Saturday, February 4, 2012

साक्षेपी वाचनासाठीचे वस्तुपाठ!

आज संध्याकाळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सांगता होईल आणि सालाबादाप्रमाणे या संमेलनाची फलश्रुती काय, हा सनातन प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होईल. त्यावर नेहमीप्रमाणे वाद-विवादही होतील. मग यातून मसावि पार काही निघत नसून लसाविच तेवढा निघतो आहे, असा जुनाच निष्कर्ष काही लोक पुन्हा काढून दाखवतील. पण त्याचबरोबर पुढच्या वर्षीचे साहित्य संमेलन कुठे याचीही हळूच विचारणा करतील. या संमेलनाची गरज आहेच, त्याला नाक मुरडण्याचे काहीच कारण नाही. पण वाचनसंस्कृती आणि ग्रंथसंस्कृती वाढीला लागण्यासाठी आणखीही काही गोष्टींची आवश्यकता असते. त्यातलाच एक भाग म्हणजे बुक ऑन बुक्सया वाङ्मय प्रकारातील पुस्तकांची संख्या वाढणेही तितकेच गरजेचे असते. दुर्दैवाने मराठीमध्ये या प्रकारच्या पुस्तकांची संख्या फारच अल्पस्वल्प आहे.
मराठीत नाटय़छटालिहिणारे दिवाकर, ‘झेंडूची फुलेलिहिणारे केशवकुमार, ‘शतपत्रेलिहिणारे लोकहितवादी, ‘हायकूलिहिणाऱ्या शिरीष पै अशा एकांडय़ा शिलेदारांची परंपरा कुणी चालवायला धजावत नाही. तसंच स्वत:च्या ग्रंथ-शोधाची, ग्रंथ-संग्रहाची आणि ग्रंथ-प्रेमाची मातब्बरी सांगता यावी एवढा साक्षेप संपादन करण्यासाठीही कुणी फारसा पुढाकार घेत नाही. असे म्हणतात की, समाज प्रगल्भ व्हायचा असेल तर त्याची ग्रंथश्रीमती वाढायला हवी. आणि ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त ग्रंथमार्गदर्शक, ग्रंथसंग्राहक, ग्रंथस्नेही निर्माण व्हायला हवेत. ती आपल्या समाजासाठी नितांत निकडीची गोष्ट आहे.
 
ग्रंथसंस्कृती आणि वाचनसंस्कृतीच्या बाबतीत आपला समाज गरीबअसणं, आपण गरीबअसणं, ही काही फारशी शोभादायक गोष्ट नव्हे!
 
मराठीमध्ये आजवर ही सांस्कृतिकगरिबी दूर करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून प्रयत्न केले, त्यात अलीकडच्या काळात अरुण टिकेकर यांचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल. त्यांच्या अक्षरनिष्ठांची मांदियाळीया पुस्तकाने बुक ऑन बुक्सया मराठीतल्या वाङ्मय प्रकारात अतिशय मोलाची भर घातली आहे.
 
अलीकडच्या काळातले हे अशा प्रकारचे एकमेव पुस्तक असावे! पण अशा पुस्तकांचे मोठेपण उमजण्याएवढा सुज्ञपणा मराठी वाचकांमध्ये अजून आलेला नाही! मात्र असे असले तरी ग्रंथसंस्कृती आणि वाचनसंस्कृतीच्या बाबतीत आपल्याला सुज्ञ करणारे हे पुस्तक आहे.
 पुस्तकांचे वाचन न करताही वैचारिक भरणपोषण होत असलेली माणसे असणार किंवा काही माणसांचा तसा समज असणार! आपण एवढेच म्हणू शकतो की, ती थोर माणसे असणार!
पण ज्यांना आपले वैचारिक भरणपोषण चांगल्या पद्धतीने करायचे आहे, हे जग समजून घ्यायचे आहे आणि झालेच तर इतरांनाही समजावून द्यायचे आहे, त्यांना वाचनाशिवाय पर्याय असत नाही. आपल्या वाचनावर आपली कौंटुबिक स्थिती, आई-वडलांचे संस्कार, शालेय जीवन, आजूबाजूचा परिसर, प्रसारमाध्यमे आणि आपण ज्या देशात राहतो तो देश, यांचा परिणाम होत असतो. त्यानुसार आपल्या वाचनाची वा न वाचनाची दिशा ठरत असते. पण तरीही अगदी समर्थ रामदासांची साक्ष न काढताही असे म्हणता येईल की, वाचनाची लसप्रत्येकाने टोचून घ्यायलाच हवी. त्याला उतारा नाही.
 
