Wednesday, January 20, 2016

पवारांचा हात?!?

अपेक्षेप्रमाणे पिंपरी-चिंचवड येथील ८९वे साहित्यसंमेलन अनेक ऐतिहासिक विक्रम करणारे ठरले आहे. संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे १३४ पानांचे अध्यक्षीय भाषण शेवटपर्यंत मुद्रित स्वरूपात उपलब्ध होऊ शकले नाही आणि त्यांनी बहुधा ते भाषण बाजूला ठेवत त्यांना दिलेल्या १५ मिनिटांच्या वेळात उत्स्फूर्त भाषण करून आपल्याकडे आवेश, आरोळ्या आणि आजवर इतरांनी सांगितलेले विचारच पुन्हा नव्याने सांगण्याची हातोटी यापलीकडे काहीही नाही, हे नेहमीप्रमाणे पुन्हा सिद्ध केले. त्यामुळे त्यांच्या भाषणाची फारशी दखल न घेतलेलीच बरी. छापील भाषणाचा यथावकाश परामर्श घेता येईलच. असो. सबनीस यांच्या नावे या निमित्ताने अजून एका पुस्तकाची भर पडली, हेही नसे थोडके. तशीच भर शरद पवार यांच्या नावेही पडली आहे. त्यांच्याही नावे उदघाटक वा स्वागताध्यक्ष या नात्याने साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावर सर्वाधिक वेळा हजेरी लावण्याचा विक्रम जमा झाला आहे. पवार निष्णात राजकारणी असल्याने ते कुठल्याही साहित्याच्या व्यासपीठावर आले की, साहित्यिकांना चार खडे बोल सुनावत तुम्ही आमच्यासारखे होऊ नका, असा उपदेश करतात. तसा त्यांनी यावेळीही केला. त्याचवेळी सबनीस यांच्या निवडीमागे माझा काही हात नाही, ते संमेलनाध्यक्ष झाल्यावरच माझी त्यांची भेट झाली, असा खुलासाही केला. पण तो कुणालाही पटणारा नाही. कारण श्रीपाल सबनीस, अरुण जाखडे, शरणकुमार लिंबाळे, विठ्ठल वाघ, चंद्रकुमार नलगे, रवींद्र शोभणे आणि श्रीनिवास वारुंजीकर यांनी या वर्षीच्या संमेलनाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले होते. नलगे-शोभणे यांनी नंतर आपली उमेदवारी मागे घेतली. कारण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुखपत्राचे विद्यमान संपादकाने फोन करून आता तुम्ही उमेदवारी मागे घेतली तर पुढच्या वर्षी राष्ट्वादी काँग्रेस तुम्हाला पाठिंबा देईल असे सांगितले होते. असेच फोन या संपादकांनी इतर उमेदवारांनाही केले. आणि त्या उमेदवारांच्या जवळच्या लोकांनाही केले. या संपादकांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार यांनी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पी. डी. पाटील यांना फोन करून स्वागत समितीची ८५ मते सबनीस यांच्या पारड्यात टाकायला सांगितली आहेत. शिवाय याच संपादकांनी सबनीस यांच्या घरी जाऊन पवारसाहेब आणि राष्ट्रवादीची सगळी ताकद आपल्या पाठीशी आहे, असे सांगितले. तेथून साहित्यक्षेत्रातल्या अनेकांना फोन केले. आता हे सर्व पवारांनी सांगितले नव्हते, ते त्या संपादकांनी पवारांचे नाव परस्पर वापरून केले, असे पवार जाहीर करतील का? नाहीतर त्यांच्याच शब्दांचा आधार घेत म्हणायचे तर ‘महाराष्ट्रात कुठेही, काहीही झाले तरी त्यात पवारांचा हात आहे, असे म्हणण्याची जी पद्धतच आहे’, ती अगदीच काही निराधार नाही. दाऊद इब्राहिमच्या बेनामी संपत्तीत वा किल्लारीच्या भूकंपात पवारांचा हात नसेलही, नसावाही, यावर त्यांच्या पक्षाबाहेरची आणि महाराष्ट्रातीलही कितीतरी माणसे डोळे झाकून विश्वास ठेवतील. पण अलीकडच्या काळात साहित्यसंस्था-नाट्यसंस्था यांच्या निवडणुकांमध्ये पवारांचा हात नाही वा