Saturday, September 12, 2015

उन्मादखोर आणि अराजकवादी

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांनी सबंध भारतीय साहित्यविश्व, विचारविश्व आणि सामाजिक चळवळी हादरून गेल्या आहेत. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर लगेच कन्नडमधील के. एस. भगवान यांना ‘...आता तुमचा नंबर’ असं सांगितलं गेलं. नुकतंच त्यांना धमकीचं पत्रही पाठवलं गेलं. महाराष्ट्रात डॉ. भालचंद्र नेमाडे यांनाही धमकीचं पत्र आल्याने त्यांनाही संरक्षण पुरवलं गेलं आहे. या साऱ्या प्रकारांमुळे एकंदर भारतीय साहित्यजगतात मोठ्या प्रमाणावर हताशा, उद्वेग आणि निराशा पसरली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारेही याबाबतीत फारशी जागरूक आहेत, असं दिसत नाही. तर दुसरीकडे सांप्रदायिक संघटनांची अरेरावी, मुजोरी आणि अघोरी कृत्यं वाढतच चालली आहेत. या साऱ्या प्रकारानं उद्विग्न होऊन हिंदीतील स्टार कथा-कादंबरीकार उदय प्रकाश यांनी मागच्या आठवड्यात साहित्य अकादमीने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचं आपल्या फेसबुक वॉलवर जाहीर केलं. ते असं-
“पिछले समय से हमारे देश में लेखकों, कलाकारों, चिंतकों और बौद्धिकों के प्रति जिस तरह का हिंसक, अपमानजनक, अवमानना पूर्ण व्यवहार लगातार हो रहा है, जिसकी ताज़ा कड़ी प्रख्यात लेखक और विचारक तथा साहित्य अकादमी पुरस्कार से सम्मानित कन्नड़ साहित्यकार श्री कलबुर्गी की मतांध हिंदुत्ववादी अपराधियों द्वारा की गई कायराना और दहशतनाक हत्या है, उसने मेरे जैसे अकेले लेखक को भीतर से हिला दिया है।
अब यह चुप रहने का और मुँह सिल कर सुरक्षित कहीं छुप जाने का पल नहीं है। वर्ना ये ख़तरे बढ़ते जायेंगे।
मैं साहित्यकार कुलबर्गी जी की हत्या के विरोध में ‘मोहन दास’ नामक कृति पर २०१०-११ में प्रदान किये गये साहित्य अकादमी पुरस्कार को विनम्रता लेकिन सुचिंतित दृढ़ता के साथ लौटाता हूँ।
अभी गाँव में हूँ। ७-८ सितंबर तक दिल्ली पहुँचते ही इस संदर्भ में औपचारिक पत्र और राशि भेज दूँगा।
मैं उस निर्णायक मंडल के सदस्य, जिनके कारण ‘मोहन दास’ को यह पुरस्कार मिला, अशोक वाजपेयी और चित्रा मुद्गल के प्रति आभार व्यक्त करते हुए, यह पुरस्कार वापस करता हूँ।
आप सभी दोस्तों से अपेक्षा है कि आप मेरे इस निर्णय में मेरे साथ बने रहेंगे, पहले की ही तरह।”