अनेक जण हौसेखातर वाचन करतात. शिक्षक-प्राध्यापक-पत्रकार यांना सक्तीने वाचन करावे लागते. पण टिकेकरांच्या शब्दांत थोडा फरक करून सांगायचे तर ते आपल्या लाइफ-स्टाइलमध्ये मुरलं पाहिजे’. पुढे एके ठिकाणी टिकेकर असेही म्हणतात की, ‘माझ्या मतानुसार, आपल्या आवडीच्या, निवडीच्या विषयात आवर्जून केलेलं वाचन हेचं खरं वाचन. असं वाचन हे अभ्यासया वर्गात मोडू शकतं, कारण अशा वाचनातून आपल्या तुटपुंज्या ज्ञानात भर पडू शकते.
 
थोडक्यात वाचनाबाबतही चोखंदळच असले पाहिजे. नुसत्या हौसेला निदान वाचनाच्या बाबतीत तरी मोल नाही. ज्यांना आपले ज्ञान वाढवण्याची जिगिषा आहे, त्यांच्यादृष्टीने तरी! पण ते असो.
 टिकेकरांचे ग्रंथप्रेम हे अनिवार वेडाच्या पलीकडचं आहे!
त्यांनी मी ग्रंथसंग्राहक कसा झालो, दुर्मीळ ग्रंथ-विक्रेते अन् ग्रंथ-संग्राहकांचा स्नेही कसा झालो, कोणते ग्रंथ संग्रही आले, त्या ग्रंथांनी काय दिले, कोणत्या ग्रंथांनी माझ्या विचाराची दिशा बदलली, मला मार्ग दाखवला याविषयीचे विवेचन या छोटय़ाशा पुस्तकात केले आहे.
 
या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या ग्रंथ-शोधया भागात टिकेकरांनी आपल्या 25-30 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रभर आणि अहमदाबाद, दिल्ली, गुरगाव असा शहरांमध्ये घेतलेल्या ग्रंथांच्या शोधांची रसाळ हकिगत सांगितली आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल 122 पाने दिली आहेत.
 
टिकेकरांनी ग्रंथ-शोधाचा प्रवास सांगताना मुंबईत दुर्मीळ पुस्तकं मिळणा-या ठिकाणांची सफर घडवली आहे, तशी रद्दीच्या ढिगा-यात तासन्तास घालवल्यानंतर मिळालेल्या मौलिक ग्रंथांच्याही कहाण्या सांगितल्या आहेत. महाराष्ट्रबाहेरच्या उत्तम ग्रंथ मिळणाऱ्या अड्डय़ांचाही ठावठिकाणा सांगून टाकला आहे! समानधर्मा ग्रंथ-सोबत्यांविषयीही लिहिले आहे, तसेच थोडय़ाशा उशिरामुळे गेलेल्या ग्रंथांविषयीची रुखरुखही नोंदवली आहे.
 
या पुस्तकातून एकेकाळी मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन, ‘न्यू अँड सेकंडहँड बुकशॉप’, ‘स्ट्रँड’, ग्रँट रोड स्टेशनजवळचा सेंट्रल बुक डेपो’, ‘कोकिल अँड कंपनीअसा दुकानांनी जोपासलेल्या ग्रंथसंस्कृतीचीही ओळख करून दिली आहे.
 
ग्रंथांचा शोध हा अज्ञाताच्या शोधासारखा असतो. त्यात कधी काय मिळेल याचा भरवसा नसतो. पायपीट करूनही कधी कधी हाती काहीच लागत नाही, तर कधी ज्याच्या शोधात आपण असतो त्यापेक्षा वेगळेच काहीतरी मिळते. म्हणजे दुसराच शोध लागतो. त्या मिळालेल्या पुस्तकातून आणखी नव्या पुस्तकांच्या वाटा सापडतात. मग त्यांचा शोध सुरू होतो. ही मालिका नव-नव्या आवर्तनांनिशी वाढतच राहते. त्यात कित्येक दिवस, तास आणि वर्षही जातात. टिकेकरांनी या शोधात आपल्या आयुष्याची उमेदीची २५-३० वर्षे घालवली. बऱ्याचदा त्यांना हवी ती पुस्तके मिळाली नाहीत. पण त्याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. कारण या सैल भ्रमंतीत त्यांना कितीतरी नव्या पुस्तकांच्या, ग्रंथसोबत्यांच्या ओळखी झाल्या. त्यांच्याशी आपला वाचनानंद वाटून घेता आला.
 
