Monday, December 27, 2010

उत्तमराव, जबाबदारी तिहेरी आहे!


उत्तमराव, तुमची भेट सध्या जवळपास रोजच होते आहे! इतर वर्तमानपत्रांतून फारशी होत नसली तरी तुमच्या वर्तमानपत्रातून तुम्हाला कुठला तरी पुरस्कार मिळाल्याची, तुमचा कुणीतरी जाहीर वा नागरी सत्कार केल्याची वा तुमच्या एखाद्या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित झाल्याची सचित्र बातमी एकदोन दिवसाआड तरी वाचायला मिळतेच मिळते. परवाच पुण्यात तुमच्यावर ‘अस्वस्थ नायक’ हा माहितीपट प्रकाशित झाल्याचीही बातमी वाचली. त्याआधीच्या आठवडय़ात तुमच्या ‘आई समजून घेताना’ या पुस्तकाच्या अकराव्या विशेष आवृत्तीचं प्रकाशन मुंबईत झालं. (हे पुस्तक इंग्रजीतही गेलं आहे. तुमच्या समग्र साहित्याचा कन्नडमध्ये अनुवाद होतोय.) नुकत्याच तुमच्या दीर्घ मुलाखती साप्ताहिक ‘साधना’ आणि ‘साप्ताहिक सकाळ’मधून प्रकाशित झाल्या आहेत. ‘साधना’तली मुलाखत पूर्वायुष्याबद्दल असल्यानं ती उत्तम आहे आणि ‘सकाळ’मधली, मुलाखत आजच्या प्रश्नांबद्दल असल्यानं ती वाचवतसुद्धा नाही इतकी नीरस आणि अपेक्षाभंग करणारी आहे! उत्तमराव, अतिशय तळागाळातून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदार्पयत झालेला तुमचा प्रवास केवळ थक्क करणारा आहे. जीवघेण्या संघर्षाशी कायम दोन हात करत, तुमच्याच शब्दांत सांगायचं तर ‘भाकरीची शिकार करत’ तुम्ही इथर्पयत पोहोचलात! त्यातही ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूहाचे मुख्य संपादक असताना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुमच्या वाटय़ाला आलं! हा दुग्धशर्करा योग आहे. आजवर पत्रकार असलेल्याही कुणाही अध्यक्षाच्या वाटय़ाला असं भाग्य आलेलं नाही!!
एखाद्या महाकाव्यात शोभावं असंच तुमचं सगळं आयुष्य आहे. त्यामुळे तुम्ही बेभान व्हावं हेही साहजिक आहे, समजण्यासारखंही आहे! पण तुमचं भान हरवत तर नाही ना? उत्तमराव, तुम्हाला पूर्वायुष्यात एवढं मोठं अपयश पचवता आलं, पण हे यश तुम्हाला संयमानं पचवता येत नाहिए का? कारण संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासूनचं तुमचं वर्तन न पटणारं आणि प्रसंगी क्लेशदायी वाटावं असंच आहे. कुठल्याही सत्कार समारंभात, कुठल्याही भाषणात, आणि तुमच्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यांत तुम्ही ‘माझी आई आणि मी’ याच विषयावर तरी बोलता किंवा तो विषय तुमच्या बोलण्यात एकदा तरी येतो. वरवर पाहता यात काही वावगंही नाही. पण पत्रकारितेसारख्या बौद्धिक क्षेत्रात इतकी वर्षे राहूनही उत्तमरावांकडे एवढीच एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, असं समजायचं का? ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे’ असं गांधींजींसारखं तुम्ही सुचवू पाहात आहात का? तुमचं पूर्वायुष्य सर्वसामान्यांनी आणि महाराष्ट्रातल्या यच्चयावत तरुणांनी प्रेरणा घ्यावी असं आहे, हे खरं. पण तोच एकमेव तुमचा संदेश आहे का?
