Monday, June 21, 2010

प्रधान मास्तरांची श्रीशिल्लक



राजकीय विचारसरणींची वैचारिक चर्चा ललित अंगाने करणारे आणि त्यासाठी पत्रे, आठवणी-गप्पा आणि ञ्ज्लॅशबॅक अशा लेखकीय तंत्रांचा मार्मिक वापर करणारे ‘साता उत्तरांची कहाणी’ हे पुस्तक, हीच ग. प्र. प्रधान यांची श्रीशिल्लक ठरेल.. प्रधान नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले; पण त्यांचे हे पुस्तक कालातीत आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

प्रधान मास्तर म्हणजेच मूर्तिमंत चैतन्य, चारित्र्यसंपन्नता आणि नीतिमत्ताही. मास्तर चारित्र्यसंपन्न आणि नीतिसंपन्न होते यासाठी वेगळ्या शब्दांची आणि विशेषणांची गरज नाही. खरे तर मास्तरांची अनेक रूपे सांगता येतील. शिक्षक, लेखक, कार्यकर्ता,आमदार, ‘साधना’चे संपादक इत्यादी. पण मास्तर खऱ्या अर्थाने समाजशिक्षक होते आणि तीच त्यांची खरी ओळख होती. मास्तरांनी समाजशिक्षक म्हणून केलेले काम हे त्यांचे मोठे योगदान आहे. मास्तर मूलत: साहित्याचे विद्यार्थी. त्यांचे साहित्यावर मनापासून प्रेम होते. मास्तरांनी लेखनही भरपूर केले. विशेषत: अलिकडच्या पाच-सात वर्षात तर खूपच. शनिवार पेठेतल्या घरातून हडपसरच्या ‘साने गुरुजी रुग्णालया’त गेल्यावर त्यांच्या लेखनाला आणखीनच बहर आला. शिवाय त्यांचा लेखनाचा झपाटाही मोठा विलक्षण होता. त्यामुळे अलिकडच्या दोनेक वर्षात त्यांनी पंधरा-सोळा पुस्तके लिहिली. ‘आठा उत्तरांची कहाणी’च्या वेळचा प्रसंग. या पुस्तकाचे लेखन पूर्ण करून त्यांनी ते एका तरुण मित्राला वाचायला दिले होते. ते वाचून तो त्यांना म्हणाला, ‘मजा येत नाही वाचताना.’ त्यावर मास्तर शांतपणे त्याला म्हणाले,‘या वयात माझ्याकडून आणखी काय अपेक्षा करणार?’ एका अर्थाने ते खरेच होते. माझ्या मित्राचा त्यांना एवढय़ा स्पष्टपणे सांगण्याचा हेतू एवढाच होता की, ‘साता उत्तरांची कहाणी’ वाचताना जी मजा येते, ती ‘आठा उत्तरांची कहाणी’ वाचताना येत नाही.’ ‘साता उत्तरांची कहाणी’ हे मास्तरांचे काहीसे दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वाचे पुस्तक. ते २ ऑक्टोबर १९८१ रोजी मौज प्रकाशन गृहाकडून प्रकाशित झाले. या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपायला मात्र सात वर्षे लागली. आणि दुसरी आवृत्ती संपायला तर सतरा-अठरा वर्षे. सध्या तिसरी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. मास्तरांचे हे पुस्तक फारसे वाचकप्रिय ठरले नसले, तरी ते त्यांचे सर्वात उत्तम पुस्तक आहे. १९४० ते १९८० या कालखंडात देशात खूप घडामोडी घडल्या. त्याविषयी प्रास्ताविकात मास्तरांनी म्हटले आहे : या कालखंडातील सर्व साधनांची जुळणी करून वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून तपशिलाची चूक होऊ न देता इतिहास लिहिणे हे मोठे काम आहे. हे पुस्तक लिहिताना तो उद्देश नव्हता. या कालखंडातील विविध चळवळीत सहभागी होताना वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात जी आंदोलने झाली त्यांचे चित्रण करण्याचा या पुस्तकात मी प्रयत्न केला आहे.. (वा. म. जोशी यांनी) ‘रागिणी’ या कादंबरीत ज्याप्रमाणे काव्य-शास्त्र-विनोद आणला आहे, त्याप्रमाणे राजकारणातील विविध विचार व समस्या यांची चर्चा करावी असे मला वाटले. मात्र माझं हे पुस्तक ही रूढार्थाने कादंबरी नाही. राजकीय घटनांच्या विस्तीर्ण व बदलत्या पटाची पार्श्वभूमी घेऊन विचारांचे व भावनांचे चित्रण करणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. प्रत्येक विचारसरणीची एक व्यक्तिरेखा आणि त्यांना जोडणारा निवेदक अशी या पुस्तकाची मांडणी आहे. समाजवादी (खानोलकर ), साम्यवादी (वैद्य), रॉयवादी (एम. आर.), पत्री सरकार (देशमुख), आंबेडकरवादी (खैरमोडे), हिंदुत्ववादी (जोशी) आणि गांधीवादी (सामंत) अशा या सात विचारसरणी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे. या मित्रांना आपल्याला पटलेला वा भावलेला विचार घेऊन आपण आधुनिक भारत घडवू शकतो, असा आत्मश्विास असतो. आधुनिक भारत घडवण्याची ही त्यांची सात उत्तरे म्हणजे, ‘साता उत्तरांची कहाणी.’ या परस्परविरोधी विचारसरणींचे लोक प्रधान मास्तरांचे चांगले मित्र होते. आणि निदान त्या काळी तरी या विचारसरणींच्या लोकांमध्ये इतरांच्या विचारांबद्दल आदरही होता; भले त्यांची मते पटत नसली तरी. या प्रत्येक विचारसरणीच्या दोन-दोन तीन-तीन लोकांशी प्रधान मास्तरांनी चर्चा केली. पुस्तकाचा खर्डा त्यांना दाखवला. त्यांच्याकडून ‘हेच तुमचे म्हणणे आहे ना, हेच तुमचे युक्तिवाद आहेत ना’ असे वदवून घेतले आणि मगच पुस्तक फायनल केले. त्यामुळे या पाचही विचारसरणींची या पुस्तकातून चांगल्या प्रकारे ओळख होते. त्यांची सामर्थ्ये समजतात, तसेच त्यांच्या मर्यादांचीही ओळख होते. या प्रवाहांची चांगल्या प्रकारे ओळख झाल्याशिवाय भारतीय राजकारण समजून घेता येत नाही. मराठीत राजकीय कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, पण अशा पद्धतीचे पुस्तक मात्र हेच एकमेव म्हणावे लागेल. त्यामुळे प्रत्येक मराठी तरुणाने हे पुस्तक वाचायला हवे. ज्यांना राजकीय विचारप्रणाल्या समजून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी तर हे पुस्तक ‘मस्ट’ आहे. त्याशिवाय भारतीय राजकारण आणि समाजकारण समजून घेता येणार नाही. खरे तर हा स्वतंत्र सात पुस्तकांचा ऐवज आहे. पण मास्तरांनी तो अवघ्या पाचशे पानांत एकाच पुस्तकात मांडून दाखवला. तोही अतिशय साध्या, सोप्या भाषेत. एरवी वैचारिक चर्चा हा तसा काहीसा रुक्ष आणि बोजड विषय. पण मास्तरांनी त्याची मांडणी ललित अंगाने करत पत्रे, आठवणी, गप्पा, ञ्ज्लॅशबॅक आणि चरित्र अशी करत तो सुबोध करून टाकला आहे. त्यामुळे पुस्तक एकदा हातात घेतले की, वाचून होईपर्यंत खाली ठेववत नाही. प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळते तर उत्तरातून हुशारी कळते, असे म्हणतात. तो समसमा योग या पुस्तकाच्या पानोपानी विखुरला आहे. आपल्या विचारांशी सहमत नसणाऱ्यांचेही म्हणणे कसे समजून घ्यावे आणि प्रतिवाद कायम ठेवूनही त्यांच्याशी कशी चांगल्या प्रकारे मैत्री करता येऊ शकते,याचे मूर्तिमंत उदाहरण स्वत: प्रधान मास्तरच होते. हे पुस्तक त्या अर्थानेही त्यांच्या कलात्मकतेचा सर्वोच्च आविष्कार मानता येईल. भारतीय राजकारणाची आणि समाजकारणाची जातकुळीलीच त्यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहे. एकोणिसाव्या शतकाबद्दल असे म्हटले जाते की, ते मूलगामी परिवर्तनाचे शतक होते. त्यामुळे आजची कुठलीही समस्या घ्या, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कलासाहि त्य-संस्कृती, त्याचा ऊहापोह आणि त्याची उत्तरेही एकोणिसाव्या शतकात सापडतात. या शतकाकडे गेल्याशिवाय आजच्या कुठल्याच प्रश्नाची उकल होऊ शकत नाही. ‘साता उत्तरांची कहाणी’ तील सात विचारप्रवाह याच शतकात उदयाला आले. त्यांच्या बहराचा काळ (रॉयवाद वगळता) विसाव्या शतकातला होता. तो नेमका काय आणि कसा होता हे मास्तरांच्या या पुस्तकात वाचायला मिळते. म्हणूनच त्याचे महत्त्व मोठे आहे. आता रॉयवादी माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही, पण एकेकाळी या ‘इझम्स’ने महाराष्ट्रातील अनेकांना कसे आकर्षित केले होते, रॉयवाद नेमका काय होता हेही समजते. या सर्व कारणांमुळे प्रधान मास्तरांचे हे पुस्तक कालातीत आहे. मास्तरांनी लिहिलेले कुठले पुस्तक पन्नास-साठ वर्षानीही शिल्लक राहील तर ते, ‘साता उत्तरांची कहाणी’!

No comments:

Post a Comment