Thursday, January 14, 2016

आत्ममग्न, आत्मलुब्ध आणि लबाड प्रक्षुब्धांचे संमेलन

पिंपरी-चिंचवड येथे उद्यापासून सुरू होणारे ८९वे साहित्य संमेलन हे  आतापासूनच आत्ममग्न, आत्मलुब्ध, लबाडांची मांदियाळी बनले आहे. संमेलनाचे नियोजित आत्ममग्न अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, साहित्य महामंडळाचे कोडगे प्रतिनिधी, आत्मलुब्ध आयोजक डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील, संमेलन निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे सांगत सबनीस यांची जुनी गैरप्रकारांची प्रकरणे उकरून काढणारे संधिसाधू, संमेलनाच्या आडून आपला सांस्कृतिक राजकारणाचा घातक अजेंडा पुढे रेटणारे राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप हे राजकीय पक्ष आणि सबनीसांनी मोदींविषयी केलेल्या विधानावरून राईचा पर्वत करत विनाकारण भुई धोपटण्याचा प्रयत्न करणारे मोदीभक्त, यांनी संयुक्तपणे या संमेलनाचे तीन तेरा वाजवण्याचा विडा उचलला आहे असे दिसते. न्या. रानडे यांनी १८७८ साली सुरू केलेल्या साहित्य संमेलनाची आजची ही दुरवस्था महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-साहित्यिक पातळीवरील तोतयागिरीच्या उच्छादाचे एक टोक म्हणावे लागेल. हा उन्माद उद्या प्रत्यक्ष संमेलनाच्या वेळी कुठल्या थराला जाईल, एवढाच काय तो आता प्रश्न राहिला आहे. या उन्मादी उच्छादाचे खापर सध्या तरी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या माथी फोडण्याचा प्रकार होत असला आणि त्याला तेही काही प्रमाणात कारणीभूत असले तरी, याला वरील सर्व अपप्रवृत्ती कारणीभूत आहेत. सबनीसांनी आपल्या वावदूक विधानांनी सुरुवातीपासूनच वादांचा धुरळा उडवून दिला असला तरी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्षीच्या निवडणुकीत प्रचंड गैरप्रकार केल्याचे आरोप होत आहेत, त्याचे काय? त्याविषयी कालच मुंबईतील गिरगाव पोलीस ठाण्यात विश्वास पाटील, राजन खान, भारत सासणे, महेश केळुस्कर, अशोक मुळे, मुरलीधर साठे यांनी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, महामंडळाचे निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेले काही दिवस मोदींविषयीच्या विधानांवरून भाजपेयींनी ज्यांचा अभिमन्यू करायचा प्रयत्न केला आहे, त्या सबनीसांनी पाच जानेवारी रोजी मोदींना लिहिलेले पत्र परवा पत्रकार परिषदेत वाचून दाखवून दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे खरेतर मोदीभक्तांनी विजयोत्सव साजरा करायला हवा होता, पण त्यांनी हा ‘माफीनामा’ नसल्याचा शंख केला आहे. या संमेलनासाठी प्रचंड पैसा खर्च करून त्यानिमित्ताने छबी उजळवण्याच्या मागे लागलेले डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील यांचे कान राष्ट्रवादी काँग्रेसचे सेकंड सुप्रीमो अजित पवार यांनी उपटल्याने त्यांनी सबनीसांचे नाक धरून त्यांच्यावर दबाव आणला. परिणामी ‘सामर्थ्य आणि मर्यादांवर आधारित संवाद-संघर्षवादी सेक्युलर भूमिका’ अशा शीर्षकाचे ११० पानी अध्यक्षीय भारुड वाचण्याचा ऐतिहासिक पराक्रम करू पाहणाऱ्या सबनीसांनी ‘झाले गेले ते गंगेला मिळाले, आता उदार अंत:करणाने मराठी रसिकांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी एकत्र यावे’ असे मानभावी आवाहन केले आहे. त्याचवेळी ‘आम्ही मागील अनेक महिन्यांपासून जी रात्रंदिवस मेहनत करत आहोत ती आता सत्कारणी लागेल’ अशी धूर्त प्रतिक्रिया पी. डी. पाटील यांनी दिली आहे. तर महामंडळाच्या हिकमती अध्यक्षा माधवी वैद्य यांनी ‘संमेलन विर्विघ्नपणे पार पडणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. इतर विषयावर मी संमेलनानंतर बोलेन’ असा इशारा दिला आहे. हीच प्रतिक्रिया सबनीस यांचे बोलविते धनी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही आहे, असे त्यांच्या पडद्यामागच्या चालींवर दिसून येते. सबनीसांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मोदीभक्तांची उबळ निदान काही प्रमाणात तरी शमायला हरकत नव्हती. शेवटच्या क्षणी का होईना, सबनीसांनी त्यांचा विरोध नक्कीच दुबळा केला आहे. मात्र सबनीसांच्या चारित्र्याचे भांडवल करून त्यांना आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्याची शर्यत अजूनही काही आत्मसंतुष्टांना लागलेली आहे. त्यात आता काही संधिसाधू मान्यवरांचीही भर पडली आहे. त्यांनी आपले प्रयत्न केवळ संमेलन चालू असेपर्यंतच सुरू न ठेवता त्यानंतरही चालू ठेवावेत आणि साहित्य महामंडळातल्या मुखंडांच्या मुसक्या आवळाव्यात. कारण यंदा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जो सार्वत्रिक तोतयागिरीचा उच्छाद पाहायला मिळतो आहे, त्यातून मराठीतल्या साहित्यिकांविषयीची उरलीसुरली सहानुभूतीही सामान्य रसिकांमधून नष्ट होण्याची साधार भीती आहे. सध्या देशात आणि राज्यात सत्तेच्या कृपाशिर्वादाने जो चिथावणीखोर उन्मादाचा ज्वर शिगेला पोहोचला आहे, त्यात आत्ममग्न, आत्मलुब्ध आणि लबाड प्रक्षुब्धांचीच मांदियाळी एकत्र आली आहे. साराच कळप संधिसाधूंचा आणि मुजोरांचा जमला की, त्यातून निवड करता येत नाही. या कळपातल्या कुणाविषयीही सुहानुभूती बाळगायचे कारण नाही. पण लबाड मतलबांसाठी इतरांना वेढू पाहणाऱ्या सुमारांची सद्दी हटवली नाही, तर सबनीस बरे होते, असे म्हणायची वेळ भविष्यात येईल.

No comments:

Post a Comment