अशानं तुमची गणनाही अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केवळ आत्मपुराणंच सांगणा-या माडगूळकर बंधू, वामन चोरघडे, गो. नी. दांडेकर या प्रभृतींच्या मांदियाळीत होणार नाही का? ‘माझ्यात एक समाज तयार झाला आहे!’ हे तुमचं विधान चलाख आहे, बुद्धिभेद करणारं आहे असं कुणाही सुबुद्ध माणसाला म्हणताच येणार नाही. पण तीच आपल्या आयुष्याची इतिकव्र्यता आहे, असा समज तर तुम्ही करून घेत नाही आहात ना? आपल्या अतिशय दुर्धर संघर्षानं भरलेल्या पूर्वायुष्यातलं एक पर्व तुमच्याकडून ‘युटोपियन फँटसी’ म्हणून तर रंगवलं जात नाही ना? उत्तमराव, ही भूतकाळातच रमून जाण्याची आणि केवळ त्याच्याच गोष्टी करण्याची वेळ नव्हे, हे तुमच्यासारख्या पत्रकाराला सांगण्याची गरज नसावी.
सध्या मराठी साहित्यापुढे, समाजापुढे कितीतरी प्रश्न आ वासून आहेत!
ज्यांच्या साहित्यसेवेचा धाक वाटावा आणि ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर वाटावा अशी विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे यांच्यासारखी माणसं आता मराठी साहित्यातून दुर्मीळ होत चालली आहेत. वेळीच दक्षता घेतली नाही तर त्यांची जागा दुय्यम दर्जाची लोकं घेण्याचं मोठं संकट उभं ठाकलं आहे.
एकटय़ादुकटय़ाचं हे काम नाही हेही खरंच! पण तुम्ही सुरुवात तरी करू शकता.
निदान हे वर्षभर तरी तुमच्या शब्दाला महाराष्ट्रात मोठा मान असणार आहे. ती संधी तुम्ही घेणार की नाही? निदान हाकारे देण्याचं काम तरी तुम्ही करायलाच हवं. उत्तमराव, तेवढं कराच तुम्ही!
साहित्य महामंडळात यच्चयावत सगळी दुय्यम दर्जाचीच माणसं का बरं असावीत? अर्थात अशा माणसांचीही गरज असतेच. पण ही माणसं काम तरी त्या प्रतवारीचं करतात का? तर तसंही दिसत नाही हे आपण पाहतोच आहोत. त्यांच्या कामाची प्रतवारी तिय्यम दर्जाची असते. म्हणजे स्वत:कडे असलेल्या क्षमतांचाही ही मंडळी धड वापर करत नाहीत. एकंदर मराठी साहित्यातच या रोगाची लागण झपाटय़ानं होत चालली आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचा ऱ्हासकाळ कधीच सुरू झालेला आहे, प्रसारमाध्यमांचाही एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच सुरू झाला, असंही म्हटलं जातं आहे. मराठी साहित्याचा अस्तकाळ तर ऐंशीच्या दशकातच सुरू झाला आहे. अशा ऱ्हासपर्वात समाजाचं नेतृत्व करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा लागतो. ही जबाबदारी सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाजावर असते हेही मान्य आहे. आता तर तुम्हाला सामान्यांपासून अभिजनांर्पयत सर्वाचीच मान्यता मिळाली आहे. तेव्हा या समाजाला गदगदून हालवण्याचा प्रयत्न तरी तुम्ही करणार की नाही?
साहित्य संमेलनाचे संस्थापक न्यायमूर्ती रानडय़ांना अभिप्रेत असलेल्या ‘विवेकी नेतृत्वा’च्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतो आहोत. त्यामुळे तुमच्याकडून कार्यकर्त्यांपेक्षा संपादक आणि संमेलनाध्यक्ष म्हणून अधिक जबाबदारीची अपेक्षा आहे. एरवीही पत्रकाराला बोलण्याची संधी क्वचितच मिळते. तुम्हाला तर पुढचं सबंध वर्ष मिळालं आहे बोलायला!
