Wednesday, March 30, 2011

एका प्रतिभावंताचा भारत



विल ड्युरांट हे जगातील सर्वश्रेष्ठ इतिहासकार. त्यांचा ‘स्टोरी ऑफ सिव्हिलायजेशन’ अकरा खंडातल्या बहुमोल ग्रंथाने त्यांचे नाव जगाच्या इतिहासात अढळ झाले आहे. त्यांनी 1930 साली ‘द केस फॉर इंडिया’ हे छोटेसे पुस्तक लिहिले आहे. त्या काळात कॅथरीन मेयोचे ‘मदर इंडिया’ हे वादग्रस्त पुस्तक प्रकाशित झाले होते. त्याला उत्तर देणारे ‘सिस्टर इंडिया’ पुस्तक प्रकाशित झाले. 1928-29 मध्ये कॅथरीनच्या पुस्तकाला उत्तरे देणारी बरीच पुस्तके प्रकाशित झाली. त्यात अभारतीयांचाही समावेश होता. इंडिया इन बाँडेज, अन इंग्लिशमन डिफेंडस, लिव्हिंग इंडिया, अनहपी इंडिया ही त्यापैकी काही. सांगायचा मुद्दा असा की, भारताविषयी अल्पकाळाच्या वास्तव्यात गैरसमज करून घेऊन पुस्तके लिहिली जात होती, त्याच काळात विल ड्युरांट हे जागतिक कीर्तीचे विचारवंत भारतात आले. पण ते काही निव्वळ प्रवासाला वा भारत पहायला आले नव्हते. समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास करताना त्यांना भारतात यावे लागले. त्यांच्या संवेदनशील मनाने ब्रिटिश अमलाखालील भारताची जी दशा पाहिली त्याने ते चक्रावून गेले. मग त्यांनी हातातली कामे बाजूला ठेवून ‘द केस फॉर इंडिया’ हे पुस्तक लिहिले. पुस्तक अतिशय छोटेसे असले तरी ते अतिशय अभ्यास करून लिहिले आहे, हे त्याच्या प्रस्तावनेवरून आणि शेवटच्या संदर्भसूचीवरून सहज लक्षात येते. पण हे पुस्तक प्रकाशित होताच त्यावर अमेरिकेमध्ये बंदी घालण्यात आली. पण भारतात या पुस्तकावर बंदी घालण्यात आल्याची माहिती मात्र मिळू शकली नाही. 11 फेब्रुवारी 1931 रोजी कविवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांनी या पुस्तकावर लेख लिहिला आहे. त्यावरून असे समजायला हरकत नाही की, यावर निदान सुरुवातीच्या काळात तरी बंदी नव्हती. या लेखात टागोरांनी लिहिले आहे, Will Durant has treated us with the respect due to human beings, acknowledging our right to serious consideration. This has come to me as a surprise, for such courtesy is extremely rare to-day to those people who have not the power to make them selves obnoxious.


इंटरनेटवरही या पुस्तकाविषयी फारशी काही मिळत नाही. त्यामुळे त्याचा पूर्वइतिहास जाणून घ्यायला मर्यादा पडतात. पण तीन वर्षापूर्वी स्ट्रँड बुक स्टॉलने या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली आणि नुकताच मराठी अनुवादही प्रकाशित केला आहे. 80 वर्षापूर्वी एका प्रतिभावंताने पाहिलेला भारत या पुस्तकातून आपल्याला भेटतो. भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडलेल्या या इतिहासकाराचे हे पुस्तक प्रत्यक्ष वाचणे हा त्याला समजून घेण्यासाठीही उत्तम पर्याय आहे.

No comments:

Post a Comment