Sunday, October 3, 2010

उत्तम मध्यम

‘‘मानवी स्वातंत्र्याच्या तत्त्वाचा स्पष्ट जाणिवेनें निष्ठापूर्वक अंगीकार करणारीं माणसें सांस्कृतिक प्रयत्न जितके अधिक करीत जातील तितका तितका सांस्कृतिक संघर्ष लोपत जाईल व प्रादेशिक संस्कृति संवादी बनतील. संवादित्व जसें समानाकार घडवितें तसे वैशिष्टय़हि टिकवितें.’’ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी  
(अध्यक्षीय भाषण, 1954, दिल्ली, अभामसासं)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कुठलीही गोष्ट ज्या हेतुपुरस्सरतेने सुरू केली जाते, ते हेतू सुरुवातीच्या काळात कसोशीने पाळलेही जातात. पण त्याला 25-50-100 अशी वर्षे उलटली की, त्याचा प्रवास काहीशा उलट्या दिशेने सुरू होतो. ‘अखिल भारतीय’ म्हणवल्या जाणा-या मराठी साहित्य संमेलनाबाबतीतही हे खरे ठरले आहे. ग्रंथकार संमेलन म्हणून सुरू झालेल्या या उत्सवाने आता स्वत:चा मोठा विस्तार करून घेतला आहे. त्याबद्दलचे आकर्षण जसे वाढते आहे, तशीच त्याबद्दलची आत्मीयताही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे 83 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तुलनेने उत्तम कांबळे यांच्यासारख्या तरुण पत्रकार-संपादकाची निवड झाली, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
कुणाच्याही कारकीर्दीचा आढावा घ्यायचा असेल तर ती एका विशिष्ट टप्प्यावर असावी लागते किंवा पूर्ण व्हावी लागते. उत्तम कांबळे यांच्याबाबत आता ते शक्य आहे. कारण ते गेली तीसेक वर्षे पत्रकारितेत आहेत. आता एका माध्यम समूहाचे मुख्य संपादक आहेत. बालपण आणि तारुण्याचा काळ फार खडतर गेला की, माणूस कार्यकर्ता होता असे म्हटले जाते. कांबळे यांच्याबाबतही ते खरे आहे. आधी कार्यकर्ता, मग पत्रकार-लेखक आणि आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा त्यांचा आलेख चढता आहे. कविवर्य नारायण सुर्वे आणि कथाकार बाबुराव बागुल यांच्याशी त्यांची सगळ्याच अर्थाने नाळ जुळते. सुव्र्याचे तर ते मानसपुत्रच होते. ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजून घेताना’ ही दोन कांबळे यांची महत्त्वाची पुस्तके. तसे त्यांनी कथा, कविता, कादंबरी आणि सामाजिक प्रश्नांवरही लेखन केले आहे, करत आहेत. पत्रकाराला सामाजिक प्रश्नांविषयी नेहमीच भूमिका घ्यावी लागते, ती कांबळेही घेत आले आहेत. त्यामुळेच ते ख-या अर्थाने कार्यकर्ता-पत्रकार आहेत.
कालपर्यंत आपल्या लेखनातून कांबळे ज्या समाजघटकांच्या बाजूने भूमिका घेत होते आणि यापुढेही घेतील, तो काही प्रस्थापित समाज नाही. तो सुव्र्याच्या आणि बागुलांच्या साहित्यातला समाज आहे. या समाजाची कड घेणा-यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नाही, त्यांची दखल घेतली जात नाही अशी काही प्रमाणात रास्त असलेली तक्रार आहे. पण त्यातल्या ज्यांनी आपले श्रेष्ठत्व निर्विवाद सिद्ध केले त्यांना अध्यक्षपदाचा गौरव बहुमानाने दिला गेला हेही सत्य आहे.
