Saturday, January 2, 2016

आनंदयात्री

मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील नवथर तरुणांच्या, मध्यमवर्गीय प्रौढांच्या, एकेकाळी त्यांच्या कविता वाचून प्रेमात पडलेल्यांच्या वा प्रेमात पडल्यावर त्यांच्या कविता वाचलेल्या वयोवृद्धांच्या आणि प्रेम हाच जगण्याचा एकमात्र विषय मानणाऱ्यांच्या काळजाचा एकतरी ठोका चुकला असेल. महाराष्ट्रातल्या तीन-चार पिढ्यांना आनंद देण्याचे, त्यांच्या प्रेमाची लज्जत वाढवण्याचे काम पाडगावकरांनी केले. जगण्यावर निस्सीम भक्ती करत आणि जगण्याचेच बोलगाणे गात पाडगावकर आयुष्यभर जगले, वागले आणि तशाच त्यांनी कविताही लिहिल्या. ते मराठीतले खरेखुरे आणि बहुधा एकमेव आनंदयात्री कवी होते. साधारणपणे पावणेसहा फुट उंची, गोरा वर्ण, नीटनेटकी वेशभूषा, जाड भिंगांचा चश्मा आणि अखंड गप्पा ही कवी आणि माणूस पाडगावकरांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. आणि त्यांची बुल्गानीन दाढीही. पन्नासच्या दशकात बुल्गानीन म्हणून रशियाचे एक पंतप्रधान होते. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण दाढी पाडगावकरांनी स्वीकारली. ती त्यांना इतकी फिट झाली की, पुढे ती ‘पाडगावकरांची दाढी’ म्हणूनच प्रसिद्ध झाली. उलट बुल्गानीन यांच्या दाढीविषयी बोलताना ‘बुल्गानीन अशी पाडगावकरांसारखी दाढी ठेवायचे!’ असे गमतीने सांगितले जाऊ लागले. वयाच्या ऐंशीनंतर अतिशय तरळ प्रेमकविता सुचणाऱ्या या कवीला प्रतिभावंतच म्हणायला हवे. पाडगावकर हा माणूस जगण्यावर नितांत प्रेम करणारा होता. जगण्याचा उत्सव सतत साजरा करत राहणे, हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले होते. पाडगावकरांनी आपल्या आयुष्यात  दाहक अनुभवही घेतले. पण ती दाहकता, कटुता त्यांच्या बोलण्या-वागण्यात कधीही येत नसे. इतरांना फक्त आनंद द्यायचा, एवढेच एक ब्रीद त्यांनी आयुष्यभर जपले. ते माणसांचे गाणे गात राहिले. आणि तेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. पाडगावकर शालेय वयातच कविता लिहायला लागले. ‘धारानृत्य’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९५० साली प्रकाशित झाला, तर ‘अखेरची वही’ हा शेवटचा कवितासंग्रह २०१३ साली प्रकाशित झाला. म्हणजे जवळपास ६३ वर्षे पाडगावकरांनी सातत्याने कविता लिहिली. कारण त्यांना माणूस समजून घेण्यात अनिवार कुतूहल होते, पण इतकी वर्षे सातत्याने माणसांविषयी कविता लिहून मला माणूस कळला आहे, असे पाडगावकर कधी म्हणाले नाहीत. मोठ्यांसाठी २८ कवितासंग्रह (त्यात मीरा, कबीर, सूरदास यांच्या रचनांचे मराठी अनुवादही आहेत.) आणि मुलांसाठी १० बालकवितासंग्रह असे एकंदर ३८ कवितासंग्रह पाडगावकरांनी लिहिले. ‘सलाम’, ‘बोलगाणी’, ‘जिप्सी’, ‘गझल’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रचंड लोकप्रिय ठरले. पाडगावकरांनी बहुतांश प्रेमकविता लिहिली असली तरी ‘सलाम’मध्ये उपरोध व उपहास, ‘उदासबोध’मध्ये विडंबन आणि ‘बोलगाणी’मधील लयबद्धता हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयोग आहेत. पाडगावकरांना शालेय वयात सक्तीने ‘बायबल’ शिकावे लागले. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांच्यावर ओशोंचा प्रभाव पडला, पण पाडगावकर कुणाच्या झेंड्याखाली गेले नाहीत. त्यांनी त्यांची बोलगाणी लिहिणारा कवी ही ओळख संपू दिली नाही. कुठल्याही राजकीय विचारधारेशी बांधीलकी न मानताही आनंदाने, जगण्याचा उत्सव साजरा करत जगता येते, त्यातही आनंद असतो, हे पाडगावकर यांनी त्यांच्या जगण्यातून आणि कवितेतून दाखवून दिले. पाडगावकरांनी कवितेशिवाय इतर लेखन मोजकेच केले. शेक्सपिअरच्या ‘द टेम्पेस्ट’, ‘ज्युलिअस सीझर’ आणि ‘रोमिओ अँड ज्युलिअेट’ या तीन नाटकांचे मुळाबरहुकूम भाषांतर केले. बायबलच्या नव्या कराराचे आणि कमला सुब्रमण्यम यांच्या दोन खंडी महाभारताचेही मराठी भाषांतर केले. याशिवाय त्यांची गद्यलेखनाची ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘चिंतन’, ‘स्नेहगाथा’, ‘शोध कवितेचा’, ‘आले मेघ भरून’, ‘असे होते गांधीजी’ अशी सहा