त्यांच्या माणसांचा व साहित्याचा काडीइतकाही संबंध नसतानाही ती या संस्थांवर निवडून येत नाहीत हे पवार नाकारू शकणार नाहीत. पण त्यांनी सराईत राजकारण्यासारखे ‘हात झटकले’ तरी ‘कानून’सारखे त्यांचे ‘हात’ किती ‘लंबे’ आहेत, हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही महत्त्वाच्या कार्यक्रमाला, उपक्रमाला, योजनेला पवारांचा ‘हात’भार लागल्याशिवाय ती यशस्वी होत नाही, अशी अनेकांची श्रद्धा आहे आणि ती अंधश्रद्धा असल्याचे अजून तरी पवारांनी सिद्ध करून दाखवलेले नाही. असो. या संमेलनाच्या निमित्ताने तर पवारांनी साहित्य महामंडळालाही संमेलनाध्यक्ष निवडणुकीचा अजेंडा ठरवून दिला आहे. संमेलनाध्यक्षांची निवड ही पाच माजी संमेलनाध्यक्षांनी करावी असे पवारांनी म्हटले आहे आणि त्याची सुरुवात पुढच्या संमेलनापासून करावी हेही सांगितले आहे. आता महामंडळाने पवारांचे ऐकले, तर उघडपणे त्यांचा ‘हात’ स्पष्ट होईल! पण चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलेच असेल की, पवार असे सांगतात तेव्हा त्यांना नेमके त्याच्या उलट म्हणायचे असते. त्यामुळे महामंडळ काय करते ते कळेलच. २०१२चे नाट्यसंमेलन आणि २०१४चे साहित्यसंमेलन ही दोन्ही बारामतीमध्ये झाली होती. त्यातला ‘हात’भार तर पवारांना नाकारता येणार नाही. त्यावेळी मोहन आगाशे नाट्यसंमेलनाध्यक्ष आणि फ. मुं. शिंदे साहित्यसंमेलनाध्यक्ष हे केवळ ‘पवारां’मुळेच होऊ शकले, हेही उघड गुपित आहे. त्यामुळे त्यासाठी पवारांनी कुठलाही खुलासा केला तरी वा नाही केला तरी पवारांच्या ‘हस्तकौशल्या’चे सामर्थ्य महाराष्ट्र पुरेपूर जाणून आहे. तब्बल २८ वर्षांपूर्वी पुण्यात १६-१७ जानेवारीलाच सामाजिक परिषदेची शताब्दी साजरी करण्यात आली. त्यावेळी काहींनी रीतीप्रमाणे ‘राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा’ वगैरे सांगून पाहिले. त्यावर या परिषदेचे उदघाटन करताना समाजवादी नेते नानासाहेब गोरे म्हणाले होते, “राजकारणाचे जोडे कसले बाहेर ठेवता? आम्ही चाळीस चाळीस वर्षे राजकारणात आहोत, ते काय मूर्ख म्हणून आहोत? महाराष्ट्रात सर्वात मोठा समाज कोणता, तर मराठ्यांचा. मराठ्यांच्यात सर्वात महत्त्वाचा माणूस कोण, तर शरद पवार. त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर राजकारण. तेच बाजूला ठेवल्यावर समाजाची कसली सुधारणा होणार? अशी भूमिका घेणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्रातील समाजाची काहीही सुधारणा होणार नाही.” गोरे म्हणतात, ते आजही तितकेच खरे आहे. पवारांशिवाय महाराष्ट्रात काहीही होत नाही, होऊ शकत नाही. पवार संमेलनाला येणार म्हटल्यावर शेवटच्या क्षणापर्यंत ताकास तूर न लागू देणारे मुख्यमंत्री फडणवीसही तोंडदेखले का होईना, आलेच. पवार येणार म्हटल्यावर अनेकांनी सबनीस, महामंडळ आणि संमेलन यांच्यावर घातलेला बहिष्कार मागे घेत संमेलनाला हजेरी लावली. पवार येणार म्हटल्यावर या संमेलनाचे काही खरे नाही, असे जे कालपर्यंत म्हणत होते, ते आता या संमेलनाच्या ‘न भूतो न भविष्यती’पणाची चर्चा करू लागले आहेत. पवारांच्या दृश्य-अदृश्य हातांचा महिमा हा असा आहे! आणि तरीही पवारांना मात्र त्याचे श्रेय अजिबात नको असते, हीसुद्धा त्यांच्याच राजकारणाची थोरवी आहे!!!


No comments:

Post a Comment