याच समाजातून पुढे आलेले कांबळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले आणि 741 पैकी 411 इतक्या मतांनी निवडूनही आले. पण सुव्र्याच्या या मानसपुत्राने ही निवडणूक मतदारांच्या सदसद्विवेक बुद्धीवर विश्वास ठेवून जिंकली असा निर्वाळा त्यांना स्वत:लाही देता येणार नाही. या निवडणुकीसाठी आजवर जी जी राजकीय समीकरणे जुळवली जातात, तीच दुर्दैवाने कांबळे यांच्याबाबतही जुळवली गेली. म्हणजे कालपर्यंत ज्या गोष्टींविषयी कांबळेंना आक्षेप होता, त्याच गोष्टी त्यांनी स्वत: अध्यक्षपदाचा उमेदवार असताना केल्या किंवा त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नावाखाली केल्या. तिथे कांबळे यांचा प्रामाणिक निस्पृहपणा, चारित्र्यसंपन्नता कामी आली नाही हेही विदारक सत्य आहे. कांबळे यांचा महाराष्ट्रभर मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांना समर्थन देणाऱ्यांनी त्यांच्यासाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी मोठी आघाडी उघडली होती.
पण कांबळेही मोहात पडले आणि गडबड झाली. आपली आजवरची पुस्तके कुठल्या प्रकाशकांनी छापली, अर्पणपत्रिका कुणाच्या नावे लिहिल्या आहेत, त्यांच्या किती आवृत्त्या आल्या, त्यांचा आशय काय आहे, मृखपृष्ठे व रेखाटने कोणी केली आहेत आणि त्यावर कुठे कुठे किती परीक्षणे छापून आली, दिवाळी अंकांचे संपादन, पुस्तकांचे संपादन, भाषणांच्या पुस्तिका, अन्य ठिकाणी आलेले लेख, रेडिओवरील कार्यक्रम, शालेय पाठय़पुस्तकात समाविष्ट झालेले साहित्य, इतरांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना, एम. फिल, पीएच. डी किती जणांनी केल्या, पुस्तकांना मिळालेल्या पुरस्कारांच्या याद्या, कार्यक्रमातले सहभाग, आजवर केलेला प्रवास, कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना हजेरी लावली याची डेमी आकारातील तब्बल 48 पानी पुस्तिका कांबळेंनी छापवून घेतली. ती सर्व मतदारांना पाठवली. या त्यांच्या ‘कारकीर्दी’चा अन्वयार्थ कसा लावायचा?
सांगलीला झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे होते. तेव्हा त्यांनी आर. आर. पाटील यांची एका धर्मसंकटातून सुटका केली होती, तेव्हा कांबळे यांचा मध्यममार्गीपणा दिसला होता. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला प्रत्यक्षात कुठलेच अधिकार नसतात. पण तो त्या वर्षाचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवक्ता असतो. मात्र अलीकडच्या काळात सरकार/प्रशासनावर नैतिक दबाव येईल असे प्रतिभावान महाराष्ट्रात उरले नाहीत आणि जे उरले आहेत त्यांच्याकडे तसा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे हे सांस्कृतिक प्रवक्तेपण कुणीच नीट निभावत नाही. सगळीकडे शाली आणि श्रीफळे स्वीकारत मानसन्मान करून घ्यायचा आणि कृतकृत्य व्हायचे असा एकंदर अध्यक्षाचा खाक्या असतो. अर्थात अलीकडचे अध्यक्षही ‘नयन लागले पैलतिरी’ याच पंथातले असल्याने त्यांच्याकडून कुठल्या अपेक्षा करताही करता येत नव्हत्या.
ते दुष्टचक्र पहिल्यांदा भेदायची संधी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रवक्तेपण निभावायचे मोठे आव्हान उत्तम कांबळे यांच्यापुढे आहे. कार्यकर्ता असणारा माणूस लेखक झाला की, जे तोटे होतात, तेच तो लेखकाचा सांस्कृतिक प्रवक्ता झाल्यावरही होतात. ते टाळण्याचा प्रयत्न कांबळे करतीलच, अशी सदिच्छापूर्वक अपेक्षा आहे!

No comments:

Post a Comment