Saturday, January 7, 2012

प्रसारमाध्यमांची झाडाझडती

प्रसारमाध्यमांना समाजाचा जागल्या वा आरसा म्हटलं जातं. जे जे समाजात घडतं, त्याचं योग्य, नि:पक्ष पद्धतीनं वार्ताकन करणं आणि अग्रलेख, लेख यांच्या माध्यमातून काय हितावह आहे, काय नाही याविषयी मार्गदर्शन करणं ही प्रसारमाध्यमांची आणि त्यांच्या संपादकांची जबाबदारी असते. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं, त्याला त्यांनी दर्पणअसं तर नंतर सुरू केलेल्या साप्ताहिक वर्तमानपत्राला दिग्दर्शनअसं नाव दिलं होतं. या नावांतून प्रसारमाध्यमांच्या कामाचं सूतोवाच होतं. पण हेही खरं की, भारतीय आणि त्यातही विशेषत: महाराष्ट्रातील पत्रकारिता ही स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली. तेव्हा त्यांच्यापुढे स्वातंत्र्याविषयीची पेरणी करणं, अन्याय-शोषणाविषयी जनमानसात चीड निर्माण करणं ही प्रमुख उद्दिष्टं होती. त्यात मोठय़ा प्रमाणावर ध्येयवाद होता. 1980च्या दशकात मात्र हा ध्येयवाद मागे पडायला सुरुवात झाली. गेल्या वीस वर्षात तर प्रसारमाध्यमांमध्ये खूपच उलटापालट झाली आहे. जागतिकी- करणाच्या रेटय़ानं सेवा-उद्योग यांच्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये मोठा बदल केला आहे.
 
त्यामुळे प्रसारमाध्यमांचा -हास सुरू झाला आहे असं सूतोवाच काही माध्यमतज्ज्ञ करू लागले आहेत. पण असं असलं तरी माध्यमांची मूळ भूमिका काही बदललेली नाही. त्यामुळे समाजाच्या दोषदिग्दर्शनाचं काम ती आपापल्या मगदुरानुसार करतच आहेत, यापुढेही करत राहतील. ती सर्वच काळच्या समाजाची गरज असते आणि असणार आहे. पण म्हणून प्रसारमाध्यमंच सर्व वेळी बरोबर असतात असंही नाही. त्यांच्या कामाचंही ऑडिट वेळोवेळी झालंच पाहिजे. ते पुन्हा समाजातल्या जाणकार आणि अभ्यासू लोकांचंच काम. अचूकतेचा, सर्वसमावेशकतेचा आणि पारदर्शकपणाचा आग्रह धरणं हे समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यकच असतं.
 
प्रसारमाध्यमांचा समीक्षकअशी काही खरं तर आपल्याकडे संकल्पना नाही. हीसुद्धा एक शाखा असू शकते आणि त्याबाबत अ‍ॅकॅडेमिक अभ्यासाची पद्धतही आवश्यक आहे असाही विचार फारसा केला जात नाही. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यासारख्या संस्था माध्यमांविषयीचं ध्येयधोरण ठरवण्याचं काम करतात, पण ती प्रातिनिधिक स्वरूपाचं काम करतात. याशिवाय काही माध्यमतज्ज्ञही सातत्यानं माध्यमांच्या वागण्याबोलण्याचं ऑडिट करतच असतात. प्रसारमाध्यमं हे सतत चर्चेतलं क्षेत्र आहे आणि समाजाच्या दैनंदिन जीवनाशी निगडितही. त्यामुळे त्यात उमटणाऱ्या चित्राविषयी चर्चा होणार.
 
महाराष्ट्रात माध्यमांची समीक्षा प्राध्यापक-पत्रकार जयदेव डोळे गेली काही वर्ष सातत्यानं करत आहेत. त्यांना खरं तर माध्यमांचा समीक्षकच म्हणायला हवं. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा पहिला लेखसंग्रह समाचारया नावानं प्रकाशित झाला. त्यानंतर बखरहा छोटेखानी लेखसंग्रह प्रकाशित झाला. या दोन्ही पुस्तकांचं चांगलं स्वागतही झालं. ही स्वागतशीलता रसिक वाचक आणि प्रसारमाध्यमं या दोन्ही घटकांनी निदान काही प्रमाणात तरी दाखवली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे डोळे यांचं अलीकडेच हालहे तिसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे. समाचार’, ‘बखरआणि हालया तिन्ही नावांतून डोळे यांनी त्यांना जे काही माध्यमांबद्दल म्हणायचं आहे ते चांगल्याप्रकारे सूचित केलं आहे. त्यांच्याच रोखठोक भाषेत सांगायचं तर ही, प्रसारमाध्यमांची झाडाझडतीच आहे. 

डोळे यांच्यासारखा एक जबाबदार प्राध्यापक-पत्रकार सातत्यानं प्रसारमाध्यमांविषयी काहीएक सांगू पाहतो आहे. माझंच खरं असं मी मानत नाही. कोणीच मानू नये. जे छापून येतं, जे टीव्हीवर उमटतं, त्या मागं खूप मोठी गुंतागुंत असते हे मला माहीत आहे. कष्टाशिवाय काही उत्पन्न होत नसते याचं भान मला असतंच. ते कष्ट आणखी प्रभावी व्हावेत, त्यातून चांगलं घडत जावं आणि कष्ट प्रामाणिक हवेत एवढीच माझी भूमिका. मला माझ्या मनाप्रमाणे कष्टायला लावणारी माध्यमं म्हणूनच मला उद्युक्त करतात. मग मला त्यांची हालहवाल पुसावीच लागते.अशी भूमिका डोळे यांनी हालच्या निवेदनात नोंदवली आहे. ती यथायोग्य आहे. 

