Monday, June 4, 2012

छोट्या संमेलनांचा यशस्वी फॉर्म्युला

 (९ डिसेंबर २०१० रोजी प्रहारमध्ये लिहिलेला लेख) 
जुलै 2007 चा शेवटचा दिवस. या दिवशी संध्याकाळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू आणि प्रसिद्ध नाटकाकर विजय तेंडुलकर यांची जाहीर
मुलाखत होणार होती. हे दोन्ही दिग्गज पहिल्यांदाच समोरासमोर येणार होते.
त्यामुळे पुण्यात मोठं उत्सुकतेचं वातावरण होतं. पण हा कार्यक्रम आयोजित करणा-या
राजन खान आणि त्यांच्या ‘अक्षर मानव’ या संस्थेला मात्र धाकधूक होती की, हा कार्यक्रम
यशस्वी होतो की नाही. कारण लागू-तेंडुलकरांशी वैयक्तिक संबंध असल्यानं त्यांचा होकार
सहजासहजी मिळाला खरा, पण आता कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचं मोठं आव्हान पुढे
ठाकलं होतं. बरं, संस्थेकडे आर्थिक बळ पुरेसं नव्हतं आणि मुनष्यबळही. त्यामुळे
कुठल्याही प्रकारची जाहिरात झाली नव्हती आणि प्रसिद्धीही. पण पाचच्या कार्यक्रमाला
पुणेकरांनी दुपारी दोनपासूनच शिस्तबद्ध रांगा लावायला सुरुवात केली. आणि राजन खान आणि
त्यांच्या कार्यकर्त्यांचं धाबं दणाणलं. पण कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला!
राजन खान हा माणूसच असाच आहे!आर्थिक बळ आणि मनुष्यबळ या दोन्हींचा कुठलीही फिकीर न
करता मनात येईल ते कार्यक्रम आखायचे, काही मित्रांच्या सहकार्यने यशस्वीही करायचे हा
त्यांचा खाक्या आहे. शिवाय णूस बोलायला एकदम फटकळ. पण मराठीतला आघाडीचा लेखक
असल्यानं सर्वाना परिचित. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला दिग्गजांपासून सर्वजण येणात. अनंत भावे,
रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, मेघना पेठे, सौमित्र (किशोर कदम), दासू वैद्य, रमेश
इंगळे उत्रादकर, आसाराम लोमटे अशा सध्याच्या आघाडीच्या साहित्यिकांशी या संमेलनांत
हजेरी लावली आहे.
मराठीत छोटी-मोठी अनेक संमेलनं होतात. पण त्यातली बरीचशी मोघम संकल्पना घेऊन केली जातात. आपण
हे टाळायचं, असं ठरवून राजन खान यांनी एकेक विषय घेऊन संमेलनं करायला सुरुवात केली. गेल्या
तीन वर्षात त्यांनी यवतमाळ, चंद्रपूर, पाचगणी या ठिकाणी ‘अक्षर मानव’च्या माध्यमातून
‘मी संमेलन’, ‘मी-तू संमेलन’, ‘साहित्याचं साहित्य संमेलन’ अशी संमेलनं घेतली आहेत.
साहित्य असेल वा समाज यातल्या कुठल्याही व्यक्तीला ‘मी’चा शोध असतो. ‘मी’ भोवती जग असतं.
यातनं ‘मी संमेलन’ घ्यावं हे लक्षात आलं. या संमेलनातून ‘मी’च्या बाहेरही जग असतं.
एकाला दुसरा घटक लागतो, तेव्हा ‘मी-तू संमेलन’ घ्यावं असा प्रस्ताव पुढे आला. मग त्यावर
संमेलन घेण्यात आलं.
साहित्याचा इतर घटकांशी संबंध येतो. त्यातून ‘साहित्याचं साहित्य संमेलन’ घेण्यात आलं.
आणि आता यवतमाळ इथं अखिल भारतीय संमेलनाच्या तारखांनाच म्हणजे 25 ते 27
डिसेंबरला ‘विनोद साहित्य संमेलन’ आयोजित केलं आहे. सध्या आपल्या समाजातून आणि
साहित्यातून विनोद संपत चालला आहे. समाज गंभीर होत चालला आहे. पण समाजाला विनोदाची गरज
