Monday, March 7, 2011

नाटय़धर्मी परफॉर्मर




गंमत अशी असते की, बहुतांश गुणवान कलाकारांची जडणघडण प्रायोगिक रंगभूमीवर होते, पण नंतर ते पैसा आणि यशासाठी व्यावसायिकतेकडे वळतात। त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीचं नुकसान होतं, पण ही प्रक्रिया आहे. त्याला इलाज नाही. मात्र सुलभाताईंविषयी असं म्हणता येत नाही. त्यांनी चित्रपट, मालिकांमध्येही कामं केली, तिथल्या भूमिकाही त्यांनी जीव तोडून, मेहनत घेऊन साकारल्या. पण तिथे त्या कधीच रमल्या नाहीत. हे त्यांनी केलं ते तडजोड म्हणून.
त्यांची प्रकृती जशी अभिनेत्रीची आहे, तशीच त्यांची वृत्ती रंगभूमीची आहे। त्या नाटय़धर्मी परफॉर्मर आहेत. प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार देताना निवड समितीनं त्यांच्या नाटय़क्षेत्रातल्या याच योगदानाचा प्राधान्यानं विचार केला असावा!
सुलभाताई मूळच्या कामेरकर। घरी आजोबांपासून नाटकांचा वारसा. ते नाटकात स्त्रीपार्ट करायचे. वडील एचएमव्हीमध्ये रेकॉर्डिस्ट होते. त्यामुळे घरी सतत कलावंतांचं, लेखकांचं येणं-जाणं असे. वडिलांना मुलांसाठी संस्कार केंद्र चालवायची खूप इच्छा होती. गदिमांनी त्याचं नाव सुचवलं होतं, ‘चंद्रशाला.’ पण ते त्यांना शक्य झालं नाही. सुलभाताईंनी वडिलांचं ते स्वप्न ‘आविष्कार’मध्ये पूर्ण केलं.
सुलभाताई वयाच्या पाचव्या वर्षापासूनच नाटकात काम करू लागल्या होत्या। त्यांच्या बहिणीही नाटकात काम करत. नाटकांमुळे अरविंद देशपांडे यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढे ते त्यांचे जीवनसाथी झाले. ही साथसोबत दोन कलावंतांची होती, आणि एका प्रगल्भ दांपत्याचीही. देशपांडे ‘रंगायन’मध्ये काम करायचे. त्यामुळे सुलभाताईंनीही ‘रंगायन’च्या नाटकांमध्ये, एकांकिकांमध्ये कामं केली.
‘अंधायुगमध्ये गांधारीची भूमिका सुलभा करेल का?’ असं सत्यदेव दुबेंनी अरविंद देशपांडेंना चार दिवसांवर कलकत्त्याचा महोत्सव असताना विचारलं होतं। तेव्हा सुलभाताईंचा निनाद तीन-चार वर्षाचा होता आणि त्याला गोवर झाला होता. पण तशाही अवस्थेत अरविंद देशपांडे, सासू-सासरे सुलभाताईंच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी गांधारी वठवली.
पुढे श्रेयवादाच्या मुद्दय़ावरून ‘रंगायन’ फुटली। ‘आविष्कार’ ही नवी संस्था अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, अरुण काकडे आणि त्यांच्या सहका-यांनी सुरू केली, चालवली, आणि वाढवलीसुद्धा!
‘आविष्कार’मार्फत छबिलदासला प्रायोगिक रंगभूमीचं महत्त्वाचं केंद्र, चळवळ म्हणण्याइतपत स्वरूप मिळवून देण्यात सुलभाताईंचा मोठा वाटा आहे। ‘छबिलदास स्कूल’ म्हणून पुढे ओळखल्या जाणा-या या इतिहासाच्या उभारणीत सुलभाताईंचाही मोठा वाटा होता. ‘आविष्कार’ हे नावही त्यांनीच सुचवलेलं आहे. त्या आधी छबिलदासमध्ये शिक्षिकेची नोकरी करायच्या. आणि याच छबिलदासमध्ये पुढे ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या ऐतिहासिक नाटकाच्या तालमी झाल्या. त्यातलं बेणारेबाईचं शेवटचं स्वगत इथल्याच एका खोलीत तेंडुलकरांना कोंडून लिहून घेण्यात आलं. हे नाटक लिहितानाही तेंडुलकरांसमोर बेणारेबाई म्हणून सुलभाताईच होत्या!
सुलभाताईंच्या अभिनय प्रवासातील ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हा मैलाचा दगड आहे. या नाटकाचे त्यांनी 150 हून अधिक प्रयोग केले. नाटककार विजय तेंडुलकर, पती अरविंद देशपांडे आणि सुलभाताईंची बेणारेबाई ही अजोड त्रयी या नाटकानं भारतभर लोकप्रिय केली. पुढे ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ यावर पं. सत्यदेव दुबे यांनी त्याच नवाने चित्रपट केला. त्यातही बेणारेबाईची भूमिका त्यांनी सुलभाताईंनाच दिली. या नाटकाचे नंतरही वेगळ्या कलाकारांनी प्रयोग केले. त्याविषयी शंभु मित्रा हे थोर बंगाली नाटककार-दिग्दर्शक एकदा म्हणाले होते, ‘सुलभाताई बेणारेला जो न्याय देतात तो अजून इतर कुणी दिलेला नाही.’ सुलभाताई बेणारेबाईच्या भूमिकेशी पूर्णपणे एकरूप झाल्या होत्या!


