Tuesday, January 5, 2016

महाराष्ट्राचे सोमनाथ चटर्जी

म. गांधी यांनी तत्त्वहीन राजकारण, नीतिमत्तारहित व्यापार, कष्टाविना संपत्ती, चारित्र्याविना शिक्षण, मानवतेविना विज्ञान, विवेकहीन सुखोपभोग आणि त्यागरहित भक्ती अशी सात ‘सामाजिक पापकर्मे’ सांगितली आहेत. या पापकर्मांच्या विरोधात लढण्याचे काम कम्युनिस्ट पक्षातील सगळ्या संस्था-संघटना आणि नेते करतात, हे भारतातील कम्युनिस्टांच्या कार्यपद्धतीवरून कुणालाही सहजपणे कळेल. जन्माने बंगाली आणि कर्माने नागपुरी असलेले कॉ. अर्धेंदू भूषण बर्धन हेही त्यापैकीच एक बिनीचे शिलेदार होते. ‘या क्रियावान सा पण्डिता’ असे एक संस्कृतवचन आहे. बर्धन यांचे सबंध आयुष्य या विधानाचा मूर्तिमंत आविष्कार होता. त्यांचा जन्म प. बंगालमधील २५ सप्टेंबर १९२५ चा. पण सरकारी नोकरीत असलेल्या वडलांची चाळीसच्या दशकात नागपूरला बदली झाली आणि नागपूर हीच बर्धन यांची कर्मभूमी झाली. वयाच्या पंधराव्या वर्षी ते कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. ते साल होते १९३९ आणि बर्धन यांचे तेव्हा वय होते पंधरा. विशेष म्हणजे तेव्हा भारतात कम्युनिस्ट पक्षावर बंदी होती. त्यामुळे पक्षाच्या नावाने उघडपणे कोणतीही गोष्ट करता येत नव्हती. त्यात वडील सरकारी नोकरीत. त्यामुळे पहिला संघर्ष घरातच उभा राहिला. बर्धन यांनी सतराव्या वर्षी घर सोडले आणि ते कम्युनिस्ट पक्षासाठी ‘फुलटायमर’ म्हणून काम करू लागले. अनेक छोट्या-मोठ्या आंदोलनांत सहभागी झाल्यामुळे बर्धन यांना सतत अटक करून तुरुंगात डांबले जाई. पण दोन-तीन महिन्यांत त्यांची सुटका केली जाई. याच काळात बर्धन प्रभावी वक्ता आणि कुशल संघटक म्हणून पुढे आले. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेला दक्षिणामूर्ती चौक हा एकेकाळी आरएसएसविरोधी लोकांची वस्ती म्हणून ओळखला जायचा. कारण या भागात हिंदू महासभेचे लोक जास्त प्रमाणात होते. ते गणेशोत्सवात व्याख्याने आयोजित करायचे. त्यात बर्धन यांना नेहमी बोलावले जाई. त्यात बर्धन संघावर सडकून टीका करत. १९५१ साली कम्युनिस्ट पक्षाला कायदेशीर मान्यता मिळाली आणि बर्धन यांच्या राजकारणाला उभारी आली. १९५७च्या निवडणुकीत बर्धन नागपुरातून महाराष्ट्राच्या विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून आले. तेव्हा त्यांनी महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांच्या सांगण्यावरून कालिदासाचे स्मारक उज्जैन ऐवजी रामटेकलाच व्हायला हवे, यावर विधानसभेत जोरदार भाषण केले. त्याने प्रभावित होऊन तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी त्या कामाला गती दिली. म्हणजे बर्धन हे त्या स्मारकाचे खरे शिल्पकार. विद्यार्थी चळवळीतून बर्धन यांचे नेतृत्व घडले. त्यामुळे त्यांची नाळ शेवटपर्यंत त्या चळवळीशी जोडलेली राहिली. नागपुरातील गिरणी कामगारांच्या मागण्यांसाठी त्यांनी कितीतरी आंदोलनांचे नेतृत्व केले, उपोषणे केली. ऑल इंडिया ट्रेड यूनियन काँग्रेसमध्ये सदस्यापासून अध्यक्षापर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निमिर्तीनंतर म्हणजे १९६७ साली आणि आणीबाणीनंतर म्हणजे १९८० साली आणि जागतिकीकरणाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १९८९ साली बर्धन यांनी लोकसभेचीही निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना यश आले नाही. तसाही कुठलाही सच्चा कॉम्रेड केवळ निवडणूक जिंकण्यासाठी सार्वजनिक जीवनात कार्यरत नसतो आणि निवडणूक हरला म्हणून त्याच्या सार्वजनिक कामाची गतीही मंदावत नाही. बर्धन यांचेही तसेच होते. ‘पडलो’ एवढेच घरी सांगून ते दुसऱ्या दिवसापासून नेहमीच्याच उत्साहाने कामाला लागत. या देशात एक दिवस क्रांती होणार आहे आणि ती कामगार-शोषित-शेतकरी-आदिवासीच करणार आहेत, असा प्रत्येक कॉम्रेडला दुर्दम्य आशावाद असतो. बर्धन यांचाही तो होताच. नव्वदच्या दशकात बर्धन दिल्लीला गेले. कम्युनिस्ट पक्षामध्ये उपमहासचिव ते सचिव अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी तत्त्वनिष्ठेने सांभाळल्या. दिल्लीच्या राजकारणात राहूनही आणि इतकी वर्षे कम्युनिस्ट पक्षात राहूनही बर्धन शेवटपर्यंत सिनिक झाले नाहीत. ‘संसदेतील साडपाचशे खासदारांपैकी ३००हून अधिक खासदार करोडपती आहेत, ही परिस्थिती बदलली पाहिजे. मजूर-शेतकरी-कामगार यांच्या न्यायासाठी क्रांती झाली पाहिजे, त्यासाठी साम्यवाद हाच एकमेव मार्ग आहे,’ या निष्ठेवरील त्यांचा विश्वासही कधी ढळला नाही. उतारवयात अनेक कम्युनिस्ट कडवट होतात, पण कॉ. बर्धन यांनी तो मार्ग जाणीवपूर्वक टाळला. सोमनाथ चटर्जींसारखीच त्यांचीही पक्षावरील निष्ठा वादातीत होती. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी शिरसावंद्य मानून ते काम करत राहिले. स्वत:बद्दल बोलायला बर्धन यांना अजिबात आवडायचे नाही. त्यामुळेच त्यांनी अनेकांनी अनेकदा आग्रह करूनही आत्मचरित्र लिहिले नाही ते नाहीच. भारतीय राजकारणात आजघडीला सामाजिक नीतीमत्ता, सार्वजनिक चारित्र्य, साधी राहणी, व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, महत्त्वाकांक्षा न बाळगता निरसलसपणे आपले काम करणे आणि तळागाळातल्या शोषितांचा कळवळा, हे फक्त कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांमध्येच दिसते. त्यातील एक आघाडीचे शिलेदार असलेले कॉम्रेड बर्धन हे ‘महाराष्ट्राचे सोमनाथ चटर्जी’ होते!

No comments:

Post a Comment