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला कुठलेही अधिकार नसतात, हे खरं आहे. पण संमेलनाध्यक्षाला वर्षभर महाराष्ट्रात मोठा मान असतो. त्याचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं जातं. पत्रकारासाठी एवढी संधीही खूप झाली! एवढय़ा जोरावर तुम्ही बरंच काही करू शकता. लेखकांच्या आरोग्य निधीचा जो संकल्प तुम्ही सोडला आहे, तो अत्यंत स्तुत्यच आहे. पण अशा उपक्रमांचा आजवरचा इतिहास मात्र फार निराशाजनक आहे. हे उपक्रम मोठय़ा उत्साहाने सुरू होतात, पण नंतर त्यांचं काहीच होत नाही. साहित्य महामंडळाच्या महाकोशाचं काय झालं हे तुम्हाला सांगायला नकोच. तेव्हा तुमच्या उपक्रमाचंही तसं होऊ नये असं वाटतं. त्यासाठी वर्षभर शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक प्रयत्न करावे लागतील. पत्रकार या नात्यानं तुमचा राजकारणी, उद्योगपती, लेखक, कार्यकर्ते अशा समाजातल्या विविध घटकांशी संपर्क आहे, येतो. त्यामुळे येत्या वर्षाअखेर या निधीत किमान काही कोटींची भर पडायला हरकत नाही. एवढं एकच काम तुम्ही तडीस नेलं, तरी ती तुमच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतली अपूर्व कामगिरी ठरेल!
आणखी एक. सध्या महाराष्ट्रात समाजकारण आणि साहित्य या दोन गोष्टींची ताटातूट झाली आहे. कुठल्याही सामाजिक प्रश्नावर मराठी साहित्यिक आणि संपादकही मूग गिळून गप्प बसतात. मग ते जेम्स लेन प्रकरण असो, बाबरी मशिदीबाबतचा निकाल असो, जैतापूर प्रकल्प असो किंवा लवासा प्रकरण असो.. अशा प्रश्नांवर सामान्य लोक भांबावून जातात, गोंधळून जातात. अशा वेळी जनमानसाची भूमिका घडवण्याची जबाबदारी वृत्तपत्रांच्या संपादकांची असते. महाराष्ट्रात आजघडीला जी तीन-चार आघाडीची दैनिकं आहेत, त्यातल्या एका वृत्तपत्रसमूहाचे तर तुम्ही मुख्य संपादक आहात. संपादकाला समाजकारणापासून राजकारणार्पयत आणि साहित्यापासून अर्थकारणार्पयत, अनेक विषयांच्या आंतरसंबधांची चांगली जाण असते. काय हितावह आहे आणि काय नाही याबाबतची व्हिजन असते. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांवर साहित्यिक - संपादक या नात्याने रोखठोक आणि सडेतोड भूमिका घेतली तर जनसामान्यांच्या मनातला गोंधळ दूर होऊ शकेल, विरोधासाठी विरोध करणाऱ्यांची धार बोथट होऊ शकेल आणि आमजनांना आपली मतं बनवता येतील. शब्दांचं सामर्थ्य तुम्ही जाणून आहात. त्यासाठी तुम्हाला कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही.
तेव्हा उत्तमराव, तुमच्याकडून अधिक जबाबदारपणाची अपेक्षा आहे. तशा क्षमता तुमच्याकडे निखालसपणे आहेत. तुम्ही सध्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहात. त्याला साजेलशा वर्तनाची, जबाबदारीची आणि विचारांची अपेक्षा तुमच्याकडून करणं अनाठायी नाही! तेव्हा तुम्ही इतकं हुरळून जाऊ नये. सद्सद्विवेकाला तिलांजली देऊ नये. थोडं वास्तवातही राहावं असं वाटतं.उत्तमराव, अनेक जण तुमच्याकडून अनेक अपेक्षा व्यक्त करत आहेत. पण समाजातल्या कळीच्या प्रश्नाविषयी साहित्यिकांनी, पत्रकारांनी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडरनं फटकून राहणं हे निकोप सांस्कृतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं फारसं भूषणावह नाही आणि स्पृहणीय तर नाहीच नाही!