‘आविष्कार’च्या मुलांसाठीच्या नाटकांचा ‘चंद्रशाला’ हा विभाग सुलभाताईंनी 1989 साली मोठय़ा आवडीनं चालवला। त्यात त्यांनी 21 बालनाटय़ आणि तीन कठपुतली नाटय़ केली. ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक तर बालरंगभूमीवरचं लिजंड बनलं. ‘वृक्षवल्ली आम्हां॥’, ‘राजाराणीला घाम हवा’, ‘बाबा हरवले आहेत’, ‘पंडित पंडित तुझी अक्कल शेंडीत’, ‘आला अडाण्याचा गाडा’ अशी अनेक दर्जेदार बालनाटय़ं केली. ‘दुर्गा..’चे तर 300 हून अधिक प्रयोग झाले आहेत. नृत्य, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथा, कीर्तन, सामुदायिक चित्रकला, नाटक असे अनेक उपक्रम राबवले. जपान, अमेरिका, युगोस्लाव्हिया, स्वीडन, नॉर्वे, मॉस्को अशा देशांना भेटी देऊन तिथली बालरंगभूमी त्यांनी मोठय़ा आस्थेवाइकपणे पाहिली. जपानमध्ये तर महिनाभर राहून तिथल्या बालरंगभूमीचा त्यांनी अभ्यास केला.


बालरंगभूमीविषयीची सुलभाताईंची समज वाखाणण्यासारखी आहे। मुलांच्या व्यक्तिमत्त्व-विकासाला पैलू पाडण्याचे शक्य तेवढे सर्व प्रयत्न त्यांनी ‘चंद्रशाला’च्या माध्यमातून केले हे कुणालाही नाकारता येणार नाही.


सुलभाताईंवर सुरुवातीला विजया मेहता यांच्यासारखं बोलतात, काम करतात अशी टीका झाली। तेव्हा सुलभाताईंनी त्यातून जाणीवपूर्वक बाहेर पडायचा प्रयत्न केला. स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण केली. सुलभा आपली भूमिका मनापासून करतात. ‘अभिनयाबाबत दत्ता भटांची ऊर्मी आणि डॉ. लागूंची मेथॅडिक या दोन्हींचा समन्वय घालण्याची गरज आहे’, असं एकदा त्या म्हणाल्या होत्या. पण खरी गोष्ट आहे की, या दोन्हींचा उत्तम समन्वय म्हणजे खुद्द सुलभाताईंचाच अभिनय आहे. तो त्या अगदी सहजरित्या करतात, कारण तीच त्यांची जीवननिष्ठेचा आहे!


म्हणूनच हिंदी ‘सखाराम बाइंडर’च्या वेळी पं। सत्यदेव दुबेंनी ‘चंपा तुझ्या प्रकृतीला मानवणार नाही’ असं म्हटलं तेव्हा सुलभाताईंनी त्यांना अतिशय सार्थ आत्मविश्वासानं उत्तर दिलं, ‘माझी प्रकृती अभिनेत्रीची आहे, सुलभा देशपांडेची नाही.’


खानोलकरांचं ‘प्रतिमा’ , देवाशिष मुजुमदारांचं ‘ताम्रपट’ आणि अशोक शहाणे अनुवादित रवींद्रनाथ टागोरांच ‘डाकघर’ अशी तीन नाटकं सुलभाताईंनी ‘आविष्कार’साठी दिग्दर्शित केली. पं. सत्यदेव दुबे, विजया मेहता आणि अरविंद देशपांडे अशा नाटकातल्या तीन महत्त्वाच्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. सत्यदेव दुबेंबरोबर ‘अंधायुग’, ‘नो एक्झिट’, ‘एवम इंद्रजित’, ‘घोस्ट’ या नाटकांमध्ये काम केलं. ‘नटसम्राट’मध्ये कावेरी केली.


तीनेक वर्षापूर्वीची गोष्ट. त्या वर्षीच्या अरविंद देशपांडे महोत्सवाला विजया मेहता, महेश एलकुंचवार आणि नाना पाटेकर आले होते. सुलभाताई थोडय़ा उशिरा आल्या. त्यांना पाहताच विजयाबाई काही तरी म्हणाल्या. त्यावर सुलभाताई तत्परतेने म्हणाल्या, ‘हल्ली गुडघे थोडे दुखतात, पण कणा मात्र ताठ आहे माझा!’
‘रङ्गनायक’ या अरविंद देशपांडे स्मृतीग्रंथात सुलभाताईंनी आपल्या दिग्दर्शक पतीविषयी म्हटले आहे, ‘मी त्याची समीक्षक होते, पण तो माझा फॅन होता’. पण सुलभाताईंबद्दल असं म्हणावं लागेल की, त्या आधी स्वत:च्या समीक्षक आहेत आणि मग इतरांच्या. म्हणूनच कदाचित नाटय़-सिनेमा क्षेत्रातले अनेक लोक त्यांचे फॅन आहेत.

No comments:

Post a Comment