डोळे यांनी काही काळ पत्रकारिता केली असली तरी ते आता पूर्णवेळ पत्रकार नाहीत, तर प्रसारमाध्यमांसाठी योग्य पत्रकार घडवणा-या प्राध्यापक-पत्रकाराच्या पेशात आहेत. त्यामुळे त्यांना प्रसारमाध्यमांतली सर्व अंगांची चांगली जाणीव आहे, त्याबाबत ते सजग आहेत, पण तरीही थेट संबंधित नसल्यानं त्यांना प्रसारमाध्यमाकडे पुरेशा तटस्थपणेही पाहता येतं, हा त्यांचा विशेष आहे.   

या संग्रहातल्या लेखांचं दुसरं वैशिष्टय़ असं की, यातले काही लेख वर्तमानपत्रांतून, काही साप्ताहिकांतून तर काही दिवाळी अंकांतून पूर्वप्रकाशित झाले आहेत. याचाच अर्थ असा की, डोळे यांच्या आक्षेपांना प्रसारमाध्यमांनी काहीसा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी आपल्यावरील टीकाही छापलेली आहे. प्रसारमाध्यमं ही चालू घटनांना प्राध्यान्य देणारी असल्यानं घाईगडबडीत त्यांच्याकडून काही छोटेमोठे अपराध कळत-नकळतपणे घडतात. विशेषत: अलीकडच्या काळात वृत्तवाहिन्यांकडून प्रमाद म्हणाव्या अशा घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. प्रचंड स्पर्धा, चढाओढ आणि अहमहमिका यामुळे त्यांच्याकडून घडणा-या प्रमादांची संख्या जास्त आहे. त्याबाबतही डोळे यांनी पुरेशा सडेतोडपणे लिहिलं आहे.
 
या सर्व लेखनाचा सूर कुठल्याही विशिष्ट माध्यमाबद्दल नसून एकंदर माध्यमातल्या अपप्रवृत्ती आणि मूल्यांबाबत आहे. त्यामुळे या संग्रहात डोळे यांनी केवळ प्रसारमाध्यमांचं उणंदुणंच काढलं आहे, असंही नाही. सामाजिक मूल्यांबाबत आणि पत्रकारितेच्या मूल्यांबाबत डोळे आग्रही आहेत आणि काटेकोरही. त्यामुळे ब-याचदा त्यांच्या लेखणीला चढा सूर लागतो, पण त्यामागे त्यांची आत्मीयताच आहे असंच गृहीत धरायला हवं. सामाजिक मूल्ये आणि माध्यमे’, ‘राजकीय मूल्ये आणि माध्यमेआणि माध्यमबाधाअसे त्यांनी या संग्रहाचे तीन विभाग केले आहेत.
 
मराठी साहित्य आणि प्रसारमाध्यमे : एक मरतुकडं, दुसरं खंगलेलंया लेखात त्यांनी प्रसारमाध्यमं आणि साहित्य यांच्यातील अनुबंधाचा चांगला ऊहापोह केला आहे. या दोघांमधील साहचर्य दोघांच्याही आणि पर्यायानं समाजाच्या कसं हिताचं आहे, याची त्यांनी साधार चर्चा केली आहे. अलीकडच्या काळात हे साहचर्य संपुष्टात येत चालल्यानं प्रसारमाध्यमं आणि साहित्य यावर काय परिणाम होत आहे, याचं दिग्दर्शन त्यांनी लेखाच्या शीर्षकातूनच सूचित केलं आहे.
 
असाच दुसरा वैशिष्टय़पूर्ण लेख आहे, ‘प्रतिपत्रांची परवड आणि परवचाहा. पर्यायी पत्रकारिता म्हणून मराठीमध्ये अलीकडच्या काळात सुरू झालेली दैनिकं, साप्ताहिकं आणि पाक्षिकांविषयी स्पष्टपणे बोलण्याचा परखडपणा या लेखात डोळे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, हा लेख एका पर्यायी माध्यम म्हणून पुढे आलेल्या पाक्षिकातच छापून आला होता. मराठीतल्या पर्यायी पत्रकारितेच्या मर्यादा या लेखात डोळे यांनी अतिशय रोखठोकपणे नोंदवल्या आहेत.
 
पण काही लेख मात्र विषयाचे सिंप्लीफिकेशन करणारे आहेत. या संग्रहातला पहिलाच लेख मावळत्या दशकाचा (म्हणजे 2000 ते 2010) ताळेबंद मांडणारा आहे. त्याचं शीर्षक आहे, ‘शक, दशक, विदूषक : मावळत्या दशकाचा ताळेबंद’. दशकाचा आढावा अवघ्या पाच-साडेपाच पानांत घेतला जात असेल तर त्यात काहीच मुद्दय़ांचं सूतोवाच होऊ शकतं, ही उघड गोष्ट आहे. त्यामुळे त्याविषयी एकच ठाम विधान करणंही तितकंसं बरोबर नाही. 
 
पण एकुणात हा लेखसंग्रह माध्यमांची चांगल्या प्रकारे समीक्षा करतो, हे मात्र नि:संशय. आपल्या कर्तव्याबाबत प्रसारमाध्यमांनी सजग असणं त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत राहणं माध्यम समीक्षकांचं कामच आहे. 
 
हाल : जयदेव डोळे
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
 पाने : 215, किंमत : 200 रुपये

No comments:

Post a Comment