एरवी भारतीय लेखक भूमिका घेत नाहीत, अशी बोंब अनेक तथाकथित विद्वान ठोकत असतात. पण एखाद्या लेखकाने भूमिका घेतलीच तर हेच महानुभाव त्याचा कसा सोयीस्कर अर्थ लावून आपले जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतात, याचा उत्तम नमुना यानिमित्ताने सध्या हिंदीमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात हिंदी साहित्यजगतातील काही साहित्यिकांनी उदय प्रकाश यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जेव्हा टीकेमागील हेतू केवळ आणि केवळ समोरच्या व्यक्तीची खिल्ली उडवणं हाच असतो, तेव्हा उघड आहे की, अशा प्रकारची टीका हे विशिष्ट हेतूने प्रेरित असते. उदय प्रकाश यांच्यावर टीका करणारे त्याच मानसिकतेतून टीका करत आहेत. बरे हे कुणी सामान्य लेखक नाहीत, तर हिंदीतील मान्यवर साहित्यिक आहेत. उदा. विष्णु खरे हे हिंदीतील मान्यवर कवी-समीक्षक. त्यांनी उदय प्रकाश यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे, ‘साहित्य अकादमीकडे पुरस्कार परत घेण्याची तरतूदच नाही. त्यामुळे उदय प्रकाश यांची कृती केवळ एक नाटक ठरते. सरकार, न्यायालय, राष्ट्रपती यांच्यापर्यंत ही गोष्ट नेण्यासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल. ते न करता अशा प्रकारच्या चतुर कृतीतून काहीच साध्य होऊ शकणार नाही.’ दुसरे मान्यवर साहित्यिक आहेत सुधीश पचौरी. त्यांचं म्हणणं आहे, ‘उदय प्रकाश ने ऐसा करके अपना ‘पाप प्रक्षालन’ किया है।’
अनंत विजय या पत्रकाराने लिहिलं आहे, ‘हा स्वस्त लोकप्रियतेचा प्रकार तर नाही? हत्येवर राजकारण केलं जाऊ नये. मारेकऱ्यांना पकडलं जावं, त्यांना जास्तीतजास्त शिक्षा केली जावी, अशी इच्छा असायला हवी.’ काही वर्षांपूर्वी उदय प्रकाश यांनी एक पुरस्कार स्वीकारला होता. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. तेव्हा त्यांचा आत्मसन्मान कुठे गेला होता, असाही प्रश्न या पत्रकाराने उपस्थित केला आहे.
सुदैवाने अशा टीकाकारांची संख्या कमी आहे. याउलट उदय प्रकाश यांच्या कृतीचं समर्थन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यापैकी अरुण महेश्वरी आणि प्रभात रंजन यांनी या टीकाकारांना  समर्पक उत्तरं देऊन त्याचा प्रतिवादही केला आहे.
पण मुद्दा आरोपाला प्रत्युत्तर करण्याचा नाही, तर उदय प्रकाश यांच्या या कृतीकडे कसं पाहावं हा आहे. पण नेमका त्याचाच अभाव आहे. समजा उदय प्रकाश यांनी पुरस्कार परत करण्याऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं असतं, तर किती लोक त्यात सामील झाले असते? फार फार तर एक हजार, दोन हजार, पाच हजार, दहा हजार, पन्नास हजार... पण सरकारला नमवण्यासाठी ते पुरेसं झालं असतं का? महाराष्ट्रात दाभोलकर यांची हत्या होऊन दोन वर्षं झाली आहेत आणि पानसरे यांची हत्या होऊन सहा महिने. या काळात महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळींनी काय कमी आंदोलने केली? त्यांनी काय लेख लिहिले नाहीत? मुख्यमंत्री, न्यायालय यांची दारे ठोठावली नाहीत? हे सर्व केल्याने सरकारवर थोडातरी वचक रािहला. तपास संथ गतीने का होईना चालू आहे. पण न्यायासाठी संघर्ष करण्याचा हा केवळ एक मार्ग झाला. दुसऱ्या मार्ग हा प्रतीकात्मक असतो. ज्यांच्याकडे कुठलीही संघटना नसते, चळवळ नसते असे लोक हे प्रतीकात्मक कृतीतूनच सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. उदय प्रकाश यांनी त्याची निवड केली तर त्यांचं काय चुकलं?
पण ते समजून घेण्याची दृष्टी या टीकाकारांकडे नाही. तशी ती कुठल्याच टीकाकारांकडे नसते. मराठीतही नुकताच असा प्रकार झाला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारावर भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्यांनी टीका केली, तेव्हा त्यांच्यावरही मराठीतल्या पचौरी-खरेनामक प्रवृत्तींनी अशाच प्रकारे टीका केली होती. हे सर्व लोक पुरंदरेसमर्थक होते असंही नाही. उलट त्यातले अनेकजण कुठल्याच बाजूचे नव्हते. पण तरीही त्यांना ती टीका समजून घेता आली नाही.
आपण ज्यांचे समर्थक आहोत किंवा ज्या विचारसरणीचा पुरस्कार करतो, त्यांच्याविषयी इतर कुणी टीका केली आणि ती कितीही सभ्य असली तरी त्याचा प्रतिवाद असभ्य भाषेतच केला जातो. कुठल्या तरी विचाराच्या दावणीला बांधून घेतल्याने माणसाच्या समग्र आकलनाला मर्यादा पडतात. त्यामुळेे ते एक वेळ क्षम्यही मानता येईल. पण तसे नसलेल्यांकडेही टीका समजून घेण्याइतपत मनाचा मोकळेपणा का नसतो? ते इतके असमंजसपणे का व्यक्त होतात? कारण या किंवा त्या बाजूचे नसलेल्यांकडे तारतम्य, विवेकबुद्धी असलेच असे नाही. उलट त्यांच्याकडेही ‘लव्ह अँड हेट’ असाच चष्मा असतो, हे आजच्या धार्मिक उन्मादाच्या काळात वारंवार सिद्ध होऊ लागलं आहे. त्यामुळे खेदानं असं म्हणावं लागतं की, सांप्रदायिक उन्मादखोरांमध्ये आणि या हल्लेखोरांंमध्ये व्यक्त होण्याच्या बाबतीत तरी फारसा फरक नाही. अगदी अचूक शब्द वापरायचा झाला तर हे हल्लेखोर स्थूल अर्थाने अराजकवादी असतात. म्हणून ते अशा प्रकारे व्यक्त होतात.

2 comments:

  1. या लोकाना हुतात्मा व्हायचे होते, ते साध्य झाले. त्यावर काथ्याकूट करण्याची गरज नाही.

    ReplyDelete