Sunday, February 26, 2012

भाषेबाबतच्या या अनास्थेला जबाबदार कोण?

'बाळासाहेब एक फतवा काढा..मराठी बोला!असा लेख ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी आठ-दहा वर्षापूर्वी लिहिला होता. अशी सक्ती करून काही उपयोग होतो का, हा वेगळा मुद्दा आहे. पण मराठीविषयीची तीव्र चिंता साधूंनी या लेखात व्यक्त केली होती. आणि त्या चिंतेतूनच त्यांनी मराठी बोलण्यासाठी फतवा काढण्याची भाषा केली होती! पण मराठीच्या भवितव्याविषयी फार चिंतातुर न होताही काही गोष्टींचा विचार करता येईल. किमान भाषिक कौशल्ये आणि शब्दकोशांची निर्मिती यांच्याबाबतीत सध्या काय स्थिती आहे?  

भाषिक कौशल्यांबाबतची अनास्था
बोलणे, ऐकणे, वाचणे आणि लिहिणे ही चार प्राथमिक भाषिक कौशल्ये मानली जातात. ही कौशल्ये विकसित करण्याचे काम प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर टप्प्याटप्प्याने व्हायला हवे. त्याचवेळी  साहित्याने त्याला समांतर जबाबदारी निभवायला हवी. पण या पातळीवरही प्रचंड अनास्था दिसते. परिणामी कितीही पदव्या संपादन केल्या तरी तरुणांची भाषा समृद्ध होत नाही. नुसत्या शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होईल असे नाही आणि त्याची भाषा-संपन्न होईल असेही नाही!
 
उत्तम श्रोता, चांगला वाचक, बरा वक्ता आणि जेमतेम लेखक असे ऐकणे, वाचणे, बोलणे आणि लिहिणे या भाषिक कौशल्याचे पर्यवसान व्हायला हवे. शिक्षणाचे हेच उद्दिष्ट असायला हवे. कारण तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाणार असा, कोणतीही नोकरी वा व्यवसाय करणार असा, ही कौशल्ये तुम्ही आत्मसात केलीच पाहिजेत. पण जनमानसाचा कानोसा घेतल्यावर याचा फारसा प्रत्यय येताना दिसत नाही. सार्वजनिक समारंभ-संमेलने-चर्चासत्रे या ठिकाणी लोकांना जेव्हा काही शंका असल्यास वा प्रश्न असल्यास विचारा असे सांगितले जाते, तेव्हाची गंमत पाहण्यासारखी असते. बहुतांश जणांना आपल्याला नेमकेकाय म्हणायचेय, आपला नेमका प्रश्न काय हेच सांगता येत नाही. ते इतका पाल्हाळ लावतात की, तुमचा नेमका प्रश्न काय असे पुन्हा पुन्हा विचारावे लागते. प्रश्न विचारण्यातून शहाणपण कळते, तर उत्तरातून हुशारी कळते, असे म्हणतात! पण या शहाणपणाचे दर्शन सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अभावानेच दिसते.
 
वाचनाच्या बाबतीतही अशीच त-हा आहे. अनेकांना काय वाचावे हेच आयुष्यभर कळत नाही. त्यासाठी कुणा चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा असेही त्यांना वाटत नाही. परिणामी ही माणसे आयुष्यभर कविता-कथा-कादंबऱ्याच वाचत राहतात. मला फक्त विज्ञान कादंब-या आवडतातकिंवा मला अर्नाळकरांच्या कादंब-या आवडतात’, असे जेव्हा लोक सांगतात तेव्हा यांना काय वाचावे?’ हेच बहुधा कळलेले दिसत नाही याची खात्रीच पटते. वय आणि वाचन यांची सांगड तर अनेकांना घालता येत नाही.
 
जेमतेम लेखक म्हणजे किमान चार ओळींचे चांगले पत्र लिहिता येणे. पण हेही अनेकांना जमत नाही. थोडक्या शब्दांत बरेच काही सांगता येते. पण तो कौशल्याचा आणि भाषाप्रभुत्वाचा भाग असतो. पण हा साक्षेप साधे पत्र लिहिण्यापासून ते कथा-कादंबऱ्यांपर्यंत कुठेच फारसा पाळला जाताना दिसत नाही. मराठी साहित्यिकांना व प्राध्यापकांना हे किमान कौशल्य अवगत करता येत नाही, याचे पुरावे त्यांच्या लेखनातून, भाषणांतून आणि बोलण्यातून मिळत राहतात! साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची छापील भाषणे यासंदर्भात पाहण्यासारखी आहेत.