Monday, December 6, 2010

उन्हाळी राजधानीतला फेरफटका


सिमल्याला जाण्याची संधी अवचित चालून आली. ‘सेमिनार’ या महत्त्वाच्या इंग्रजी मासिकाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सिमल्याच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’मध्ये (पूर्वीश्रमीच्या ‘राष्ट्रपती निवास’मध्ये) दोन दिवसांचं चर्चासत्र भरतंय, हे मुख्य आमिष! चर्चासत्रात रामचंद्र गुहा (प्रसिद्ध इतिहासकार), गोपाल गांधी (प. बंगालचे राज्यपाल), नयनतारा सहगल (लेखिका), सुनील खिलनानी (‘आयडिया ऑफ इंडिया’चे लेखक), दिग्दर्शक श्याम बेनेगेल, परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन, अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शीद आणि ‘सेमिनार’ची टीम- मालविका सिंग, तेजबीर सिंग, हर्ष सेठी. एवढंच अमिष पुरं होतं सिमल्याला जाण्यासाठी! तिथं सप्टेंबर ते नोव्हेंबर हा उत्तम सीझन मानला जातो. आणि हे चर्चासत्र नेमकं ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात!!
सिमल्याची एक दिवस सैर करण्याचीही व्यवस्था संस्थेनं केली होती. शिवाय ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे याच संस्थेत गेली दोन वर्षे फेलो होते. त्यांचीही अनायसे भेट होणार होती. त्यामुळे ‘आंधळा मागतो एक डोळा..’ अशी काहीशी भावविभोर अवस्था झाली होती. एके दिवशी सहज गप्पा मारता मारता एका कविमित्राला ही बातमी सांगितली. कविलोक मुळात तुमचा बुद्धिभेद करण्यात पटाईत! हे मित्र तर दोन-तीन वेळा सिमल्याला जाऊन आलेले.. त्यांनी सल्ला दिला, सिमल्याला जायचं तर दिल्लीहून थेट कालकाला जायचं. तिथून सिमल्याला नॅरोगेज झुकझुक ट्रेन आहे. या ट्रेनचा प्रवास एकदम मस्त!! मग काय, दिल्लीहून थेट कालका गाठलं. तिथून सिमल्याचं अंतर 94 किलोमीटर. रस्त्यानं ते कापायला फक्त तीन तास लागतात, पण ट्रेननं त्यासाठी तब्बल सहा तास. पण हा प्रवास खरोखरच अद्भुत होता. बागा-शेतं, दऱ्या-खोरी, 103 लहान-मोठे बोगदे आणि ‘पृथ्वीवरच्या परमेश्वरां’नी (मूळ शब्द नारायण सुव्र्याचा) तयार केलेले तब्बल 806 पूल. 2008 मध्ये युनेस्कोनं या मार्गाला ‘वर्ल्ड हेरिटेज साइट, माउंटन रेल्वेज् ऑफ इंडिया’चा दर्जा दिला आहे. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही त्याची नोंद झाली आहेच. इतका रोमांचक आणि थरारक प्रवास कधीच करायला मिळाला नव्हता!
सिमल्याला सकाळी साडेपाच-पावणे सहाला पोचलो, तेव्हा एकदम हुडहुडीच भरली. सोबत काही नव्हतं. एका जागी किती वेळ थरथरणार? मग सिगरेट शिलगावली. पण छे! काही उपयोग नव्हता. तेवढय़ात संस्थेचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला अन् सुटका झाली!