त्यामुळे हा प्रवास काहीसा अडनिडा झाला खरा, पण त्यातून अतिंमत: फायदाच झाला. ग्रंथांचा क्लोरोफॉर्म त्यांना धुंद करत राहिला. अर्थात ती धुंदी जगू पाहणा-यांनाच हा प्रवास करता येतो! मध्ये गळाठून जाणाऱ्यांनी या वाटेला जाऊ नये, हेही तितकेच खरे!
 
पुस्तकाच्या वाचन-बोधया दुस-या भागात, म्हणजे ३३ पानांत, ‘वाचनया विषयावर दिलेले व्याख्यान आहे. यात टिकेकरांनी त्यांना ज्या ग्रंथांनी वाचनानंद दिला,  जगाच्या अज्ञाताची गुपिते समजावून दिली, थोडक्यात ज्यांनी त्यांना प्रभावित केले, त्या ग्रंथांविषयी लिहिले आहे. यासोबत वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी काय करायला हवे, तिचे फायदे काय, याचाही थोडक्यात ऊहापोह केला आहे. ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज का असते, तो नसला तर काय होते, असला तर काय होते याविषयी सांगत स्वत:च्या वाचनप्रवासाचा चढता आलेख सांगितला आहे.
 
काव्य, कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, तत्त्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पायऱ्या आहेत, असं मला वाटतं,’ असे त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. तो त्यांचा स्वानुभव आहे, तसाच ते जे आजवर वाचन करत आले आहेत, त्यातून त्यांना सापडलेला निष्कर्षही आहे. तो फार मोलाचा आहे. कारण जगात दर मिनिटाला कुठे ना कुठे एक तरी पुस्तक प्रकाशित होते. आपण कितीही ठरवले तरी, अगदी रात्रीचा दिवस करायचा ठरवले तरी, ती सारी पुस्तके वाचणे एका आय्मुष्यात कुणालाच शक्य नाही. (ज्यांचा पुनर्जन्मनामक गोष्टींवर विश्वास आहे, त्यांना दहा जन्म घेऊनही ते शक्य होणारे काम नाही!) आणि त्याची गरजही नसते. मराठीतलीही अगदी सुरुवातीपासूनची सर्व पुस्तके वाचणेही शक्य नाही. आणि वाचूही नयेत. कारण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो. इतिहासकार शेजवलकरांच्या शब्दांत सांगायचे तर सर्व जन्म एकच एक काम करन्यांत घालविणें हीहि समाजविकृति होय.
 
वाचन हे शेवटी जगाचे आकलन करून घेण्याचे साधन असते. पण हे साधनही योग्य प्रकारे वापरण्याची गरज असते. त्यासाठी मोठा विवेक असावा लागतो. तो कमवायचा कसा, त्याचा प्रवास नेमका कसा व्हायला हवा याचे वस्तुपाठ टिकेकरांच्या या पुस्तकात जागोजागी भेटतात. म्हणून हे पुस्तक मराठीमधील बुक ऑन बुक्सया प्रकारातले एक सर्वोत्तम पुस्तक आहे.
 
2005 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या आतापर्यंत तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या, हा त्याचा पुरावा आहे!
 टिकेकरांना त्यांच्या वाचन-प्रवासात कुणी ग्रंथ-मार्गदर्शक मिळाला नाही. गोविंद तळवलकरांनी अ लिस्ट ऑफ बुक्स फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रीडिंगही एम. एम. रॉय यांनी प्रगत वाचकांसाठी तयार केलेली ग्रंथांची यादी दिली. ती वगळता टिकेकरांनी ग्रंथांनाच वाट पुसत आपला वाचन-प्रवास घडवला’, प्रशस्त केला.
पण प्रस्तुत पुस्तक लिहून मात्र टिकेकरांनी मराठी वाचकांना ऋणको करून ठेवले आहे. कारण ज्यांना आपली वैचारिक प्रगती करून घ्यायची आहे, किमान काय वाचावे, कसे वाचावे याचा साक्षेप कमवायचा आहे, त्यांच्यासाठी टिकेकरांचे हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. तेव्हा या गुरूचा गंडाबंद शिष्यहोणे अनिवार्य आहे!
 
  • अक्षरनिष्ठांची मांदियाळी : अरुण टिकेकर
  • रोहन प्रकाशन, पुणे
  • पाने : 173, किंमत : 140 रुपये

No comments:

Post a Comment