 थोडक्यात बोलणे, ऐकणे, वाचणे आणि लिहिणे ही प्राथमिक भाषिक कौशल्ये प्राथमिक पातळीवरच कच्ची राहतात. त्यामुळे त्याचे भयावह परिणाम आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. भाषा-विवेक नसलेल्या समाजामध्ये कोशवाङ्मयाची निर्मिती आणि त्यांचे महत्त्वही दुर्लक्षिलेच जाणार!
 
इच्छाशक्तीचा अभाव
मराठीमध्ये कोशवाङ्मयाची समृद्ध म्हणावी अशी परंपरा आहे. ज्ञानकोश, संस्कृतिकोश, चरित्रकोश, व्यायामकोश, समाजविज्ञान कोश, महाराष्ट्र शब्दकोश, सरस्वती कोश, अशी मोठमोठी कामे एकेकाळी झाली.  

श्री. व्यं. केतकरांनी १९२० ते १९२७ या आठ वर्षात ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. हा कोश केवळ विषयसंग्रह कोश ठरू नये, तर तो महाराष्ट्राच्या भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक राजकीय उलाढालींचे साधन ठरावा, अशी केतकरांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे त्यांनी त्याची रचना केली. हिंदुस्थान आणि जगया त्यांच्या प्रस्तावना खंडावरून त्यांची कल्पना येते. पण केतकरांच्या कामाची बूज त्यांच्या हयातीत राखली गेली नाही आणि त्यानंतरही. अतिशय हालअपेष्टा सोसून केतकरांनी ज्ञानकोशतयार करून मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण नंतरच्या काळात त्यांच्या ज्ञानकोशाची नवी सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यासाठीही कुणी पुढे येऊ शकले नाही. तशी इच्छाही कुणाला झाली नाही.
 
मराठी विश्वकोशाची काय स्थिती आहे हे आपण गेली ४०-५० वर्षे पाहतोच आहोत. या काळात जग ज्या गतीने बदलले आहे, त्याचा आवाकाच या विश्वकोश नामक मंडळाला उमगत नसल्याने तो कधीच कालबाह्य झाला आहे. पण त्यामुळे ब्रिटानिका एन्सायक्लोपिडिआया जगातील सर्वात मोठय़ा कोशाचा आदर्श समोर असलेल्या विश्वकोशाची अवस्था लाजीरवाणी म्हणावी अशी झाली आहे!
 
अशीच परिस्थिती शब्दकोशांची आहे. वेगवेगळ्या शब्दांचे कोश त्या भाषेत नव-नव्या शब्दांची भर घालण्याचे काम करीत असतात. त्यामुळे शब्दकोशांची संख्या जास्त असायला हवी. भाषा समृद्ध करण्यासाठी ते आवश्यक असतात. पण चांगले शब्दकोशच नसतील तर ते होणार कसे? सध्या बाजारात उपलब्ध असलेला कुठला इंग्रजी-मराठी शब्दकोशउत्तम म्हणावा असा आहे, या प्रश्नांचे उत्तम फारसे समाधानकारक नाही. कारण या कोशांच्या नव्या सुधारित आवृत्त्या, पुरवण्या ज्या सातत्याने प्रकाशित व्हायला हव्यात, त्यांच्या अद्ययावतीकरणाचे जे प्रयत्न व्हायला हवेत, तेच होताना दिसत नाहीत. त्यामुळे सोवनी, नवनीत आणि ऑक्सफर्ड मराठी हेच तीन कोश वापरावे लागतात. पण हे तीनही कोश फारच अपुरे आहेत, मात्र त्यांच्याशिवाय पर्यायही नाही! अशीच परिस्थिती इंग्रजी-मराठी आणि मराठी-मराठी या शब्दकोशांचीही अवस्था आहे. मराठी-मराठी शब्दकोशामध्ये प्र. न. जोशी यांचा आदर्श मराठी शब्दकोशहाच काय, तो त्यातल्या त्यात चांगला म्हणावा असा कोश. पण तोही बहुतेकांना माहीत नसावा.
 