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’चा परिसर नयनरम्य आहे. ब्रिटिश जमान्यात सिमला ही ‘उन्हाळी राजधानी’ होती, तेव्हाचं हे ‘व्हाइसरीगल लॉज’- नंतर राष्ट्रपती निवास म्हणूनही या वास्तूचा वापर झाला. आजही ही संस्था त्याच्या दिमाखदार खाणाखुणा आपल्या अंगा-खांद्यावर मिरवत आहे. दिल्लीच्या तापदायक उष्णतेवर थंडाव्याचा उतारा म्हणून ऑकलंड, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी सिमल्याला जायला सुरुवात केली. ते अक्षरक्ष: सिमल्याच्या प्रेमातच पडले. 1864 मध्ये व्हाईसरॉय लॉरेन्स याच्या भेटीनंतर सिमला ‘उन्हाळी राजधानी’ म्हणून जाहीर करण्यात आलं. 1888 मध्ये तिथे ही वास्तू उभारण्यात आली. सिमल्याला येणारा पर्यटक या वास्तूला भेट द्यायला येतोच येतो. वास्तू गॉथिक शैलीतली. व्हाईसरॉय राहायचा ती रूम बघितली. त्यात त्याचा बेड, सोफासेट अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आता तिथं संस्थेचे चेअरमन राहतात. नेमाडे सरांच्या शिफारशीमुळे तळमजला पाहायला गेलो. खरं तर तो ब्रिटिशांच्या काळातला खलबतखानाच असावा! त्याला तब्बल पाचसहा दारं होती आणि ती लांब डोंगरद-यात निघत होती. प्रत्येक गुप्तहेराला वेगवेगळ्या मार्गानं बोलवायचं आणि वेगवेगळ्या मार्गानं पाठवायचं, असा तो ब्रिटिशांचा ‘गनिमी कावा’ असावा!
सिमला हे शिवालिक रांगांमध्ये वसलेलं आणि समुद्र सपाटीपासून सात हजार फूट उंचीवर असलेलं थंड हवेचं ठिकाण. असं म्हणतात की, एवढय़ा उंचीवरील सिमला हे जगातील बहुधा एकमेव ठिकाण असावं. ‘सिमला’ किंवा ‘शिमला’ हे नाव ‘शामलादेवी’ या कालीमातेच्या एका रूपावरून पडलं असावं असं मानलं जातं. पण त्याबाबत एकवाक्यता नाही. ब्रिटिशांच्या काळात हे अतिशय पारंपरिक पण गजबज नसलेलं ठिकाण होतं, पण आता हिमाचल प्रदेशची राजधानी झाल्यापासून ते अतिशय गजबजून गेलं आहे.
सिमल्यात सलग अशी जमीन कुठेच नाही. सारी वस्ती डोंगर उतार आणि शिखरांवरच. आजूबाजूला सर्वत्र लहान-मोठे डोंगर आणि ओक, फर, पाईन, -होएडेंड्रॉन या वृक्षांनी नटलेला निसर्ग आणि तेवढय़ाच निसर्गसंपन्न द-या.
सिमल्याच्या आसमंतात दूरवर बर्फाच्छादित शिखरं दिसतात. ती आपल्याला साद घालतात, बोलावतात. पण चढण-उतरणीनं आपण इतके मेटाकुटीला आलेलो असतो की, पाय एका जागी थांबायचे आदेश देत राहतात आणि मन हिमशिखरांकडे झेपावत राहतं. मोठा बाका प्रसंग निर्माण होतो!
या सा-याचा कडेलोट झाला तो, जाखू या सिमल्यातल्या सर्वोच्च शिखरावर गेल्यावर. हे आठ हजार फूट उंचीवर आहे. सकाळी आठ-साडेआठची वेळ होती. नुकताच सूर्य हिमशिखरांच्या मागून ‘प्रगट’ झालेला. त्याची कोवळी किरणं हिमशिखरांना अभ्यंगस्नान घालत होती. त्याच्या प्रकाशानं सभोवतालच्या टेकडय़ा पाचूमय झालेल्या.. हाच तो ऋतु बरवा!
जाखू हिलवरून संपूर्ण सिमला दिसतं. तो देखावा मोठा नयनरम्य आणि भकास वाटवणारा होता. म्हणजे निसगाचं सौंदर्य कसं अगाध असतं याची तिथं प्रचिती येत होती आणि माणसांची घरं, सिमेंटच्या इमारती, अधेमधे डोकावणारी मोठेमोठे होर्डिंग्जही त्या सौंदर्यावर काजळीसारखी वाटत होती. या एवढ्या उंचीवरही बलोपासना करणा-या हनुमानाचं मंदिर आहे.
