास प्रकाशन' ही संस्था काढली. त्यामार्फत अनेक चांगली पुस्तकं काढली. अरुण कोलटकरांची मराठी-इंग्रजी पुस्तकं काढली. पुस्तकांच्या रूढ होऊ पाहणाऱ्या साचेबद्ध आकारांना सुरुंग लावण्याचं काम केलं. पुस्तक तर काढायचं आहे; पण त्यासाठी पैसे नाहीत, या विवंचनेतून त्यांनी पुस्तकांच्या आकारात, मांडणी, सजावटीमध्ये जे बदल केले आहेत, ते मराठी वाचकांना चांगलेच माहीत आहेत.
अशोक शहाणे हे प्रयोगशील आणि उद्योगी गृहस्थ आहेत. प्रयोग प्रयोगासाठी असतात; त्यांचे सामाजिक सिद्धान्त सहसा होत नाहीत. राजकारण घ्या, समाजकारण घ्या, साहित्य घ्या वा इतर सांस्कृतिक कला घ्या. भरपूर उदाहरणं देता येतीलड पण शहाणे यांना त्याची पर्वा नसते. आधीची प्रमाणकं मानायची नाहीत आणि ती आपल्या प्रयोगांना फूटपट्टीसारखी लावूनही पाहायची नाहीत, हा त्यांचा बाणा आहे.
प्रस्थापितांना सतत आणि सातत्याने विरोध करायला त्यांना जाम आवडतं. त्यामुळे त्यांच्या तडाख्यातून भले भले लोक सुटत नाहीत; अगदी टिळक-आगरकरही. मग इतरांची काय कथा! 40-45 वर्षांपूर्वी त्यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्‌मयावर 'क्ष किरण' आणि त्यानंतर 'तीस वर्षांची पुस्तकी हालहवाल' हे लेख लिहून अशीच खळबळ उडवून दिली होती. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स', 'आज दिनांक', 'महानगर' आणि 'साप्ताहिक सकाळ'मध्ये अल्पकाळ केलेले सदर लेखनही असेच चर्चेचा विषय झाले होते.
म्हणूनच पत्रकार अंबरीश मिश्र त्यांच्याविषयी म्हणतात, "अशोकमध्ये अवाढव्य ऊर्जा आहे. आगीचा किंवा चाकाचा शोध लावलेल्या माणसांमध्ये अशीच ऊर्जा असणार. मन नितळ, स्वभाव बेरका, त्याच्या करड्या नजरेतनं काहीच सुटत नाही." मग तुम्ही-आम्ही कसे सुटणार? 7 फेब्रुवारीला मित्रपरिवारानं त्यांचं कौतुक केलं. त्यांनी स्पष्टपणे 'पुष्पगुच्छ' कुणीही आणू नका' असं सांगितलं असतानाही आणले. त्यांना दिले. एकानं चक्क त्यांच्यावर कविताही केली. मग शेवटी शहाणेच उभे राहिले आणि म्हणाले, "आपल्याकडे नाहीतरी म्हणायची पद्धत आहे, गप्प बसायचं काय घेतो?'
पण मी काही गप्प बसणार नाही. कारण- अजून बरंच काम बाकी आहे... तुम्ही लोक असं समजू नका, की आता मी संपलोय. तुम्हाला वॉर्निंग देण्यासाठी मी बोलतोय." आणि त्यांनी घडाघडा आपल्या आगामी योजना सांगून टाकल्या.
त्यात कवी अरुण कोलटकर यांनी तुकोबांच्या अभंगांविषयी केलेले संशोधन आहे. महाराष्ट्र शासनानं छापलेल्या तुकोबांच्या गाथेतले काही अभंग त्यांचे नाहीत आणि तुकोबांचे म्हणून असलेल्या बऱ्याच अभंगांचाही त्यात समावेश नाही. अशा एकूण जवळपास नऊ हजार अभंगांचा शोध कोलटकरांनी घेतला आहे. ते शहाणेंना छापायचे आहे. कोलटकरांचे आणखी काही अप्रकाशित साहित्य आहे. प्रसिद्ध कॅलिग्राफी तज्ज्ञ र. कृ. जोशी यांच्या मराठी अंकलिपीचे पुस्तक, वसंत गुर्जर यांच्या कविता, सिनेदिग्दर्शक अरुण खोपकरांचे पुस्तक, नुकतेच दिवंगत झालेल्या रघू दंडवते यांची एक कादंबरी आणि कवितासंग्रह, 'असो' आणि 'वाचा'मधील सर्व लेखनाचे स्वतंत्र पुस्तक अशा योजना त्यांच्या हाताशी आहेत.
याशिवाय संगणकावर मराठीची जी हेळसांड चालली आहे, त्याविषयीही ते पोटतिडकीने बोलत होते. मराठीच्या युनिकोडच्या प्रामाणिकीकरणाविषयी काहीतरी करायला हवे, त्याचा सध्या जो गैरवापर चाललाय, त्याने ते अस्वस्थ आहेत.
त्यामुळे अगदी शहाणेंच्याच शब्दांत सांगायचे, तर "गप्प बसण्याचा काळ अद्याप आलेला नाही. तुम्ही जरा सावध राहा!"

No comments:

Post a Comment