थोडक्यात, अलीकडच्या काळात कोशवाङ्मयाची निर्मिती खूपच रोडावली आहे. शब्दकोश, वाक्यसंप्रदाय कोश, संज्ञा-संकल्पना कोश अशा चढत्या क्रमांच्या कोशांची सतत निर्मिती होणे आणि त्यांच्या सुधारित आवृत्त्या प्रकाशित होणे हा भाषेच्या समृद्धीचा आणि वाढीचा उत्तम पर्याय असतो. पण तेही होताना दिसत नाही. मग भाषिक वृद्धी व समृद्धी होणार तरी कशी?
 
मराठी भाषेची परवड
 भाषा ही सतत प्रवाही असते. त्या प्रवाहाला तुम्ही कसे वळण देता, यावर तिची वृद्धी आणि समृद्धी होत जाते. नुसत्या साहित्याने भाषेची वाढ आणि समृद्धी होत नाही. दर्जेदार साहित्य फक्त भाषेला स्थिरत्व देते, असे मराठी भाषा - उद्गम आणि विकासकर्ते कृ. पां. कुलकर्णी यांनी म्हटले आहे ते खरेच आहे.
भाषा समृद्ध होण्यासाठी आणि तिचा प्रवाह सतत सशक्त होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. काळाच्या गतीनुसार भाषा बदलत असते आणि समाजही. त्यामुळे त्या गतीने भाषेमध्ये नव्या नव्या शब्दांची-संज्ञा-संकल्पनांची निर्मिती होणे गरजेचे असते. जागतिकीकरणाच्या गेल्या वीस वर्षात समाजजीवनात जे आमूलाग्र म्हणावे असे बदल झाले आहेत, त्या तुलनेत मराठी भाषेमध्ये किती नव्या शब्दांची-संज्ञा-संकल्पनांची भर पडली आहे? भरपूर इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरल्याने ती आजच्या काळाची भाषा होत नाही. पण नव्वदोत्तर काळात लिहू लागलेल्या कवींनी आणि लेखकांनी इंग्रजाळलेल्या शब्दांचा-वाक्यप्रयोगांचा इतका धुडगूस घातला आहे की विचारू सोय नाही!
 
पण त्याहून भयानक आहेत, ते या भाषेलाच आजच्या काळाची भाषा म्हणून तिचा पुरस्कार करणारे बुद्धिजीवी. पोस्ट-मॉडर्निझम नावाच्या शेंडाबुडखा नसलेल्या उठवळ संकल्पनेचा विनाकारण गवागवा आणि पुरस्कार करून या लोकांनी आपला भाषाविवेककधीच गमावला आहे! पण दुर्दैवाने याच लोकांकडे छापील माध्यमे असल्याने मराठी भाषेची परवड चालूच आहे.
 
सर्वसामान्यांना पचेल, रूचेल आणि समजेल अशा भाषेत लिहिण्याऐवजी हे लोक केवळ स्वत:च्या पांडित्याचे प्रदर्शन करण्यासाठीच लिहीत असतात! परिणामी विनाकारण अगम्य शब्द, वाक्यरचना आणि संकल्पना वापरून वाचकांना घाबरून टाकतात. त्यावर आमच्या डोक्यावरून गेले, म्हणजे तुम्ही चांगलेच लिहिले असणारअशा चतुर प्रतिक्रिया देऊन वाचक मोकळे होतात, पण त्याचा सोयीस्कर अर्थ घेऊन हे पंडितस्वत:चीच पाठ थोपटून घेत राहतात!!
 
यांची अशी, त्यांची तशी त-हा!
 सर्वाना समजेल अशा भाषेत लिहिणे ही फारच कठीण गोष्ट असते म्हणा! सरकारी पातळीवरचे मराठी, प्राध्यापकी मराठी आणि सर्वसामान्यांकडून बोलले जाणारे मराठी अशा प्रमाण मराठीच्या तीन तीन त-हा पाहायला मिळतात, त्या याचमुळे. शुद्धलेखनाच्या नियमांविषयीही एकमत न होण्याचे कारणही हेच आहे. परिणामी सरकारी आणि प्राध्यापकी मराठीचा सर्वसामान्यांच्या मराठीशी काही संबंध राहिलेला नाही आणि सर्वसामान्यांच्या मराठीला बुद्धिजीवी वर्गाकडून कमी लेखले जाते.
 