असतेच, म्हणून हे संमेलन आयोजित केले आहे असं राजन खान सांगतात.
राजन खान यांना यशस्वी संमेलनांचा फॉर्म्युला सापडला आहे. आता तर त्यांना
लोकांकडूनच वेगवेगळ्या संमेलनांचे पर्याय सुचवले जात आहेत. आमच्या गावीही असं
संमेलन घ्या अशी निमंत्रणं येऊ लागली आहेत. चंद्रपूरच्या भोयर नावाच्या तरुणानं तर
लग्नातल्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्यासाठी ‘अक्षर मानव’चं संमेलनच लग्नात भरवलं
होतं. आणि त्याला वऱ्हाडी मंडळींसह सर्वानी चांगला प्रतिसाद दिला. त्या तरुणाची
आधी हिरमुसलेली बायकोही खुश झाली. आजवरच्या ‘अक्षर मानव’च्या सर्वच संमेलनांना
साहित्यिक-रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याची तीन-चार कारणं आहेत. फार गर्दी
व्हावी अशी राजन खान यांचीच अपेक्षा नसते. कार्यक्रमाला शंभर लोक आले तरी पुरे असं
त्यांचं म्हणणं असतं. पण कुठल्याही कार्यक्रमाला पाचशे-सातशे लोक येतातच, येतात.
कारण ही संमेलनं पाचगणीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी असतात. तीन दिवस आणि चार
रात्री लेखक-वाचकांना एकमेकांशी मनमोकळा संवाद करता येतो, देवाणघेवाण करता येते.
त्यामुळे दिवसभराच्या कार्यक्रमानंतर रात्री शेकोटी पेटवून त्याभोवती काव्य-शास्त्र-विनोद यांना
उधाण येतं. तिथं संमेलनानंतरचं संमेलन भरतं.
माणसाच्या बौद्धिक विकासासाठी काम केलं पाहिजे असं राजन खान यांना वाटतं.
त्यासाठी आपण आपल्यापरीनं काय करू शकतो? तर समाजात खूप चांगलं काम असणारी आणि विचार असणारी
माणसं आहेत. त्यांना बोलावून लोकांसमोर बोलायला लावायचं, तत्कालीन प्रश्नांकडे कसं
पाहायचं याबाबत मागदर्शन करायला सांगायचं. यातलं काय घ्यायचं अन् काय नाही ही
समाजाची जबाबदारी आहे. पण समाजाला असं काहीतरी देणं ही आपली जबाबदारी आहे, ती मी
माझ्या परीनं पार पाडतो, असं राजन खान आपल्या उपद्व्यापाचं स्पष्टीकरण देतात.
लेखकानं नुसतं लिहून चालणार नाही. समाजाचं काहीतरी काम केलं पाहिजे. कोपरा धरून
लिहिण्यापेक्षा, कागदावरच नुसते संदेश देण्यापेक्षा काही तरी काम केलं पाहिजे, या
ऊर्मीतून राजन खान यांच्यासारख्या एका आघाडीच्या लेखकानं ‘अक्षर मानव’ या संस्थेच्या
माध्यमातून वेगळ्या वाटा शोधायचा प्रयत्न चालवला आहे. तो अनुकरणीय आहे. भविष्यात
‘आम्ही संमेलन’, ‘आपण संमेलन’, ‘वेगळ्या वाटांचे लेखक संमेलन’ अशी संमेलनं घेण्याचा
‘अक्षर मानव’चा विचार आहे. ती संमेलनं यशस्वी होतील यात आता काही शंका उरलेली नाही.
एकंदर मराठी साहित्यविश्वाचा विचार केला तर ही संमेलनं फार छोटय़ा स्वरूपाची आहेत. पण काय
करायचं नाही हे आधीच ठरवल्यानं या संमेलनात कुठलाही अनावश्यक खर्च केला जात नाही अन् निर्थक
चर्चाही होत नाही. हे एका अर्थानं औंदुबर संमेलनाला समांतर ठरणारे संमेलन आहे.
छोटय़ा स्वरूपाची संमेलन यशस्वी होतातच, पण तिथंही दर्जाचं आव्हान असतं. ‘अक्षर
मानव’च्या संमेलनांमधून ही गोष्ट निर्विवादपणे होते. आणि तेच त्यांचं यश आहे.

No comments:

Post a Comment