पुस्तके प्रकाशित झाली, पण पाडगावकरांची खरी ओळख ही कवी म्हणूनच राहिली, यापुढेही राहील. असा आणि इतका समरस झालेला दुसरा कविमाणूस महाराष्ट्रात दाखवता येणार नाही. अशा प्रकारच्या जगण्याविषयी फारसे बरे बोलण्याचे दिवस आता राहिले नाहीत आणि तशा जगण्याची सोयही राहिली नाही. त्यामुळे आजच्या-उद्याच्या पिढ्यांना पाडगावकरांची थोरवी अनुभवता येणार नाही, पण त्यांच्या कविता मात्र त्यांना भावतील, आवडतील. नवथर प्रेमिकांचे पाडगावकर अजून कैक वर्षे आवडते कवी राहतील. ते कवी म्हणून प्रसिद्ध पावू लागले होते, तेव्हा ‘शीळ’वाल्या ना. घ. देशपांडे यांनी त्यांना एक महत्त्वाचा कानमंत्र दिला होता - ‘कविता जर अनेक अंगांनी फुलायची असेल, तर कवितेशिवायच्या इतर सर्व वाटा बंद केल्या पाहिजेत.’ पाडगावकरांनी नाघंचा हा सल्ला जवळपास आयुष्यभर प्रमाण मानला. त्यामुळेच ते इतकी वर्षे सातत्याने कविता लिहू शकले. पाडगावकरांनी स्वत:चा शिष्यसंप्रदाय निर्माण केला नाही. पण त्यांना द्रोणाचार्य आणि स्वत:ला एकलव्य मानणाऱ्यांचा महाराष्ट्रात नंतर बराच सुकाळ झाला. या लोकांनी पाडगावकरांचेच शब्द उलटेपालटे फिरून त्यांची स्वत:च्या कविता म्हणून नव्याने नाणी पाडली. ‘लिज्जत’ पापडसाठी पाडगावकरांनी अनेक वर्षे पावसावर कविता लिहिली. पावसाळा सुरू झाला की, वर्तमानपत्रात लिज्जड पापडची पाडगावकरांच्या नव्या कोऱ्या कवितेसह जाहिरात हा एकेकाळी अनेकांच्या औत्सुक्याचा विषय झाला होता. नंतर तो चेष्टेचाही होत गेला. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर या त्रिकुटाने महाराष्ट्रभर कवितावाचनाचे कार्यक्रम करून कवितेला लोकाश्रय मिळवून दिला. गद्यकविता लयीत म्हटल्या तर त्या लोकांना आवडतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले, पण दिलीप चित्रे यांच्यासारख्या लघुनियतकालिकांच्या परंपरेतील कवीने ‘करंदीकार-बापट-पाडगावकर यांनी कवितेचे बघे निर्माण केले... कवितेची प्रतिमा न उंचावता फक्त कवीचीच प्रतिमा उंचावली,’ अशी टीका त्यावर केली. साठीच्या दशकानंतर लोकप्रिय ते सर्व त्याज्य ही विचारसरणी बळावत गेल्याने अशी टीका होणे क्रमप्राप्त होते. ती काही प्रमाणात रास्तही आहे, पण लोकप्रिय कवीचीही समाजाला अभिजात कवींइतकीच गरज असते, हे नाकारून चालणार नाही. पाडगावकरांना अभिजात होण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती आणि बाजारू होण्याचा सोसही नव्हता. समाजातल्या एका मोठा समूहाच्या भावभावनांना हात घालणाऱ्या कविता लिहिणे, एवढेच पाडगावकर करू शकत होते आणि तेच त्यांनी केले. बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज आणि ना. घ. देशपांडे यांची बहुतांश कविता पाडगावकरांना वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत तोंडपाठ होती. आपल्या आधीच्या पिढीतल्या कवींच्या कविता अशा मुखोद्गत असलेले आणि आपल्या समकालीन कवींविषयी सजग असलेले पाडगावकर हे कवी म्हणून निदान लोकप्रियतेच्या बाबतीत तरी मोठेच होते. त्यांच्या कवितासंग्रहाच्या किमान दोन ते कमाल पंचवीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. अशी आणि इतकी वाचकप्रियता लाभलेला कवी महाराष्ट्रात निदान नजीकच्या काळात तरी निर्माण होण्याची शक्यता कमीच आहे. तोवर जगण्याचे बोलगाणे गाण्यासाठी, प्रेमाच्या आणा-भाका घेण्यासाठी आणि भवतालाकडे निर्मळ दृष्टीने पाहण्यासाठी पाडगावकरांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही.

3 comments:

  1. Real good tribute. अतीव प्रेम किंवा कुत्सितपणा टाळून लिहिल्याने मजा आली.

    ReplyDelete
  2. धन्यवाद, मला वाटतं पाडगावकरांकडे अतिव प्रेम आणि कुत्सितपणा टाळूनच पाहायला हवे. त्यांच्या मर्यादा जगजाहीर आहेत आणि त्यावर पुष्कळ बोलून-लिहून झाले आहे. तेच पुन्हा उगाळत बसण्याचे कारण नाही, नव्हते. म्हणून मी ते टाळण्याचा प्रयत्न केला.

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय चांगला लेख .पाडगावकरांच्याबाबतीत हे आणि असेच सर्वांच्या मनात आहे, धन्यवाद रामभाऊ

      Delete