नव्या शब्दांची निर्मिती सर्वसामान्यांकडूनही होत असते, याचे भान आपल्याकडच्या भाषेच्या अभ्यासकांना तरी कितपत आहे कोण जाणे! फ्लॉवरया इंग्रजी शब्दाचे फुलवरअसे मराठी रूप केले गेले. ते कुणा मराठी साहित्यिक, प्राध्यापक वा भाषाशास्त्राच्या अभ्यासकाने केले नाही; तर ग्रामीण भागातल्या अशिक्षित जनतेने केले. असे अनेक शब्द एरवी अडाणी, निरक्षर आणि खेडुत म्हणवणारे लोक घडवत असतात. पण याकडे आपल्याकडचे बुद्धिजीवी लक्ष देत नाहीत. भाषेची वृद्धी फक्त आपलीच मक्तेदारी आहे असा समज करून घेतल्याने सर्वसामान्य जनतेने घडवलेल्या असा शब्दांना शब्दकोशात स्थान मिळत नाही. आणि शब्दकोशातील शब्द सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्नही पुरेशा प्रमाणात केले जात नाहीत.

 संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पदनामकोशतयार करण्यात आला. तो नव्या शब्दांच्या निर्मितीचा तसा चांगला प्रयत्न होता. त्यातील काही शब्द आता समाजमान्य झाले आहेत. पण या कोशाची बदनामी करण्याचा आणि त्याची टिंगलटवाळी करण्याचा विडा, तेव्हा काही मराठी साहित्यिकांना उचलला होता! खरे तर या पदनामकोशातले चांगले शब्द ठेवून बाकी शब्दांना नव्याने पर्याय शोधायला हवे होते. जेणेकरून ते शिष्टसंमत झाले असते. पण तसा प्रयत्नही कुणी केला नाही.
 
खेडय़ापाडय़ातल्या बायाबापडय़ा काबाडकष्ट करून पै-पैसा जमून, अनंत व्यवधाने असतानाही प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन हौसेने एखादा दागिना सोनाराकडून घडवून घेतात. आणि मग तो अभिमानाने अंगावर मिरवतात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तृप्त समाधान पाहायला मिळते. मराठी भाषेत नव्याने घडवल्या जाणाऱ्या एकेका शब्दालाही अशीच श्रमाच्या घामाची तुरट-खारट चव आल्याशिवाय आणि ते दिमाखाने मिरवल्याशिवाय त्यांना ऐश्वर्य मिळणार नाही, त्यांचा प्रसार होणार नाही आणि ते प्रचलितही होणार नाहीत.
 
इंग्रजीमध्ये दरवर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीची सुधारित आवृत्ती प्रकाशित होते. तेव्हा, यंदा त्यात जगभरातल्या भाषांमधील कोणकोणते शब्द जशाचे तसे स्वीकारण्यात आले आहेत, याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होतात. भारतीय आणि मराठी वृत्तपत्रांमध्येही या बातम्या येतात! असा शब्दकोश मराठीमध्ये का असू नये? आमचा सारा जोर इंग्रजीला विरोध करण्यात आणि मराठीच्या नावाने कंठशोष करण्यातच किती दिवस खर्च होणार आहे?

 भाषेच्या समाजशास्त्राकडे आणि भाषाशास्त्राकडे मराठी साहित्यिक-प्राध्यापक-पत्रकार-शिक्षक असे सर्वच बुद्धिजीवी घटक दुर्लक्ष करत असल्याने मराठी भाषेविषयीची अनास्था दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोंबडी अंडं घालते पण कलकलाट करते ब्रह्मांड घातल्यासारखाअसे मार्क ट्वेन या अमेरिकन लेखकाने म्हटले आहे. मराठीच्या भवितव्याची आणि मराठी वाचवा, मराठी वाचवाअसा कंठशोष करणा-यांची त-हा यापेक्षा वेगळी नाही!

1 comment:

  1. उत्तम श्रोता, चांगला वाचक, बरा वक्ता आणि जेमतेम लेखक असे ऐकणे, वाचणे, बोलणे आणि लिहिणे या भाषिक कौशल्याचे पर्यवसान व्हायला हवे.- great quote.

    ReplyDelete