सिमल्यात बघण्यासारखं बरंच काही आहे. पण फिरायचं म्हणजे हा डोंगर चढायचा-उतरायचा, तो डोंगर चढायचा-उतरायचा. सपाटी अशी नाहीच. त्यामुळे एकटं फिरण्यात फार मजा नव्हती. फार लवकर दमवणूक होई. या ठिकाणी सोबत कुटुंबकबिला नेणंही गैरसोयीचंच. मित्रांचा ग्रुप हवा, आणि भरपूर वेळ. मगच सिमल्याच्या सौंदर्याचा अनुभव पूरेपूर उपभोगता येणार.
हिवाळा असल्यानं देखण्या चांदण्या रात्रीची मजाही अनुभवता आली. ‘व्हाइसरीगल लॉज’च्या टेरेसवरून साऱ्या आसमंतात पसरलेल्या चांदण्याच्या साम्राज्याच्या सीमांचा थांग लागत नव्हता. चांदोबाची स्वारी मात्र स्वत:वरच खूश असावी तशी वाटत होती. रात्रीचं सिमला इलेक्ट्रिक बल्बच्या झगमगाटात राहुटय़ांचा अंतराअंतरानं पडाव पडावा तसं वाटत होतं!
तिस-या दिवशी पुन्हा सिमला पाहायला निघालो. सोबत पद्मदेव हा संस्थेचा ड्रायव्हर होता. नावाप्रमाणंच स्वभावानं आणि भाषेनं गोड माणूस. पण तो देवच शेवटी, त्यामुळे पहिल्यांदा घेऊन गेला तो ‘संकटमोचन’ मंदिरात. मग प्रॉस्पेक्ट हिलवर गेलो. तिथेही कामना मातेचं मंदिर होतं. साधंच होतं पण तिथून आजूबाजूच्या द-या-खोऱ्याचा छान व्ह्यू दिसत होता. दूरवरली हिमालय-शिखरांची रांग पद्मदेवनं दाखवली, तेव्हा मात्र क्षणभर जागच्या जागी थिजल्यासारखं झालं. पण तो वर्ण्यविषय म्हणता येणार नाही इतका दूर आणि बर्फाची क्षितिजावर छोटीशी रेषा दिसावी तसा दिसत होता. या हिलवर दोन कंपन्यांचं मोबाईल टॉवर उभारायचं काम चाललं होतं. देवदर्शनानं सुरुवात केल्यानं निघताना पद्मदेवला सरळ सांगितलं, ‘अब मंदिर मत ले चलो, यार!’ तोही हुशार होता. त्यानं गाडी स्टेट म्यूझियमला वळवली. तिथं 16-17व्या शतकातल्या बौद्ध आणि इतर राजेमहाराजे-देवादिकांच्या मूर्ती अप्रतिम म्हणाव्या अशा होत्या. मग आर्मी हेड क्वार्टर पाहायला गेलो.
दुपारी सिमल्यातल्या माल रोडवर पायी गेलो. तर तिथल्या गेइटी थिएटरमध्ये श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचा महोत्सव चालू होता. माल रोडवरील द रीज, स्कँडल पॉइंट ही दोन ठिकाणंही पाहण्यासारखी होती. मुंबईतल्या चर्चचं वास्तुसौंदर्य जसं भूरळ घालणारं आहे, तसंच हेही पुरातन म्हणावं असं वैशिष्टय़पूर्ण चर्च. माल रोडवरील त्रिशूल बेकरीची शिफारस संस्थेतल्या काही लोकांनी केल्यानं तिथल्या पेस्ट्रीचा स्वाद घेतला. पण काही खास नव्हती. खाण्यापिण्याबाबत ‘अंदाज़्‍ा अपना अपना’च असतो! निघताना मात्र सरळ बाय रोड निघालो. हा ‘झुकझुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी’पेक्षा वेगळा अनुभव होता. ‘पृथ्वीवरच्या परमेश्वरां’च्या लीलाही अगाध असतात, हेच खरं!